रात्र वाढत
चालली होती. जंगलात वाऱ्याचा लवलेश नव्हता. सर्वत्र भयाण शांतता पसरली होती.
रातकिड्यांचा आवाज शांततेचा भंग करू पाहत होता. काट्या-कुट्यातून, दगड-धोंड्यातून वाट काढत दोन पाय पळत होते. अचानक ते पाय अडखळले आणि
पळणारी व्यक्ती खाली पडली. वळून पाहणाऱ्या डोळ्यात आसवं आणि भिती एकाच वेळी दिसत होते.
काही क्षणातच आसमंत भेदणारी एक किंकाळी जंगलात दूरवर जात नाहीशी झाली...
"आई... आ...ई..." असं ओरडत नेत्रा जागी झाली. तिला दरदरून घाम फुटला
होता. आवाज ऐकून नेत्राचे आई-बाबा धावत तिच्याजवळ आले. पाण्याचा ग्लास नेत्राला
देत तिची आई म्हणाली, "शांत हो नेत्रा. पाणी घे बघू
आधी..." थरथरत्या हातांनी नेत्राने ग्लास घेतला आणि ढसाढसा पाणी प्यायलं.
नेत्राचं पाणी पिऊन झालं तेव्हा तिच्या वडिलांनी विचारलं, "नेत्रा, पुन्हा तेच स्वप्न पाहिलंस का..."
नेत्राने होकारार्थी मान हलवली आणि तिच्या आईच्या कुशीत शिरून रडू लागली. तिला जवळ
घेत तिची आई म्हणाली, "हे कसलं दुष्टचक्र मागे लागलं हो
पोरीच्या... आता लग्न व्हायचं पोरीचं. आणि हे..."
नेत्राचे
बाबा लगेच म्हणाले, "सरिता, आता
हिला झोपू देत. स्वप्न पाहून झालंय तिचं. आता झोपेल शांतपणे..." नेत्रा झोपली
आणि सरिता व रत्नाकर खोलीच्या बाहेर आले. सरिता म्हणाली, "काय करायचं हो पोरीसाठी. परवा ती मंडळी येतील तिला पहायला. या एका
गोष्टीमुळे..." रत्नाकर म्हणाले, "शांत हो सरिता.
हे बघ, ती मंडळी परवा येणार आहेत. आपण उद्याच एखाद्या
सायकियाट्रिस्टला कन्सल्ट करायचं का..." "सायकियाट्रिस्टला... अहो आपली
नेत्रा काही..." रत्नाकरला मध्येच तोडत सरिता म्हणाली. तिला समजावत रत्नाकर
म्हणाले, "सरिता अगं नेत्राच्या डोक्यावर परिणाम झालाय
म्हणून नाही जात आपण डॉक्टरकडे. तिला हे एकच स्वप्न का पडतंय हे समजायला नको
का..." सरिताला रत्नाकरचं म्हणणं पटलं. झोपलेल्या नेत्राकडे पाहत दोघांनी दार
बंद केलं...
दुसऱ्या
दिवशी तिघंही डॉक्टरकडे जायला निघाले. नेत्रा थोडी अपसेटच दिसत होती. "आई, बाबा, जाणं गरजेचं आहे का... साधं स्वप्नच तर आहे...
त्यासाठी सायकियाट्रिस्ट कशाला...", सारखी हा प्रश्न विचारत होती. थोड्याच
वेळात टॅक्सी एका बिल्डिंगजवळ थांबली. क्लिनिकमध्ये डॉक्टर कौशिक एका खुर्चीत बसले
होते. सरिता व रत्नाकर एका बाजूला जाऊन बसले. नेत्रा डॉक्टरांच्या समोरच्या
खुर्चीत बसली होती. डॉ. कौशिक काही काळ नेत्राकडे टक लाऊन पाहत होते. नेत्राही
त्यामुळे जरा अवघडल्यासारखी झाली. डॉक्टर म्हणाले, "सुरुवात
करण्याआधी मी हे सांगू इच्छितो, की मानसोपचारतज्ञाकडे जाणं
म्हणजे आपल्या डोक्यावर परिणाम झाला आहे असं नाही. त्यामागे अनेक कारणं असू शकतात.
तेव्हा तुम्ही अगदी निर्धोकपणे व्यक्त व्हा..." डॉक्टरांच्या बोलण्यामुळे
नेत्राला जरा हायसं वाटलं आणि तिने बोलायला सुरुवात केली...
