Saturday, June 22, 2019

टिल्लू - भाग २...



मीनूच्या उत्तराने वरमलेला टिल्लू हलक्या आवाजात म्हणाला, "का गं मीनू, काय झालं. माझं काही चुकलं का... का मी दिसायला..." टिल्लूला मध्येच तोडत मीनू म्हणाली, "नाही टिल्लू, तसं नाही. तुझ्या दिसण्यामुळे नाही रे... खरंतर मीच लायक नाही तुझ्यासाठी. मी तुला फ........" मीनू बोलायची थांबली आणि मागे सरकत, "नाही टिल्लू, मी तुला सांगू शकत नाही. आता मला इथे राहता येणार नाही..." इतकं बोलून मीनूने पळायला सुरुवात केली. टिल्लूला मीनूचं हे वागणं खटकलं. तो तसाच तिला जाताना पाहू लागला. मीनूने नदी पार केली आणि पुढे जाऊ लागली. इतक्यात काही वटवागुळांनी तिच्यावर हल्ला केला आणि आपल्या तीक्ष्ण पंजात तिला पकून वरवर नेऊ लागले. मीनूच्या उत्तराने सुन्न झालेला टिल्लू, तिचा म्यावा ऐकून भानावर आला. त्याने वर पाहिलं तर चार वटवागुळं मीनूला पकडून हवेत उडत जात होती...

"मीनूऽऽऽऽऽ..." असं ओरडत टिल्लू त्या दिशेला धावू लागला. वटवागूळं झाडांच्या वर जाऊ लागली तसा टिल्लूही झाडावर चढला. एका फांदीवरून दुसरीवर उद्या मारत टिल्लू मिनूला वाचवण्यासाठी पळत होता. एक फांदी तुटली आणि टिल्लू झाडावरून खाली पडला तो थेट जमिनीवर. पुन्हा एकदा "मीनूऽऽऽऽऽ..." असा म्यावा टिल्लूने केला आणि ती वटवागूळं मीनुला घेऊन डोंगरापलिकडे दिसेनाशी झाली. टिल्लू कसाबसा गब्बू आजोबा राहत होते त्या झाडाखाली पोहोचला. दिवसभराचं काम उरकून सगळे तिथे गप्पा मारायला जमले होते. टिल्लूला उदास पाहून चिमणी आईने त्याला विचारलंच, “काय झालं रे टिल्लू, असा उदास का आहेस... आणि आपली मीनू कुठे आहे...” चिमणी आईच्या पंखाआड जाऊन टिल्लू रडू लागला. चिमणा बाबा त्याला थांबवणार तोच गब्बू आजोबा म्हणाले, “रडू दे त्याला. मन हलकं झालं की आपसूक थांबेल...” आणि तेच झालं. काही क्षण रडून झाल्यावर टिल्लूने त्याच्या पंजांनी डोळे पुसले आणि नदीकाठी घडलेली सर्व घटना सर्वांना सांगितली...

हे ऐकून सर्व सुन्न झाले. टिल्लू पुढे म्हणाला, “गब्बू आजोबा, मला मीनूला शोधायला जायचं आहे. आई, बाबा, मला मीनू खूप आवडते. माझ्यासमोर ती वटवागूळं मीनूला घेऊन गेली आणि मी काहीच करू शकलो नाही. आता ती संकटात असताना मी तिला वाचवायला जायला हवं. चिमणी आई चटकन म्हणाली, “नाही नाही. मी टिल्लूला कुठेच जाऊ द्यायची नाही. मीनूसुद्धा आपलीच आहे. तिच्याबद्दल मला वाईटच वाटतंय. पण तिला मदत करताना माझ्या टिल्लूला काही झालं तर... नाही नाही... मी नाही जाऊ देणार त्याला...” चिमणा तिला समजावत म्हणाला, “चिमणे, अगं आपला टिल्लू आता मोठा झाला आहे. स्वत:ला आणि मीनूला वाचवताना त्याने कशी हुशारी दाखवली ठाऊक आहे ना...” काही केल्या चिमणी आई ऐकत नव्हती. शेवटी टिल्लू म्हणाला, “आई, तुझी काळजी मला समजते. मी स्वत:ची काळजी घेईन. मला जाऊ दे...” शेवटी चिमणी आई तयार झाली. माकडी मावशी म्हणाली, “अरे पण टिल्लू, तू मीनूला शोधणार तरी कुठे...” “काऽऽऽऽऽव... काऽऽऽऽऽव...” या कर्कश आवाजाने सर्वांचं लक्ष त्या दिशेला गेलं...

झाडावर एक डोमकावळा बसला होता. सर्वांचं लक्ष आपल्याकडे आहे हे पाहून तो खाली आला. म्हणाला, “मी सांगतो तुम्हाला मीनू कुठे आहे ते... ती कालीपूरमध्ये आहे. महाराज कालीने तिला कैद करून ठेवलं आहे आणि उद्या तो तिला मारून टाकेल. कारण त्याला तिच्या कातड्याचा अंगरखा शिवायचा आहे...” हे ऐकून सर्वजण घाबरले. गब्बू आजोबा पुढे होत म्हणाले, “पण हे सगळं तुला कसं काय माहित...” तो डोमकावळा त्याची चोच खाली करत म्हणाला, “मीही कालीच्या सेनेत होतो...” हे ऐकताच टिल्लूचे सवंगडी लगेच म्हणाले, “याच्यावर विश्वास नका ठेऊ कोणी... कोणास ठाऊक हा खोटं बोलत असेल...” टिल्लू त्या डोमकावळ्याजवळ जात म्हणाला, “तू जर त्या कालीच्या सेनेत होतास तर आम्हाला मीनूबद्दल का कळवलंस... आणि मीनू इथे राहत होती हे तुला कसं माहित...” तो डोमकावळा म्हणाला, “बरोबर आहे तुम्हा सर्वांचं. मी कालीच्या सेनेत होतो. पण तो काली पक्का स्वार्थी निघाला. आपलं पोट भरण्यासाठी त्याने माझ्याच पिल्लांचा फडशा पाडला. माझी पिल्लं तर नाहीत, निदान मीनू तरी वाचावी असं मला वाटतं. आणि मीनूवर नजर ठेवण्याचं काम माझ्याकडेच होतं. या जंगलात तुमच्यासोबत राहताना मी तिला पाहिलं होतं. नदीकाठी मीनू एकटीच बसल्याची वार्ताही मीच कालीच्या वटवागुळांना दिली होती...”

तो डोमकावळा गप्प झाला. सर्वांना त्याच्याबद्दल संताप होता. पण त्याच्या पिल्लांबद्दल वाईटही वाटत होतं. टिल्लू, चिमणी आई आणि चिमणा बाबांकडे वळत म्हणाला, “आई, बाबा ऐकलंत ना... आपली मीनू संकटात आहे. मी लगेच निघतो तिला सोडवायला...” त्याच्या मागून येणाऱ्या त्याच्या सवंगड्यांना थांबवत टिल्लू म्हणाला, “आणि माझ्यासोबत कोणीही येणार नाही. नदीकाठी मीनूला मी वाचवू शकलो नाही. माझ्याचमुळे मीनू त्या वटवागुळांच्या तावडीत सापडली. आता मीच तिला सोडवून आणणार. कावळेदादा, मला तुझ्या पाठीवरून नेशील का कालीपुरात...” तो डोमकावळा लगेच तयार झाला. गब्बू आजोबा, माकडी मावशी, चिमणी आई आणि चिमणा बाबांचे आशीर्वाद घेऊन सर्वांना टाटा करत टिल्लू डोमकावळ्याच्या पाठीवर बसला. डोमकावळा आकाशात उडाला आणि काही क्षणातच नदीच्या दिशेने नाहीसा झाला. चिमणी आईने डोळे पुसले. माकडी मावशी तिला जवळ घेत म्हणाली, “काळजी करू नकोस चिमणे, आपला टिल्लू सुखरूप असेल हो...”

इकडे तो डोमकावळा जसा कालीपुराजवळ आला तसा त्याने उडण्याचा वेग कमी केला. हळू हळू खाली येत म्हणाला, “टिल्लू हे बघ कालीपूर. मीनूला नक्की कुठे कैद केलं आहे ते नाही माहित. मी तुला वेशीवर सोडतो. उगाच तुला कोणी माझ्यासोबत पाहिलं तय माझ्या कावळीचेही प्राण संकटात येतील...” टिल्लूने मानेनेच होकार दिला. कालीपूरच्या वेशीबाहेर त्या डोमकावळ्याने टिल्लूला उतरवलं. महालापर्यंत जाण्याचा मार्गही त्याला सांगितला आणि लगेच तिथून उडून गेला. सर्वांच्या नजरा चुकवत टिल्लू पुढे पुढे जाऊ लागला. ती घरं, ते रस्ते, यांबद्दल टिल्लूच्या मनात वेगळीच भावना निर्माण झाली. तो विचार करू लागला, “हे सर्व ओळखीचं का वाटतंय... मी कधी इथे आलो होतो का... असं का वाटतंय की मी इथलाच आहे...” विचार करत करत टिल्लू चालत असताना अचानक कुठूनतरी काही वटवागुळं त्याच्यावर धाऊन आली. अकस्मात झालेल्या हल्ल्याने टिल्लू गडबडला आणि वटवागुळांनी त्याला पकडलं. टिल्लू काही करण्याच्या आत वटवागुळं हवेत उडती झाली आणि महालाच्या दिशेने जाऊ लागली. काळे मनोरे, काळ्या खडकातून तयार झालेल्या भिंती, हे सर्व पाहून टिल्लू विचार करू लागला, “हे सगळं असंच होतं का... बहुतेक हे सगळंच वेगळं होतं. का मला सारखं वाटतंय, की मी इथलाच आहे...” वटवागुळांनी टिल्लूला जमिनीवर फेकलं आणि त्याची विचारमालिका खंडित झाली. टिल्लू महालात सर्वत्र नजर फिरवतच होता की, “हा...हा...हा... ये टिल्लू... आलास...” या आवाजाने तो चपापला...

टिल्लूने आवाजाच्या दिशेने पाहिलं तर तांबड्या डोळ्यांचा, काळा अंगरखा घातलेला, काळा मुकुट परिधान केलेला एक काळा-करडा बोका समोरून चालत येत होता. त्याला पाहताच टिल्लूने आपली नखं बाहेर काढली. वटवागुळं आणि इतर काळ्या बोक्यांनी लगेच टिल्लूला धरलं आणि पिंजऱ्यात डांबलं. पिंजऱ्याजवळ येत काली म्हणाला, “टिल्लू, तुला माहित आहे मी कोण ते... मी आहे काली. या कालीपूरचा राजा. आणि तू, माझ्या अनोख्या संग्रहालयातील एक वस्तू. अरे आकाराने इतका लहान तरीही इतका चपळ आणि हुशार बोका पाहिला नव्हता कोणी आजवर. माझ्या कावळ्यांनी नदीच्या पलिकडे तुला पाहिलं आणि लगेच मला वर्दी दिली. मी पाठवलेल्या बोक्यांना आणि वटवागुळांना तू पळवून लावलंस...” “पुढचं मी सांगू का महाराज...” कालीला मध्येच तोडत यवक्री म्हणाला. कालीची आज्ञा मिळताच तो पुढे बोलू लागला, “टिल्लू, मी यवक्री. महाराज कालीचा उजवा हात. महाराज तर सैन्य पाठवणार होते तुला आणायला. पण मीच म्हणालो त्यांना, की इतक्या लहान कामासाठी सैन्य कशाला... मोहिनीअस्त्राचा वापार करावा... आमचं मोहिनी अस्त्र पहायचं आहे तुला... ते बघ...”

