"कुंग-फू पंड्या" हे नाव ऐकलं किंवा वाचलं, की बहुतांश क्रिकेट प्रेमींना एकच व्यक्ती आठवते. मिश्कील हसणारा, मस्कऱ्या स्वभावाचा हार्दिक पंड्या...
Instagramच्या एका क्लिपमध्ये हार्दिकने 'कुंग फू पांडा' या प्रसिद्ध व्यक्तिरेखेचे कपडे घातले होते. तेव्हापासून त्याला "कुंग फू पंड्या" हे टोपण नाव मिळालं. हार्दिकचं क्रिकेटप्रेम त्याच्या वडिलांना त्याच्या लहानपणीच लक्षात आलं होतं. हार्दिकची ही आवड जोपासायला त्याच्या वडिलांनी सूरतेहून वडोदरेला स्थलांतरण केलं आणि तिथल्या किरण मोरे अकादमीमध्ये हार्दिक पंड्या नावाच्या हिऱ्याला पैलू पाडण्याचं काम सुरू झालं...
तिथल्या क्लब क्रिकेटमध्ये हार्दिक चांगली प्रगती दाखवत पुढे गेला. हार्दिक त्या वेळी वडोदरा संघाकडून खेळायचा. २०१३ साली सय्यद मुश्ताक़ अली ट्रोफीच्या अंतिम सामन्यात खेळताना हार्दिकने वडोदरा संघातर्फे नाबाद ८६ धावा केल्या ज्यात सहा उत्तूंग षटकारांचाही समावेष होता. हार्दिकच्या याच कामगिरीच्या जोरावर वडोदरा संघाने विदर्भ संघाला हरवत ट्रोफी मिळवली आणि हार्दिक सर्वांच्या नजरेत आला. यापुढे हार्दिकची पुढची पायरी होती IPL, म्हणजेच Indian Premier League...
T20 या क्रिकेटच्या छोटेखानी स्वरूपाच्या IPL नावाच्या महास्पर्धेत हार्दिकची मुंबई इंडियन्स संघात वर्णी लागली. मुंबई संघातर्फे खेळताना हार्दिकने अनेक स्फोटक खेळी करून रसिकांची दाद मिळवली. कायरन पोलार्डसोबत मोक्याच्या क्षणी भागिदाऱ्या रचून हार्दिकने मुंबई इंडियन्सला अनेक विजय मिळवून दिले. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या ३१ चेंडूत ६१ धावा, ही हार्दिकची IPLमधली सर्वोत्तम खेळी ठरली. २०२२च्या सुरुवातीला मुंबईने हार्दिकला निरोप दिल्यावर गुजरात टायटन्स या नव्या संघाचं कर्णधारपद त्याच्याकडे आलं. हार्दिकच्या कुशल नेतृत्वाने आणि त्याच्या उंचावलेल्या कामगिरीने गुजरात टायटन्स, IPL २०२२चा विजेता संघ बनला...
IPL मधल्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर २०१६मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या T20 सामन्यात पदार्पण करण्याची संधी हार्दिकला मिळाली. तोपर्यंत हार्दिक एक उत्तम अष्टपैलू खेळाडू म्हणून प्रसिद्ध झाला होता. २०१६च्या T20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध फक्त आठ धावात तीन मोलाचे बळी मिळवून त्यांना ८३ धावांवर रोखण्यात हार्दिकने मोलाचा वाटा उचलला. ऑस्ट्रेलिया विरुद्ध हार्दिकेने ३१ चेंडू साकारलेल्या स्फोटक ७१ धावांची खेळी त्याची सर्वोत्तम खेळी होती. अर्थात तो सामना भारताने गमावला खरा, पण हार्दिकची खेळी मात्र स्मरणात राहिली...
२०१६ हे वर्ष हार्दिकसाठी महत्वाचं ठरलं. कारण याच वर्षात T20 पाठोपाठ एक दिवसीय अंतरराष्ट्रीय सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध पदार्पणाची संधी हार्दिकला मिळाली. आजवर खेळल्या गेलेल्या त्याच्या ६२ एक दिवसीय सामन्यात हार्दिकच्या नावे सात अर्ध शतके आहेत, पण अजून त्याला शतकाला गवसणी घालता आली नाही. ऑस्ट्रेलिया विरुद्धची नाबाद ९२ धावांची फटकेबाज खेळी हार्दिकची सर्वोत्तम खेळी ठरली. T20 आणि एक दिवसीय सामन्यांमध्ये हार्दिक कमाल करतच होता. पण पारंपारिक कसोटी क्रिकेटपासून तो वंचित राहत होता. २०१६च्या हंगामात इंग्लंड विरुद्ध मालिकेसाठी हार्दिकची निवड झाली होती, पण त्याला खेळण्याची संधी मिळाली ती श्रीलंकेच्या मालिकेत. याच मालिकेच्या तिसऱ्या कसोटीत हार्दिकने आपलं पहिलं कसोटी शतक झळकवताना जबरदस्त फलंदाजी तर केलीच, शिवाय जेवणापूर्वी शतक ठोकणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू, असा विक्रमही केला...
२०२०-२१चा हंगाम हार्दिकसाठी वाईट काळ ठरला. त्याच्या पाठीच्या दुखण्यामुळे तो संघातून सतत आत-बाहेर करत राहिला. त्याने गोलंदाजी करणं बंद केलं होतं, पण त्याचा फलंदाजीचा फॉर्मही ढासळत गेला. २०२१च्या T20 विश्वचषकात हार्दिकच्या याच खराब कामगिरीचा मोठा फटका भारतीय संघाला बसला. संघाला पाकिस्तानकडून विश्वचषकातला पहिला पराभव स्वीकारावाला लागला आणि सोबत भारताला उपांत्य फेरीही गाठता आली नाही. त्यानंतर बराच काळ संघाबाहेर राहून हार्दिकने स्वत:च्या फिटनेस व फॉर्मवर मेहनत घेतली. हार्दिकची ही मेहनत फळाला आली आणि २०२२ मध्ये हार्दिकने धडाकेबाज पुनरागमन केलं...
हार्दिक पंड्या रुबाबदार आहेच, पण वागण्या-बोलण्यातला रुबाब जरा कमी केला आणि संघाबद्दल आणि सह-खेळाडूंबद्दलची वागणूक बदलली तर हार्दिकमध्ये महान खेळाडू बनण्याची क्षमता नक्की आहे. आज ११ ऑक्टोबर. भारतीय संघाच्या या भरवशाच्या अष्टपैलू खेळाडूचा आज वाढदिवस. जिगरबाज हार्दिकला वाढदिवसाच्या चौकार-षटकारमय शुभेच्छा...
Happy Birthday Kung Fu Pandya...
@ अनिकेत परशुराम आपटे.
.jpeg)
.jpeg)

.jpeg)
.jpeg)