"डॉक्टर, आत्तापर्यंत सगळं ठिक होतं. पण मागच्या
महिन्यापासून रोज रात्री साधारणपणे बारा नंतर मला एक विचित्र स्वप्न पडतं. एक
खिडकी दिसते. आतून रडण्याचा आवाज येतो. रडवेल्या आवाजातच, “आई... ये ना... भूक
लागली मला...” असं ऐकू येतं, पण भाषा गावरान असते. काही क्षणात एक जंगल दिसतं. कोणीतरी
धावत असतं. अचानक ती व्यक्ती खाली पडते. मग वळून पाहणारे भेदरलेले डोळे आणि एक
आर्त किंकाळी... हेच एक स्वप्न मी गेला महिनाभर पाहते आहे. किंकाळीनंतर मला जाग
येते. संपूर्ण शरीरात कापरा भरतो आणि मानही दुखू लागते. थोड्या वेळाने झोप लागते
ती थेट सकाळी जाग येते..." सर्व ऐकून घेत डॉक्टर म्हणाले, "मिस नेत्रा, महिनाभर हे एकच स्वप्न तुम्ही पाहत आहात
असं म्हणताय. म्हणजे महिन्यापूर्वी अशा काही घटना घडल्या असणार, ज्यांनी तुमच्या अंतर्मनावर खोल परिणाम केलाय. त्याबद्दल काही सांगू शकाल
का..." हे ऐकताच सरिता म्हणाली, "अबीर... अबीर
गोखले..."
डॉक्टरांनी
नेत्राकडे पाहत तिला विचारलं, "अबीर गोखले..??"
नेत्रा थोडी लाजल्यासारखी झाली. तेव्हा रत्नाकर म्हणाले,
"डॉक्टर, नेत्राच्या लग्नासाठी आम्ही
विवाह मंडळात नाव नोंदवलं होतं. महिन्यापूर्वीच सिंगापूरला राहणाऱ्या, अबीर गोखले
या मुलाकडून नेत्राची चौकशी झाली. अबीर कालच भारतात आला आहे आणि उद्या ती मंडळी
घरी येणार आहेत..." हे ऐकून डॉ. कौशिक जरा हरवल्यासारखे झाले आणि लगेच सावरत म्हणाले,
"ही तर खूपच चांगली गोष्ट आहे. मिस नेत्रा, आज आपण इथेच थांबू. इतक्या चांगल्या गोष्टीचा तुमच्या स्वप्नाशी काही
संबंध असेल का, ते नाही सांगता येत. कदाचित अजूनही काही घटना घडल्या असू शकतात.
त्यासाठी एक-दोन निवांत सेशन्स लागतील. आपण परवा याच दिवशी भेटू..." हे ऐकून
नेत्राला थोडं हायसं वाटलं आणि डॉक्टरांचा निरोप घेऊन तिघंही निघून गेले. तिथे
क्लिनिकमध्ये डॉ. कौशिक मात्र विचारात गढून गेले...
रात्री
बिछान्यावर पडल्या पडल्या नेत्रा सकाळचा विचार करत होती. त्या विचारातच तिला झोप
लागली. मध्यरात्रीनंतर झोपेतच अस्वस्थ होऊन ओरडली आणि दचकून उठली. सरिता व रत्नाकर
खोलीत आले तेव्हा नेत्रा बिछान्यावर थरथरत बसली होती. सरिताने जाऊन तिला जवळ
घेतलं. रत्नाकरने तिला पाणी देत विचारलं, "बेटा,
पुन्हा तेच पाहिलंस का..." नेत्राने पाणी प्यायलं आणि म्हणाली,
"हो बाबा. पण आज मला अजून काहीतरी दिसलं. एक जुनाट वाडा,
झोपाळ्यावर कोणीतरी बसलंय. त्याचा चेहेरा नाही दिसला पण पाय दिसले. जिन्यावर
दोघंजण पाठमोरे उभे होते. एक बाई आणि एक पुरुष होता. सगळं धुसर दिसत होतं.
तेवढ्यात ते सगळं गायब झालं आणि माझं नेहमीचं स्वप्न दिसू लागलं. आई, माझ्याबरोबर हे का होतंय गं..." सरिताच्या कुशीत शिरून नेत्रा रडू
लागली...