यवक्रीने दाखवलेल्या दिशेला टिल्लूने पाहिलं तर बेड्यात जखडलेली मीनू त्याला दिसली. “मीनू...” असं ओरडत टिल्लू बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागला पण पिंजरा चांगलाच मजबूत होता. काली पुढे म्हणाला, “या मीनूवर किती काळ डोळा होता माझा. हिला माझी राणी करून घेण्याचा विचार होता माझा. पण ही मस्तवाल मांजरी... मग तिच्या वडिलांना मी कैद केलं आणि त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. तेव्हा मीनू लग्नाला तयार झाली. पण त्याआधीच तू पळवून लावलेले माझे बोके आणि वटवागुळं परत आली...” कालीला दुजोरा देत यवक्री म्हणाला, “आणि त्यानंतर याच मोहिनीअस्त्राचा वापर करायचं आम्ही ठरवलं. तुझ्यासमोर माझ्या काही वटवागुळांनी मीनूवर हल्ला केला. तू तिला वाचवलंस आणि तिच्या मायाजाळात अडकलास. काल नदीकाठी माझ्या वटवागुळांनी मीनूला पळवलं नाही, तर तुला इथे येण्यासाठी प्रवृत्त केलं. आणि, तू इथे कसा आलास माहित आहे... ए कावळ्या... ये की आता बाहेर...” हे ऐकताच मगाचचा डोमकावळा बाहेर आला...

“काली महाराजांचा विजय असो...” हे शब्द ऐकताच टिल्लूने त्या दिशेला पाहिलं तर त्याला पाठीवरून इथवर घेऊन येणारा डोमकावळाच त्याच्यासमोर उभा होता. तो पुढे म्हणाला, “महाराज, तुम्ही आणि यवक्रीने सांगितलं तितका हा टिल्लू काही हुशार नाही... अहो मी मारलेल्या थापेवर चटकन विश्वास ठेवला की त्याने. अगदीच मूर्ख निघाला हो हा टिल्लू... हा...हा...हा...” सर्वजण हसू लागले. टिल्लूने मीनूकडे पाहिलं तशी मीनू म्हणाली, “टिल्लू, माफ कर रे मला. तुला दुखवायचा हेतू नव्हता पण या दुष्टाने माझ्या वडिलांना पकडून ठेवलं आणि मी... नदीकाठी तुला हे सांगावं की नाही याचाच विचार करत होते रे मी...” मीनूचा गळा आपल्या पंजांनी आवळत कालीने तिला गप्प केलं. टिल्लूकडे पाहून म्हणाला, “ मीनू, तुझा बाप वरच्या बुरुजावरून खाली पडून कधीच मेला. या टिल्लूला वाचवायला तुला माझ्याशी लग्न करावंच लागेल. टिल्लू, आता आजची रात्र आराम कर या पिंजऱ्यात. उद्या सकाळी लांडगेभाऊ, तरसबुआ, कोल्होबा, गिधाडराज या इतर राज्यांच्या राजांसमोर आणि माझ्या मित्रांसमोर तुझ्यासह माझं अनोखं संग्रहालय पेश करेन आणि मग दिमाखात या मीनूशी विवाह करेन. आणि हो, उद्याच आम्ही सर्व मित्र मिळून सर्व जंगलं काबीज करण्यासाठी सैन्य पाठवू. मग ना तुझे ते सवंगडी राहतील आणि ना इतर कोणी प्राणी. सर्व जंगलांवर आमचंच राज्य असेल... हा...हा...हा... घेऊन जा रे याला आणि पिंजऱ्यासह कालकोठडीत डांबा...”

हे सर्व ऐकून टिल्लूचा राग मस्तकात जाऊ लागला. त्याच्या पंजांमधून धूर यायला लागला. तो पिंजऱ्यातून बाहेर पडण्याची धडपड करू लागला. पण त्याला ते शक्य होत नव्हतं. पिंजरा कालकोठडीत ठेवला गेला. बाहेर पडण्यासाठी टिल्लूची धडपड सुरूच होती. “कोण... कोण आहे इथे... कालीचा नवा कैदी का...” या आवाजाने टिल्लूचं लक्ष विचलित झालं. त्याच्या पंजांमधून निघणारा धूर बंद झाला. टिल्लूने कान वळवले. आवाज आला त्या दिशेला टिल्लू जाऊ लागला. त्या कालकोठडीत अंधाराशिवाय दुसरं काहीच नव्हतं पण झारोख्यांमधून चंद्राच्या शीतल प्रकाशाचे छोटे छोटे कवडसे मात्र पडत होते. त्या प्रकाशात टिल्लूने पाहिलं, की एक म्हातारा बोका समोर साखळदंडांमध्ये जखडून उभा आहे आणि बाजूलाच तशाच साखळदंडांमध्ये जखडलेली एक म्हातारी मांजर बसली आहे. टिल्लूने स्वत:ची ओळख करून दिली आणि विचारलं, ”तुम्ही कोण आहात... आणि इथे या अवस्थेत कसे काय...” टिल्लू हा प्रश्न विचारात असतानाच त्या म्हाताऱ्या बोक्याचं लक्ष टिल्लूच्या कपाळाकडे गेलं. आपले मिचमिचे डोळे अजून उघडत त्याने टिल्लूच्या कपाळावरचं निशाण पाहिलं आनंदाने किंचाळलाच, “युवराज... आमचा युवराज... हे निशाण, हा आकार... मनीदेवी... मनीदेवी, उठा... पहा. आपला युवराज आला...”

हे ऐकून ती म्हातारी मांजरही उठून उभी राहिली. सळ्यांजवळ येत म्हणाली, “हो महाराज, आपला युवराजच... तेच निशाण, आणि विषामुळे लहान राहिलेला आकार...” टिल्लूला काहीच कळत नव्हतं. प्रश्नार्थक नजरेने समोर पाहत टिल्लूने विचारलं, “कोण युवराज... कोण मनीदेवी... काय बोलता आहात तुम्ही...” आपले साखळदंडातले पंजे कसेबसे टिल्लूच्या कपाळावर नेत तो म्हातारा बोका म्हणाला, “टिल्लू, मी बोकेश्वर आणि या मनीदेवी आणि तू आमचा युवराज. तुझ्या कपाळावर असलेलं हे चिन्ह त्याचा पुरावा आहे. तू खूपच लहान होतास जेव्हा मी तुला नदीत सोडून दिलं होतं...” मग बोकेश्वरांनी व मनीदेवीने सगळी हकीगत टिल्लूला सांगितली. टिल्लूच्या डोळ्यात पाणी तरारलं. सळ्यांजवळ येत तो म्हणाला, “म्हणजे... तुम्ही माझे आई-बाबा आहात...” दोघांनी मानेनेच होकार दिला. हळू हळू आनंदाची जागा क्रोधाने घेतली. टिल्लू म्हणाला, “आणि हा दुष्ट काली माझा मामा आहे तर... त्याच्याचमुळे आपल्यासर्वांची ही दशा झाली... सकाळी तो आणि त्याची मित्रराष्ट्र सर्व जंगलांवर हल्ला करण्याचा मनसूबा आखत आहेत... मी हे होऊ देणार नाही...”

टिल्लूच्या हातून पुन्हा धूर येऊ लागला. त्याचे डोळे लालेलाल झाले. कालीवरच्या रागाने त्याने पिंजऱ्याची लोखंडी सळई घट्ट पकडली. काही क्षणातच टिल्लूच्या पंजांनी आग पकडली आणि ती सळई वितळू लागली. टिल्लूने क्षणार्धात आपला पंजा मागे घेतला. त्याचं लक्ष विचलित झालं आणि पंजांवर असलेली आग व धूर नाहीसे झाले. टिल्लूला जळजळू लागलं आणि तो पंजे चाटू लागला. कालकोठडीच्या एका रक्षक बोक्याने सर्व ऐकलं. त्याला टिल्लू, बोकेश्वर आणि मनीदेवीच्या नात्याची कल्पना आली आणि तो लगेच कालीला ही खबर देण्यासाठी निघाला. काली त्याच्या कक्षात उभा राहून बाहेरचं जग पाहत असताना अचानक ढगांचा गडगडाट होऊन एक आवाज कालीच्या कानावर पडला, कालीने आकाशात पाहिलं तर ढगांमध्ये त्याला अस्वलेश्वर गुरुजींचा चेहरा दिसला. ते हसत म्हणाले, “तो दिवस आला आहे काली... तुझा कर्दनकाळ उद्या तुझा अंत करेल...” गडगडाट थांबला. अस्वलेश्वर गुरुजींचा चेहराही नाहीसा झाला आणि कालकोठडीचा रक्षक बोका समोर येत म्हणाला, “महाराजांचा विजय असो... महाराज, आपण संध्याकाळी पकडलेला तो छोटा बोका साधा नाही. त्या बोकेश्वर आणि मनीदेवीचा पुत्र आणि राज्याचा युवराज आहे...”

काली हे ऐकतच होता की यवक्री दालनात येत म्हणाला, “महाराज, वाईट बातमी... त्या मीनूचा बाप मंगू, निसटला आपल्या तावडीतून...” काही क्षण शांततेत गेले आणि काली म्हणाला, “निसटला... जाऊ देत उद्याच्या आनंददायी सोहळ्यासाठी ही चूक आम्ही माफ करतो. तो मंगू अर्धमेलाच झालाय. जाऊन जाऊन जाईल कुठे... मरेलच थोड्या वेळात. त्याला मारण्याचे माझे कष्ट तरी वाचले. आणि यवक्री, तो टिल्लू म्हणजे युवराज आहे बरं का कधीकाळच्या मार्जारपूरचा... उद्या माझ्या सर्व शत्रूंना एकत्रच संपवतो. पुत्रासमोर त्याच्या माता-पित्याची हत्या आणि प्रजेसमोर त्यांच्या युवराजांची हत्या... काय दृश्य असेल ना... हा...हा...हा...” काली हसत असताना यवक्री म्हणाला, “महाराज, ते सर्व ठीक, पण बोकेश्वर, मनीदेवी आणि युवराजला पाहून प्रजेने विद्रोह केला तर... आपला डाव आपल्यावरच उलटायचा...” यवक्रीकडे शांत नजरेने पाहत काली म्हणाला, “तसं काही होणार नाही यवक्री. आणि झालंच तर... चाल माझ्यासोबत...” बोलता बोलता काली थांबला आणि यवक्रीला घेऊन तळघरात गेला. त्याने एक छोटं दार उघडलं आणि आत प्रवेश केला. यवक्री त्याच्या मागोमाग होताच. काली म्हणाला, “यवक्री, जर तू म्हणतोस तसं उद्या काही आपल्या विरोधात गेलंच तर हा आपली मदत करेल...” कालीने पंजा दाखवलेल्या दिशेला यवक्रीने पाहिलं आणि भीतीने त्याचे डोळे उघडेच राहिले...

