आत्तापर्यंत...
नेत्राला रोज रात्री भयानक स्वप्न पडतात आणि ती आपरात्री दचकून उठते. य त्रासाबद्दल जाणण्यासाठी आणि तो कमी करण्यासाठी रत्नाकर आणि सरिता, डॉ. कौशिक साने या मानसोपचारतज्ञाची मदत घेतात. नेत्रा आणि डॉ. कौशिक बोलत असताना नेत्राला सांगून आलेल्या अबीर गोखले या मुलाचा विषय निघतो आणि डॉ. कौशिक ते सेशन तिथेच थांबवतात. दुसऱ्या दिवशी घरात सगळी आवराआवर सुरू असताना आणि स्वप्नांच्या विचारात नेत्रा हरवली असताना गाडीचा हॉर्न ऐकू येतो...
अबीर, त्यांची आई म्हणजे कल्पना गोखले आणि वडील म्हणजे सुधीर गोखले यांच्यासोबत आलेला असतो. गप्पा रंगतात आणि नेत्रा व अबीर फ्लॉव्हर गार्डन पाहायला मागल्या दारी जातात. तिथे बोलत असताना नेत्राला एक दरवाजा दिसतो जो कुलूपाने बंद आहे पान कोणीतरी आतून ठोठावत आहे. हे सगळं पाहून नेत्रा बेशुद्ध पडते. रत्नाकर आणि सरिता याबद्दल गोखले दाम्पत्य आणि अबीरला सर्व सांगतात. सर्व समजल्यावर अबीर पुढच्या सेशनला नेत्रासोबत जाण्याची परवानगी मागतो. गोखले दाम्पत्य निघून जातं पण अबीर तिथेच थांबतो...
अबीर आणि नेत्रा डॉ. कौशिकच्या क्लिनिकमध्ये पोहोचतात. तिथे नेत्राला समजतं की अबीर आणि कौशिक लहानपणापासूनचे मोटर आहेत. हे कळल्यावर नेत्रालाही जरा हायसं वाटतं पण त्याच वेळी नेत्राला पुन्हा त्या सर्व भयानक गोष्टी दिसू लागतात. कधीतरी मागे घडलेली घटना या त्रासाचं मूळ असावं अशी समजूत घालत डॉ. कौशिक नेत्राला हिप्नोटाईझ करून मागे घेऊन जातात. एक एक घटना आठवत नेत्रा त्या दिवसात पोहोचते जेव्हा अबीरने नेत्राला एक मेल पाठवलेला असतो आणि संध्याकाळी मोकळी झाल्यावर नेत्रा तो मेल उघडते...
मेलमधला अबीरचा फोटो पाहून नेत्रा सुखावते. त्या रात्री तिला पहिल्यांदा ते भयानक स्वप्न पडतं. नेत्राला डॉ. कौशिक अजून मागे नेतात. त्या दिवशी ती घरात एकटी असताना एक पिक्चर पाहत झोपते पण तिला ती भयानक स्वप्न पडत नाहीत. डॉ. कौशिक नेत्राला संमोहित अवस्थेतून बाहेर काढतात आणि त्या पिक्चरचा परिणाम झाला असावा असं सांगतात. नेत्रा आणि अबीर जांभुळपाड्याला जाणार हे समजल्यावर तिथे असलेल्या घरी डॉ. कौशिक त्यांची व्यवस्था करण्याची हमी देतात. त्याच दिवशी अबीर आणि नेत्राचा साखरपुडा पार पडतो. संध्याकाळी ठरलेल्या छोटेखानी पार्टीत अबीर आणि डॉ. कौशिक बोलत असताना नेत्रा पाहते आणि तिला शंका येते...
