Sunday, June 24, 2018

अगडम् बगडम्...



सोसाट्याचा वारा सुटला होता. अंधारातून वाट काढत बर्फाच्या मोठ्या वाळवंटातून दोघंजण पुढे जात होते. एक हातात जाडजूड काठी घेतलेला, अंगावर घोंगडी असलेला असा ताकदवान गडी होता. तर दुसऱ्याने हातात बाक आलेली काठी धरली होती आणि ती व्यक्ती कमरेत बऱ्यापैकी वाकली होती. बर्फाने झाकलेली एक टेकडी समोर आली आणि दोघं थांबले. दुसऱ्याने एक चादर जमिनीवर हंतरली. त्यावर पाण्याने भरलेलं वाडगं ठेवत काहीतरी पुटपुटलं. बघता बघता वाडग्यातलं पाणी हलायला लागलं. पाण्याचा रंग काळा पडला आणि त्यातून एक वीज निघून समोरच्या टेकडीवर आदळली. जमीन हादरू लागली. टेकडीवरचा बर्फ गळून पडला आणि टेकडीचं रूप पालटलं. समोर दिसू लागली राक्षसाचं तोंड असलेली एक प्रचंड मोठी गुहा...

दुसऱ्याने पहिल्या माणसाला इशारा केला. तो पहिला माणूस आत गेला. पुढे जात असताना त्या माणसाने पाहिलं तर सर्वत्र बर्फच बर्फ होता. बर्फाच्या भिंतीत त्याचं प्रतिबिंबपण दिसत होतं. हळू हळू पुढे जाताना तो माणूस एका वनाशी पोहोचला. भीत भीत त्याने वनात प्रवेश केला. आजू-बाजूला चकाकणारी झाडं होती. त्याशिवाय दुसरं काहीच दिसत नव्हतं. चित्रविचित्र आवाज येऊ लागले. कुठे ओरडण्याचा आवाज तर कुठे पानांची सळसळ, कुठे सापाचा "फस..." असा आवाज तर कुठे वाघाची डरकाळी होती. तो माणूस खूप घाबरला. काही वेळ उभा राहिला. कानोसा घेऊन तो पुढे जाणार इतक्यात त्याला मागून कोणीतरी बोलावलं. त्याने मागे पाहिलंमात्र... सगळा अंधार झाला. जमिनीला फट पडली आणि, "आऽऽऽ..." असं ओरडत तो माणूस त्यात पडून नाहीसा झाला...

ओरडण्याचा आवाज ऐकून गुहेबाहेर असलेल्या दुसऱ्या व्यक्तीने आत डोकावलं. वाऱ्यासरशी त्याच्या अंगावरची चादर दूर झाली आणि समोर दिसली मोठमोठ्या काजळ लावलेल्या डोळ्यांची, ओबडधोबड चेहऱ्याची, वाकलेली लांबच लाब नखं असलेली एक चेटकीण. ती म्हणाली, "काय माझं मेलीचं नशीब... एकही जण ही गुहा पार करेल तर शपथ... कोणी पाताळातच गेला तर कोणाचं भस्मच झालं... काय करू वेताळा काही समजत नाही..." ती बोलत असतानाच जोरदार वाऱ्याच्या झोतासरशी ती चेटकीण गुहेबाहेर पडली. गुहेच्या तोंडाचा तो राक्षस मोठ्या आवाजात म्हणाला, "चेटके... तू आणलेला कोणीच मला पार करू शकला नाही... माझ्यातल्या विचित्र गोष्टीच देतील याची ग्वाही... आता आण असा माणूस जो मला करेल पार... तोच ठरेल तुझा तारणहार..." हे बोलत असताच ती गुहा लुप्त झाली पुन्हा बर्फाचं वाळवंट सभोवार दिसू लागलं...

थंडगार वाऱ्यात ती चेटकीण कुडकुडत म्हणाली, “म...मी आहे ठकी चेटकीण... मला व्हायचंय अमर... त्यासाठी मला हवेत त्या राक्षसाच्या घामाचे थेंब... त्या राक्षसाचा वाडा आहे त्या गुहेच्या पल्याड... मी ही अशी म्हातारी, गुहा पार करताना मोडणार नाही का माझं हाड... आता वेताळालाच पाचारण करते... तोच दाखवील मजं रस्ते...” असं म्हणत ठकीने आपली चादर पसरली. त्यावर वाडगं ठेऊन त्यात पाणी भरलं आणि जोरजोरात मंत्र म्हणू लागली “अगडम् बगडम्... अगडम् बगडम्... वेताळा वेताळा दाखव तिगडम्... आणील जो दाणे अमृताचे... पाहूदे मजं रूप त्याचे...” वाडग्यातलं पाणी हलू लागलं आणि त्यातून एक वीज निघून आकाशात नाहीशी झाली. मोठ्ठा गडगडात झाला आणि आकाशात दिसू लागला वेताळाचा अक्राळ विक्राळ चेहरा. मोठमोठ्याने हसत वेताळ म्हणाला, “हा... हा... हा... ठके ठके कशाला बोलावलंस मला... जे तू मिळवू शकली नाहीस असं काय हवंय तुला...”

ठकी म्हणाली, “वेताळा वेताळा, मला व्हायचंय अमर... त्यासाठी हवेत राक्षसाच्या घामाचे थेंब... राक्षस राहतो त्या गुहेच्या पलिकडे... मी अशी म्हातारी कशी बरं जाऊ तिकडे... दाखव मला असा कोणी, ज्याकडे असेल शक्ती व युक्तीचे देणे... जो पार करून ती गुहा... आणेल ते अमृताचे दाणे...” वेताळ आपले मोठ्ठे हात हवेत फिरवू लागला. आकाशात विजा चमकू लागल्या. एक वीज पाण्याच्या वाडग्यात पडली. काही क्षणात वेताळ म्हणाला, “सापडला ठके सापडला तुझा माणूस... पार तिकडे दक्षिणेला... आहे सुंदरनगर... तिथेच राहतो हा शंकर... वापर तुझी युक्ती, कर त्याचे मन काबीज... तोच आणून देईल तुला, तुझ्या अमरत्वाचे बीज...” ठकीने पाण्यात पाहिले. तिला शंकरचा चेहरा दिसला. वेताळ एकाएकी गायब झाला आणि ठकी “ही... ही... ही...” अशी किळसवाणी हसू लागली...

तिकडे दक्षिणेला डोंगरांच्या पायथ्याशी आणि समुद्राच्या किनाऱ्याशी वसलेलं सुंदरनगर खरंच खूप सुंदर होतं. नगराचा राजा सुंदरसेन व राणी रूपमती खूप दयाळू आणि प्रेमळ होते. आपल्या प्रजेला मदत करायला ते नेहमी तयार असायचे. त्यांची एकुलती एक कन्या राजकुमारी मोहिनी नुकतीच वयात आली होती. दिसायला नक्षत्रासारखी, आवाज तिचा कोकिळेसारखा आणि स्वभावाने अत्यंत नम्र अशी राजकुमारी मोहिनी सर्वांना खूप आवडायची. ती उपवर झाली तेव्हा प्रधानांनी तिच्या स्वयंवराचा प्रस्ताव राजासमोर ठेवला. राजाला हा प्रस्ताव आवडला त्याने स्वयंवरासाठी आजूबाजूच्या सर्व राजकुमारांना आमंत्रित केलं. राजकुमारी मोहिनी म्हणाली, “पितामहाराज, आपण माझ्या विवाहासंदर्भात विचार करताय हे योग्यच आहे पण मी अशी तशी नाही कोणाची निवड करणार... स्वयंवरात एक परीक्षा असेल... जो त्या परीक्षेत खरा उतरेल... तोच माझ्या मनी वसेल...”

राजकुमारी मोहिनीच्या स्वयंवराची आणि ती घेणार असलेल्या परीक्षेची बातमी नगरात सर्वत्र पसरली. त्याच नगरात शंकर राहत होता. देखणा, बलदंड, उंचपुरा असा शंकर लाकडाच्या मोळ्या विकून आपला उदरनिर्वाह चालवी. जंगलात लाकडं गोळा करत असताना एक-दोनदा त्याने घोडदौड करणाऱ्या राजकुमारी मोहिनीला पाहिलंही होतं. मोहिनीबद्दल त्याच्या मनातही प्रेम होतंच. तो नेहमी स्वप्न पहायचा, “जर राजकुमारी आणि माझं लग्न झालं तर... कित्ती मज्जा येईल...” स्वयंवराचा दिवस उजाडला. तो सोहळा पाहण्यासाठी शंकर इतर सर्वांसोबत राजवाड्यात दाखल झाला. राजवाड्याच्या मागच्या पटांगणात सर्व व्यवस्था केली होती. एकाबाजूला राजा, राणी आणि राजकुमारी बसले होते. एका बाजूला आमंत्रित राजकुमार बसले होते आणि एका बाजूला समस्त जनता. पण त्या पटांगणात काय होणार हे कोणालाच ठाऊक नव्हतं...

