नेत्राला रोज रात्री भयानक स्वप्न पडतात आणि ती आपरात्री दचकून उठते. य त्रासाबद्दल जाणण्यासाठी आणि तो कमी करण्यासाठी रत्नाकर आणि सरिता, डॉ. कौशिक साने या मानसोपचारतज्ञाची मदत घेतात. नेत्रा आणि डॉ. कौशिक बोलत असताना नेत्राला सांगून आलेल्या अबीर गोखले या मुलाचा विषय निघतो आणि डॉ. कौशिक ते सेशन तिथेच थांबवतात. दुसऱ्या दिवशी घरात सगळी आवराआवर सुरू असताना आणि स्वप्नांच्या विचारात नेत्रा हरवली असताना गाडीचा हॉर्न ऐकू येतो...
अबीरने त्याचा फोटो पाठवला होता. तो हसतमुख चेहेरा आवडला मला. सकाळी आलेल्या नंबरवर मी मेसेज टाकला. अबीरचा फोन आला. आम्ही छान बोललो. अबीर बोलण्यात खूप डिसंट वाटत होता. रात्री मला एक भयानक स्वप्न पडलं. एक जंगल ज्यात कोणीतरी धावतंय. ती व्यक्ती खाली पडली आणि एक किंकाळी. मी दचकून जागी झाले. मला दरदरून घाम आला होता. मानही प्रचंड दुखत होती..." नेत्राच्या कानाजवळ जात डॉ. कौशिक म्हणाले, "काम डाऊन नेत्रा. आता आपण अजून पंधरा दिवस मागे जाऊ... काय झालं आज..." नेत्राने पुन्हा मान हलवून आठवण्याचा प्रयत्न केला आणि बोलू लागली, "मी घरात एकटीच आहे. आई-बाबा नाशिकला गेलेत. माझ्या मैत्रिणी यायच्या होत्या पण तो प्रोग्रॅम कँसल झाला. आवरून-सवरून मी टि.व्ही. लावला. एक पिक्चर लागला होता. जंगलात एक माणूस धावत होता. तो पडला. एका लांडग्याने त्या व्यक्तीवर वार केला...
डॉ. कौशिकने हे बोलायचा अवकाश, की अबीर म्हणाला, “अरे पुढच्या आठवड्यात नाही रे येऊ शकणार आम्ही... अरे आम्ही जांभुळपाड्याला जायचा विचार करतोय. तिथल्या उजव्या सोंडेच्या गणपतीचं दर्शन घ्यावं असं आई-बाबांचं म्हणणं आहे. आणि तिथे जाणारच आहोत तर जरा ३-४ दिवस पिकनिकसाठीच जावं असा विचार करतोय. म्हणजे अलिबागसुद्धा करता येईल...” जांभुळपाड्याचं नाव ऐकताच डॉ. कौशिक म्हणाले, “अरे जांभुळपाड्याला माझं घर आहे. राहण्याची काही काळजीच नाही. आमचा एक विश्वासू नोकर आहे तिथे. हिरू नाव आहे त्याचं. मी त्याला सांगून ठेवतो. तो सगळी व्यवस्था करेल तुमची. फक्त कधी जाताय आणि किती जण जाताय ते कळवा. मला जमलं तर मी पण येईन...” अबीरने स्मित केलं. डॉ. कौशिकला मिठी मारून नेत्राला घेऊन तो बाहेर पडला. दार बंद होताना डॉ. कौशिक कोणाशीतरी बोलताना दिसले आणि नेत्रा व अबीर बाहेर आले. नेत्राचा चेहेरा पाहून अबीर म्हणाला, “अगं तुला सांगणारच होतो, पण तेवढ्यात कौश्यानेच विषय काढला ना. म्हणून असं सांगावं लागलं...” नेत्रा काहीच बोलत नव्हती. थोडा वेळ गेल्यावर ती म्हणाली, “अबीर, आधी मला काका-काकूंना भेटायचं आहे...”