रात्री नेत्राला पुन्हा तीच दृष्य दिसतात. या वेळी अजून काही संदर्भ समोर येतात. नेत्रा घाबरते पण काहीही न बोलता झोपी जाते व थेट सकाळी उठते. अबीरला लवकर परत जावं लागणार म्हणून जांभुळपाड्याचा निर्णय लगेच घेतला जातो आणि लगचंच सगळे निघतात. गप्पांमध्ये प्रवास सुरू असताना गाडी जांभुळपाड्याच्या वेशीपर्यंत पोहोचते. तिथे असलेल्या एका इमारतीला नेत्राने ओळखलं हे पाहून सगळे गोंधळतात. गाडी डॉ. कौशिकच्या बंगल्यात शिरते. बंगल्याच्या समोर असलेल्या वाड्याकडे पाहण्यात नेत्रा हरवून जाते. बंगल्याचा नोकर हिरू त्या वाड्याचा भूतकाळ सांगायला सुरुवात करतो. त्यात मंगळदास व गोपाळदास या दोन भावांचा आणि गोपाळदासने नव्याने घरी आणलेल्या त्याच्या पत्नीचा, राधाबाईचा उल्लेख असतो जिला मंगळदास सून म्हणून स्वीकारतो...
तो माणूस पुढे येत म्हणाला, "गोपाळ, अरे आपलं घराणं काय, गावातली आपली प्रतिष्ठा, कशाचाही विचार केला नाहीस तू..." गोपाळदास त्याला मध्येच तोडत म्हणाला, "मंगळदादा अरे तेवढा वेळच नव्हता विचार करायला. सकाळी शेताकडे जात असताना गावाबाहेरच्या जंगलाच्या तोंडावर गर्दी दिसली. आत डोकावलं तर या राधाला आणि आनंदीला लोकांनी धरून ठेवलं होतं. कोणीतरी तिथे उठवलं होतं की राधा आणि आनंदी या माय-लेकी, माणसं खाणाऱ्या हडळी आहेत. राधाच्या पहिल्या नवऱ्यालाही म्हणे या दोघींनीच मारलं. आजकालच्या जमान्यातही हे असले विचार करतात लोक... तिचा नवरा तापाच्या साथीत गेला, पण हे अडाणी गावकरी... मला रहावलं नाही. जमिनीवर पडलेलं तिचं मंगळसूत्र मी उचललं आणि तिच्या गळ्यात घातलं..." मंगळदास अजून चिडला. त्याच स्वरात बोलता झाला, "अरे तुला इतकाच पुळका आला होता, तर घरातली मोलकरीण बनवून आणायचंस तिला. किंवा गावातच उजवायची तिला. पण तू... जातीबाहेरच्या या बाईशी लग्न करून तू घराण्याला काळिमा फासला आहेस गोपाळ..."
मंगळदासचा आवेश जरा कमी होण्यासाठी गोपाळने काही क्षण जाऊ दिले. मग खिडकीबाहेर दिसत असलेल्या राधाबाई व आनंदीला पाहत तो म्हणाला, "दादा, त्यावेळी मला जे योग्य वाटलं तेच मी केलं. आता राधा माझी लग्नाची बायको आहे आणि या घरची मालकीण. तुला जर हे पटत नसेल तर..." गोपाळदासच्या या वाक्याने मंगळदास हबकला. तो रागाने लाल होत गोपाळदास जवळ गेला. मग आपला चेहेरा सौम्य करत गोपाळदासच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, "गोपाळ, तू केलंस ते योग्यच होतं. आता नव्या नवरीला असं दारातच उभं ठेवणार आहेस का... चल..." दोघंही बाहेर आले. मंगळदास पुढे होत म्हणाला, "या घरात बाईमाणूस नाही. त्यामुळे तुमचं स्वागत कसं करायचं ते समजत नाहीये..." राधाबाईचे डोळे पाणावले. तिने मंगळदासला वाकून नमस्कार केला. तिला पाहून आनंदीनेही मंगळदासला नमस्कार केला. सर्वजण आत गेले. हे सर्व पाहणारी नेत्रा मनातून सुखावत होती. तिघांनाही आराम करायला सांगून मंगळदास झोपाळ्यावर येऊन बसला...