नेत्राला
धीर देत सरिता म्हणाली, "अहो, सकाळचा
कार्यक्रम पुढे ढकलायचा का आपण. पोरीची ही अवस्था पाहवत नाही हो..." खुर्ची
पुढे खेचून रत्नाकर बसले आणि काही बोलणार इतक्यात त्यांनी पाहिलं की नेत्रा गाढ
झोपी गेली होती. तिला नीट झोपवून दोघं बाहेर आली. रत्नाकर म्हणाले, "सरू, मला माहित आहे की नेत्राचा हा त्रास जरा गंभीर
आहे. पण जर सकाळचा कार्यक्रम कँसल केला तर काय वाटेल त्या मंडळींना. शिवाय सगळं
व्यवस्थित झालं तर आपल्या नेत्राला होकार पण मिळण्याची शक्यता आहे. काही काळजी करू
नकोस. तो बसलाय ना वर, सगळं ठिक होईल. नेत्रा काही आता सकाळपर्यंत
उठायची नाही. तू ही झोप पाहू..." दोघं पलंगावर आडवी झाली खरी, पण नेत्राच्या काळजीने डोळ्याला डोळा लागत नव्हता. अखेर पाहण्याच्या
कार्यक्रमाचे सुखद विचार करत दोघं झोपी गेली...
उजाडलं तशी
घरात धांदल सुरू झाली. येणाऱ्या पाहुण्यांसाठी खास स्वयंपाक, घरातली आवरा-आवर यातच सकाळचे दहा वाजले. आवरून-सवरून सरिता खोलीत आली
तेव्हा नेत्रा आरशासमोर केस विंचरत बसली होती. "नेत्रा, अगं किती उशीर हा... ती मंडळी येतीलच इतक्यात. तयार हो पाहू पटकन..."
असं म्हणून सरिता जायला लागली तर नेत्राने तिचा हात पकडला व म्हणाली,
"आई, सगळं होईल ना नीट..." नेत्राला
जवळ घेत सरिता म्हणाली, "काळजी करू नकोस राणी. सगळं
व्यवस्थित होईल. आता आवर लवकर..." सरिता निघून गेली आणि नेत्रा तिच्या तयारीत
गुंतून गेली. तिच्या मनात वेगवेगळे विचार सुरू होते. गेला महिनाभर सोशल मिडियावर
ज्याच्याशी नेत्रा गप्पा मारत होती त्या अबीरला आज ती प्रत्यक्षात भेटणार होती
याचा आनंद तर होताच. पण रात्री दिसणाऱ्या त्या स्वप्नांबद्दल काळजीही वाटत होती.
नेत्रा विचारात हरवली असतानाच गेटवर हॉर्न ऐकू आला...

सरिता व
रत्नाकरनेही तो हॉर्न ऐकला होता. ते बाहेर आले तेव्हा एक गाडी आत आली होती.
गाडीतून एक जोडपं उतरलं. त्यातला पुरूष म्हणाला, "नमस्कार,
मी सुधीर गोखले. आणि ही माझी पत्नी कल्पना..." हस्तांदोलन,
नमस्कार होतंच होते की एक देखणा तरूण समोर आला. त्याला पाहूनच
रत्नाकर व सरिताची कळी खुलली. हा अबीरच असला पाहिजे हे त्यांनी ओळखलंच होतं.
सर्वजण स्थिरावले, चहा-कॉफीसोबत इकडच्या-तिकडच्या गप्पा सुरू
असताना अबीर मात्र सगळीकडे नजर फिरवत होता. त्याला पाहून सुधीर म्हणालेच,
"हॅव पेशन्स यंग मॅन... सब्र का फल मीठा होता है..." हे
ऐकून हास्याची एक लकेरच हॉलमध्ये पसरली. तेवढ्यात जिन्यावरून उतरणाऱ्या नेत्राला
पाहून अबीर उठून उभा राहिला...
हॉलमध्ये
येऊन नेत्रा तिच्या आईजवळ उभी राहिली. अबीरच्या आई-वडिलांची ओळख झाल्यावर तिने
दोघांनाही वाकून नमस्कार केला. गाडी अबीरवर आली तशी नेत्रा गालातल्या गालात हसली
आणि नजर जमिनीकडे वळवत मागे जाऊन उभी राहिली. सर्व मंडळी बसली. चहा-कॉफीच्या सेकंड
राऊंडसोबत आलेला उपमा खाताना गप्पाही रंगू लागल्या. अबीर व नेत्रा मात्र
एकमेकांकडे चोरटा कटाक्ष टाकत होते, पण काहीच बोलत नव्हते. सुधीरना हे समजताच ते
म्हणाले,
"मि. ओक, या दोघांना आपल्यात बसणं थोडं
अवघडल्यासारखं होत असेल नाही का..." रत्नाकरांना सुधीरच्या म्हणण्याचा अर्थ
समजला आणि ते नेत्राला म्हणाले, "बेटा, अगं तू सजवलेली फ्लॉव्हर गार्डन दाखव की अबीरला..." नेत्राने स्मित
केलं. अबीरही जागेवरून उठला. दोघंही मागच्या दाराकडे वळली...