प्रधानांनी इशारा करताच घोषणा झाली, “महाराजांचा विजय असो... आज राजकुमारी मोहिनी यांच्या स्वयंवराचा दिवस उगवला आहे... मोहिनीदेवी आजच्या दिवशी त्यांचा भावी जोडीदार निवडणार आहेत. त्यासाठी त्या परीक्षा घेणार आहेत. त्या परीक्षेविषयी मोहिनीदेवीने सर्वांना सांगावं अशी त्यांस नम्र विनंती...” घोषणा संपली आणि राजकुमारी मोहिनी उठून उभी राहिली. एकवार सर्वांकडे पाहत म्हणाली, “पितामहाराज आणि मातोश्रींना प्रणाम आणि समस्त आमंत्रितांचे स्वागत. आज मी जी परीक्षा पाहणार आहे त्यात शक्ती आणि युक्ती दोघांचाही कस लागणार आहे. जो कोणी होईल पारंगत या परीक्षेत... तोच मिळवील स्थान माझ्या मनाच्या कक्षेत...” बोलत असताना मोहिनीने टाळी वाजवली. पटांगणाच्या दोन टोकांना असलेल्या दोन पिंजऱ्यांची दारं उघडली आणि सात फुटी ऊंच व ताकदवान असलेले दोन राक्षसवजा इसम समोर आले. मोहिनी म्हणाली, “परीक्षेचा पहिला भाग आहे या दोन शस्त्रधारी योध्यांना हरवणं आणि दुसरा भाग म्हणजे मला स्पर्श न करता माझ्या डोळ्यात पाणी आणणं...”

पटांगणात फेऱ्या मारणाऱ्या त्या अजस्र माणसांना पाहून सर्वांनी तोंडात बोटं घातली. शिवाय “स्पर्श न करता डोळ्यात पाणी... अशक्य...” अशी कुजबूज सुरू झाली. आमंत्रित राजकुमारांपैकी एकेक पुढे होऊ लागला पण त्या योद्धयांपुढे कोणीच काही करू शकलं नाही. बिचारे खाली मान घालून तिथूनच राजवाड्याबाहेर निघून गेले. बघता बघता सर्व राजकुमार आपापल्या वाटेने निघून गेल्यावर समस्त जनतेत शांतता पसरली. प्रधान म्हणाले, “महाराज, हे तर मोठं अघटित घडलं... स्वयंवरात कोणाचीच निवड झाली नाही... निकालाविनाच हा समारंभ संपवायचा का...” सगळे विचारात पडले. “महाराजांचा विजय असो...” शांतता भेदणारा हा आवाज जनतेच्या दालनामधून आला. सर्वांनी तिथे पाहिलं तर शंकर त्याच्या जागेवर उभा होता. शंकरचा देखणा चेहरा, पिळदार शरीर आणि तेजस्वी डोळे पाहून मोहिनीने स्मित केलं. शंकर म्हणाला, “महाराज, आपली आज्ञा आणि राजकुमारीची परवानगी असेल तर मी परीक्षा द्यायला तयार आहे...”

महाराजांनी एकवार मोहिनीकडे पाहिलं. तिचा हसरा चेहरा पाहून त्यांनी शंकरला लगेच अनुमती दिली. महाराजांचा आज्ञेचा हात दिसताच शंकरने उभ्या जागेवरून पटांगणात उडी घेतली ती थेट त्या दोन योद्ध्यांच्या मधोमध. आपली कुऱ्हाड सरसावत त्याने एकेकदा दोघांकडे पाहिलं. इशारा होताच दोन्हीही योद्धे शंकरकडे धावत आले. आपल्या कुऱ्हाडीने शंकरने काही काळ त्यांचा प्रतिकार केला खरा पण त्यांच्या अजस्र ताकदीपुढे शंकरचा काही निभाव लागत नव्हता. शंकरला एक युक्ती सुचली. आपापल्या भल्या मोठ्या तलवारी घेऊन ते दोन्हीही योद्धे शंकरकडे धावत आले. शंकर तसाच उभा राहिला. सर्वांना वाटलं आता शंकरची काही खैर नाही... अगदी शेवटच्या क्षणी शंकर खाली बसला. दोघांच्याही तलवारींचे घाव एकमेकांना बसले. दोघंही एका क्षणात गतप्राण झाले. महाराजांनी उभं राहून टाळ्या वाजवल्या आणि आपल्या गळ्यातील हार काढून शंकरकडे भिरकावला. शंकर म्हणाला, “धन्यवाद महाराज. आता दुसऱ्या परीक्षेसाठी मी राजकुमारीला विनंती करतो की त्यांनी त्यांच्या दालनात जाऊन सर्व खिडक्या, झरोखे आणि दारं बंद करून घ्यावीत व मी सांगेपर्यंत उघडू नयेत...”

सर्वांनाच या गोष्टीचं आश्चर्य वाटलं. मोहिनीने एकदा शंकरकडे पाहिलं आणि पुन्हां स्मित करून आपल्या दालनाकडे वळली. दालनाच्या सगळ्या खिडक्या आणि दारं बंद केले गेले. मोहिनी दालनात एकटीच बसली होती. काही क्षणातच दालनाच्या एका झारोख्यातून धूर आत येऊ लागला. धूर चांगलाच जळजळणारा असल्याने मोहिनीला ठसका लागला आणि क्षणभरातच तिच्या डोळ्यांमधून घळाघळा पाणी येऊ लागलं. शंकरने इशारा केला आणि दालनाचं दार उघडलं गेलं. महाराज सुंदरसेन आत आले. त्यांनी पाहिलं तर मोहिनीच्या डोळ्यातून पाणी येत होतं आणि ती हसत होती. म्हणाली, “पितामहाराज, यांनी माझे दोन्ही पण पूर्ण केलेत आणि मला जिंकलं आहे... आपली आज्ञा असेल तर...” महाराज सुंदरसेन यांनी मोहिनीचं मन ओळखलं. “शंकर, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते हे तू दाखवून दिलंस. माझी या विवाहाला अनुमती आहे...” असं म्हणत दोघांच्याही डोक्यावर हात ठेवत महाराज सुंदरसेन यांनी विवाहाला परवानगी दिली. शंकर आणि मोहिनीच्या विवाहाच्या बातमीने सर्वत्र आनंदी आनंद पसरला. महाराज सुंदरसेन यांना त्यांचा भावी महाराज मिळाला होता तर मोहिनीला मिळाला तिच्या मनातील राजकुमार. सगळीकडे असं आनंदी वातावरण असताना सुंदरनगरच्या जंगलाबाहेर ठकी चेटकीण येऊन पोहोचली...

नगराच्या वेशीबाहेर असलेल्या जंगलात ठकीने एक झोपडी बांधली. एका जख्ख म्हातारीचा वेश तिने घेतला आणि नगरात फेरफटका मारू लागली. फिरताना ठकीची नजर शंकरला शोधत होती. नगरात फिरत असताना शंकर आणि मोहिनीच्या लग्नाविषयी तिला समजलं. ठकी विचार करू लागली, “अरे माझ्या कर्मा... कसं हे अघटित घडलं... इथे तर सर्व मंगलमय झालं... असं सगळं छान छान असताना... का बरं माझी मदत करेल हा शहाणा... आता लढवले शक्कल... करते काहीतरी युक्ती... भाग पाडीन शंकरला... मिळवेन अमर शक्ती...” विचित्र नजरांनी सगळीकडे पाहत ठकी तिच्या झोपडीकडे परतली. संध्याकाळ सरत चालली होती. ठकी झोपडीत येरझारा घालत होती. काय करावं, कसं करावं हे काही ठकीला सुचत नव्हतं. इतक्यात ठकीला एक युक्ती सुचली. तिने चादर पसरली. वाडग्यात पाणी भारून त्यावर ठेवलं आणि मंत्र म्हणू लागली “अगडम् बगडम्... अगडम् बगडम्... ठके ठके दाखव तिगडम्... सर्पदंश होऊ दे मोहिनीला... घालावे तिने आलिंगन निद्रेला...” वाडग्यातील पाणी हलू लागलं. आतून निघालेल्या विजेने समोर एक गोळा तयार केला. प्रकाशाने ठकीचे डोळे दिपले आणि समोरून “फस्स....” असा आवाज आला...

विजा नाहीशा झाल्या. ठकीने डोळे उघडले तर समोर मोठ्ठा फणा उभारलेला, पिवळ्या डोळ्यांतून हिरवी बुबुळे असलेला एक काळा साप दिसत होता. “ही... ही... ही...” डोळे मोठे करत ठकी किळसवाणी हसू लागली. दाराकडे बोट दाखवत ठकी म्हणाली, “जा सर्पा जा... दंश कर राजकन्येला... निद्रेच्या कवेत जाईल ती... शंकर तिच्यासाठी आणेल... मजं अमृताचे मोती... ही... ही... ही...” सापाने ठकी दाखवत असलेल्या दिशेला पाहिलं आणि सरपटत दाराबाहेर निघून गेला. तिथे महालात मोहिनी खिडकीबाहेर पाहत होती. शंकर आत येताच त्याची तलवार आणि अंगरखा घेत म्हणाली “आज स्वारीला अंमळ उशीरच झाला म्हणायचा कक्षात यायला...” शंकर हसत म्हणाला, “प्रिये, अगं आज समजतंय की महाराजांना किती काम असतं... प्रजेसाठी काही विकासाची कामे हाती घेतली आहेत ना...” नाक मुरडत मोहिनी म्हणाली, “तर तर... प्रजेसाठी वेळच वेळ आणि आमच्यासाठीमात्र दुष्काळ... हो ना...” मोहिनी पलंगाच्या काठावर जाऊन बसली. शंकर तिच्या शेजारी बसत तिला मनवू लागला. वारा मंद मंद वाहत होता अशा या शांत वातावरणात ठकीने पाठवलेला साप हळू हळू महालाकडे येत होता...