अबीरने मान हलवली आणि बाईक सुरू झाली. थोड्याच वेळात बाईक दाराशी येऊन थांबली. नेत्रा उतरली आणि काही काळ बंद दाराकडे टक लावून पाहत राहिली. अबीरने तिला आत यायला सांगितलं तेव्हा तिची तंद्री भंग झाली. थोडं बिचकतच नेत्राने आत प्रवेश केला. गोखले दाम्पत्य समोरच उभं होतं. नेत्रा सरळ त्यांच्याजवळ जात म्हणाली, "काका, काकू, मला थोडं बोलायचं आहे. काल तुम्ही घरी आला होता तेव्हा जे काही घडलं ते घडायला नको होतं. हे काय होतंय ते मला माहित नाही. पण यामुळे तुम्हाला जो त्रास झाला त्याबद्दल मला तुमची माफी मागायची आहे..." नेत्रा बोलत असतानाच मि. गोखलेंनी तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, "बेटा, काल रात्री आमचं आणि अबीरचं बोलणं झालं आहे. अबीरप्रमाणेच आम्हालाही असंच वाटतं, की यात तुझा काहीही दोष नाही..." मि. गोखलेंना दुजोरा देत नेत्राच्या जवळ येत मिसेस गोखले म्हणाल्या, "यांचं बरोबर आहे नेत्रा. आमची तुझ्याविषयी कसलीच तक्रार नाही..."
हे ऐकून नेत्राच्या डोळ्यांत अश्रू येताच गुडघ्यावर बसून अबीरने नेत्रासमोर अंगठी धरली आणि तिला विचारलं, "नेत्रा, माझ्याशी लग्न करशील...??" नेत्रासाठी हा सुखद धक्का होता. तिने सर्वांकडे पाहिलं आणि अबीरला उठवत म्हणाली, "अरे पण आई-बाबा... त्यांना विचारायला हवं. आणि माझ्याकडे अंगठी नाहीये अजून..." नेत्रा हे बोलतच होती, की "सर्प्राईझ..." या हाकेने ती दचकली. तिने आवाजाच्या दिशेने पाहिलं तर तिचे आई-बाबा समोर होते. सरिता म्हणाली, "नेत्रा, अगं तू बाहेर पडलीस आणि मि. गोखलेंनी फोन केला. त्यांच्याकडून अबीरच्या अंगठीचं माप घेऊन येतानाच ही अंगठी घेतली. खरंतर अबीर तुला न सांगता इथे आणणार होता, पण तूच त्याला इथे येण्यासाठी विचारलंस. सगळं कसं झकास जमून आलं..." सरिता बोलत असतानाच रत्नाकर पुढे होत म्हणाले, "नेत्रा, तुझं काय म्हणणं आहे बेटा..." नेत्रा लाजली आणि मानेनेच तिने होकार दिला आणि सरिताच्या कुशीत शिरली...
एकीकडे टाळ्या वाजत होत्या तर दुसरीकडे अबीर व नेत्राने आपापल्या अंगठ्या बदलल्या. तेवढ्यात रत्नाकरना फोन आला. फोन घेत रत्नाकर म्हणाले, "हां रंजू, आनंदाची बातमी... ठरलं नेत्राचं. हो आम्ही आत्ता त्यांच्याच घरी आहोत... हो तर नक्कीच... मी लगेच कळवतो..." फोन ठेवत सुधीरकडे वळत रत्नाकर म्हणाले, "मि. गोखले, माझ्या बहिणीचा फोन होता. नेत्रा कुटुंबातली एकुलती एक मुलगी आहे. नेत्रा सोडून तिच्या पिढीत सगळे मुलगेच आहेत, त्यामुळे आमच्या नातेवाइकांना होणाऱ्या जावयाला पहायचं आहे. आज अनायसे शनिवार आहे, तर संध्याकाळी एक छोटा समारंभ ठेवायचा का... फक्त घरातली माणसंच असतील..." मि. गोखलेंनी कविताकडे पाहून अबीरकडे नजर वळवली आणि मानेनेच होकार दिला. त्यावर आनंदी स्वरात रत्नाकर म्हणाले, "तर मग येतो आम्ही. संध्याकाळची तयारी करायची आहे. नेत्रा, सरू चला. आपण तयारीला लागू..." ते तिघंही निघाले आणि सुधीर, कविता व अबीरने दारातूनच त्यांना निरोप दिला...