निजानीज झाली. वातावरण शांत झालं आणि झोका घेणाऱ्या मंगळदासच्या चेहेऱ्यावरचे भाव बदलले. मंगळदासचे डोळे रागाने लाल होऊ लागले. तो काहीच बोलत नव्हता, पण नेत्राला त्याच्या मनातले विचार स्पष्ट ऐकू येऊ लागले, "कोण कुठली ही राधाबाई आणि तिची पोर आनंदी... हा गोप्या तर महामूर्ख आहे. म्हणे लग्न केलं. हा गोप्या सावत्र असून माझ्या बापाचा त्याच्यावर जीव. सगळी इस्टेट त्याच्या नावे केली आणि मी सख्खा असून मला काहीच नाही... आत्तापर्यंत या गोप्याला हातातलं खेळणं बनवून ठेवलं होतं मी, या बयेच्या येण्याने ही शेळी वाघासारखी बोलायला लागली आहे. या राधाबाईचा काहीतरी बंदोबस्त करायला हवा. पण त्या आधी या गोप्याला तालुक्याला धाडून देतो. नाहीतरी वकिलांकडून कागदपत्र आणून त्यांच्यावर या गाढवाची सही घ्यायची होती. आता तो स्वत: जाईल त्यांच्याकडे. गोप्या नसताना राधाबाईला हाकलणं सोप्पं जाईल...” काही क्षणातच मंगळदास झोपाळ्यावरून उठला आणि आत जात गायब झाला. मंगळदासचे हे विचार ऐकून नेत्रा अवाक झाली. आत्ताचा मंगळदास खरा की मगाचचा खरा हाच प्रश्न तिला पडला होता. नेत्रा विचार करतच होती की तिची नजर तिच्या हातावर असलेल्या घड्याळावर गेली...
घड्याळातले काटे अचानक गरा गरा फिरू लागले आणि सातवर येऊन थांबले. नेत्राने पाहिलं तर मंगळदास पुन्हा झोपाळ्यावर बसला होता आणि गोपाळदास दारात उभा होता. मंगळदास म्हणाला, "गोपाळ, कालच्या गडबडीत सांगायचं राहून गेलं. आज वकिलसाहेबांनी बोलावलं आहे कागदपत्र आणायला. मी जाण्यापेक्षा तूच का नाही जात... मी जाणार, कागद घेऊन येणार मग तू सही करणार मग कागद परत जाणार, यापेक्षा तूच गेलास तर एक दिवस वाचेल की... आत्ताच निघालास तर उद्या संध्याकाळपर्यंत परतही येशील तू. आता लग्न झालंय तुझं. थोड्या जबाबदाऱ्या तुलाही स्वीकारायला हव्याच की..." गोपाळदासला मंगळदासचं म्हणणं पटलं. तो आत जात गायब झाला. घड्याळाचे काटे पुन्हा फिरू लागले आणि नऊवर येऊन थांबले. फाटकाबाहेर बैलगाडी उभी होती आणि त्यात गोपाळदास बसून फाटकाच्या दिशेने हात हलवत होता. आनंदी आणि राधाबाई फाटकात उभ्या राहून त्याला प्रतिसाद देत होत्या. बैलगाडी गेली आणि आनंदी व राधाबाई घराकडे परतल्या...
मंगळदासच्या बोलण्याने राधाबाई अवाक झाली. मंगळदास पुढे बोलता झाला, "कोण कुठली तू... त्या बावळट गोपाळदासला भूल पाडलीस आणि इथे आलीस. गावकरी बरोबर बोलत असणार, तूच तुझ्या नवऱ्याला मारलंस आणि पैशासाठी या गोपाळदासशी लग्न केलंस. तो मूर्ख आहे. पण मी तुला बरोबर ओळखलं आहे. ताबडतोब काळं कर या घरातून. आणि तुझ्या त्या पोरीलाही घेऊन जा..." असं म्हणून मंगळदासने राधाबाईला हाताला धरून ढकललं. राधाबाई दारावर आदळली आणि तिचा पदर थोडा खाली सरकला. हे पाहून मंगळदासच्या चेहेऱ्यावरचे भाव बदलले. मंगळदास तिला वरपासून खालपर्यंत पाहू लागला आणि राधाबाई पदर सावरून आनंदीकडे जाऊ लागली. मंगळदास म्हणाला, "थांब… जाणार तर तू आहेसच. पण जाण्याआधी माझी तहान भागव..." डोळे पुसत राधाबाई स्वयंपाकघराकडे वळली तशी तिचा पदर धरत मंगळदास म्हणाला, "मला पाण्याची नाही, तर तुझ्या या शरीराची तहान लागली आहे..."