महालातले सर्व दिवे, पणत्या अचानक विजल्या. कोणाला काहीच सुचत नव्हतं. शंकर म्हणाला, “प्रिये, तू इथेच पलंगावर बसून रहा. मी पाहून येतो काय झालं ते...” जायला निघालेल्या शंकरचा हात घट्ट धरत मोहिनी म्हणाली, “नको नको... तुम्ही इथेच थांबा माझ्यासोबत...” शंकरने तिला धीर दिला. तिला पलंगावर बसवली आणि कक्षाबाहेर पडला. बाहेर दास-दासींची पळापळ चालू होती. एकाला थांबवून शंकरने दिवे जाण्याचं कारण विचारलं तर तो म्हणाला, “कारण समजत नाही महाराज. अचानक अंधार झाला. आम्हाला काही सुचायच्या आत “फस्स...” असा आवाज आला. इथे नक्कीच एखादा सर्प शिरला असावा अंधारात...” शंकर जरा वेळ थबकला आणि तडक आपल्या कक्षाकडे वळला. कक्षाकडे येत असताना, “आ...ई... गं... महा...रा...ज...” असा आवाज आला. शंकर कक्षात शिरला आणि दिवे लागले. त्याने पाहिलं तर मोठ्ठे डोळे करून मोहिनी त्याच्याकडे येत होती आणि पलंगाच्या जवळ एक मोठ्ठा काळा साप वेटोळे घालून फणा काढून उभा होता. मोहिनी शंकरच्या कवेत शिरली आणि तिची शुद्ध हरपली. तो सापही अचानक शंकरच्या डोळ्यांदेखत गायब झाला. झाडीत लपलेली ठकी चेटकीण हसत म्हणाली, “ही... ही... ही... चला सर्पाने आपले काम चोख केले... राजकुमारीला त्याने निजवले... आता जाते महाली घेऊन एक युक्ती... मिळवतेच ती अमरत्वाची शक्ती... ही... ही... ही...”

वैद्यांना पाचारण केले गेले. राणी रूपमतीची आसवं थांबत नव्हती आणि महाराज सुंदरसेन तर खूपच हवालदिल झाले होते. वैद्यांनी मोहिनीला तपासलं. गुटी उगाळून तिच्या तोंडात ते चाटण घातलं पण मोहिनी बरी होत नव्हती. शंकरकडून घडलेला प्रकार समजल्यावर ते म्हणाले, "हा कसलातरी जादूटोणा दिसतोय. ज्या अर्थी तो साप अदृष्य झाला त्याअर्थी तो सर्प साधा नाही. हे प्रकरण माझ्या हाताबाहेर आहे. माफी असावी..." वैद्यबुवा निघून गेले आणि महाराज व महाराणी यांना दु:ख अनावर झाले. शंकर त्यांना धीर देत होता पण त्याचाही धीर खचत चालला होता. अखेर नगरात दवंडी पिटवली गेली, "डम...डम...डम... ऐका हो ऐका... राजकुमारी मोहिनीला बरं करणाऱ्या व्यक्तीस त्याच्या वजनाइतकं सोनं देण्यात येईल हो... डम...डम...डम..." सोन्याच्या लालसेपोटी अनेक जण पुढे आले पण राजकुमारी मोहिनी बरी होण्याचं नाव घेईना... तिथे ठकीनेसुद्धा ही दवंडी ऐकली होती. तिच्या चेहऱ्यावर हसू येऊ लागलं...

तिने मनोमन विचार केला, "आता करते वेषांतर... गाठते राजवाडा... हा शंकरच आता पाडेल... माझ्यावर अमृताचा सडा... ही... ही... ही..." विचित्र हसत ठकीने म्हातारीचं सोंग घेतलं आणि थेट राजवाड्यावर पोहोचली. महाराजांनी परवानगी देताच ती मोहिनीच्या कक्षात दाखल झाली. मोहिनीला तपासण्याचं नाटक करून झाल्यावर ती कक्षातून बाहेर आली. शंकर, महाराज आणि महाराणी तिच्या मागेच होते. ठकी बाहेर येत म्हणाली, "राजकुमारीला ज्या सर्पाने दंश केला तो मंतरलेला होता. त्याच्या दंशाने राजकुमारी मोहिनी निद्रितावस्थेत गेली आहे. तिला बरं करण्याचा एकच उपाय आहे पण खूप कठिण आहे..." शंकरने कसलाही विचार न करता, "मोहिनीसाठी मी कोणतेही दिव्य करेन..." असे सांगून टाकले. त्यावर ठकीने त्याला जंगलातल्या तिच्या झोपडीत बोलावले व तिथून निघून गेली. शंकरने महाराज व महाराणीची समजूत काढली. मोहिनीला त्यांच्याजवळ सोपवलं. प्रधानजींना कारभारावर लक्ष ठेवायला सांगितलं आणि तो तडक निघाला...

एका घोड्यावर शंकर आणि त्याच्या मागे सैन्याची एक तुकडी असे सगळे ठकीच्या झोपडीपाशी पोहोचले. सर्वांना बाहेर थांबायला सांगून शंकर आत गेला. ठकी त्याचीच वाट पाहत होती. ठकी म्हणाली, “आलास शंकर... नीट ऐक मी सांगते काय... दूर हिमालयात आहे मोहिनीच्या आजाराचा उपाय... हिमालयात एक लाबलचक वाळवंट आहे. त्याच्या मधोमध आहे एकुलती एक टेकडी. त्या टेकडीच्या आत करावा लागेल तुला एकट्यालाच प्रवेश... तेव्हा सापडेल तुला हिमासुराचा प्रदेश... पायऱ्या उतरून खाली गेलास की लागेल तुला एक जंगल... तुझं ध्यान विचलित करण्या तिथले सर्व लढवतील शक्कल... न लक्ष देता जाशील निळाईतून तू पुढे मात्र... लागेल तेव्हा तुला तलावाचे भले मोठे पात्र... पार करून तो तलाव जाशील तू पल्याड... पण बाहेर पडण्याआधी त्यातले पाणी जरूर काढ... समोर दिसेल तुला मोती नारळासारखा... ओत ते पाणी त्याच्यावर... निघेल एक झाडं ऊंचपुरे जे घेऊन जाईल तुला वर... तिथे आहे हिमासुराचा वाडा प्रवेश त्यात कर... घेऊन ये त्याचे घर्मबिंदू जे करतील मोहिनीला बरं लवकर...”

टेकडीचं द्वार उघडण्यासाठी लागणारं मंतरलेलं पाणी, चादर, वाडगं आणि मंत्र असं सर्व ठकीने शंकरला दिलं. म्हातारीला नमस्कार करून शंकर झोपडीबाहेर आला. आपल्या सैन्यास पाहून त्याने विचार केला, “जर जायचं आहे मला एकट्यालाच गुहेत... तर का बरं एवढेजण सोबत हवेत...” शंकरने सेनाधिकाऱ्यास तिथे जंगलातच तळ ठोकून म्हातारीचं रक्षण करण्याची आज्ञा दिली आणि आपला घोडा घेऊन निघाला मोहिमेवर. झोपडीत, आपल्याला आता लवकरच अमरत्व प्राप्त होणार म्हणून म्हातारीच्या वेशातली ठकी  मनोमन सुखावली होती. मजल दरमजल करत शंकर हिमालयाच्या पायथ्याशी पोहोचला. पुढे डोंगरांची चढण आणि त्यापुढे बर्फ त्यामुळे शंकरने घोड्याला तिथेच पायथ्याशी राहणाऱ्या एका माणसाला सुपूर्द केले. त्याला थोड्याशा मोहरा देऊन घोड्याची निगा राखण्यास सांगून शंकर डोंगर चढू लागला. हळू हळू डोंगराळ मातीचा प्रदेश मागे सरत गेला आणि गार गार वाऱ्याच्या झोतांसरशी सगळीकडे बर्फच बर्फ दिसू लागला. म्हातारीने सांगितलेलं बर्फाचं ते लांबच लांब पठार शंकरच्या नजरेस पडलं आणि दूरवर दिसत होती एक छोटीशी टेकडी...