नेत्राने
कडी काढून दार ढकललं आणि समोर एक सुंदर बाग दिसू लागली. वेगवेगळी फुलझाडं, लॉन, मधोमध बसवलेला झोपळा आणि झोपाळ्याकडे जाणाऱ्या
छोट्या छोट्या पायऱ्या, सगळंच खूप छान दिसत होतं. नेत्रा
पुढे होत अबीरला म्हणाली, "या ना..." अबीरने पुढे
पाऊल टाकलं आणि डोळे मोठे करत म्हणाला, "आहो-जाहो...
सोशल मिडियावर अरे-तुरे आणि आता... या ना... आप तो ऐसे न थे... हे बघ नेत्रा,
आपण एकमेकांना आधीच पसंती दिली आहे. ही भेट आपल्या आई-वडिलांना आपली
पसंती कळवावी म्हणून आहे. तेव्हा नो फॉरमॅलिटीज. तू सोशल मिडियावर जशी बिन्धास्त
आहेस तशीच रहा. मला जास्त आवडशील. पण तिथे मला अब्या म्हणतेस तसं इथे नको बरं
का..." अबीरच्या बोलण्याने नेत्रा सुखावली व थोडी हसली. हसत असताना तिने
बागेकडे एक कटाक्ष टाकला आणि तिचं हसू विरून गेलं...
आत्तापर्यंत
जिथे उजेड होता, तिथे गडद अंधार दाटून आला. बाग नाहीशी झाली होती
आणि एक जुनाट वाडा तिथे दिसू लागला. ते पाहत असताना नेत्रा नि:शब्द झाली होती.
अचानक, "आय... लवकर ये ना..." हा रडवेला आवाज आला
आणि मोठ्या कुलुपाने बंद असलेलं एक दार नेत्राच्या समोर आलं. नेत्राच्या समोर येऊन
ते दार जोरजोरात वाजू लागलं. असं वाटत होतं जणू दारापलिकडून कोणीतरी ते उघडण्याचा
प्रयत्न करतंय. नेत्रा किंचाळली आणि तिने आपले डोळे घट्ट बंद करून घेतले.
"नेत्रा... ए नेत्रा... अगं काय झालं..." नेत्राला भानावर आणत अबीर
म्हणाला. नेत्राला बोलायचं होतं पण शब्दच फुटत नव्हते. अबीरच्या मिठीत शिरत तिने
बागेकडे बोट दाखवलं व स्वत: तिथे पाहिलं. तो अंधार, ते दार,
तो वाडा, सगळंच गायब झालं होतं आणि समोर बाग
दिसत होती. हे पाहून नेत्राला काहीच सुचेना. ती अबीरच्या हातात कोसळली आणि तिची
शुद्ध हरपली...
नेत्राच्या
किंचाळण्याचा आवाज ऐकून गोखले व ओक दांपत्य एव्हाना बागेत पोहोचली होती. सर्वांनी
मिळून नेत्राला आत नेलं आणि तिच्या रूममध्ये बिछान्यावर झोपवलं. नेत्रा अजून
बेशुद्धच होती. तिला तिथेच ठेऊन सर्वजण बाहेर आले. मि. सुधीर म्हणाले, "मि. ओक, हे सगळं काय होतं. नेत्राला काही आजार तर
नाही ना..." ओक दामपत्य बोलायला कचरत आहेत हे लक्षात येताच अबीर म्हणाला,
"काका, जे असेल ते सांगा. काळजी करू
नका..." रत्नाकरांना जरा हायसं वाटलं आणि नेत्राला पडणाऱ्या स्वप्नांबद्दल
सगळं सविस्तर सांगत ते म्हणाले, "कालच आम्ही डॉ. कौशिक
साने यांच्याकडे ट्रीटमेंट सुरू केली आहे..." हे ऐकून काय बोलावं तेच सुधीर
आणि कल्पनाला समजत नव्हतं. खाली मान घालून उभ्या रत्नाकरांच्या खांद्यावर हात ठेवत
अबीर म्हणाला, "काका, माझा निर्णय
बदललेला नाही..." अबीरच्या बोलण्याने रत्नाकर व सरिताला थोडा धीर आला. अबीर
पुढे म्हणाला, "पण नेत्राला होणाऱ्या त्रासाचा निकाल
लावायलाच हवा. तुमची हरकत नसेल तर पुढच्या सेशनला मी जाऊ नेत्रासोबत..."