हे ऐकून राधाबाई हादरली. स्वत:चा पदर खेचून घेत ती दूर झाली आणि म्हणाली, "दादा, हे काय बोलतायसा... थोरली वैनी आयपरमाने असती तर धाकली बैनीसारखी असती. म्या तुमची धाकली वैनी, तुमच्या पाटच्या भावाची बायको, तुम्माला बैनीसारखी, अन् तुम्मी..." राधाबाईकडे रोखून पाहत मंगळदास म्हणाला, "वहिनी, आई, बहिण, हे शब्द तुझ्यासाठी नाहीत. आत्ता मला तुझ्यात फक्त माझी तहान भागवण्याचं साधन दिसतंय. तू मला हवं ते दिलंस, तर तू गेल्यावर या आनंदीचा सांभाळ मी करेन. तिला शाळेत घालेन, चांगल्या घरात लग्न करेन तिचं. तुझ्या वाट्याला जे आलं ते तिच्या वाट्याला नाही येऊ देणार मी. पण जर तू माझं ऐकलं नाहीस, तर..." असं म्हणून आनंदी खेळत होती त्या खोलीत मंगळदास गेला आणि आनंदीचे केस पकडून त्याने तिला उचललं व तिचा गळा दाबू लागला. त्यासरशी राधाबाई खोलीजवळ येत म्हणाली, "नगं नगं, आसं नका करू. तुम्माला जे हवं... ते... देते म्या..."
मंगळदासच्या चेहेऱ्यावर स्मित आलं. त्याने आनंदीला सोडलं. तिने लगेच, "आय... आय..." असं म्हणत राधाबाईकडे धाव घेतली. मंगळदासने तिला पुन्हा मागे खेचत जमिनीवर ढकललं आणि डोळे मोठे करून आनंदीकडे पाहत म्हणाला, "ए चिमुर्डे, तुझी आई माझ्या ताब्यात आहे. तू आणि तुझा आवाज, अजिबात या खोलीच्या बाहेर येता कामा नये. नाहीतर..." असं म्हणून मंगळदासने दार व खिडकी लाऊन घेतली. खिडकीची कडी लावली आणि दाराला कुलूप लाऊन चावी तिथेच बाजूच्या टेबलवर ठेवली. मग राधाबाईच्या जवळ येत मंगळदास म्हणाला, "राधाबाई, चला... आपल्याला त्या खोलीत जायचं आहे. चावी तर इथेच ठेवली आहे. माझी तहान भागली, की तू उघड हे दार... हा...हा...हा..." राधाबाईचा दंड धरून मंगळदास तिला खेचत नेऊ लागला. राधाबाईच्या डोळ्यांना पाण्याची धार लागली होती. आनंदीच्या खोलीच्या दाराकडे पाहत जड पावलांनी ती मंगळदाससोबत दुसऱ्या खोलीत जाऊ लागली. खोलीत असलेल्या खाटेवर मंगळदासने राधाबाईला ढकललं आणि विकृत हसत त्याने खोलीचं दार लाऊन घेतलं...
नेत्रा दोन्ही बंद खोल्यांच्या मध्ये उभी होती. एका खोलीतून, "आय, मला भिती वाटती हितं. ये ना गं... मला भूक लागली..." असं रडवेल्या हलक्या स्वरात आनंदी बोलत होती, तर दुसऱ्या खोलीतून राधाबाईच्या हुंदक्यांचा आवाज येत होता. नेत्राने दोन्हीही खोल्यांकडे हात केला आणि तिची नजर तिच्या हातावरच्या घड्याळाकडे गेली. घड्याळातले काटे गरा गरा फिरत पुढे धाऊ लागले. बघता बघता तो दिवस सरून दुसऱ्या दिवसाची संध्याकाळ आली. आनंदी ज्या खोलीत होती, त्या खोलीतून आवाज येणं बंद झालं. बाजूच्या खोलीतले राधाबाईचे हुंदकेही बंद झाले होते. खोलीचं दार उघडलं. मिशांवरून हात फिरवत मंगळदास दारात दिसला. मागे वळत तो म्हणाला, "तू तुझं काम केलंस. माझी तहान भागली. तो गोप्या यायची वेळ झाली आहे. तू निघून जा इथून. त्या आनंदीची काळजी नको करूस. तिला मी सांभाळेन..." नेत्राने खोलीत डोकावलं, तर फाटकं लुगडं अंगाभोवती गुंडाळलेली राधाबाई जमिनीवर बसली होती...