शंकर जसजसा टेकडीजवळ पोहोचला तसतशी टेकडी मोठी होत होती. राजवाड्याहूनही मोठ्या टेकडीच्या पायथ्याशी पोहोचताच शंकरने चादर पसरली, त्यावर वाडगं ठेऊन त्यात म्हातारीने दिलेलं पाणी ओतलं. त्या टेकडीकडे पाहत मोठमोठ्याने मंत्र म्हटला. बघता बघता वाडग्यातलं पाणी हलायला लागलं. पाण्याचा रंग काळा पडला आणि त्यातून एक वीज निघून समोरच्या टेकडीवर आदळली. जमीन हादरू लागली. टेकडीवरचा बर्फ गळून पडला आणि टेकडीचं रूप पालटलं. समोर दिसू लागली राक्षसाचं तोंड असलेली एक प्रचंड मोठी गुहा. ते राक्षसाचं तोंड बोलू लागलं, “हा... हा... हा... आता तू आलास... त्या ठकीने तुला तिच्या जाळ्यात ओढलं तर... असशील खरा शूरवीर तर टाक पाऊल पुढे आणि कर आत प्रवेश...” शंकर मनातल्या मनात विचार करू लागला, “कोण ठकी... कसलं जाळं... बहुदा हा मला विचलित करण्याचा प्रकार दिसतोय... पण मी असा डगमगणार नाही...” तलवार सरसावत शंकर पुढे झाला. त्याला लांब गोलाकार जिना खाली जाताना दिसला...

एकेक पायरी उतरत शंकर खाली आला. आजूबाजूचा बर्फाळ प्रदेश नाहीसा होत ती जागा घनदाट जंगलाने घेतली. सगळीकडे चमकणारी झाडं होती. कुठल्या दिशेला जावं तेच शंकरला समजत नव्हतं. अचानक एक निळ्या रंगाचा प्रकाश त्याच्या समोरून गेला आणि त्या प्रकाशाने नागमोडी वळणाची एक वाट उघड करून दिली. त्या निळ्या रंगाच्या वाटेवरून शंकर पुढे सरकत असताना त्याला चित्रविचित्र आवाज येऊ लागले. कोणी त्याचे नाव पुकारत होतं, तर कुठे त्याला प्रत्यक्ष मोहिनी दिसत होती. कुठे वाघाची डरकाळी होती तर कुठे हत्तींचे चित्कार होते. पण शंकर विचलित झाला नाही. निळ्या प्रकाशाची वाट त्याने सोडली नाही. काही झाडांच्या फांद्या तर त्याची वाट अडवून होत्या. पण शंकरने तलवारीने त्या कापून काढल्या. चालता चालता शंकरला पाण्याचा आवाज आला. त्याने पाहिलं तर थोड्या अंतरावर त्याला तलाव दिसू लागला. तलावाजवळ पोहोचताच शंकरने मागे टाकलेलं जंगल अचानक गायब झालं आणि त्याबरोबर गायब झाले त्यातून येणारे आवाज आणि होणारे भास. तलावाच्या किनाऱ्यावर एक होडी होती. शंकर तीत बसला आणि वल्हवू लागला. तलावाचं पाणी तसं शांत होतं. शंकर मधोमध पोहोचला आणि पाणी डचमळू लागलं...

शंकरची होडी जोरजोरात हलू लागली. शंकर सावरतोय तोच भली मोठी मगर पाण्यावर आली आणि आपला जबडा उघडून शंकरकडे झेपावली. शंकरने इतकी मोठी मगर कधीच कुठेच पाहिली नव्हती. तिचा जबडा एखाद्या बोग्द्यासारखा वाटत होता. त्या मगरीने एका घासातच होडीचा पार चेंदामेंदा केला. शंकरने वेळीच पाण्यात उडी मारली म्हणून तो वाचला. आता तलावात शंकर आणि ती मगर असे दोघेच होते. आजूबाजूला होते मगरीने नष्ट केलेल्या होडीचे तुकडे. एका तुकड्यावर शंकरची तलवार त्याला दिसली. मगरीने तिचे हिरवेगार डोळे एकदा उघड-बंद केले आणि शंकरकडे झेपावली. शंकरने तलवारीच्या दिशेने सूर मारला आणि तलवार पाण्यात पडायच्या आत हस्तगत केली. तलवार सरसावून त्याने मगरीवर उडी घेतली. शंकरला पाडण्यासाठी ती मगर पाण्यात गरागरा फिरू लागली. संधी हेरून शंकरने तिच्या पोटाच्या भागावर सपासप वार केले. मगर गतप्राण होऊन पाण्यावर आदळली. काही क्षणातच ती महाकाय मगर पाण्यात विरघळून गेली. पाणी पुन्हा शांत झालं. शंकर तलावाबाहेर आला पण तलावातले पाणी घ्यायला तो विसरला नाही. तलावाबाहेर पडताच पाणी पूर्ण सुकून गेलं. जिथे ती मगर पाण्यावर आदळली तिथे जमिनीवर काहीतरी चकाकणारी वस्तू शंकरला दिसली...

शंकर हळू हळू पुढे झाला. त्याने पाहिलं तर शहाळ्याच्या आकाराचा पांढराशुभ्र मोती त्याला दिसला. शंकर तो मोती घ्यायला पुढे वाकला आणि थबकला. तलावातून घेतलेलं पाणी त्याने मोत्यावर ओतलं. मोती हलायला लागला. मोत्याचे दहा तुकडे झाले आणि दाही दिशांना फेकले गेले. खाली उरला हिरव्या रंगाचा एक छोटा मणी. त्या मान्यातून एक वेल सरपटत वरवर जाऊ लागला. ढगांच्याही पलिकडे ऊंच आकाशात गेलेला तो वेल हळू हळू वाढत जाऊन एका भल्यामोठ्या वृक्षात त्याचं रुपांतर झालं. शंकरने तो वृक्ष चाचपडला. लोखंडासमान मजबूत अशा त्या वृक्षावर शंकर चढू लागला. लाकडाचं काम करत लहानाचा मोठा झाल्याने वृक्षावर चढणं शंकरला सोप्पं गेलं. वृक्षावर चढत शंकर ढगांच्याही वर पोहोचला. वृक्षाच्या शेवटच्या फांदीवर उभा राहून शंकरने चौफेर नजर फिरवली. काळ्या ढगांमधून एक ऊंचच्या ऊंच मनोरा डोकावत होता. शंकर विचार करू लागला, “तोच दिसतोय हिमासुराचा वाडा. पण तिथवर जायचं कसं... म्हातारीने तर झाडापर्यंतचाच मार्ग दाखवला होता... आता...” विचार करताना शंकरला एक युक्ती सुचली. त्याच वृक्षाच्या फांद्या आणि वेली वापरून शंकरने एक बेचकी तयार केली. तीत स्वत:ला बसवलं आणि झाडाला अडकवलेला वेल तोडला. त्याबरोबर शंकर हवेत उडू लागला...

हवेत उडत शंकरने काळ्या ढगांना पार केलं आणि समोर दिसू लागला मोठ्ठाला वाडा. त्या वाड्याच्या भोवताली सुकलेली झाडं होती. त्यातल्या एका झाडाच्या वेली चा आधार घेत शंकर जमिनीवर उतरला. राजवाडा एखाद्या पर्वतासारखा विशालकाय होता. मोठ्ठाल्या प्रवेशद्वाराला एक छोटीशी फट दिसत होती. शंकर त्या फटीतून आत शिरला. त्याबरोब्बर वाडा प्रकाशमान झाला. शंकर चौफेर नजर फिरवताना अवाक झाला. मोत्यांचे पडदे, हिरेजडित नक्षीकाम केलेली आसनं पाहून शंकरचे डोळे दिपले. शंकर वाड्यात फिरत असताना, “शंकर... आलास तू...” हा आवाज वाडाभर घुमला. शंकर थबकला आणि आवाज कुठून येतोय ते शोधू लागला. पुन्हा तोच आवाज घुमू लागला, “अरे असा इथे तिथे पाहू नकोस... मीच तो... तुला हवा असलेला हिमासूर... ये... जिना चढून वर ये...” शंकरने तलवार सरसावली आणि जिना चढून वर गेला. एका लांबचलांब दालनाच्या शेवटी एक भीमकाय, अजस्त्र राक्षस बसला होता. संपूर्ण बर्फाने वेढलेल्या त्या राक्षसाला एकच डोळा होता. शंकरला तलवार सरसावलेला पाहून हिमासूर म्हणाला, “बाळ, अरे असा घाबरू नकोस... मी तुझीच वाट पाहत होतो...”

शंकर बुचकळ्यात पडला, “इतक्या मोठ्या राक्षसाला माझ्या मदतीची काय गरज... आणि याला माझं नाव कसं माहित...” हिमासूर जागेवरून उठला आणि शंकरकडे चालू लागला. त्याला येताना पाहून शंकरने त्याचे विचार झुगारून टाकत तलवारीने वार केला. वार हिमासुराच्या डोळ्यावर बसला. त्यासरशी हिमासूर गायब झाला आणि धुराचा एक लोट समोर दिसू लागला. हळू हळू धूर कमी होऊन एक माणूस समोर आला. त्याने पूर्ण पांढरी वस्त्र परिधान केली होती आणि त्याच्या भोवती पांढऱ्या रंगाचं वलय होतं. तो माणूस शंकरजवळ येत म्हणाला, “बाळ शंकर, मी एक देवदूत आहे... एकदा स्वर्गातल्या देवदूतांचं आणि नरकातल्या असुरांचं तुंबळ युद्ध जुंपलं. त्यावेळी असुरांना मी मदत केली आणि मला सहाय्य दिलं माझ्या भावाने. देवदूत युद्ध जिंकले आणि माझं कृत्य उघकीस आलं. मला आणि माझ्या भावाला अनंत काळापर्यंत पृथ्वीवर राहण्याची शिक्षा मिळाली. मी गयावया केली तेव्हा मला सांगितलं गेलं की शंकर नावाचा मुलगा माझी आणि माझ्या भावाची या शिक्षेतून मुक्तता करेल...