समोर संपूर्ण दगडाचा आणि पर्वताएवढा मोठा किडा बसला होता. त्याचे डोळे बंद होते आणि त्याच्या डोळ्यांच्या मधोमध एक खाच होती. त्या किड्याच्या बाजूलाच एक चमकणारा लाल मणी ठेवला होता. यवक्रीच्या खांद्यावर हात ठेवत काली म्हणाला, “यवक्री, उद्याच्या सोहळ्यात जर काही विघ्न आलंच, तर हा मणी त्या खाचेत घालून या राक्षसी किड्याला जागृत करू. मग हा किडा त्याच्या वाटेत येणाऱ्या सर्वांचा चेंदामेंदा करेल. जोपर्यंत हा मणी त्याच्या कपाळावर असेल तोपर्यंत याला कोणी थांबवू शकणार नाही. तो मणी तुटताच हा किडा नष्ट होईल... तो एवढासा टिल्लू काय वाकडं करू शकणार आपलं... या राक्षसाच्या आणि माझ्या मित्रराष्ट्रांच्या मदतीने मी या जगावरच्या सगळ्या जंगलांवर राज्य करेन. हा...हा...हा...”

तिकडे कालीपूरपासून लांब, नदीपलिकडच्या जंगलात चिमणा-चिमणी, माकडी मावशी, गब्बू आजोबा आणि टिल्लूचे सवंगडी, असे सर्व टिल्लूच्या चिंतेत असतानाच, “म्या.... म्या....व.... म्या...” असा कहणण्याचा आवाज आला. सर्वजण आवाजाच्या दिशेला गेले तर एक जखमी बोका झाडाच्या खाली आला होता. सर्वांगाने रक्तबंबाळ झालेल्या त्या बोक्याला माकडी मावशीने झाडाला टेकवून बसवलं. गब्बू आजोबांनी जवळ जात त्याची विचारणा केली तेव्हा तो म्हणाला, “मी मंगू. त्या दुष्ट कालीला माझ्या मुलीशी, मीनूशी लग्न करायचं होतं. तिने नकार दिला. म्हणून त्याने मला कैद केलं आणि मीनूवर लग्नासाठी दबाव आणला. मीनूने त्याच्याशी लग्न करू नये म्हणून मी तिथून पळालो. त्या कालीचे काळे बोके आणि वटवागुळं माझ्या मागे लागली. मला चावलं, ओरबाडलं. पण मी तसाच पळत राहिलो आणि कसाबसा इथवर पोहोचलो. माझ्या... मी...नूला... वा...चवा हो...” बोलत असतानाच मंगूने डोळे मिटले. गब्बू आजोबांनी मंगूचा पंजा धरला आणि सर्वांकडे पाहत म्हणाले, “हा तर मेला. बहुतेक जखमा आणि थकव्यामुळे याने प्राण गमावले...” सर्वांनी मान खाली घातली. चिमणी म्हणाली, “म्हणजे, ती मीनू इथे आली ती... माझा टिल्लू... तरी मी सांगत होते सर्वांना... नका पाठवू टिल्लूला तिथे. पण कोणीच ऐकलं नाही माझं. आता मी नाही ऐकणार कोणाचं. मला जायचं आहे टिल्लूकडे आत्ताच्या आत्ता...” चिमणीला दुजोरा देत सर्वजण म्हणाले, “आम्हालाही टिल्लूची काळजी आहे. आम्हीही येणार तुझ्यासोबत. चला... सर्वजण लगेच निघू...”

सकाळ झाली. कालीच्या सांगण्यावरून संपूर्ण कालीपूर सजवलं गेलं होतं. महालाच्या टेकडीच्या खालीच असलेल्या पटांगणात सर्व प्रजेला बोलावलं गेलं होतं. महालातल्या सर्वांत ऊंच मनोऱ्यात काली त्याच्या जागेवर बसला होता. त्याच्याच बाजूला बेड्यांमध्ये अडकलेली मीनू खिन्न होऊन बसली होती. त्याचे सगळे मित्र, म्हणजे लांडगेभाऊ, तरसबुआ, कोल्होबा, गिधाडराज त्यांच्या त्यांच्या स्थानांवर बसले होते. बोकेश्वर आणि मनीदेवीला बाजूच्याच मनोऱ्यात साखळदंडांमध्ये जखडून बसवलं होतं. सोहळा दिमाखात सुरू झाला. भाल्यांच्या टोकावर जमवलेल्या त्या प्रजेसमोर कालीने जमवलेले अदभूत प्राणी असलेले पिंजरे येत गेले आणि पुढे सरकत राहिले. शेवटचा पिंजरा टिल्लूचा होता. पिंजरा पटांगणात येताच आकाराने लहान असलेल्या त्या पांढऱ्या-नारंगी बोक्याला पाहून सर्वजण अवाक झाले. आवाजाच्या दिशेने कान हलवत टिल्लू पिंजऱ्यात तडफडत होता. टिल्लूचा पिंजरा पाहताच काली जागेवरून उठला आणि म्हणाला, “प्रजाजनहो, ही आहे माझ्या संग्रहालयातली सर्वात नवखी वस्तू. आणि बरं का, हा फक्त बोका नाही, तर तुमचा युवराज आहे. हो, तुमच्या बोकेश्वर आणि मनीदेवीचा सुपुत्र...

हे ऐकताच सर्वजण उभे राहिले. एकमेकांकडे पाहत असतानाच मीनूला उठवत काली पुन्हा कडाडला, “ही तुमची भावी राणी आणि, हे बघा तुमचे बोकेश्वर आणि मनीदेवी...” कालीने पंजा डावीकडे नेला. पडदा बाजूला झाला आणि कालीच्या काळ्या बोक्यांच्या गराड्यात उभे असलेले बोकेश्वर आणि मनीदेवी सर्वांसमोर आले. त्यांना पाहून जनता खवळली. आपल्यामागे भाले घेऊन उभे असलेल्या कालीच्या बोक्यांना काहीजण मारू लागले तर काहीजण उड्या मारून मैदानात उतरले. हे सर्व पाहताच कालीने यवक्रीला इशारा केला. यवक्री लगेच तळघराकडे निघाला. प्रजेने विद्रोह केला होता. कालीचे काळे बोके आणि वटवागूळ सेना त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करू लागली. तिथे यवक्री तळघरात पोहोचला. त्याने मण्याला त्या किड्याच्या मस्तकावरच्या खाचेत बसवलं. प्रचंड गडगडाट झाला. त्या महाकाय किड्याने डोळे उघडले. किड्याने त्याचे दगडी पाय पसरले आणि तो उभा राहिला. पर्वतही लहान वाटेल इतका मोठा किडा आणि त्याचे जळत्या निखाऱ्यासारखे ते लालभडक डोळे पाहून यवक्री थोडा घाबरला. लगेच सावरत बाहेरच्या दिशेने पळाला. किड्याने यवक्रीला पाहिलं आणि वाटेतले दगड-धोंडे पायाखाली तुडवत तो यवक्रीच्या दिशेने जाऊ लागला...

यवक्री बाहेर आला. कालीच्या दिशेने पाहताच काली जोरात हसायला लागला. सगळे त्याच्याकडे पाहू लागले. “आणि आता या महासभेचं खास आकर्षण... माझा महाकाय अंगरक्षक...” असं म्हणत कालीने एका दिशेला पंजा केला. जमीन हादरू लागली आणि काही क्षणातच जमीन दुभंगली आणि सहा पाय असलेला, लालभडक डोळ्यांचा तो भीमकाय किडा सर्वांच्यासमोर आला. किड्याला पाहून सर्व घाबरले. किडा कालीच्या दिशेने येऊ लागला. आता तो कालीला पकडणार इतक्यात कालीने त्याच्या पंजावर असलेली एक कळ दाबली. त्यासरशी किडा थांबला. आपला पाय मागे घेत किडा वळला आणि बोकेश्वर व मनीदेवी ज्या मनोऱ्यात होते तिथे गेला. किड्याने मनोऱ्याला एक फटका मारला. मनोरा तुटू लागला. बोकेश्वर आणि मनीदेवी खाली पडत होते. कालीने पुन्हा पंजावरची कळ दाबली आणि किड्याने खाली पडणाऱ्या बोकेश्वर आणि मनीदेवीला त्याच्या एका पायात पडकलं. काली पिंजऱ्याकडे पाहत म्हणाला, “टिल्लू, हे बघ तुझे आई-बाबा... आता याच्याचकडून त्यांची माती-माती करवतो. कोण वाचवणार आता त्यांना. हा...हा...हा...”

काली बोलतच होता की अचानक अंधार झाला. गरुडावर बसलेले टिल्लूचे सवंगडी, माकडी मावशी, त्याच्यासोबत उडणारे अनेक पोपट, कबुतरं, चिमणे आणि चिमण्या यांच्या प्रचंड थव्यामुळे सूर्य झाकोळला गेला होता. गरुडांच्या पायात मोठे तर कबुतर आणि पोपटांच्या पायात लहान दगड होते. पटांगणावर येताच सर्वांनी दगड खाली सोडले. काळ्या बोक्यांवर आणि वटवागुळांवर ते दगड पडले. काही त्याचक्षणी गतप्राण झाले आणि काही मागे हटले. काही गरूड पुढे गेले आणि त्या राक्षसी किड्यावर त्यांनी दगड सोडले. अकस्मात हल्ला झाल्याने किडा गोंधळला. त्याने बोकेश्वर आणि मनीदेवीला जमिनीवर भिरकावलं. दोन गरूड लगेच खाली झेपावले आणि त्यांनी बोकेश्वर व मनीदेवीला झेलून सुखरूप जमिनीवर आणलं. हे पाहून काली आणि त्याचे मित्र म्हणजेच लांडगेभाऊ, तरसबुआ, कोल्होबा, गिधाडराज मैदानात उतरले. सर्वजण गरूडसेनेवर तुटून पडले. भीषण युद्ध सुरू झालं...

गरुडाने काली बसला होता त्या मनोऱ्याकडे झेप घेतली. माकडी मावशी आणि टिल्लूच्या सवंगड्यांच्या एकत्रित ताकदीसमोर काळ्या बोक्याचं काहीच चाललं नाही. ते पळून गेले आणि मीनूला सोडवून सगळे लगेच खाली उतरले. मीनूला पटांगणाच्या एका बाजूला यवक्री दिसला. तिने आपल्या पंजांनी त्याला धरलं आणि त्याच्या मानेचा जोरदार चावा घेतला. मीनूच्या जबड्यात तडफडत यवक्रीने प्राण सोडले. यवक्रीची दशा पाहून काली खवळला. आपल्या मित्रांना घेऊन तो मीनूकडे झेपावला. दुसऱ्या बाजूला नागरिकांची पळापळ होत असताना चिमणा-चिमणी, पोपटराव आणि गरुडांनी पाहिलं तर मीनू आणि त्याच्या सवंगड्यांना काली आणि त्याच्या मित्रांनी घेराव घातला आहे. गरूड, पोपट, आणि कबुतरांनी लगेच तिथे धाव घेतली. लांडगेभाऊ, तरसबुआ, कोल्होबा, गिधाडराज यांना गरूडसेनेने सळो की पळो करून सोडलं. काळ्या बोक्यांच्या सेनेला आणि वटवागुळांना कालीपूरच्या  प्रजेने, पोपटांनी आणि कबुतरांनी नामोहरम केलं. तो राक्षसमात्र काही केल्या थांबत नव्हता...