संध्याकाळचे सात वाजले होते. सर्वजण हळूहळू जमत होते. सगळी व्यवस्था घरच्या मागच्या अंगणात केली गेली होती. नेत्रा आणि अबीर सर्वांशी हसतमुखाने बोलत होते. नेत्रा आपल्या कुटुंबाशी अबीरची ओळख करून देत होती. तेवढ्यात, "काँग्रॅट्स नेत्रा..." हा आवाज आला. दोघांनी पाहिलं तर हातात पुष्पगुच्छ घेऊन डॉ. कौशिक उभे होते. कौशिकला पाहून अबीर व नेत्रा दोघांनाही नवल वाटलं. तेव्हा रत्नाकर म्हणाले, "मीच बोलावलं डॉ. कौशिकना. दुपारी डॉक्टरांचा फोन आला होता तेव्हा दिलं आमंत्रण..." नेत्राच्या हातात पुष्पगुच्छ देत डॉ. कौशिक म्हणाले, "काय रे अब्या, गुपचूप पार्टी... यही तेरी दोस्ती..." डॉ. कौशिकच्या खांद्यावर हात ठेवत अबीर म्हणाला, "नाही रे कौश्या... अरे फॅमिली फंशन आहे ना, म्हणून नाही सांगितलं हो तुला. आणि हे ठरलंही सकाळीच..." त्यांचं बोलणं सुरू होतं तेव्हा नेत्रा पाणी पिण्यासाठी बाजूला गेली. तिथून तिने या दोघांकडे पाहिलं तर दोघंही काहीतरी बोलत होती. काही क्षणातच डॉ. कौशिक तिथून निघून गेले. नेत्राने अबीरला विचारलं तर तो म्हणाला, "अगं त्याला एका पेशंटचा फोन आला..." पण नेत्राला मात्र शंका येत होती...
बराच वेळ ते आवाज घुमत राहिले, मोठे होत गेले आणि अचानक बंद झाले. सगळं शांत झालं हे लक्षात येताच नेत्राने कानावरचे हात काढले. डोळे किलकिले करून तिने सगळीकडे नजर फिरवली. पिवळ्या डिम लाईटमुळे खोलीभर अंधूक प्रकाश पसरला होता. तो दरवाजा, ते आवाज, सगळं गायब झालं होतं आणि सगळीकडे शांतता पसरली होती. नेत्रा बेडवरून खाली उतरली. जिथे तिला ते दार दिसलं होतं तिथे गेली. तिने हाताने चाचपडून पाहिलं पण तिच्या हाताला काहीच लागलं नाही. ए.सी.मुळे खोली बऱ्यापैकी थंड झाली होती नेत्रा मात्र घामेजलेली होती. तिने गटागटा पाणी प्यायलं आणि दार उघडायला धावली. दार उघडणार इतक्यात नेत्रा थांबली आणि विचार करू लागली, "आई-बाबा किती खुशीत असतील... एरवी मी रात्री दचकून जागी होते याचं टेंशन असतं दोघांना. आता पुन्हा त्यांना त्रास द्यायचा का..." हा विचार करत नेत्रा दारापासून लांब होत बेडवर येऊन झोपली. सगळं शांत होतं तरी तिला झोप येईना. शेवटी डोक्यावरून पांघरूण घेऊन नेत्राने डोळे बंद करून घेतले...