सरिता व रत्नाकर दोघांनी स्मित करून माना डोलावल्या...
नेत्रा
पूर्ण दिवसभर बेशुद्धच होती. गोखले पती-पत्नी तर निघून गेले होते, पण अबीर तिथेच थांबला होता. रात्रीचे बारा वाजून गेले तरी नेत्रा अजून
शुद्धीवर येत नाही याची काळजी रत्नाकर व सरितासोबत अबीरलाही होती. तिथे नेत्रा
बिछान्यावर तळमळू लागली. रडत रडत कोणीतरी मारलेली हाक, तो
बंद दरवाजा, तो वाडा आणि कोणाचंतरी धावणं, हे सगळं तिला दिसू लागलं. "आई..." असं ओरडत नेत्रा जागी झाली.
तिने पाहिलं तर ती तिच्या खोलीत नव्हती. आजू-बाजूला जंगल होतं. सगळीकडे किर्र झाडी
आणि अंधार. तिने पाहिलं तर तिच्या अंगावरचे कपडेही बदललेले होतो. तिच्या नेहमीच्या
ड्रेसऐवजी गावाकडचं लुगडं होतं तिच्या अंगात. ते ही जागोजागी फाटलेलं. नेत्राने
सभोवार पाहिलं पण अंधाराशिवाय तिला काहीच दिसत नव्हतं. अचानक तिला पावलांचा आवाज
आला. नेत्राने समोर पाहिलं तर एक काळी आकृती तिच्या दिशेने येत होती. त्या आकृतीचे
डोळे चमकत होते आणि जबडा उघडा होता. तो एक लांडगा होता. त्या लांडग्याने नेत्रावर
झेप घेतली आणि, "आऽऽऽऽऽ..." नेत्रा त्याचवेळी किंचाळली आणि तिने डोळे
बंद करून घेतले...
नेत्राच्या
किंचाळण्याचा आवाज ऐकून रत्नाकर, सरिता व अबीर धावत तिच्या खोलीत
गेले. सरिताने लाईट लावले. नेत्रा चेहेऱ्यावर हात ठेऊन बेडवर बसली होती. अबीर नेत्राजवळ
गेला आणि तिला हलवत त्याने विचारलं, "नेत्रा... काय
झालं... नेत्रा..." नेत्राने डोळे उघडले तेव्हा तिचे आई-वडील बाजूला उभे होते
आणि अबीर तिच्याजवळ बेडवर बसला होता. नेत्राने सगळीकडे नजर फिरवली. तो अंधार,
तो लांडगा, ते जंगल, सगळं
गायब झालं होतं. तिने स्वत:ला चाचपडलं तर ते लुगडं गायब होऊन तिचे सकाळचे कपडे
तिला दिसले. अबीर नेत्राला शांत करण्याचा प्रयत्न करत होता आणि ती आपला हात
सगळीकडे फिरवत काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती. पण तिच्या तोंडून शब्दच फुटत
नव्हते. थोड्या वेळात नेत्रा शांत झाली. दोन्ही हातांनी डोकं धरत, "माझं डोकं खूप ठणकतंय. मी पडते जरा..." असं म्हणत नेत्राने उशीवर
डोकं ठेवलं. काही क्षणातच तिला गाढ झोप लागली...
तिला
झोपवून रत्नाकर, सरिता आणि अबीर खोली बाहेर आले. अबीरने शांत
झोपलेल्या नेत्राकडे पाहिलं आणि दार लावून तो हॉलमध्ये आला. रत्नाकर म्हणाले,
"पाहिलंस अबीर... हे असं होतं. गेला महिनाभर नेत्राला हा त्रास
आहे. यातून कसं सावरायचं तिला हेच समजत नाहीये..." त्यांना धीर देत अबीर
म्हणाला, "काळजी करू नका काका. डॉ. कौशिक चांगले
मानसोपचारतज्ञ आहेत. ते नेत्राला नक्कीच बाहेर काढतील..." सरिता आणि रत्नाकर
यांच्या चेहेऱ्यावरचे आश्चर्याचे भाव पाहून अबीर पुढे म्हणाला, "मी आणि कौशिक शाळेपासूनचे मित्र आहोत. एकाच शाळेत होतो आम्ही. कौशिक
पुण्याला निघून गेला आणि हळू हळू आमचा संपर्क कमी होत गेला. आता तर फक्त सोशल
मिडियावर आम्ही टचमध्ये आहोत... बरं काका आता पुढचं सेशन कधी आहे..."