टिल्लू पिंजऱ्यातून बाहेर पडण्याचा आतोनात प्रयत्न करत असताना बोकेश्वर आणि मनीदेवी त्याच्याजवळ आले. बोकेश्वर म्हणाले, “युवराज, आपल्या क्रोधाला आपली शक्ती बनवा. बघा तो राक्षस सर्वांना किती त्रास देत आहे. आणि तो काली, ज्याच्यामुळे आपण दुरावलो. कालकोठडीतलं तुमचं ते रूप बाहेर येऊ द्या. मनोनिग्रह करा युवराज...” त्यांना दुजोरा देत मनीदेवी म्हणाल्या, “ऊठ टिल्लू, तुझ्यात अमोघ शक्ती आहे. त्याच्या जोरावर नष्ट कर त्या दुष्टांना...” टिल्लूने दोघांचे शब्द ऐकलेमात्र आणि त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. क्रोधाचा लावा भडकला. टिल्लूच्या अंगातून धूर निघू लागला आणि क्षणार्धात त्याचं संपूर्ण शरीर आगीच्या ज्वाळांमध्ये घेरलं गेलं. टिल्लूने म्यावा केला पण बाकीच्यांना जणू सिंहगर्जनाच ऐकू आली. टिल्लूच्या शरीरातून निघणारी आग इतकी तीव्र होती की तो लोखंडी पिंजरा वितळून गेला. टिल्लू किड्याच्या दिशेने पळू लागला. त्याला जाणवलं की त्याचा आकार वाढतो आहे. किड्यापर्यंत पोहोचेपर्यंत टिल्लू त्या किड्याच्या आकाराइतकाच मोठा झाला होता. आपल्यासमोर आगीत घेरलेला हा प्रचंड प्राणी पाहून किड्याने इतर सर्वांना सोडून त्याच्याकडे आपले पाय वळवले. एका महा-द्वंद्वाला सुरुवात झाली...

किड्याचे सहा पाय तर टिल्लूचे दोन पंजे एकमेकांवर आदळत होते. किड्याच्या प्रत्येक वाराला टिल्लू परतवत होता. आपल्या एका पंजाने टिल्लू त्या किड्याचे पाय अडवत होता तर दुसऱ्याने त्याच्यावर वार करत होता. टिल्लूच्या अग्नीची झळ किड्याला लागत होती. किडा पूर्ण जोर लाऊन पुढे सरकला तशी टिल्लूने जमिनीवर घसरत त्याचे एकेक करत चार पाय तोडून टाकले. किडा कोलमडला आणि जमिनीवर आदळला. त्याने आपलं अजस्र तोंड उघडलं आणि त्यातूनसुद्धा आगीच्या ज्वाळा निघू लागल्या. टिल्लूने त्याचे दोन्ही पंजे त्या किड्याच्या पोटात खुपसले खरे पण तरीही तो किडा अजून जिवंतच होता. मीनूला त्या किड्याच्या डोळ्यांच्या मधोमध एक चकाकणारा खडा दिसला. मीनू लगेच ओरडली, “टिल्लू... तो खडा... त्या किड्याच्या मस्तकावर असलेला तो लाल खडा...” टिल्लूने ते ऐकलं. तो मणी टिल्लूला दिसला. टिल्लूने हवेत उडी घेतली आणि आपल्या पंजाच्या एकाच वाराने त्या किड्याच्या मस्तकावरचा मणी बाजूला केला. त्यासरशी त्या किड्याचे डोळे बंद झाले आणि किडा निपचित पडला. तो मणी जमिनीवर आदळून फुटला आणि त्याच क्षणी प्रचंड स्फोटानिशी तो किडा नष्ट झाला...

पटांगणात आता लांडगेभाऊ, तरसबुआ, कोल्होबा, गिधाडराज, काळे बोके आणि वटवागूळ सेना, कोणी कोणी मागे नव्हते. गरूडराज, पोपटराव, कबुतर, बोकेश्वर, मनीदेवी, टिल्लूचे सवंगडी आणि मीनू यांच्या गराड्यात आता काली एकटाच राहिला होता. सभोवार नजर फिरवत असताना काली थोडा घाबरला होता पण लगेच उसने अवसान आणून म्हणाला, “मी एकटा राहिलो तरी माझे हे विषारी पंजे सर्वांना पुरून उरतील. या... करा वार... बघतोच एकेकाला...” हे ऐकून प्रचंड गर्जना करत टिल्लू म्हणाला, “नाही... या कालीला कोणीही हात लावणार नाही. हा माझा अपराधी आहे. याला मीच शिक्षा देणार...” हे बोलत असताना टिल्लूचा आकार परत लहान होत गेला. त्याच्या अंगातल्या ज्वाळा नाहीशा होत लुप्त झाल्या आणि टिल्लू पुन्हा पूर्ववत झाला. त्याला पाहून काली म्हणाला, “टिल्ल्या, तू आकाराने मोठा होतास तेव्हाच मला मारायला हवं होतंस. आता तुला क्षणार्धात मारून टाकतो बघ...”

काली टिल्लूवर धाऊन गेला. कालीच्या उजव्या विषारी पंजाला चुकवत टिल्लू त्याच्याशी लढत होता. कालीच्या पिळदार डाव्या पंजाचे वारही टिल्लूला चांगलेच लागत होते. त्याच्या अंगातून रक्त वाहू लागलं. कालीच्या प्रचंड ताकदीपुढे टिल्लूची ताकद कमी पडत होती. टिल्लूला थकवा जाणवू लागला. टिल्लूचं लक्ष विचलित झालेलं पाहून कालीने त्याच्यावर आपल्या उजव्या विषारी पंजाचा वार केला. टिल्लू घायाळ झाला आणि कोसळला. टिल्लू पडलेला पाहून चिमणी आणि मनीदेवी एकदम पुढे सरसावल्या. चिमणा म्हणाला, “थांबा, ही टिल्लूची लढाई आहे. त्याची त्यालाच लढायला हवी...” बोकेश्वर पुढे येत म्हणाले, “चिमणेराव म्हणत आहेत ते बरोबर आहे. युवराजांना लढू द्या स्वत:ची लढाई...” हळू हळू जमिनीवर पडलेल्या टिल्लूने डोळे किलकिले केले. त्याचं शरीर निळं पडत चाललं होतं. हे पाहून गरूडराज चटकन हवेत उडाले. तिथे टिल्लू उभा राहिला. विष पसरत चाललं होतं पण टिल्लू त्वेषाने पुढे झाला. कालीने पुन्हा वार केला. यावेळी टिल्लूने त्याच्या संपूर्ण ताकदीनिशी त्याचा उजवा पंजा रोखला आणि झाडाच्या दिशेने वळवला. पंजाची नखं झाडात रुतून तुटली. टिल्लूने त्याच्या अंगात असलेली शेवटची शक्ती पणाला लावली आणि आपल्या पंजांनी कालीवर वार केला. टिल्लूचा वार कालीच्या मानेवर बसला. रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. कालीचा गळा कापला गेला आणि तो कोसळला. पटांगणातून सरपटत सिंहासनाकडे तो जाऊ लागला पण तिथे तो पोहोचू शकला नाही आणि वाटेतच गतप्राण झाला...

टिल्लूही जखमा सहन करू शकला नाही आणि तिथेच कोसळला. सर्वजण टिल्लूच्या भोवती जमा झाले. टिल्लूला उठवण्याचा प्रयत्न करू लागले. इतक्यात गरूडराज एका सापाला घेऊन आला. मानेवर दहाचा आकडा असलेला फणा काढून तो नाग सर्वांकडे पाहत असताना गरूडराज म्हणाले, “नागराज... आमच्या टिल्लूला बरं करा हो...” नागराजांनी एकवार टिल्लूकडे पाहिलं आणि त्याच्या पावलावर चावा घेतला. थोड्याच वेळात नागराज बाजूला झाले. टिल्लूच्या शरीराचा निळा रंग उतरू लागला. हळू हळू टिल्लू शुद्धीवर आला. आपलं अंग झाडत तो उभा राहिला. मनीदेवी त्याला येऊन बिलगली. हमसून हमसून रडू लागली. बोकेश्वरांनीही टिल्लूच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. टिल्लूसुद्धा दोघांच्या प्रेमाने भारावला होता. इतक्यात त्याची नजर चिमणा आणि चिमणीकडे गेली. त्याच्यासह गरूडराज, पोपटराव, कबुतर, सर्वांनी आपले पंख पसरवून टिल्लूला आशीर्वाद दिला आणि मागे वळले...

टिल्लू लगेच त्यांच्याजवळ जात म्हणाला, “हे काय आई-बाबा, तुम्ही कुठे निघालात... मला भेटलाही नाहीत तुम्ही...” माकडी मावशी त्याच्याजवळ येत म्हणाली, “आता तुम्ही युवराज आहात... खूप मोठे आहात... आता आम्ही तुमच्यासोबत नसलेलंच बरं नाही का...” टिल्लू माकडी मावशीच्या जवळ जात म्हणाला, “नाही मावशी, मी कितीही मोठा झालो तरी तुझा आणि तुम्हा सर्वांचा टिल्लूच आहे... नका ना जाऊ...” मनीदेवी सर्वांच्या जवळ येत म्हणाल्या, “बरोबर आहे टिल्लूचं. तो जितका आमचा आहे तितकाच तुमचाही आहे...” बोकेश्वर महाराजांनी त्याचक्षणी घोषणा केली, “आजपासून या कालीपूरचं नाव पुन्हा मार्जारपूर असेल आणि या प्रांतात असलेल्या सर्व जंगलांना आणि त्यातल्या प्राण्यांना आमच्याकडून अभय असेल...” हे ऐकून सर्वांना आनंद झाला. सर्व टाळ्या वाजवत असताना एका भिंतीआड लपलेली उदासवाणी मीनू चिमणीला दिसली...

तिला जवळ बोलवत चिमणीने तिचा पंजा टिल्लूच्या पंजावर ठेवला. त्यासरशी मीनू गोड लाजली. टिल्लूही हसला. मोठा सोहळा रंगला. मार्जारपूरचा युवराज म्हणून गब्बू आजोबांनी टिल्लूचा राज्याभिषेक तर केलाच शिवाय टिल्लू आणि मीनूचं थाटामाटात लग्नही लाऊन दिलं. सर्वत्र आनंदी आनंद पसरला आणि मार्जारपूर पुन्हा खुशाल झालं...

समाप्त.

Wednesday, June 19, 2019

टिल्लू - भाग १...