नेत्राला थेट सकाळी जाग आली तेव्हा सरिता तिच्या खोलीत आवरा-आवर करत होती. नेत्राला जाग आलेली पाहून सरिता म्हणाली, "उठलीस बाळा, चला आवर लवकर. अगं अबीरचा फोन आला होता. तो म्हणतोय ट्रिपला जाऊ. काय बाई ही घाई तरी... पण नाही कसं म्हणणार... जावईबापू नाराज झाले म्हणजे... चल राणी आवर पटकन. मंडळी येतीलच थोड्या वेळात..." बेडवर बसल्या बसल्या नेत्रा हे सर्व ऐकत होती आणि एकीकडे तिचं विचारसत्र सुरू होतं, "रात्री काय झालं सांगू का आईला... नको. उगाच टेंशन घेत बसेल..." हा विचार करत असतानाच, "राणी अगं ऊठ की आता. तयार हो पटकन..." या तिच्या आईच्या आवाजाने नेत्रा भानावर आली आणि वॉशरूममध्ये पळाली. आवरून-सवरून नेत्रा हॉलमध्ये आली तर अबीर आणि गोखले दामपत्य चहा पीत बसले होते. सर्वजण ट्रिपच्या तयारीनिशीच आले होते. त्यांना पाहून गोंधळलेली नेत्रा अबीरच्या बाजूला जाऊन बसली...
नेत्राचा गोंधळ लक्षात येताच अबीर म्हणाला, "अगं माझ्या ऑफिसमधून कॉल आला रात्री. मी ज्या प्रॉजेक्टवर काम करतोय त्यात काही अडचणी आल्या आहेत. मला २-३ दिवसात निघावं लागेल. पण त्या आधी आपली ही ठरलेली ट्रिप करावी असं वाटतं. म्हणून असा तडकाफडकी निर्णय घेतला. सकाळी काकांना कॉल करून सांगितलं तर त्यांनीही होकार दिला..." नेत्रा अजूनही चक्रावल्यासारखीच पाहत होती. शेवटी म्हणाली, "अरे डॉ. कौशिकना सांगितलंस का... ते ही येणार होते ना..." नेत्राचं हे बोलणं सपतं न संपतं तोच अबीरने मोबाईल काढत नंबर लावला, "हॅलो कौश्या... अरे ते आपलं ट्रिपचं ठरत होतं ना, ते आजच जातोय आम्ही. तू ही तयार रहा. आम्ही येतो तुला न्यायला. काय... अच्छा. ठिक आहे. पण नक्की बरं का... ओके..." फोन ठेवत अबीर म्हणाला, "कौशिकच्या काही अपॉईंटमेंट्स आहेत आज. त्या संपवून तो उद्या येईल. त्याचा तो कोण हिरू आहे त्याला सांगून सगळी व्यवस्था करून ठेवतो म्हणाला...”
सगळं इतकं पटापट होतंय ही गोष्ट नेत्रा जरा विचित्र वाटत होती. पण आई-बाबांच्या आनंदाकडे पाहत ती गप्प बसली. तयारी झाली आणि गाडी निघाली. ड्रायव्हिंग सीटवर अर्थात अबीर होता आणि बाजूला नेत्रा बसली होती. गोखले व ओक दामपत्य मागच्या सीट्सवर स्थानापन्न झाले होते. गप्पा-गाणी यांच्या सहाय्याने प्रवास मस्त चालू होता. साधारण दोन-अडीच तासात गाडी जांभुळपाड्याच्या वेशीवर आली. गाडीने वेस ओलांडताच नेत्राला काहीतरी जाणवल्यासारखं झालं आणि ती खिडकीतून बाहेर पाहू लागली. एका इमारतीजवळून गाडी पास झाली आणि नेत्रा म्हणाली, "ही गावची शाळा ना..." हे ऐकून सर्वजण नेत्राकडे पाहू लागले. काही क्षणातच एक बोर्ड दिसला ज्यावर बोर्ड होता, "प्राथमिक शाळा, जांभुळपाडा..."
अबीरने गाडी थांबवली. नेत्रा एकटक त्या बोर्डकडे पाहत होती. नेत्राला "काय गं नेत्रा... काय पाहतेस..." अबीर असं म्हणाला आणि ती भानावर आली. नकारार्थी मान हलवत तिने सर्वांकडे पाहिलं. अबीरने गाडी पुन्हा सुरू केली. वातावरण हलकं करण्यासाठी अबीर म्हणाला, "पुन्हा शाळेत शिकण्याचा विचार दिसतोय नेत्राचा. हरकत नाही, आम्हाला मूल झालं की ते या शाळेत येईल हां शिकायला..." अबीरच्या बोलण्यावर नेत्रा लाजली आणि सर्वजण हसू लागले. नेत्राने खिडकीबाहेर पाहिलं तर रस्त्यापासून थोडा आत तिला एक वाडा दिसला. कौलं, लाल मातीचा रस्ता आणि काळा पडलेला वाडा पाहण्यात नेत्रा गर्क झाली. इतक्यात गाडीही थांबली. सर्वजण उतरले आणि अबीर नेत्राला हलवत म्हणाला, "नेत्रा... अगं ऊठ... कुठे तंद्री लागली आहे..."