रत्नाकरांनी सेशन उद्याच आहे असं सांगितलं. दोघांचा निरोप घेऊन अबीर निघणारच होता,
की सरिता म्हणाली, "अरे इतक्या रात्रीचा
कुठे जातोस आता. आज रात्री इथेच झोप. सकाळी जाऊन फ्रेश होऊन ये परत हवं तर. सेशन
सकाळी अकराचं आहे..." अबीरला सरिताचं म्हणणं पटलं आणि तो तिथेच गेस्ट
रूममध्ये झोपला...

सकाळ झाली.
नेत्राला जाग आली. सगळं आवरून ती बाहेर आली. नेत्रा सोफ्यावर बसलीच होती की सरिता
तिच्याजवळ येत म्हणाली, “नेत्रा, बरं वाटतंय का...” आईला पाहताच नेत्राने तिला
मिठी मारली. नेत्राच्या डोक्यावरून हात फिरवत सरिता म्हणाली, “सगळं ठीक होईल
बाळा... बरं चल, आवर लवकर. डॉ. कौशिककडे जायचं आहे ना... अबीर येईलच इतक्यात...”
अबीरचं नाव ऐकताच नेत्राला आश्चर्य वाटलं. रत्नाकर बाजूलाच उभे होते. ते म्हणाले,
“हो नेत्रा. तू बेशुद्ध झाल्यावर अबीर तुझ्याच सोबत होता. रात्रीही तो इथेच झोपला.
आत्ता पहाटे उठून तयार व्हायला घरी गेला. तो येतोय आज तुझ्या बरोबर डॉक्टरकडे...”
रत्नाकरना दुजोरा देत सरिता म्हणाली, “नेत्रा, अबीर खूप चांगला मुलगा आहे. आम्हा
दोघांनाही तो आवडला. मला खात्री आहे, तुलाही तो आवडत असणार. हो ना...” नेत्रा जमिनीकडे
पाहत होती. पुन्हा आपल्या आईकडे पाहत म्हणाली, “हो आई. मलाही तो आवडतो, पण...”
“पण... पण काय...”
नेत्रा
बोलतच होती की दारातून हा आवाज आला. सर्वांनी दारात पाहिलं तर अबीर उभा होता. आत
येत अबीर म्हणाला, "पण काय नेत्रा..." नेत्रा
काहीच बोलत नव्हती. तेव्हा अबीरच बोलता झाला, "नेत्रा,
तुझा तो ‘पण’ काय असू शकेल याचा अंदाज आलाय मला. मी घरी गेलो तेव्हा
आई-बाबांनीही मला तुझ्याबद्दल फेरविचार करायला सांगितलं होतं. मी त्यांना समजावलं
आहे. त्यामुळे आपल्या लग्नाविषयी माझ्याकडून... नव्हे आमच्याकडून तरी होकारच आहे.
हां, आता तुलाच नकार द्यायचा असेल तर..." हे ऐकून,
"तसं काही नाही रे..." असं म्हणत नेत्रा लाजली. वातावरण
जरा हलकं झालं तेव्हा रत्नाकर म्हणाले, "चला निघा आता.
डॉ. कौशिक वाट पाहत असेल..." रत्नाकर व सरिताचा निरोप घेऊन नेत्रा आणि अबीर
त्याच्या बाईकने निघाले डॉ. कौशिककडे जायला...
थोड्याच
वेळात ते क्लिनिकला येऊन पोहोचले. नेत्रा उतरली आणि, "तू
पुढे हो. मी बाईक पार्क करून येतो..." असं सांगून अबीर बाईक घेऊन पुढे गेला.
नेत्रा आत गेली तेव्हा डॉ. कौशिक तिची वाटच पाहत होते. नेत्रा खुर्चीवर जाऊन बसली.
"आज एकट्याच आलात का..." असं डॉ. कौशिकने विचारल्यावर नेत्रा काही बोलणार
इतक्यात, "आत येऊ का डॉक्टर..." असा आवाज आला. डॉ.
कौशिक आणि नेत्रा दोघांनीही दाराकडे पाहिलं तर अबीर समोर उभा होता. काही क्षण डॉ.