मार्जारपूर, एक खुशाल राज्य. तिथले राजे बोकेश्वर महाराज आणि राणी मनीदेवी खूप प्रेमळ होते. प्रजेला आपल्या मुलाप्रमाणे ते वागवत. प्रजासुद्धा त्यांच्यावर मनापासून प्रेम करत होती. सर्वकाही छान असूनही बोकेश्वर आणि मनीदेवी यांना एक दुःख होतं, आणि ते म्हणजे त्यांना स्वत:ला मूल-बाळ नव्हतं. त्यांनी कित्येक नवस केले, देव-धर्म केले पण काहीच गूण आला नाही. एक दिवस त्यांना, अस्वलेश्वर नावाचे एक तपस्वी, जग परियटणाला निघालेत आणि सध्या नगराबाहेरच्या जंगलात वास्तव्य करून आहेत ही बातमी मिळाली. मग काय, बोकेश्वर महाराज आणि मनीदेवी ताबडतोब त्यांच्या दर्शनाला गेले...

दोघं त्यांच्या मठात पोहोचले तेव्हा अस्वलेश्वर गुरूजी साधनेत लीन होते. त्यात व्यत्त्यय येऊ नये म्हणून दोघं तसेच वाट पाहत उभे राहिले. काही वेळातच गुरुजींनी डोळे उघडले. बोकेश्वर आणि मनीदेवी यांना समोर पाहून स्मित करत ते म्हणाले, "ये राजन. तुझं इथे येण्याचं प्रयोजन आम्ही जाणतो. राणी, आपली समस्या आम्हास ज्ञात आहे. घे हे संत्र. निजण्यापूर्वी हे ग्रहण कर. लवकरच तुला पुत्रप्राप्ती होईल. राजन, तू परोपकारी आणि मनाने चांगला आहेस. तुझ्या याच गुणांमुळे तुझा पुत्र असामान्य असेल. तो धाडसी असेल, प्रेमळ असेल, पण त्याची देहबोली इतरांसारखी नसेल. मनोनिग्रह केल्यास हिमालयसुद्धा त्याच्यापुढे ठेंगणा होईल आणि अग्निदेवता त्याला नमन करेल. तुझ्या मस्तकावर आहे तसंच चिन्ह त्या बाळाच्याही मस्तकी असेल आणि तीच त्याची ओळख पटवून देईल..."

गुरुजींनी आशीर्वादाचा हात वर करत पुन्हा स्मित केलं आणि बोकेश्वर व मनीदेवी त्यांना नमस्कार करून समाधानाने महालात परतले. निजण्यापूर्वी मनीदेवींनी संत्र खाललं आणि येणाऱ्या सुखाची स्वप्न पाहत बोकेश्वर व मनीदेवी निद्राधीन झाले. महालापासून दूर, नागराच्या वेशीआधी, वटवागुळांच्या गुहेशेजारी असलेल्या महालात काली येरझारा घालत होता. नागराचा प्रधान असलेला काली, हा मनीदेवीचा सावत्र भाऊ होता. तो एक काळा-करडा बोका होता आणि नावाप्रमाणेच मनानेही काळा व क्रूर होता. त्याचा हस्तक होता यवक्री नावाचा एक कपटी आणि कारस्थानी वटवागूळ. कालीला असं फिरताना पाहून यवक्रीने विचारलंच, "महाराज, काय झालं... अशा फेऱ्या का मारताय..."

आपले लाल झालेले डोळे यवक्रीवर रोखत काली म्हणाला, "काय झालं... तुला दिसलं नाही काय झालं ते... इथे वारस नसलेल्या त्या बोकेश्वर आणि मनीदेवीचा अडथळा दूर करून मार्जारपुराचा राजा होण्याची स्वप्न बघतोय आम्ही आणि तिथे त्या योग्याने पुत्रप्राप्तीचं संत्र दिलं त्या मनीदेवीला. आत्तापर्यंत तिने ते ग्रहणही केलं असेल... आता त्यांना पुत्र झाला तर... तो थेट गादीवर बसेल. आणि मी... प्रधान तो प्रधानच..." बोलता बोलता कालीने पंजा उगारला आणि समोर असलेला पेला खिडकीबाहेर भिरकावला. त्याचा राग पाहून यवक्री थोडा घाबरला खरा, पण धीर करून म्हणाला, "महाराज, आपण आजपर्यंत खूप सहन केलंत. वास्तविक राणीचा भाऊ म्हणून तुम्हाला अधिक मान मिळायला हवा होता. निदान अर्ध राज्य तरी... काहीतरी करायलाच हवं..."

दिवस सरत गेले आणि बोला-फुलाला गाठ पडली. अस्वलेश्वर महाराजांनी दिलेल्या प्रसादाला फळ मिळालं आणि मनीदेवीची कूस धन्य झाली. बातमी सर्वत्र पसरली. मनीदेवी बाळाला जन्म देणार म्हणून प्रजा खूप खुश होती. सगळीकडे आनंदी आनंद असताना कालीचा मात्र जळफळाट होत होता. आपल्या महालात पुन्हा फेऱ्या मारत असताना वाटेत येणाऱ्या वस्तूंची तोडफोड करत काली त्याचा राग व्यक्त करत होता. थोड्याच वेळात यवक्रीकडे पाहून म्हणाला, “यवक्री, आपल्या वटवागूळ सेनेला बोलावून घे. आत्ताच महालावर आक्रमण करू आपण. यवक्री त्याच्या मालकाप्रमाणेच धूर्त होता. कालीच्या कानाजवळ येत म्हणाला, “महाराज, असा अतातायी विचार करू नये. प्रजा आज त्या बोकेश्वर आणि मनीदेवीच्या बाजूने आहे. असं नको व्हायला की आपण महालावर आक्रमण करायचो आणि आणि ही प्रजा आपल्यालाच...”

यवक्रीच्या बोलण्याने काली विचारात पडला. यवक्री पुढे म्हणाला, “महाराज, प्रजेला क्रोधाच्या आगीत जाळून काबीज करण्यापेक्षा दु:खाच्या सागरात तिला बुडवून त्यांच्यावर राज्य करा. महालातले चोर दरवाजे तुम्हाला ठाऊक आहेतच. रात्री निजानीज झाल्यावर महालात शिरायचं. त्या मनीदेवीला विष पाजून बोकेश्वरासह तिला खिडकीबाहेर फेकून द्यायचं आणि महालावर कब्जा करायचा. एकदा का राजा-राणी मेले की प्रजा हवालदिल होईल आणि आपल्या चरणांशी येईल...” कालीला ही युक्ती पटली. क्रूर हसत तो म्हणाला, “हा...हा...हा... आता अर्ध नाही, तर तुझं पूर्ण राज्य मी हस्तगत करणार आहे बोकेश्वर. मनीदेवी, तुझा भाऊ असलो म्हणून काय झालं. सिंहासनाची लालसा कोणाला नसते... बिचारी ती मनीदेवी... हा...हा...हा...”

रात्र वाढत चालली होती. आपल्या बाळाचे आणि भावी युवराजाचे इमले मनात बांधण्यात बोकेश्वर आणि मनीदेवी इतके गर्क होते की येणाऱ्या संकटाची साधी चाहूलसुद्धा त्यांना नव्हती. अंधाराचा फायदा घेत कालीची वटवागूळसेना महालात शिरली. बोकेश्वर महाराजांच्या एकेक सैनिकाला मारत ती सेना कालीसाठी रस्ता मोकळा करत होती. काली आणि यवक्री दालनात पोहोचले तेव्हा बोकेश्वर आणि मनीदेवी गाढ झोपेत होते. वटवागुळांनी लगेच दोघांच्या मुसक्या बांधल्या. अचानक झालेल्या हल्ल्याने दोघं घाबरली. काही करायच्या आतच दोघांचे पंजे आणि पाय बांधले गेले. काय होत आहे हे समजण्याचा प्रयत्न करत असतानाच काली त्यांच्या समोर आला. त्याला तसा पाहून बोकेश्वर म्हणाले, “काली... तू... तू केलंस हे...” त्यांना दुजोरा देत मनीदेवी म्हणाल्या, “अरे, भाऊ ना तू माझा. आपल्या बहिणीशी असं वागताना काहीच वाटत नाही का तुला...”

आपल्या पंजांनी दोघांची मान पकडत काली म्हणाला, “भाऊ नाही मनीदेवी, सावत्र भाऊ. तुझ्या नाही, तर माझ्या बापाने दुसरं लग्न केलं. मी मोठा पण तो नेहमीच मला पाण्यात पहायचा. त्याचं तुझ्यावरच प्रेम जास्त. इतकंच कशाला, आपल्या राज्याचं नावही त्याने तुझ्या जन्मानंतर बदललं. शेवटी सहन न होऊन माझ्या या विषारी पंजांनी मीच मारलं त्याला. पण त्याने, मरण्यापूर्वीच सर्वकाही तुझ्या स्वाधीन केलं. माझा हक्क हिरावून घेतला. तुझं लग्न झालं आणि मोठ्या मनाने तू मला इथे आणलंस. मला मात्र सतत इथे आश्रितासारखं वाटत होतं. पण आता नाही. बोकेश्वर, भावी युवराजाची स्वप्न पाहतो आहेस ना... त्याच्या जन्माआधीच त्याला संपवतो आणि मग तुम्हा दोघांना कैद करून ठेवतो म्हणजे उघड्या डोळ्यांनी तुम्ही आयुष्यभर मला राज्य करताना पाहत बसाल आणि गेलेल्या युवराजाच्या शोकाने व्याकूळ व्हाल. हा...हा...हा...”

“महाराज, बोलत काय बसलात... हा घ्या पेला आणि करा विषप्रयोग...” काली बोलत असताना यवक्री एक पेला घेऊन समोर आला. दोघांची मान सोडून कालीने त्याच्या पंजातील विष पेल्यात टाकलं आणि जबरदस्तीने मनीदेवीला ते प्यायला लावलं. बोकेश्वरांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला तर यवक्रीने त्याच्या पंजांनी त्यांना जखमी केलं. इतक्यात त्यांच्या अंगरक्षकाला, मन्याला याचा सुगावा लागला. मन्या ताबडतोब महाराजांच्या कक्षात आला. आपल्या पंजांनी एकेका वटवागुळाला बाजूला सारत महाराज आणि महाराणीपर्यंत मन्या पोहोचला व तिथून निघण्यास सांगू लागला. महाराज म्हणाले, “नाही मन्या. मी या नगराचा राजा आहे. मी असा पळून गेलो तर माझी प्रजा...” मन्या त्यांना समजावत म्हणाला, “महाराज, तुमचं बरोबर असलं तरी आत्ता आपल्याला तुमचा, महाराणींचा आणि येणाऱ्या युवराजांचा जीव जास्त महत्वाचा आहे. हट्ट करू नये महाराज. आपण या रस्त्याने निघावं. मी त्यांना इथे थोपवून धरतो...”