सर्वजण उतरलेले पाहून नेत्राही उतरली. त्या वाड्याकडे पुन्हा एकटक पाहत ती वाड्याच्या दिशेने जाणार इतक्यात गाडीतून बॅगा काढणारा माणूस म्हणाला, "ताईसाहेब, थितं न्हवं. हे घर हाय कौशिक सायबांचं. त्यो वाडा लय वंगाळ हाय..." त्याचं बोलणं झालं आणि नेत्रीने पुन्हा आपली नजर वाड्याकडे वळवली. अबीर जवळ येत म्हणाला, "काय गं नेत्रा... पुन्हा हरवलीस... अगं चल की आत... हिरू, यांना आत घेऊन जा. आणि जेवणाचं बघ जरा..." नेत्रा अबीरसोबत चालू लागली. तिने मध्येच वाड्याकडे एक कटाक्ष टाकला. नेत्रा आत जाणार इतक्यात तिला हळू असा मुसमुसण्याचा आवाज आला. तिने इकडे तिकडे पाहिलं पण आस-पास कोणीच नव्हतं. नेत्राची नजर पुन्हा वाड्याकडे वळली. वाड्याकडे पाहत ती विचार करू लागली, "हा तोच वाडा तर नाही ना जो मला स्वप्नात दिसतो..."
हात-पाय-तोंड धुऊन सर्व जरा बसले होते तोच नेत्राने प्रश्न केला, "हिरूदादा, तुम्ही म्हणालात तो वाडा वंगाळ आहे. तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे..." हिरूने एकवार सर्वांकडे पाहिलं आणि बोलू लागला, "लय वरीस अदुगर त्या वाड्यामंदी मंगलदास आनी गोपालदास असे दोन भाव ऱ्हायचे. मंगलदास थोरला व्हता अन् गोपालदास धाकला. त्येंच्याकडं लय पैका व्हता. गोपालदास शहराकडं शिकाया व्हता तर मंगलदास इतं सावकारीचं, शेत-जिमिनीचं समदं बगायचा. मंगलदास लय चांगला व्हता. पन गोपालदास आकशी वाया ग्येलेला. त्येला बरीच व्यसनं व्हती. येक दिस गोपालदास राधाबाई नावाच्या येका बाईला घेऊन घरी आला. राधाबाई त्येंच्या घरान्याला शोभनारी न्हवती, पर गोपालदासने म्हने तिच्यासंगं लगीन केलं व्हतं. मंगलदासना ह्ये आवडलं न्हाई, पर आपल्या भावाकडं पाहून त्यांनी त्या राधाबाईला सून म्हनून स्वीकारलं...
गोपालदासला कामं व्हतं म्हनून त्यो तालुक्याला ग्येला व्हता. गोपालदासची पाठ वळली आनी या राधाबाई तिचं खरं रूप दाखवाया लागली. ती मंगलदासला जाल्यामंदी वडू लागली. तिला म्हाईत व्हतं, की मंगलदासकडंच समदा पैका हाय. त्या राधाबाईने तिच्या शरीराचा वापर करायचं ठरिवलं, पर मंगलदासला ह्ये पटलं न्हाई आनी त्यांनी राधाबाईला दूर लोटली. राधाबाई चवताळली आनी तिने फुलदानी उचलून मंगलदासच्या डोसक्यात मारली. त्याचवेली गोपालदास थितं आला. त्येला पाहून राधाबाई घाबरली अन् रानाकडं पलत सुटली. गोपालदासने मंगलदासला पायलं अन् राधाबाईच्या मागे ग्येला. मंगलदासपन कसेतरी त्येंच्या मागे गेले. धावताना मंगलदासना येक वरडन्याचा आवाज आला. त्येंनी पायलं तर राधाबाई वाईस लांब मरून पडली व्हती अन् लांडगं तिचं लचकं तोडत व्हतं. बाजूलाच गोपालदास उभा व्हता. मोटे डोले करून त्यो त्ये समदं बगत व्हता...