कौशिक तसेच अबीरकडे पाहत होते. मग उठून त्याच्याकडे जात म्हणाले, "अब्या..." अबीरनेही, "कौश्या..." असं
ओरडत डॉ. कौशिकला मिठी मारली. हे पाहून नेत्राला आश्चर्य वाटलं. "तुम्ही
ओळखता एकमेकांना..." या प्रश्नावर दोघंही हसले. अबीर म्हणाला, "आम्ही एकाच शाळेत होतो. पण शाळा संपल्यावर कौशिक पुण्याला गेला. अगदी
परवापर्यंत आम्ही चॅटवर बोलत होतो आणि आज भेट झाली. अशी भेट अपेक्षित नव्हती,
पण असो..."
अबीरला
दुजोरा देत डॉ. कौशिक म्हणाले, "परवा जेव्हा तू अबीरबद्दल
सांगितलंस, तेव्हाच हे लक्षात आलं होतं माझ्या. पण म्हटलं
आधी सगळं ठरू देत मग बोलू. आता अबीरला इथे पाहून सगळं ठरल्यातच जमा आहे, सो मी तुला नेत्रा वहिनी म्हणणार. चालेल ना..." नेत्रा लाजली आणि
पायाकडे पाहू लागली. काही क्षणात तिने वर पाहिलं, तर चित्रंच
पालटलं होतं. तिला समोर तोच वाडा दिसत होता. तोच हलणारा झोपाळा. ओसरीवर उभे असलेले
एक माणूस आणि बाई, झोपाळ्यावर बसलेला एक माणूस, सगळं धुसर दिसत होतं. तेवढ्यात रडण्याचा आवाज आला. नेत्राने बाजूला पाहिलं,
तर एक दार तिला दिसलं. कोणीतरी ते दार उघडण्यासाठी दारामागून धडका
देतंय असं वाटत होतं. क्षणार्धात सगळं नाहीसं झालं आणि जंगल दिसू लागलं. पुन्हा
तेच भेदरलेले डोळे आणि आर्त किंकाळी...
नेत्रा
एकदम दचकली. "नेत्रा... अगं कुठे तंद्री लागली आहे... ए नेत्रा..." अबीर
नेत्राला भानावर आणण्याचा प्रयत्न करत होता. शून्यात हरवलेली नेत्रा बाहेर आली आणि
अबीरकडे पाहू लागली. तिने आजूबाजूला पाहिलं पण काहीच नव्हतं. सगळं गायब झालं होतं.
अबीरचा हात धरत नेत्रा म्हणाली, "अबीर, पुन्हा तेच सगळं दिसलं रे... ते सगळं... अबीर..." नेत्राला शांत करत,
तिला खुर्चीत बसवत अबीरने कौशिककडे पाहिलं आणि म्हणाला,
"कौशिक, हा कसला त्रास असू शकतो रे...
काल पण असंच काहीसं झालं होतं. नेत्रा काहीतरी शोधत होती, असंबद्ध
बोलत होती पण आम्हाला कोणालाच काही समजत नव्हतं. शिवाय, काल
नेत्रा बेशुद्ध पडली होती, पण आज तसं झालं नाही..."
दोघांजवळ
येत डॉ. कौशिक म्हणाले, "अबीर, काल
जेव्हा हे घडलं, तेव्हा तुला याबद्दल काहीच माहित नव्हतं.
त्रास वाढल्याने नेत्राच्या मेंदूवर जास्त ताण पडला आणि तिची शुद्ध हरपली. पण आज
तू तयार होतास. वेळेत तिला भानावर आणलंस म्हणून ती शुद्धीत आहे. याचा संबंध आपण
आपल्या अंतर्मनाशी जोडू शकतो. आपल्या अवतीभोवती अनेक घटना, किस्से
घडत असतात. बहुतांश किस्से आपण विसरून जातो किंवा त्यांच्याकडे विशेष लक्ष देत
नाही. पण एखादा प्रसंग किंवा घटना अशी असते, जी आपल्या नकळत
आपल्या अंतर्मनावर सखोल परिणाम करते. नेत्रा, तुझ्या
बाबतीतही हेच झालं आहे. महिन्याभरापूर्वी तुझ्यासोबत असं काही घडलं आहे, ज्याने तुझ्या अंतर्मनाचा ताबा मिळवला आणि तुला हा त्रास सुरू झाला. या
गोष्टीचा संदर्भ कदाचित विस्मरणात गेलेल्या एखाद्या प्रसंगाशी किंवा घटनेशीही असू
शकतो. तुझ्या या त्रासाचं मूळ शोधण्यासाठी आपल्याला संमोहनशास्त्र म्हणजे
हिप्नॉटिझमचा आधार घ्यावा लागेल..."