महाराज बोकेश्वर मनीदेवीला घेऊन महालाच्या मागच्या बाजूने जंगलाच्या दिशेने पळाले. तिथे महालात काली आणि यवक्रीने त्यांच्या वटवागूळ सेनेसह मन्यावर हल्ला केला. शरीराने कणखर असलेल्या मन्याने आपल्या पंजाच्या सहाय्याने एकेका वटवागुळाचा समाचार घ्यायला सुरुवात केली. खिडकीबाहेर जंगलाच्या दिशेने जात असलेल्या बोकेश्वर आणि मनीदेवीला पाहून काली खवळला. त्याच्या विषारी पंजाने त्याने मन्यावर एकच वार केला. घायाळ झालेला मन्या निपचित पडला आणि काही क्षणातच त्याची प्राणज्योत मालवली. काली यवक्रीला सूचना देत म्हणाला, “वटवागुळांना आणि कावळ्यांना सांग वरून जंगलाकडे लक्ष द्यायला. आपल्या सैनिकांना जंगलाचा कोपरा अन कोपरा खणून काढायला सांग. ती दोघं सापडलीच पाहिजेत...”

तिथे जंगलात जखमी असलेले बोकेश्वर आणि विष प्राशन केल्यामुळे अर्धमेल्या झालेल्या मनीदेवी कसेतरी स्वत:ला खेचत एका झाडापर्यंत पोहोचले. पंजांनी घसा आणि पोट पकडत मनीदेवी म्हणाल्या, “खोक... खो...क... म...महा...राज... आ...पलं... बाळ...” स्वत:च्या वेदना विसरून मनीदेवीकडे पाहत बोकेश्वरांनी सभोवार नजर फिरवली आणि दुर्वांच्या पाती घेऊन आले. मनीदेवीसमोर ठेवत म्हणाले, “मनीदेवी, तुमचे पंजे निळे पडत आहेत पण काळजी करू नका. या दुर्वा खा. तुम्हाला बरं वाटेल...” मनीदेवी दुर्वा खाणार इतक्यात कुठूनतरी एक विंचू आला आणि मनीदेवीच्या पायाला चावला. त्याबरोबर कर्कश ओरडत मनीदेवींनी पाय झाडला. विंचू झाडीत फेकला गेला आणि मनीदेवी जमिनीवर पडल्या. बोकेश्वर त्यांच्या जवळ आले. त्यांनी मनीदेवींकडे पाहिलं तर त्यांच्या पंजाचा रंग बदलत होता. निळाई कमी होत होती. मनीदेवीला उठवत बोकेश्वर म्हणाले, “मनीदेवी, उठा. बघा, तुमचं विष उतरतंय. देव विंचवाच्या रूपाने आला आपल्या बाळाचं रक्षण करायला...”

मनीदेवीला आता त्राणच नव्हतं. कुठल्याही क्षणी बाळ बाहेर येणार होतं. त्यांनी एक आर्त किंकाळी दिली आणि मनीदेवींच्या शेपटीजवळ एक छोटंसं पिल्लू दोघांना दिसलं. मनीदेवींच्या किंकाळीने आकाशात घिरट्या घालत असलेल्या एका डोमकावळ्याचे लक्ष खाली गेलं. त्याने बोकेश्वर आणि मनीदेवीला पाहिलं पण तो पिल्लाला पाहू शकला नाही. ताबडतोब यवक्रीला वर्दी देण्यासाठी तो माघारी फिरला. खाली बोकेश्वर आणि मनीदेवीने समोरच्या पिल्लाला पाहिलं आणि त्यांना धक्का बसला. बेडकापेक्षाही लहान आकाराचं ते पिल्लू पाहून मनीदेवी म्हणाल्या, “महाराज, हे... काय... आपलं बाळ...” बोकेश्वर त्या पिल्लाकडे पाहत म्हणाले, “शेवटी त्या विषाने आपला परिणाम दाखवलाच. पण मनीदेवी देवाच्या कृपेने आपलं बाळ सुखरूप तर आहे...” मनीदेवी बाळाला दूध पाजू लागली आणि बोकेश्वर अन्नाच्या शोधात जंगलात गेले. त्यांनाही चालण्याचं जास्त त्राण नव्हतं पण मनीदेवीही उपाशी होत्या...

फिरता फिरता बोकेश्वरांना काही कावळे वटवागुळांसोबत हवेत फिरताना दिसले. त्यांनी कान टवकारले. जमिनीवरून कालीच्या काळ्या बोक्यांची सेना जवळ येताना त्यांना जाणवली. लगेचंच मागे जात ते मनीदेवीपर्यंत पोहोचले. त्यांना म्हणाले, “मनीदेवी, मला इथे धोका संभवतो आहे. तो काली किंवा त्याची सेना इथे कधीही पोहोचू शकते. आत्ताच आकाशात कावळे आणि वटवागूळ पाहिले मी. आपल्याला इथून निघायला हवं...” कशाबशा उठत मनीदेवी म्हणाल्या, “महाराज, आपण दोघंही जखमी आहोत. त्यांचा सामना आपण नाही करू शकणार. आपल्या बाळाच्या जिवाला जास्त धोका आहे. त्याची सुरक्षितता आधी पहायला हवी...” बोकेश्वरांना मनीदेवीचं म्हणणं पटलं. आजू-बाजूला पडलेली काही पानं उचलून बोकेश्वरांनी त्याचा द्रोण तयार केला. आपल्या झोपलेल्या पिल्लाला त्या द्रोणात अलगद ठेऊन एकदा डोळे भरून त्याला पाहून मनीदेवीने तो द्रोण बोकेश्वरांच्या स्वाधीन केला. बाजूलाच वाहत असलेल्या नदीत त्या द्रोणाला सोडत बोकेश्वर म्हणाले, “जा युवराज, सुखरूप रहा. आम्ही तुमची वाट पाहू...”

प्रवाहात वाहत तो द्रोण दिसेनासा झाला आणि साश्रू नयनांनी बोकेश्वर मागे फिरले. मनीदेवीजवळ ते पोहोचलेच होते की त्यांनी पाहिलं, काळ्या बोक्यांनी मनीदेवीला घेराव घातला होता आणि यवक्रीने त्यांना पकडून ठेवलं होतं. बोकेश्वर पुढे होणार इतक्यात डोमकावळ्यांनी आणि वटवागुळांनी मिळून त्यांना पकडलं. क्रूर हसत काली समोर आला. “हा...हा...हा... बोकेश्वर, पळून पळून जाशील कुठे... आणि हे काय, तुमचं बाळ... मार्जारपुराचा युवराज कुठे आहे...” यवक्री पुढे होत म्हणाला, “महाराज, तुमच्या जालीम विषापुढे त्याचा काय निभाव लागणार... संपला असेल की तो...” यवक्रीकडून बोकेश्वर आणि मनीदेवीकडे नजर वळवत काली म्हणाला, “युवराज संपला, हा राजा आणि ही राणी माझ्या कैदेत... आता मीच राजा. आता या मार्जारपुराचं कालीपूर करणार मी. महालात आरामात वास्तव्य करणार मी आणि तुम्ही दोघं, कोठडीत मरेपर्यंत खितपत जगत राहणार. हा...हा...हा...”

तिथे नदीतून वाहत तो द्रोण बराच लांब निघून गेला. पिल्लाला जाग आली. आजू-बाजूला आपली आई नाही आणि वर मागे-मागे सरकणारं आकाश पाहून ते पिल्लू घाबरलं. द्रोणातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागलं पण त्या गुळगुळीत हिरव्यागार पानावरून त्याचे पंजे सरकत होते. त्याला काय करावं सुचत नव्हतं. जिवाच्या आकांतानं, “म्या.....व म्या.....व...” करत त्याने साद घालायला सुरुवात केली. नदीच्या किनाऱ्यावर एक चिमणा व चिमणी कीटक वेचत होते. त्यांना अस्पष्ट आणि हळू असा म्यावा ऐकू आला. त्यांनी कान देऊन ऐकलं आणि नदीतून वाहत असलेल्या द्रोणाकडे त्यांचं लक्ष गेलं. लगेच उडत जाऊन दोघांनी आत डोकावून पाहिलं आणि ते इवलंसं पिल्लू त्यांच्या नजरेस पडलं. काही अंतरावर नदी डोंगरावरून खाली जात एका धबधब्यात परिवर्तीत होत होती. त्या धबधब्यात हा द्रोण अडकला तर हे पिल्लू जिवानिशी जाईल, हे चिमण्याला काळलं. त्या दोघांनी द्रोणाला चोचीच्या सहाय्याने द्रोणाला उचलत किनाऱ्यावर आणलं. चिमणी म्हणाली, “अहो, हे मांजराचं पिल्लू इथे कसं काय आलं असेल...” त्या पिल्लाकडे पाहत चिमणा म्हणाला, “बहुतेक या द्रोणात पडलं असेल आणि वाहत वाहत इथवर पोहोचलं असेल. पण हे इतकं छोटंसं कसं काय... आणि सारखं ओरडतंय का...” चिमणी म्हणाली, “अहो याला भूक लागली असेल. चला आपण याला गब्बू आजोबांकडे घेऊन जाऊ...”

गब्बू आजोबा म्हणजे त्या जंगलात राहणारं एक घुबड होतं. वयाने आणि अनुभवाने ते मोठं असल्याने सर्व प्राणी, पक्षी त्यांचा सल्ला घ्यायला यायचे. चिमणा-चिमणी त्या द्रोणाला गब्बू आजोबांकडे घेऊन आले. पोपट, कबुतर, खार, माकड असे बरेच पक्षी आणि प्राणी तिथे जमले. अखेर गब्बू आजोबा म्हणाले, “चिमण्या, हे पिल्लू जरी मांजराच्या जातीचं असलं तरी ते आपल्या आश्रयाला आलं आहे आणि चिमणे, तुझी पिल्लं त्या डोमकावळ्यांनी खाऊन टाकली ना. मग असं समज हेच तुझं पिल्लू आहे...” “हो, आणि त्याला दूध पाजायचं म्हणशील तर मी आहेच की...” बाजूच्याच फांदीवर बसलेल्या माकडीणीने गब्बू आजोबांना दुजोरा देत त्या पिल्लाला जवळ घेतलं आणि दूध पाजू लागली. गब्बू आजोबा म्हणाले, “काय रे, याचं नाव काय ठेवायचं...” चिमणी म्हणाली, “आजोबा, हा इवलासा आहे ना तर आपण याला टिल्लू म्हणू... चालेल...” टिल्लू हे नाव सर्वांना आवडलं. आणि सर्वांनी हसत होकार दिला. दूध पिऊन पुन्हा झोपलेल्या त्या पिल्लाला कुशीत घेत चिमणी म्हणाली, “माझा गोंडस टिल्लू गं तो...”

तिकडे मार्जारपुरात कालीने बोकेश्वर आणि मनीदेवी दोघांनाही कोठडीत डांबले. आपल्या दालनात येऊन त्याने सर्व सैनिकांना हुकुम सोडला आणि काही क्षणातच मार्जारपुराची प्रजा महालाबाहेर येऊन ठेपली. काली म्हणाला, “तुम्हा सर्वांना एक दु:खद बातमी द्यायची आहे. आपले महाराज बोकेश्वर आणि राणी मनीदेवी आपल्या युवराजांसहीत स्वर्गवासी झालेत. आणि आनंदाची बातमी अशी की आता मार्जारपुरावर मी राज्य करणार आहे. माझ्या या राज्याचं नाव कालीपूर असेल. कालीपूर आणि माझ्या राजा बनण्यावर जर कोणाचा आक्षेप असेल तर तो आधीच सांगावा जेणेकरून त्याला बोकेश्वराकडे पाठवता येईल... हा...हा...हा...” यवक्री बाजूलाच होता. लगेच ललकारी देत म्हणाला, “महाराज काली यांचा विजय असो...” त्या बरोबर सर्व वटवागुळांनी आणि काळ्या बोक्यांनी कालीच्या नावाचा जयजयकार केला. महाराज बोकेश्वर, मनीदेवी आणि युवराज गेल्याची बातमी ऐकून जनता शोकाकूल झाली. समोर जे वाढून ठेवलं आहे त्याचा स्वीकार करण्याशिवाय कोणालाच पर्याय नव्हता...