या वाड्यात मी कैद झालो. माझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी ते जादूचं जंगल आणि तो तलाव निर्माण केला गेला. तलावात तू ज्या मगरीला मारलंस तो माझा भाऊ होता. तो मुक्त झाल्याचं मला समजलं आणि मी मनोमन खुश झालो. तूच तो एकमेव जो आम्हला मुक्त करू शकतो याची मला खात्री पटली. आता तुझी मदत केली की मला मुक्ती मिळेल...” सर्व ऐकून शंकर म्हणाला, “म्हणजे तुम्ही माझी मदत करणार... पण मला तर हिमासुराच्या घामाचे थेंब हवे होते आणि तुम्ही... आता माझी मोहिनी कशी झोपेतून जागी होणार...” देवदूत हसत म्हणाला, “बाळ, हिमासुराच्या घामाचे थेंब प्राशनकर्त्याला अमरत्व देतात हे मीच पसरवलं जेणेकरून तू इथे येशील किंवा कोणीतरी तुला इथे येण्यास भाग पाडेल. राजकुमारी मोहिनीला जो साप दंश करून गेला तो मंतरलेला होता. त्याला पाठवणारी होती ठकी चेटकीण. हो शंकर... तुला इथला मार्ग मार्ग दाखवणारी जंगलातली ती म्हातारीच ठकी चेटकीण आहे. तिला संपवलंस तर तिची जादूही संपेल आणि मोहिनी बरी होईल. तुला विश्वास बसणार नाही सहाजिक आहे. बघ या आरशात...” शंकरने आरशात पाहिलं. गुहेत प्रवेश करण्यासाठी ठकीने दिलेल्या बळींपासून तिने घेतलेल्या म्हातारीच्या रूपापर्यंत सर्वकाही शंकरला समजलं. देवदूत म्हणाला, “शंकर, अजूनही तुझा विश्वास नसेल तर हा मोती घे...

त्या ठकीजवळ जाऊन तो जमिनीवर जोरात आदळ. जमिनीचा स्पर्श होताच मोत्याच्या आसपास असलेली सर्व जादू, तंत्र-मंत्र नष्ट होईल आणि त्याच्या प्रभावाखाली असलेले सर्व मुक्त होतील. सामान्यांवर त्याचा काहीएक परिणाम होणार नाही. मी आता तुला गुहेच्या बाहेर पोहोचवतो...” असं म्हणत देवदुताने हात वर केला. शंकर आणि देवदूत एकाएकी गायब झाले आणि थेट गुहेबाहेर प्रकटले. शंकरने देवदूताला वाकून नमस्कार केला. देवदुताने त्याला आशीर्वाद तर दिलाच पण शंकरच्या चांगुलपणावर प्रभावित होऊन अनेक हिरे, माणिक, मोती, सुवर्ण मुद्रा व एक पांढरा शुभ्र घोडा उपहार म्हणून दिला. इतक्यात आकाशातून एक पांढरा प्रकाश त्या देवदुतावर पडला. त्या प्रकाशात तो देवदूत आणि ती गुहा दोन्हीही अंतर्धान पावले. सर्व धन आपल्या घोड्यावर लादून स्वत: देवदुताने दिलेल्या घोड्यावर स्वर होऊन शंकर माघारी निघाला. मजल दरमजल करत शंकर नगराजवळ पोहोचला. आत प्रवेश करण्याआधी ठकीचा बंदोबस्त करावा म्हणून जंगलात शिरला. ठकी आतुरतेने शंकरची वाट पाहत होती...

शंकर दिसताच तिने म्हातारीचा वेष धारण केला आणि लगोलग बाहेर आली. म्हणाली, “बाळ शंकरा... आलास तू... मी तुझीच वाट पाहत होते रे... दे ते हिमासुराच्या घामाचे थेंब मला दे पटकन... म्हणजे मोहिनीला आपण बरं करू चटकन...” शंकर काहीही न बोलता झोपडीबाहेर पडला. ठकी त्याच्या मागेच होती. ती अजून काही बोलणार इतक्यात शंकर म्हणाला, “ठके... तू चेटकीण आहेस ना... मला सगळं समजलं आहे... माझ्या मोहिनीला तूच मूर्च्छित केलंस ना... थांब आता तुला चांगली अद्दल घडवतो...” असं म्हणत शंकरने कमरपट्ट्यात लपवलेला मोती काढला आणि हात वर उचलला. हे पाहून ठकी म्हातारीच्या रूपातून चेटकिणीच्या रुपात आली आणि मोठ्ठे डोळे करून शंकरकडे झेपावली. शंकरने लगेच मोती जमिनीवर आदळला. मोत्याचे दोन तुकडे झाले आणि त्यातून एक प्रचंड मोठं वावटळ निघालं. ते वावटळ पाहून चेटकीण घाबरली आणि पळू लागली. ते वावटळ अजून मोठं होत गेलं. चेटकिणीसह तिच्या झोपडीलाही त्याने खेचलं. “ना....ही... शं...कर... तुला सोडणा...र नाही... वेता...ळा...” ठकी असं किळसवाणं ओरडत त्या वावटळात नाहीशी झाली. सगळीकडे शांतता पसरली...

ठकी संपल्याने जंगलावर पसरलेली अवकळा नाहीशी झाली. तिथे महालात मोहिनीला हळू हळू जाग आली. सुंदरसेन महाराज व राणी रूपमती तिच्या बाजूलाच बसले होते. मोहिनीने त्यांना आलिंगन दिलं. शंकर नगरात परतला. नगरात सर्वत्र रोषणाई होती. प्रजा आनंदी दिसत होती. शंकरची मोहीम यशस्वी झाली होती हे एव्हाना सर्वांना समजलं होतं. सोबत आणलेले धन शंकरने खजिन्यात जमा केले. मोहिनी बरी झाली होती. शंकर एक कुशल राज्यकर्ता म्हणून प्रजेच्या मनात वसला होता. हे सर्व पाहून सुंदरसेन महाराजांनी शंकरचा राज्याभिषेक करवला आणि मोहिनीला व सुंदर नगरीला त्याच्या स्वाधीन करून राणी रूपमतीसह तीर्थयात्रेला निघून गेले. शंकर आणि मोहिनीच्या सुखी संसारासोबत सुंदरनगरीसुद्धा प्रगतीशील झाली...

समाप्त.

Thursday, June 7, 2018

बेटाचे रहस्य...



सकाळची वेळ होती. चौकीवर नेहमीप्रमाणे काम चालू होते. इतक्यात तिघंजण आत शिरले. समोर सब इंस्पेक्टर सचिन होता. त्या तिघांमधला एक म्हणाला, “सर, आमच्या मित्राला वाचवा हो... तो हरवला आहे...” सचिन सकट सर्वाचं लक्ष त्यांच्याकडे गेलं. तो माणूस पुन्हा बोलता झाला, “सर, मी विकास, हा अविनाश आणि हा रमण. आम्ही तिघं आणि सिद्धांत कॉलेजचे मित्र आहोत. डिग्री मिळाली आणि आम्ही चौघांनी पार्टनरशीपमध्ये नवा बिझिनेस सुरू करायचं ठरवलं. पुढच्या आठवड्यात आमच्या नव्या कंपनीचं ओपनिंग आहे. त्याआधी थोडा समुद्रविहार करावा असा चौघांचा विचार ठरला. आम्ही एक बोट भाड्याने घेतली आणि समुद्रसफर सुरू केली. मुंबईपासून काही अंतरावर असलेल्या सात बेटांना भेट द्यावी असं आम्ही ठरवलं. फिरत असताना बुचर आयलंडच्या दक्षिणेला आम्हाला एक बेट दिसलं. ते आजवर कधी पाहण्यात आलं नव्हतं. बुचर आयलंडचा नकाशा पाहिला तर हे बेट या आयलंडचाच एक भाग असावा असं दिसतं. आम्ही तिथे गेलो तर एका मोठ्या विंचवाने आमचं स्वागत केलं. त्याच्यापासून वाचून आम्ही पुन्हा किनाऱ्याला येत असताना सिद्धांतचा पाय एका सापळ्यात अडकला. आम्हाला तिघांना तिथून त्याने जायला सांगितलं. आम्हाला त्याला सोडून जायचं नव्हतं पण जे काही आम्ही पाहिलं त्यामुळे आम्हीही घाबरलो होतो. तिथून निघालो आणि तडक इथे आलो...” प्रधान हनवटी चोळत म्हणाले, “इंटरेस्टिंग... आनंद आणि सचिन तुम्ही चला माझ्याबरोबर. उमा तू इथेच थांब. इथून आमच्या संपर्कात रहा. लेट्स गो...”