नेत्रा आणि
अबीरने मान हलवली आणि डॉ. कौशिकने नेत्राला आतल्या खोलीत जायला सांगितलं. त्या
खोलीत आरामखुर्चीसारखी एक खुर्ची होती आणि समोर एक स्टँड होता. त्या स्टँडला एक
गोलाकार चकती लावली होती. नेत्रा त्या खुर्चीवर जाऊन बसली. डॉ. कौशिकने अबीरला
बाहेर बसायला सांगितलं, पण तो काही तयार होईना. मग दोघंही आत
आले. अबीरला एका बाजूला उभं रहायला सांगून नेत्रा जवळ येत डॉ. कौशिक म्हणाले,
"नेत्रा, आता आपण सेशन सुरू करत आहोत..."
हे म्हणत असतानाच त्यांनी सगळे दिवे बंद केले आणि त्या स्टँडचा लाईट सुरू केला.
एका लयीत ती चकती फिरू लागली. "नेत्रा, रिलॅक्स. आरामात
मागे डोकं टेकून बस आणि या फॉर्मेशनकडे लक्ष दे. कॉन्सनट्रेट...", डॉ. कौशिकचा हा आवाज ऐकताच नेत्रा जरा टेकून बसली आणि चकतीकडे पाहू लागली.
काही क्षणातच तिचे डोळे जड झाले आणि ती झोपली...
डॉ. कौशिक
नेत्राच्या कानाजवळ येत म्हणाले, "नेत्रा, जर माझा आवाज तुला ऐकू येत असेल तर तुझा उजवा हात वर नेऊन खाली
कर..." नेत्राने तसं केलं आणि डॉ. कौशिकने स्मित केलं. मग पुन्हा ते म्हणाले,
"आता आपण पंधरा दिवस मागे जातोय... आज काय झालं सांग..."
नेत्राला काहीतरी आठवत होतं आणि ती बोलू लागली, "आज
दिवसभर मी वाट पाहत होते, पण अबीरने कॉलच नाही केला. अब्या,
कुठे आहेस रे... कर ना कॉल... एखादा मेसेज तरी... पण काहीच नाही.
मीही फोन स्विच ऑफ करून ठेऊन दिला. संध्याकाळी फोन चालू केला तेव्हा अबीरच्या
मेसेजेसचा आणि इमेजेसचा पाऊस पडला. प्रत्येक मेसेजमध्ये सॉरी म्हटलं होतं त्याने.
पण मी ठरवलं होतं. दिवसभर अब्याने मला सतवलं आता मी सतावणार. मी रिप्लाय दिलाच
नाही. पण मलाच कसंसं झालं. पंधरा दिवसांची ओळख आणि अबीर इतका महत्वाचा झाला होता
माझ्यासाठी...
शेवटी रात्री गुड नाईटचा
मेसेज केला. अब्याचा लगेच रिप्लाय आला. आम्ही बराच वेळ बोलत राहिलो. मग मी झोपी
गेले..." हे ऐकून कोपऱ्यात उभ्या अबीरच्या चेहेऱ्यावर स्मितहास्य उमटलं. तिथे
नेत्रा बोलतच होती, "मला ते जंगल दिसतंय, तो लांडगा,
ते भेदरलेले डोळे..." खुर्चीत बसल्या बसल्या नेत्रा थरथरू
लागली. डॉ. कौशिक तिच्या जवळ जात म्हणाले, "शांत हो
नेत्रा. शांत हो..." नेत्राचं थरथरणं कमी झालं आणि ती शांत झाली. डॉ. कौशिक
पुन्हा म्हणाले, "आता आपण अजून पंधरा दिवस मागे
जातोय... काय झालं आज..." नेत्राने मान हलवली आणि बोलू लागली, "मी ऑफिसला जायच्या गडबडीत होते. तेवढ्यात फोन वाजला. मी फोन घेतला तर तो
अबीर होता. मेल चेक केला का हे विचारत होता. मी घाईत असल्याने संध्याकाळी पाहते
असं सांगितलं. दिवसभर तो फोन डोक्यात घोळत राहिला. संध्याकाळी मी मेल उघडला...
पुढील भाग: ०६.११.२०२१