आपल्या नावाचा जयजयकार ऐकून आणि समोर असलेली भेदरलेली जनता पाहून काली मनोमन खूप खुश झाला. यवक्री म्हणाला, “महाराज, तुमचं स्वप्न खरं झालं. बोकेश्वर गेला, मनीदेवी गेली आणि तो युवराजही गेला. आता तुम्हाला आरामात राज्य करता येईल...” यवक्रीकडे पाहत काली म्हणाला, “बरोबर आहे यवक्री सगळं काही आपल्या मनासारखं झालं आहे, पण अजून एकाची भेट घ्यायची आहे आपल्याला...” इतकं बोलून कालीने टाळी वाजवली. काही क्षणात काही काळे बोके तिथे आले. काली म्हणाला, “आम्ही जंगलात त्या अस्वलेश्वरला भेटायला जात आहोत. ताबडतोब व्यवस्था करा...” थोड्याच वेळात तीन-चार काळे बोके, दोन-तीन वटवागुळं, यवक्री आणि काली असे सर्व अस्वलेश्वर ऋषींच्या मठात पोहोचले. गुरुजी ध्यानस्थ बसले होते. काली पुढे होत अस्वलेश्वर ऋषींना म्हणाला, “योग्या, तुझं भाकीत खोटं ठरवलं मी. सगळ्यांना दूर करून टाकलं... हा...हा...हा...”

इतकं बोलून कालीने आपल्या पंजांचा वार अस्वलेश्वर ऋषींवर केला. त्याबरोब्बर तीव्र पांढरा प्रकाश तिथे झाला. गुरुजी अचानक गायब झाले आणि त्याजागी अनेक गुलाबाची फुलं प्रकट झाली. सर्वजण किलकिल्या डोळ्यांनी इथे-तिथे पाहत असतानाच आकाशवाणी झाली, “काली... पापी, दुष्टबुद्धी, तुला वाटलं असेल की तुला आता कोणी हरवू शकणार नाही, कोणी मारू शकणार नाही. तू उन्मत्त झाला आहेस. पण तुझा कर्दनकाळ अजून जिवंत आहे. एक दिवस तूच त्याला इथे आणशील आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी तुझा मृत्यू होईल...” आकाशवाणी बंद झाली आणि गुलाबाची सगळी फुलं अचानक गायब झाली. सर्वत्र अंधार पसरला. अस्वलेश्वर ऋषींना मारू न शकलेल्या कालीचे डोळे रागाने लाल झाले होते. त्याच रागात त्याने झाडावर आपल्या पंजाने वार केला आणि तणतणत महालाकडे निघून गेला. कालीने ज्या झाडावर वार केला होता त्याची पानं हळू हळू सुकायला लागली. खोड काळं पडलं आणि काही क्षणातच ते झाड जमीनदोस्त झालं...

तिथून बरंच लांब असलेल्या जंगलात टिल्लू वाढू लागला. त्याचा दिवस एकदम छान जायचा. सकाळी चिमणीआईसोबत दाणे वेचणं, भूक लागली की माकडी मावशीकडे जाऊन दूध पिणं. गब्बू आजोबांकडून छान छान धडे घेणं. फुलपाखरू, ससुल्या, खारुताई, बेडूकदादा या सवंगड्यांसोबत मनसोक्त खेळणं. चिमणाबाबांच्या पाठीवर बसून आकाशाची सफर करणं, असे रोजचे उद्योग करत टिल्लू मोठा होऊ लागला. जसजसा टिल्लू मोठा होत होता तसतसं त्याचं शरीरही वाढत होतं. वयात आलेला हा टिल्लू आता चिमण्याहून थोडाच मोठा दिसत होता. आता त्याला पाठीवर बसवून आकाशात उडणं चिमण्याला जमेना. त्याने पोपटरावांना सांगितलं. मग काय विचारता, पोपटरावांच्या पाठीवर बसून टिल्लू आकाशात मुक्त विहार करी. सरसर सरसर झाडावर चढी. खारुताई आणि बेडूकदादासोबत शर्यत लावी. एकदा गरूडराज आकाशातून जात होते. इतका मोठा पक्षी टिल्लूने कधीच पाहिला नव्हता. त्याने चिमणीला विचारलं. तर ती म्हणाली, “टिल्लू, हा की नाही गरूड आहे. हा खूप उंचावर उडतो. कधी कधी तर ढगात गायब होऊन जातो...”

चिमणी बोलतच होती की गरूड समोरच्या झाडावर येऊन बसला. टिल्लू हळू हळू त्यांच्याजवळ जात म्हणाला, “गरूडकाका, मला तुमच्या पाठीवरून घेऊन चला ना. मला या ढगांच्या पलिकडे काय आहे ते बघायचं आहे...” गरूडाने एकवार टिल्लूकडे पाहिलं आणि म्हणाला, “कोण तू... दिसायला तर मांजर आहेस पण इतका लहान आकार...” टिल्लू खाली मान घालत म्हणाला, “माझं नाव टिल्लू. खरं आहे की मी एक बोका आहे. माझा आकार असा का ते माझ्या आई-बाबांनाही माहित नाही...” खाली मान घालून उभ्या असलेल्या टिल्लूकडे पाहून तो गरूड हलकेच हसला. त्याच्या जवळ येत गरूड म्हणाला, “टिल्लू, नाव तर खूप छान आहे. आणि तू सुद्धा गोड आहेस. चल, बस माझ्या पाठीवर...” गरूडकाकांना विनंती करून टिल्लूने खारूताई, बेडूकदादा व ससुल्यालाही त्यांच्या पाठीवर बसण्याची परवानगी मिळवली आणि गरुडाने आकाशात झेप घेतली. त्याच्या पाठीवर बसलेले टिल्लू आणि त्यांचे सवंगडी खूप खुश होते. टिल्लू इतक्या वर कधीच आला नव्हता. त्याचे सवंगडी तर कधी आकाशातही गेले नव्हते. दिसणाऱ्या सर्व गोष्टींचं सर्वांनाच अप्रूप होतं. गरूडकाकांच्या पाठीवर बसून आकाशात विहार करताना टिल्लूला दूरवर काळ्या रंगाचा एक मनोरा दिसला. तो मनोरा पाहून टिल्लूला खूप नवल वाटलं...

त्याने पंजाने गरूडाला हात लावत विचारलं, “गरूडकाका, ते लांब काळं-काळं काय दिसतंय...” गरूडाने टिल्लू दाखवत असलेल्या दिशेला पाहिलं आणि म्हणाला, “ते कालीपूर आहे. आणि तो ऊंच मनोरा दिसतोय ना, तो आहे कालीपूरमधील सर्वात ऊंच टेकडीवर असलेला महाराज कालीचा राजवाडा. आधी त्या राज्याचं नाव मार्जारपूर होतं. तिथल्या महाराज बोकेश्वर आणि मनीदेवीला त्या कालीने मारलं आणि राज्य बळकावलं...” बोलत असतानाच गरूडाने डोळे किलकिले केले आणि म्हणाला, “आपल्याला खाली जायला हवं. मला वाटतं त्या मनोऱ्यात उभा राहून काली बहुतेक याच दिशेला बघतोय...” इतकं बोलून गरूड परत फिरला. टिल्लूने एकदा मागे वळून पाहिलं. खारूताईने विचारलं, “काय झालं रे टिल्लू, असा का बघतो आहेस...??” टिल्लू म्हणाला, “काय माहित, पण ती जागा ओळखीची वाटते...” तिथे मनोऱ्यातून खरोखरंच काली त्याच्या दुर्बिणीतून सगळीकडे पाहत होता. परत फिरणारा गरूड त्याला दिसला. दुर्बीण खाली ठेवत कालीने टाळी वाजवली. दोन कावळे उडत खिडकीपर्यंत आले. गरूड उडाला त्या दिशेला पंजा दाखवत काली म्हणाला, “जा, तो गरूड जिथे गेला त्या दिशेला जा. त्या गरुडाच्या पाठीवर मी एक मांजर पाहिलं. काय प्रकार आहे ते मला येऊन काळवा...”

गरूड ज्या दिशेला गेला, कावळेही लगेच त्या दिशेने उडाले. एक कावळा नदीच्या या बाजूला शोधू लागला आणि दुसरा कावळा नदीच्या पलीकडे गेला. या बाजूला असलेल्या कावळ्याला दगड-धोंड्यांखेरीज काहीच सापडलं नाही पण नदीपलिकडे गेलेला कावळा जेव्हा एका झाडावर थोडा आराम करण्यासाठी बसला होता, तेव्हा त्याला खाली काही प्राणी खेळताना दिसले. त्यातल्या टिल्लूला पाहून तर तो कावळा चक्रावलाच. आकाराने पोपटापेक्षा थोडा लहान असलेल्या त्या मांजराला पाहून कावळ्याला नवल वाटलं. दिसायला लहान असूनही हुशारी आणि चपळाई यामध्ये त्याने सर्वांना मागे टाकल्याचं दिसत होतं. कावळा लगेच कालीपूरकडे उडाला. महालात जाऊन कालीला ही खबर देताच काली मनोमन म्हणाला, “अच्छा आकाराने लहान मांजर पण बुद्धी आणि चपलता मात्र.... ते मांजरतर माझ्या अदभूत संग्रहालयात यायला हवं...” दाराबाहेर पाहत काली ओरडला, “कोण आहे रे तिकडे...” लगोलग दोन काळे बोके धावत आले. काली म्हणाला, “दक्षिणेकडे नदीच्या पलिकडे जे वन आहे, तिथे जा. आकाराने लहान असणारं एक अदभूत मांजर आहे तिथे. त्याला घेऊन या. काही वटवागुळांना न्या सोबत...”

कालीच्या आज्ञेचं पालन करत दोन-तीन वटवागुळं आणि दोन-तीन बोके मोहिमेवर निघाले. येणाऱ्या या संकटाची खबर नसलेला टिल्लू त्याच्या सवंगड्यांसोबत खेळात गर्क होता. चिमणा-चिमणी, गब्बू आजोबा, माकडी मावशी आणि इतर वयस्कर प्राणी-पक्षी त्यांना खेळताना पाहून आनंदित होत होते. इतक्यात, “थांबा...” या आवाजाने सर्वजण थबकले. सर्वांनी आवाजाच्या दिशेने पाहिलं तर काही काळे बोके आणि वटवागुळं समोर उभी होती. त्यातला एक बोका म्हणाला, “तुमचे हे खेळ ताबडतोब बंद करा. या मांजराला आम्ही घेऊन जायला आलो आहोत. कालीपूरच्या काली महाराजांचा तसा हुकूम आहे...” हे ऐकून सर्वजण टिल्लूभोवती गोळा झाले. गब्बू आजोबा म्हणाले, “तुमच्या काली महाराजांना सांगा, आमचा टिल्लू काही खेळणं नाही कधीही घेऊन जायला...” एक बोका पुढे होत म्हणाला, “म्हाताऱ्या घुबडा, तुला काली महाराज काय चीज आहेत ते माहित नाही म्हणून असा बोलत आहेस... बऱ्याबोलाने मागे व्हा सगळे आणि ए टिल्लू, चल आमच्यासोबत. नाहीतर...”