उमाला प्रधानांचं म्हणणं पटलं नाही. ती म्हणाली, “सर, तिथे जर खरंच असं काही... आणि तुम्ही म्हणताय मी इथेच राहू...” प्रधान उमाच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले, “उमा, डोंट गेट इमोशनल... हे तिघं त्या बेटाचं जे वर्णन करत आहेत, कदाचित तिथे धोका असू शकतो. जर आम्ही तिथे अडकलो किंवा आमचा संपर्क तुटला तर बेटाच्या बाहेर असणारी तू आमची मदत करू शकशील... सो... स्टे हियर... आनंद, सचिन... तयारी करा... आपण तासाभरात निघतोय...” थोड्याच वेळात प्रधान, आनंद, सचिन आणि सहा पोलीस अशी नऊ जणांची तुकडी सफरीवर निघाली. बुचर आयलंडला वळसा घालून बोट त्या अज्ञात बेटाकडे वळली. जवळ पोहोचताच पाण्याखाली लपलेल्या खडकावर बोट आदळली आणि थांबली. प्रयत्न करूनही बोट पुढे जात नाही हे पाहिल्यावर प्रधानांनी सर्वांना उतरायला सांगितलं. पाण्यातून हळू हळू पुढे जात सर्व किनाऱ्यावर पोहोचले. प्रधान म्हणाले, “टीम, आपलं प्राईम टार्गेट आहे सिद्धांतला शोधणं आणि त्याच बरोबर या बेटाचं रहस्य जाणून घेणं. सो आनंद, तू या दोघांना घेऊन डाव्या बाजूने जा. सचिन, या दोघांसोबत तू उजव्या बाजूने जा आणि मी या दोघांसोबत या मधल्या वाटेने जातो. सतत संपर्कात रहा... ऑल दी बेस्ट...” तीन तुकड्या तीन दिशांना गेल्या. प्रधान, आनंद आणि सचिन आपापल्या तुकड्यांचं प्रतिनिधित्व करत होते. फांद्या कापत सर्व पुढे जात होते. सचिनला कसलासा आवाज ऐकू आला...

तो म्हणाला, “थांबा. कसलातरी आवाज येत आहे... रातकिड्याचा वाटतोय...” ते हवालदार व सचिन आवाजाचा शोध घेऊ लागले. हळू हळू आवाज वाढत जाऊ लागला. एक हवालदार म्हणाला, “सर, आवाज तर वाढत चाललाय... हा एका रातकिड्याचा आवाज वाटत नाही... आणि रातकिडे दिवसा का असतील...” दुसरा हवालदार वॉकीटॉकीवरून इतरांशी संपर्क साधतच होता की आवाजाची पट्टी प्रचंड वाढली. आवाज इतका वाढला की तिघांनी दोन्ही कानांवर हात ठेवले. तिघांच्याही कानातून रक्त येऊ लागलं. जसजशी आवाजाची पातळी वाढत होती तसतसं त्यांना ते असह्य झालं. वॉकीटॉकी घेतलेला हवालदार कोसळला. सचिन आणि दुसरा हवालदार त्या कोसळलेल्या हवालदाराच्या जवळ जात असताना दुसरा हवालदारही कोसळला. सचिनने पटकन वॉकीटॉकी उचलला आणि आवाजाच्या उलट्या दिशेने पळू लागला. त्याने संपर्क साधण्याचा प्रयत्न कला पण वॉकीटॉकी काम करत नव्हता. पुन्हा तोच रातकिड्यांचा आवाज येऊ लागला. सचिनने कानावर हात ठेवले पण उपयोग झाला नाही. सचिन खाली पडून सरपटत जाण्याचा प्रयत्न करू लागला.  तिथे आनंद आणि त्याचे दोन साथीदार पुढे जात असताना त्यांना एकदम अंधार झालेला जाणवला. एका हवालदाराने टॉर्च पेटवला. त्यांच्या तीन बाजूंनी धुक्यासारखं येताना दिसलं. तिघंही स्तब्ध उभे होते. काही क्षणातच धुक्याने त्या तिघांना वेढलं...

आनंदसह ते हवालदार हळू हळू खोकायला लागले. जसं धुकं दाट होत गेलं तसं त्यांचं खोकणंही  वाढू लागलं. या धुक्यात काहीतरी गडबड आहे हे आनंदला जाणवलं. एका हवालदाराच्या खोकल्यातून रक्त पडू लागलं. तो हवालदार कोसळला आणि श्वासासाठी तडफडू लागला. काही क्षणातच तो मेला. हा विषारी धूर आहे हे एव्हाना आनंद आणि राहिलेल्या हवालदाराच्या लक्षात आलं होतं. दोघंही धुक्यापासून लांब पळू लागले. धुकं त्यांचा पाठलाग करू लागलं. पळता पळता आनंदचा पाय एका दगडावरून सरकला. आनंद गडगडत एका खड्ड्यात पडला. “सर... सर... खोक... ख...खोक...” आनंद धडपडत असताना वर हवालदाराचा येणारा आवाज हळू हळू कमी होत बंद झाला. आनंद ज्या खड्ड्यात पडला होता त्यावर धुक्यानं एक गडद पडदा बनवला... “कम इन आनंद... हॅलो, सचिन... शीट... कोणीच जवाब देत नाहीये... काय झालं असेल त्यांच्यासोबत...” प्रधान गोंधळून गेले होते. त्यांच्या वॉकीटॉकीवर खरखरीशिवाय काहीच ऐकू येत नव्हतं. ते पुढे चालू लागले. त्यांचा पाय खाली असलेल्या पाचोळ्यावर पडला आणि त्याच क्षणी झाडाचा एक मोठा ओंडका त्यांच्यादिशेने येऊ लागला. प्रधानांवर तो ओंडका आदळणार हे दिसताच एका हवालदाराने त्यांना धक्का दिला. प्रधान जमिनीवर पडले पण त्या ओंडक्याने त्या हवालदारावर आघात केला. तो हवालदार जागीच गतप्राण झाला. त्याची ही दशा पाहून प्रधान विव्हळले. राहिलेल्या हवालदारासोबत पुढे जाताना दोघांनाही “खसखस...” असा आवाज ऐकू आला. काहीतरी सरपटत जात आहे हे त्यांच्या लक्षात आलं...

प्रधान आणि तो हवालदार सभोवार पाहू लागले. हवालदाराला जमिनीवर काहीतरी दिसलं. “सर... तो बघा एक दोर जमिनीवरून चालला आहे...” असं म्हणत हवालदाराने प्रधानांना जमिनीवरून तेजीने सरपटत जाणारा दोरखंड दाखवला. आपल्या बाजूने जमिनीलागत जाणारा दोरखंड पाहत असताना दोरखंडाने प्रधानांच्या पायाला विळखा घातला. प्रधान खेचले गेले आणि म्हणता म्हणता झाडाच्या फांदीवर जाऊन अडकले. त्याच वेळी लाकडाचे भाले बसवलेली एक मोठी शिडी त्याच झाडाच्या मागून आली आणि खाली उभ्या असलेल्या हवालदाराच्या शरीरात घुसली. रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या आणि तो हवालदार उभ्या उभ्याच मरण पावला. पायामध्ये दोरखंड फसल्याने झाडावर अडकलेले प्रधान नुसतं पाहत बसण्याशिवाय काहीच करू शकले नाहीत. त्यांनी धडपड केली. कसेतरी ते पायापर्यंत पोहोचले. बुटाच्या चेनमध्ये ठेवलेला चाकू त्यांनी बाहेर काढला आणि एका झटक्यात दोरखंड कापला. त्यासरशी ते खाली आले. पिस्तूल सरसावत प्रधानांनी दोन्ही हवालदारांची पाहणी केली. “दे आर डेड... इथे काहीतरी गडबड आहे... सचिन आणि आनंद ठीक असावेत...” प्रधान हे बोलत असतानाच त्यांना झुडपातून हालचाल जाणवली. त्यांनी त्या दिशेने पाहिलं तर सचिन येताना दिसला. “थँक गॉड सचिन तू ठीक आहेस... समथिंग इज फिशी हियर... आपल्याला आनंदला शोधायला हवं. चल...” हे बोलत असताना प्रधानांनी सचिनकडे पाहिलं तर त्याचा चेहरा बदलेला जाणवला...