मंगलदासनी गोपालदासला माघारी आनलं. रानात त्ये समदं बगून गोपालदासच्या डोसक्यावर परिनाम हून त्यो येडा जाला. मंगलदासनी गोपालदासला येड्यांच्या दवाखान्यात घातलं. थितं म्हनं त्येनं सवताला फास लाऊन घेतला. मंगलदासला खूप दुख जालं. त्यो येकलाच वाड्यात ऱ्हाऊ लागला. पर त्येंना समदीकडं राधाबाई दिसू लागली. वचपा काढाया वाड्यात राधाबाईचं भूत आलं व्हतं. मंगलदासना तरास व्हाया लागला अन् त्ये गाव सोडून निगून गेले. मंगलदास आनी गोपालदास चांगले गुन्यागोविंदानं ऱ्हायचे हो. पर त्या राधाबाईने येऊन समदा इस्कोट केला. बाई कसली हो ती, बारा गावचं पानी प्यालेली कुल्टा व्हती ती कुल्टा..." "खोटं हाय समदं... राधा कुल्टा न्हाई..." हिरू बोलत असतानाच हा आवाज आला आणि सगळे दचकले. सर्वांनी पाहिलं तर नेत्रा हे बोलत होती. तिच्या चेहेऱ्यावरचे भाव बदलले होते...
सर्वांनी एकमेकांकडे पाहिलं. अबीर नेत्राच्या जवळ गेला आणि तिला हलवत म्हणाला, "नेत्रा, अगं काय बोलतेस..." अबीरच्या हलवण्याने नेत्रा भानावर आली. तिने सर्वांकडे पाहिलं आणि गोंधळून विचारलं, "काय झालं... तुम्ही सर्व माझ्याकडे असे काय बघताय..." नेत्राचं हे बोलणं ऐकलं आणि कोणाला काय बोलावं तेच समजत नव्हतं. रत्नाकर नेत्राजवळ येत म्हणाले, "नेत्रा, मला वाटतं तुला प्रवासाचा थकवा आलाय. तू जरा आराम कर..." नेत्रा काही बोलणार इतक्यात अबीरच म्हणाला, "त्यापेक्षा असं केलं तर... काका-काकू, तुम्ही आराम करा. मी आणि नेत्रा जरा फेरफटका मारून येतो. नेत्रालाही बरं वाटेल... काय बाबा..." सुधीरने मान हलवत सांगितलं, "हो, चालेल की... तुम्ही दोघं या चक्कर मारून. आम्ही दोघं आणि हा हीरू आहोत यांची काळजी घ्यायला..." हे ऐकून नेत्राला बरं वाटलं. अबीर आणि नेत्रा बाहेर पडली. समोरच्या वाड्याकडे नेत्रा एकटक पाहत होती. अबीर तिथे आला तशी नेत्रा म्हणाली, "तिथे कोणी राहत असेल का रे..." अबीरने खांदे उडवत नकारार्थी मान हलवली. नेत्राने एक कटाक्ष वाड्याकडे टाकला आणि दोघं पुढे चालू लागली...