त्या काळ्या बोक्याने जसा आवाज वाढवला तशी तिथे आलेली वटवागुळं आणि इतर बोके हल्ला करायला सज्ज झाले. या इतक्या मोठ्या बोक्यांपुढे आपले सवंगडी तग धरू शकणार नाहीत हे लक्षात येताच टिल्लू पुढे होत म्हणाला, “नाहीतर काय... उगाच आवाज चढवून बोलू नका. तुम्ही मला न्यायला आलात ना... मग या, आधी मला पकडून तर दाखवा की... जर पकडलंत तर मी स्वत: तुमच्यासोबत येईन...” टिल्लूच्या बोलण्यावर चवताळलेले बोके एकसाथ त्याच्यावर धाऊन गेले. तसा टिल्लू पटकन मागे सरकत झाडाच्या मागून पळाला. तो सरसर सरसर झाडावर चढला. बोके त्याच्या मागे होतेच. टिल्लू त्यांच्यापासून पळत एका अरुंद आणि सुकलेल्या फांदीवर गेला. ती फांदी इतकी लहान होती की बोक्यांना स्वत:ला सांभाळता येईना. बोके मागे जाणार इतक्यात फांदी तुटली आणि सगळे खाली पाण्यात पडले...

टिल्लूने मात्र लगेच उडी मारून दुसरी फांदी गाठली. आपले पंजे एकमेकांवर आपटत तो हसू लागला. हे पाहून वटवागुळं लगेच हवेत उडाली आणि टिल्लूच्या दिशेने येऊ लागली. त्यांना पाहून कबुतरं मदतीला येणार इतक्यात टिल्लूने पंजा दाखवत त्यांना थांबवलं. टिल्लू जिथे उभा होता त्या फांदीला लागून एक वेल वरच्या बाजूला गेला होता आणि वरच्या एका फांदीला वेटोळे घालून बसला होता. टिल्लूने दातांनी तो वेल ओढला. तशी ती फांदीही ओढली गेली. ती वटवागुळं जशी टप्प्यात आली तसा टिल्लूने वेल सोडला. ओढली गेलेली फांदी पुन्हा सरळ झाली पण सरळ होताना येणाऱ्या वटवागुळांना फटके मारत गेली. वटवागुळं झाडांवर आदळून खाली पडली. पाण्यातून बाहेर आलेल्या बोकांचा माकडी मावशी आणि माकडोबा मामाने समाचार घेतला तर त्या वटवागुळांवर कबुतरं तुटून पडली. त्यांना तिथे थांबणं अशक्य वाटू लागलं आणि सर्व बोके व वटवागुळं आल्या दिशेला निघून गेली. मिळालेल्या विजयाचा सर्वजण आनंद साजरा करत असताना गब्बू आजोबा म्हणाले, “ते बोके आणि ती वटवागुळं आज जरी निघून गेली असली तरी संकट अजून टळलेलं नाही. तो काली महादुष्ट आहे. तो असा गप्प नाही बसणार. आपल्याला सावध रहायला हवं...”

गब्बू आजोबांच्या बोलण्याने सर्व धास्तावले खरे पण टिल्लूची हुशारी व चपळाई पाहून सर्व आनंदीतही होते. दिवस जसे पुढे जात होते तसा टिल्लू मोठा होत होता. आता तर टिल्लू चांगलाच मोठा झाला होता, पण आकारानेमात्र एखाद्या पोपटाइतकाच होता. एक दिवस नदी किनारी पाणी पीत असताना टिल्लूला वटवागुळांचा चित्कार ऐकू आला. त्याच्या पाठून हलक्या आवाजातला म्यावाही त्याने ऐकला. टिल्लूने वर पाहिलं तर दोन-तीन वटवागुळं एका पांढऱ्याशुभ्र मांजरीचा पाठलाग करत होते. मधूनच तिला पंजांनी मारत होते. नदीच्या या बाजूला असलेल्या टिल्लूला तिची मदत कशी करावी तेच कळत नव्हतं. त्याने आजूबाजूला पाहिलं. एका मोठ्या खडकाला एक लाकडाचं फळकूट टेकून उभं होतं आणि त्याचा नदीच्या बाजूचा भाग हवेत होता. टिल्लूला एक युक्ती सुचली. त्याने काही दगड तोंडात पकडून फळकुटावर ठेवले. मग थोडा मागे जाऊन जोरात धावत येऊन स्वत: त्यावर चढला आणि नदीच्या दिशेने उडी मारली...

त्यासरशी नदीकडचा फळकुटाचा भाग खाली गेला आणि खाली असलेला दगड ठेवलेला भाग वर उचलला गेला. दगड हवेत भिरकावले गेले आणि समोर असलेल्या वटवागुळांवर आदळले. वटवागुळं सैरभैर झाली आणि पळून गेली. ती गेलेली पाहून सुटकेचा निश्वास सोडत ती मांजर आपल्या जखमा चाटत तिथेच बसली. टिल्लू तिच्या जवळ आला. त्या मांजरीने टिल्लूला पाहत डोळे मिचकावले. ते निळेशार डोळे पाहून टिल्लू मनोमन सुखावला. ती मांजरी म्हणाली, “तू दगड मारून मला वाचवलंस ना. मी तुझी खूप आभारी आहे. नाहीतर आज त्या वटवागुळांनी मला फाडूनच खाल्लं असतं. तो कोण आहेस... आणि... इतका लहान कसा काय...” टिल्लू थोडा खजील झाला. म्हणाला, “माझं नाव टिल्लू. मी असा का ते मलाही माहित नाही खरंतर. सगळे म्हणतात मी लहानपणापासून असा आहे. बरं ते जाऊ दे... तू कोण आहेस आणि इथे कशी...???” कशीबशी उठत ती मांजरी म्हणाली, “मी मीनू. आईसोबत या जंगलाच्या पलिकडच्या गावात राहत होते. एकदा गावात दुष्काळ पडला. तिथे खाण्यापिण्याचीही व्यवस्था होईना. त्यातच तहान-भुकेने व्याकूळ माझी आई गेली. ज्यांच्या घरी आम्ही राहत होतो तिथेही लहान मुलं होती. आता माझा मालक मला खायला देईल की त्याचं पोट भरेल... मग मीच ते घर सोडलं...

या जंगलात आले. इथे असणारे छोटे पक्षी, किडे खाऊन, पाणी पिऊन दिवस घालवत होते. आज मी एक पक्षी मारून खात बसले होते तेव्हा काही वटवागुळं तिथे आली. मला पाहून माझ्यावर हल्ला केला. एखाद-दुसरं असतं तरी ते काही माझ्या पंजांच्या तावडीतून सुटलं नसतं. पण ते संख्येने जास्त होते. माझा काय निभाव लागणार होता... मी पळाले आणि ती वटवागुळं माझ्या मागे लागली. पुढचं सगळं तर तुझ्यासमोरच घडलं...” मीनू गप्प झाली. टिल्लू त्याचा पंजा मीनूच्या खांद्यावर ठेवत म्हणाला, “काळजी करू नकोस मीनू. ती वटवागुळं गेलीत आता. आणि राहण्याचं म्हणशील, तर तू चल माझ्यासोबत. नदीच्या त्या बाजूला मी माझ्या आई-बाबांसोबत राहतो. तूही तिथेच रहा...” मीनू खुश झाली आणि टिल्लूसोबत चालू लागली. दोघंही चालत चालत गब्बू आजोबांकडे पोहोचले. टिल्लूने गब्बू आजोबांना व तिथे जमलेल्या माकडी मावशी, चिमणी आई, चिमणा बाबा आणि त्याच्या सवंगड्यांना घडलेलं सगळं सांगितलं. गब्बू आजोबा म्हणाले, “मीनू, तू काही काळजी करू नकोस. तू इथेच रहा आम्हा सगळ्यांसोबत...” चिमणी आई त्यांना दुजोरा देत म्हणाली, “मीनू, जसा माझा टिल्लू तशीच तू आहेस हो... आता तुला काही काळजी करायची गरज नाही हो...”

मीनू मनोमन सुखावली. एक नवीन जग, एक नवीन घर मिळालं होतं तिला. टिल्लू आणि त्याच्या सवंगड्यांसोबत, त्याच्या परिवारासोबत मीनू तिथे मजेत राहू लागली. टिल्लूही त्याचा जास्त वेळ आता मीनूसोबत घालवू लागला. दोघंच जणं लांब लांब फिरायला जायची, मासे व उंदीर पकडायची. बेडूकदादा, खारुताई व ससोबाला जाणवू लागलं की टिल्लू आता त्यांच्यासोबत जास्तवेळ खेळत नाही. त्यांनी चिमणा बाबांकडे विचारणा केली तेव्हा ते म्हणाले, "अरे, टिल्लू जरी आपल्यात मोठा झाला असला तरी तो एक बोका आहे. त्याच्या जोडीचा, त्याच्याचसारखा दिसणारा एखादा सवंगडी त्याला मिळाला तर तो लांब जाणारच... तुम्ही काळजी नका करू..." तिथे टिल्लूला मनोमन मीनू आवडू लागली होती. आपल्या सवंगड्यांना भेटून टिल्लूने त्याच्या मनातली गोष्ट सांगितली. "मीनूला सर्व मनातलं सांगून टाक..." असा सल्ला त्यांनी टिल्लूला दिला...

टिल्लू मीनूला शोधू लागला. मीनू नदी किनारी असल्याचं पोपटरावांनी टिल्लूला सांगितलं. टिल्लू धावतच तिथे पोहोचला. पाण्याकडे एकटक पाहत मीनू उदास चेहऱ्याने बसली होती. टिल्लू तिथे कधी आला ते तिला कळलंच नाही. "काय झालं मीनू, अशी का बसली आहेस..." मीनूजवळ बसत टिल्लू म्हणाला. त्याच्याकडे पाहत मीनू म्हणाली, "विचार करते आहे मी. टिल्लू, तुला काहीतरी सांगायचं आहे. पण धीरच होतं नाही..." मीनूच्या खांद्यावर पंजा ठेवत टिल्लू म्हणाला, "मीनू, आज मलाही तुला काही सांगायचं आहे. आपण इतके दिवस एकत्र खेळलो-बागडलो की आता मला तुझी सवय झाली आहे. तू मला मनापासून आवडायला लागली आहेस मीनू..." टिल्लूकडे पाहत मीनूने टिल्लूचा पंजा आपल्या खांद्यापासून दूर केला. आपली नजर खाली करत म्हणाली, "तुझ्या मनातल्या भावना मला समजत आहेत टिल्लू. पण ते शक्य नाही..."

पहिला भाग समाप्त.