सचिनच्या चेहऱ्यावर कसलेही भाव नव्हते. थंड नजरेने तो प्रधानांकडे पाहत होता. प्रधानांनी एक-दोनदा त्याला हलवून पाहिलं पण शुन्यात हरवल्यासारखा सचिन एकटक पाहत होता. सचिनने हातात त्याचं पिस्तूल धरलं होतं. प्रधानांना ढकलत सचिनने त्यांच्यावर पिस्तूल रोखलं. प्रधान जरा पुढे झाले आणि सचिनने गोळी चालवली. प्रधान खाली वाकले आणि गोळी झाडावर बसली. प्रधानांनी एकवार झाडाकडे पाहिलं आणि विस्फारलेल्या नजरेने सचिनकडे पाहू लागले. सचिन दुसरी गोळी झाडणार इतक्यात आनंदने त्याच्या हातावर लाथ मारली. सचिनच्या हातून पिस्तूल खाली पडताच प्रधानांनी सचिनच्या जोरदार मुस्कटात मारली. त्या जोरासरशी सचिन झाडावर आपटला आणि खाली पडला. काही क्षण डोकं धरून मग वर पाहत म्हणाला “प्रधान सर... आनंद सर... हे काय... मी असा इथे...” आनंद सचिनला उठायला मदत करत म्हणाला, “सचिन, तू आत्ता सरांवर गोळी झाडलीस... गोळीच्या आवाजाच्या दिशेने इथे आलो तर तू दुसरी गोळी झाडणार होतास. आपलं नशीब चांगलं म्हणून सर वाचले. पण सचिन, तू सरांवर गोळ्या का झाडल्यास...” सचिनचं डोकं अजूनही ठणकत होतं. तो सावरत म्हणाला, “मी गोळी झाडली... नाही आनंद सर... मी असं कसं करेन... त्या हवालदारांसोबत जात असताना कान सुन्न होतील असा आवाज येऊ लागला. आम्ही पळू लागलो. ते दोन्ही हवालदार एकेक करत मरण पावले पण मी तिथून सटकलो. थोडं पुढे गेलो तर माझ्या डोक्यावर आघात झाला. त्यानंतर आत्ता तुमच्यासमोर शुद्धीवर आलो...”

सर्व ऐकून प्रधान म्हणाले, “सचिन, तुला कोणीतरी हिप्नोटाईज केलं होतं आणि आमच्या विरुद्ध तुझा हत्यार म्हणून वापर केला. आता माझ्यासोबत काय झालं... मला वाचवताना ओंडक्याच्या आणि झाडाच्या मध्ये सापडून एक हवालदार गेला तर दुसरा भाल्यासारखी टोकं असलेली लाकडं शरीरात शिरून गतप्राण झाला. इथे खूप मोठी गडबड आहे. काहीतरी असं आहे ज्यापर्यंत आपल्याला पोहोचू दिलं जात नाहीये...” आनंद याला दुजोरा देत म्हणाला, “मलाही तसंच वाटतंय... आम्ही जात होतो त्या दिशेने विषारी धुक्याने आम्हाला वेढलं. मला श्वास रोखून धरता येतो म्हणून मी वाचलो. पण माझ्यासोबतच्या हवालदारांना नाही वाचवू शकलो सर...” प्रधान म्हणाले “येस... व्हेरी राईट... इथे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड दिसतंय. त्याच्या किरणांमुळे आपले वॉकीटॉकी निकामी झालेत. शिवाय नेटवर्क सिग्नल्सपण ब्लॉक केलेत ज्यामुळे आपले फोन्सही चालत नाहीयेत... आपल्या तिघांवर वेगवेळ्या प्रकारे झालेले हल्ले हेच दाखवत आहेत... आपल्याला सावधपणे पुढे जायला हवं. लेट्स मूव्ह...” प्रधान बोलत असतानाच पायाखालची जमीन हलू लागली आणि एखादी मोठी वस्तू जमिनीवर आदळावी तसा “थड... थड... थड... थड...” असा आवाज येऊ लागला. आजूबाजूची वृक्ष हलायला लागली. प्रधान, आनंद आणि सचिन सर्वत्र नजर घुमवू लागले. प्रधानांनी समोर पाहिलं तर एक खूप मोठी वस्तू वेगाने खाली येत होती. आनंद आणि सचिनवर ती वस्तू आदळणार इतक्यात प्रधान ओरडले, “वॉच आऊट...”

आनंद आणि सचिनने वर पाहिलं. झाडाच्या मागून एक काळी वस्तू त्यांच्या बाजूने येत होती. दोघांनीही विरुद्ध दिशेला उद्या मारल्या. त्या काळ्या वस्तूने जमिनीला खड्डा केला आणि पुन्हा वर गेली. आजूबाजूची झाडं तुटली आणि समोर एक काळाकभिन्न विंचू दिसू लागला. त्याचा आकार जवळ जवळ बारा फुटाइतका होता. डोळे जळत्या निखाऱ्याप्रमाणे आग ओकत होते. त्या अजस्र विंचवाला पाहून तिघंही अचंभित झाले. पहिला वार फोल गेल्याने तो विंचू अजून त्वेषाने हल्ला करायला सिद्ध झाला. प्रधान, आनंद आणि सचिनने पिस्तूल, लाकडाचा ओंडका असं मिळेल ते हत्यार घेऊन सज्ज झाले. आनंदने उगारलेला ओंडका त्या विंचवाने आपल्या एका पायात पकडून जोरात जमिनीवर आपटला. त्या ओंडक्याचा पार भुगा झाला. दुसऱ्या पायाने त्या विंचवाने सचिनला जबर धक्का दिला. सचिन झाडावर आदळून खाली पडला. दुसऱ्या बाजूने आनंदनेही वार करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचीही सचिनसारखीच दशा झाली. त्या विंचवाचं लक्ष आपल्याकडे नाही असं दिसताच प्रधानांनी त्यावर ओंडका फेकून मारला. टण असा आवाज होऊन ओंडका खाली पडला. प्रधान विचार करू लागले “म्हणजे... हा विंचू नसून एक मशीन आहे तर... कुठेतरी याचं कंट्रोल असणारच...” त्यांनी निरखून पाहिलं तेव्हा त्या विंचवाच्या लालभडक डोळ्यांच्या मधोमध एक चौकोनी ठिपका दिसला. सचिन आणि आनंद त्या विंचवाला अडकवून ठेवत होते तेव्हा प्रधानांनी पिस्तुलाने बरोब्बर नेम साधला. गोळी त्या चौकोनात शिरली. त्या विंचवाच्या डोळ्यांचा लाल रंग एकदम लुप्त झाला आणि तो विंचू जमिनीवर कोसळला...

तिघंही सगळीकडे पाहू लागले. चहू बाजूला झाडीच झाडी दिसत होती. सर्वत्र शांतता पसरली होती. वाऱ्यामुळे होणारा पानांचा काय तो आवाज होता फक्त. सचिन म्हणाला, “सर, नकाशाप्रमाणे विचार केला तर हे बेट मुख्य बेटाचा वेगळा झालेला भाग आहे. पण सर, जंगल असूनही इथे जनावरं नाहीत की पक्षी नाहीत... कोळ्यांची जाळीसुद्धा दिसत नाहीत... दिसतात ती फक्त मेलेली आणि जिवंत झाडं...” सचिनच्या म्हणण्याला दुजोरा देत प्रधान म्हणाले, “यू आर राईट सचिन... रोबॉट्स, विषारी धूर, कानाचे पडदे फाडणारा आवाज, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड या सर्वांमुळे इथले प्राणी नष्ट झाले असावेत किंवा इथून निघून तरी गेले असावेत. झाडांनाही याची झळ बसली आहे पण ती बिचारी हलूच शकत नाहीत... पण हे सगळं का... जाणून घेण्याचा एकच मार्ग... वी हॅव्ह टू गो डीप इन द वूड्स... पण यावेळी एकत्र जाऊ... काय माहित अजून काय वाढून ठेवलं आहे आपल्यासमोर...” प्रधान बोलतच होते की समोरून पानांची सळसळ ऐकू आली. त्यासरशी तिघंही पावित्रा घेऊन सज्ज झाले. काही क्षणात एक आकृती झाडीमागून बाहेर आली. चिखलानं माखलेले कपडे पाहून हा माणूस आहे हे तिघांनाही लक्षात आलं. प्रधान त्याच्या जवळ जात पिस्तूल रोखत म्हणाले, “कोण आहेस तू... इथे काय करतो आहेस...” तो माणूस काही बोलणार इतक्यात आनंदने त्याला ओळखत विचारलं, “तू... सिद्धांततर नाहीस ना...”