थोडं अंतर चालून गेल्यावर अबीर म्हणाला, "नेत्रा, मघाशी तू काय म्हणत होतीस त्या राधाबाईबद्दल... तुला काही माहिती आहे का तिच्यासंदर्भात..." अबीरच्या प्रश्नाने नेत्राचा चालण्याचा वेग मंदावला. एका ठिकाणी येऊन ती थांबली आणि अबीरकडे वळत म्हणाली, "काही कळत नाही रे. हिरूदादा जेव्हा राधाबाईबद्दल सांगत होते तेव्हा असं वाटलं की ते खोटं बोलत आहेत. अचानक डोकं बधीर झाल्यासारखं झालं. तू मला हलवत होतास तेव्हा कुठे शांत झालं ते. हे असं पहिल्यांदाच झालं आहे..." नेत्रा पुढे काही बोलणार इतक्यात तिने बाजूला पाहिलं. ते दोघं शाळेच्या इमारतीसमोर उभे होते. अचानक वारा वहायला सुरुवात झाली. रस्त्यावरचा पालापाचोळा नेत्रापासून लांब जात गावच्या वेशीकडे गेला. नेत्राला घुंघरांचा आवाज आला. डोळे किलकिले करत नेत्राने त्या दिशेला पाहिलं, तर समोर एक बैलगाडी येताना दिसली. बैलगाडी शाळेच्या दारापर्यंत येऊन थांबली. आत गाडीवानासह एक लहान मुलगी आणि एक जोडपं बसलं होतं...
अबीरकडे पाहत नेत्रा म्हणाली, "ते पाहिलंस तू..." अबीरला काहीच कळत नव्हतं. तो म्हणाला, "काय पाहिलं... अगं आत्ता तू बोलता बोलता थांबलीस आणि एकटक शाळेकडे पाहू लागलीस. आता तू गावाकडे बोट दाखवत आहेस. काय आहे तिथे..." गोंधळलेली नेत्रा अबीरकडे पाहत म्हणाली, "अरे असं काय करतोस... ही समोर चाललेली बैलगाडी नाही दिसत का तुला... त्या बैलगाडीत राधा बसली आहे. आणि तिचा चेहेरा बघ... अगदी माझ्यासारखा आहे... राधा थांब. मला बोलायचं आहे तुझ्याशी..." असं म्हणत नेत्रा बैलगाडीच्या मागे गेली. बैलगाडी त्या जुनाट वाड्याच्या दिशेने जात गायब झाली. अबीर व नेत्रा धावतच तिथे पोहोचली. तिथे स्मशान शांतता होती. साधं चिटपाखरूही तिथे नव्हतं. वाड्याचं गेट कुलूपाने बंद केलं होतं. नेत्रा सगळीकडे शोध घेत होती तेवढ्यात वारा वाहू लागला. वाऱ्यासरशी रस्त्यावरचा पाचोळा वाड्याच्या दिशेने जाऊ लागला. गेटला लावलेलं कुलूप आणि साखळी गळून पडले. गेट उघडलं. ओसरीवर एक झोपाळा हलत होता. त्यावर कोणीतरी बसलं होतं. पायऱ्यांपाशी एक जोडपं उभं होतं. नेत्राला सगळं काही धुसर दिसत होतं...
झोपाळ्यावरचा माणूस उठला आणि पायऱ्यांजवळ येत म्हणाला, "गोपाळ, आत ये. मला बोलायचं आहे तुझ्याशी. आणि, एकटाच ये..." असं म्हणत तो माणूस वळला आणि पाय आपटत बंद दाराच्या आत गायब झाला. नेत्राही पायऱ्या चढून वर येऊ लागली. अबीर तिच्या मागे होताच. नेत्राने पायऱ्यांजवळ उभ्या असलेल्या गोपाळ आणि राधाकडे पाहिलं आणि गोपाळचा चेहेरा पाहून ती अवाक झाली. गोपाळ हुबेहूब डॉ. कौशिकसारखा दिसत होता. ती काही बोलणार इतक्यात राधाकडे वळत गोपाळ म्हणाला, "राधा, तू काळजी करू नकोस. मंगळदादा चांगला आहे. मी त्याला समजावतो. तू थांब, मी आलोच..." असं म्हणत गोपाळही बंद दाराकडे जात नाहीसा झाला. पदराच्या काठाला बोटांवर फिरवत राधाबाई दाराकडे पाहू लागली. बाजूलाच खेळत असलेली लहान मुलगी राधाबाईला येऊन बिलगत म्हणाली, "काय जालं गं आय... आपन हितं कशापायी थांबलो..."

No comments:
Post a Comment