त्या माणसाने होकारार्थी मान हलवली. म्हणाला, “हो सर. मी सिद्धांतच आहे. माझ्या मित्रांसोबत ट्रीपला निघालो होतो. या बेटावर आम्ही पोहोचलो तेव्हा एका मोठ्या विंचवाने आमच्यावर हल्ला केला. त्यापासून पळताना माझा पाय सापळ्यात अडकला. मी माझ्या मित्रांना तिथून निघून जायला सांगितलं. मोठ्या मुश्किलीने सापळ्यातून पाय सोडवला पण मला चकवा लागला आणि मी दलदलीत पडलो. कसाबसा तिथून बाहेर पडलो पण वाटच सापडेना... गनशॉट ऐकले तेव्हा जरा हायसं वाटलं. मनात विचार आला की मला सोडवायला आलं असेल कोणीतरी. आवाजाच्या दिशेने मी इथे पोहोचलो. मला वाचवा सर, हे बेट खूप विचित्र दिसतंय. मला इथे मारायचं नाही. सर, मला परत घेऊन चला...” आनंद त्याला धीर देत म्हणाला, “सिद्धांत, डोंट व्हरी. तू आता आमच्यासोबत आहेस. तुला काहीही होणार नाही. पण आम्ही माघार नाही घेऊ शकत...” प्रधानही पुढे होत म्हणाले “राईट आनंद. सिद्धांत, तू आता सुखरूप आहेस. पण या बेटाच्या रहस्याची उकल झाल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही. सो एव्हरी वन स्टे टुगेदर. लेट्स गो...” प्रधान, आनंद, सचिन आणि त्यांच्या मागे असलेला सिद्धांत असे सर्व पुढे जाऊ लागले. काही क्षण पुढे गेल्यावर अचानक जमीन हलू लागली. कोणाला काही कळायच्या आता जमिनीला मोठं भगदाड पडलं आणि सर्वजण त्यात पडले. जमिनीखालून जाणाऱ्या पाण्याच्या घसरगुंडीतून वाहत सर्व वेगवेगळ्या दिशाना जात एका मोठ्या गुहेत असलेल्या लोखंडी पिंजऱ्यात येऊन पडले. ते पुढे काही करणार इतक्यात “टॉकटॉक...” असा आवाज येऊ लागला. लगेचच कोणीतरी जोरजोरात हसतंय असंही जाणवलं...

गुहेतले लाईट लागले. प्रधान, आनंद आणि सचिन वेगवेगळ्या लोखंडी पिंजऱ्यात अडकले होते. तिघांनी समोर पाहिलं तर त्यांचे डोळे विस्फारले. ती हसणारी व्यक्ती दुसरी-तिसरी नसून सिद्धांत होता. एका निर्ढावलेल्या गुन्हेगारासारखा तो हसत होता. गुहेत सर्वत्र मशीनगनधारी माणसं होती. सिद्धांत म्हणाला, “प्रधान, तू आणि तुझे हे चेले फारच शूर आहात... माझ्या रचलेल्या सापळ्यातून वाचलात तर वाचलात शिवाय माझ्या रोबो विंचवालाही निकामी केलंत... नाईस व्हेरी नाईस... मारणार तर तुम्ही आहातच पण त्याआधी, प्रधान तुझी शेवटची इच्छा पूर्ण करतो मी. हे सगळं का चाललंय ते जाणून घ्यायचं आहे ना तुला... आणा रे सर्वांना वर...” असं म्हणून सिद्धांत निघून गेला. काही क्षणातच चारचार मशीनगनधारी गुंडांनी वेढलेले प्रधान, आनंद आणि सचिन मोकळ्या मैदानात आले. त्यांच्यासमोर एक मोठी इमारत होती. सिद्धांत त्या इमारतीसमोर उभा होता. त्या तिघांजवळ येत म्हणाला, “हे बघा. या बिल्डिंगला लपवत होतो मी. इथे सोनं बनवतो मी. मानवजातीला जगण्याची मजा देणारं सोनं... नाही समजलं... ड्रग्स... हो. इथे ड्रग्स बनवतो आणि देशभरात विकतो. आम्हाला कोणी जगासमोर आणू नये म्हणून इथे ही सगळी यंत्र बसवली. ही जागा चारही बाजूंनीच नाही तर आकाशातूनही सुरक्षित आहे. आमच्या कक्षेत येणारं एखादं विमान किंवा हेलिकॉप्टर जर धोक्याचं वाटलं तर त्याला उडवायला इथे मिसाईल्स पण आहेत... सो प्रधान. तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत अशी आशा करतो आणि तुम्हा तिघांना मरणाची शिक्षा बहाल करतो...”

सिद्धांतने जवळ येत प्रधानांच्या कपाळाला पिस्तूल लावलं. चाप ओढणार इतक्यात मोठा स्फोट झाला आणि बिल्डिंगच्या ठिकऱ्या उडाल्या. भिंतीला पडलेल्या खिंडारातून मागे पिस्तूल घेऊन उभी असलेली उमा सर्वांना दिसली. तिने गोळी चालवली आणि सिद्धांतच्या हातून पिस्तूल दूर उडालं. हळू हळू पुढे येत उमा बिल्डिंगच्या बाहेर आली. आनंदने विचारलं, "उमा, तू इथे कशी काय..." सिद्धांतच्या कानाजवळ पिस्तूल लावत उमा म्हणाली, "जेव्हा एकाच वेळी तुम्हा तिघांकडून येणारे सिग्नल्स आणि तुमचे मोबाईल फोन्स बंद झाले तेव्हा तुम्ही संकटात असल्याचं मला जाणवलं. मी पोलीसांची एक फळी घेऊन तडक निघाले. बेटाच्या ज्या बाजूने तुम्ही आत शिरलात तिथून न येता बेटाला वळसा घालून मागच्या बाजूला उतरले. ही बहुतेक यांची ड्रग्सची ने-आण करण्याची जागा असावी, कारण तिथे गुंडांची संख्या जास्त होती. आम्ही सर्व गुंडांचा समाचार घेतला. पोलीसांची फळी मागे राहिली आणि मी एकटीच पुढे आले तर ही बिल्डिंग दिसली. गुंडांच्या नजरा चुकवत मी आत शिरले. सर्व पुरावे गोळा करतच होते की समोरून आवाज आले. पाहिलं तर तुमच्या प्राणांशी गाठ होती. मी सोबत आणलेल्या एक्सप्लोझिव्सने पूर्ण बिल्डिंग उडवली..." प्रधानांनी सर्व ऐकून उमाशी हस्तांदोलन केलं. म्हणाले, "वेलडन उमा. वी आर प्राऊड ऑफ यू... सिद्धांत... जेव्हा पार्वती दुर्गेचं रूप घेते तेव्हा दुष्टांना पळता भुई थोडी होते ती अशी... एनीवेज... लेट्स गो सिद्धांत..."

सर्वजण जायला निघाले. बेसावध उमाला धक्का देऊन तिचं पिस्तूल सिद्धांतने हिसकावलं आणि प्रधानांवर गोळी झाडली. त्याचबरोबर सिद्धांतच्या गुंडांनी बेछूट गोळीबार करायला सुरुवात केला. उमा, सचिन, आनंद व प्रधानांनी प्रतिकार करत एकेका गुंडाला ठार केलं. शेवटी सर्वांनी सिद्धांतला घेरलं. सचिन म्हणाला, "बस सिद्धांत. आता शरण येण्याखेरीज तुझ्याजवळ काहीच शिल्लक नाही. मुंबईतलं मोठं घर तुझी वाट बघत आहे..." सर्वजण मुंबईला पोहोचले. येताना प्रधानांनी सिद्धांतच्या तिघा मित्रांनी चौकीवर बोलवून घेतलं. सिद्धांतला बेड्या घातलेलं पाहिलं आणि तिघांना धक्का बसला. प्रधान म्हणाले, "हा तुमचा हरवलेला मित्र आणि त्या बेटावरच्या रहस्यांचा खरा सूत्रधार. सिद्धांत, बोल आता..." सर्वांच्या गराड्यात बसलेला सिद्धांत बोलू लागला, "हो. मी गुन्हेगार आहे पण खरा सूत्रधार मी नाही. तो होता उस्मान पारकार... आमच्या घरची परिस्थिती बरी होती. खाऊन-पिऊन  आम्ही सुखी होतो. फक्त पोट भरणं म्हणजे आयुष्य नाही होत. चैन, मजा हे असतं खरं आयुष्य आणि त्यासाठी लागतो पैसा. कॉलेजमध्ये मला ड्रग्सचं व्यसन लागलं. त्यासाठी हवा असलेला पैसा घरातून मिळेनासा झाला. त्याचवेळी माझी भेट उसमान पारकरशी झाली. माझी हुशारी पाहून त्याने मला पार्टनर केलं व त्या बेटावर घेऊन गेला. तिथल्या कामाची व सापळ्यांची मी माहिती करून घेतली. सगळं व्यवस्थित चालू होतं. पण काही महिन्यांपूर्वी उसमान पोलीस एनकाऊंटरमध्ये मारला गेला...

उसमानचा सगळा धंदा मला मिळाला. सगळा प्रॉफिट मला मिळणार याच आनंदात मी होतो. पण तीन दिवसांपूर्वी माझ्या या मूर्ख मित्रांनी समुद्र सफर ठरवली आणि त्या बेटावर पोहोचले. मी तो विंचू पाठवला. आम्ही सर्व पळत असताना मला माझ्या माणसाचा फोन आला. मी स्वत:ला सापळ्यात अडकवून घेतलं आणि यांना जाऊ दिलं. मला वाटलं हे घाबरतील पण हे तुम्हा सर्वांना घेऊन आले. तुम्हा सर्वांना संपवण्याचा मी खूप प्रयत्न केला पण तुम्ही सर्वांनी माझे सर्व सापळे हाणून पाडलेत आणि मी पकडलो गेलो..." प्रधान त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले, "सिद्धांत, तुझ्या फायद्यासाठी तू स्वत:चंच नाही तर मानवजातीचं आणि निसर्गाचंही नुकसान केलं आहेस... तुला कठोरातली कठोर शिक्षा होईल..."

समाप्त.