हे दृश्य पाहून दारात उभा असलेला मंगळदास म्हणाला, "मेली की काय... चला, ब्याद टळली एकदाची..." असं म्हणत कुत्सित हसत मंगळदास झोपाळ्यावर येऊन बसला. राधाबाई त्याच्या मागे मागे दाराबाहेर आली. मंगळदासकडे बोट दाखवत ती म्हणाली, "तू मारलंस माज्या पोरीला. तुज्या तहानेसाटी माजी पोर उपाशीपोटी, बिनपान्याची ऱ्हायली आनि त्यातंच ती गेली. तू नीच हायेस..." मंगळदास ताडकन झोपाळ्यावरून उठला आणि राधाबाईला म्हणाला, "मी... हा...हा... मी नाही, तूच मारलंस तुझ्या मुलीला. तिच्या अन्न-पाण्याची सोय तुलाच पहायची होती. पण तू तिकडे माझ्यासोबत... पोटच्या पोरीच्या तहान-भुकेपेक्षा तुला तुझी शारिरीक भूक जास्त प्रिय होती. तुझ्याचमुळे आनंदी मेली..." हे ऐकून राधाबाईच्या आसवांनी भरलेल्या डोळ्यात राग दाटून आला आणि बाजूलाच ठेवलेली फुलदाणी, पूर्ण तकदीनिशी उचलून राधाबाईने मंगळदासवर वार केला. मंगळदास डोकं धरून खाली कोसळला आणि त्याचवेळी त्याला समोरून गोपाळदास येताना दिसला...
गोपाळदासला पाहून मंगळदास एकदम ओरडला, "गोपा...ळ... अरे वाचव मला... या कुल्टेने आनंदीला मारून टाकलं आणि आता मलाही मारू पाहते आहे..." मंगळदासच्या ओरडण्याने राधाबाईने समोर पाहिलं, तर गोपाळदास फाटकात उभा होता. हे पाहून तिच्या हातून फुलदाणी गळून पडली. "न्हाई न्हाई म्या कुल्टा न्हाई..." असं ओरडत राधाबाई जंगलाच्या दिशेने पळाली. नेत्रासुद्धा राधाबाईच्या मागे गेली. राधाबाई जंगलात धावत होती. एका ठिकाणी ती ठेच लागून पडली. राधाबाईने सभोवताली पाहिलं, तर किर्र झाडी होती. तिच्या पायातून रक्त येत होतं. झाडाचा आधार घेऊन ती उठणारच होती, की तिला गुरगुरण्याचा आवाज आला. राधाबाई घाबरली. तिने नजर वळवली आणि दोन चमकदार डोळे तिला दिसले. भेदरलेल्या नजरेने राधाबाई त्या डोळ्यांकडे पाहत असतानाच पुढे येत असलेल्या लांडग्याने तिच्यावर झडप घातली. राधाबाई जिवाच्या आकांताने किंचाळली. त्याचवेळी लांडग्याने राधाबाईच्या नरडीचा घोट घेतला...
"मंगल.... तुला... सो...ड...णा...र न्हा..." शेवटचा श्वास घेणाऱ्या राधाबाईने कसेबसे हे शब्द उच्चारले आणि प्राण सोडले. विजेची एक लकेर राधाबाईच्या शरीरातून निघाली आणि वाड्याकडे गेली. आनंदी असलेल्या खोलीच्या बंद दाराआड ती वीज गेली आणि "खा...ड" असा आवाज करत दाराचं कुलूप हललं. दारासमोर नेत्रा उभी होती. तिच्या हातातलं घड्याळ चमकू लागलं. काटे गरागरा फिरू लागले. काळ आजच्या दिवसावर परत आला. सगळीकडे जळमटं, अंधार असलेल्या त्या जागेत अबीर व नेत्रा उभे होते. सगळं वातावरण शांत होतं. अबीरकडे पाहत नेत्रा म्हणाली, "अबीर... तू... तू केलंस हे..." बंद दाराकडे जात अबीर म्हणाला, "म्हणजे तुला सगळं आठवलं तर… हेच तर मला हवं होतं. लहानपणापासून मलाही त्या आनंदीचा आवाज ऐकू यायचा, हा दरवाजा मलाही दिसायचा. जसजसा मोठा होत गेलो तसतशा मला मंगळदासच्या इतर काही गोष्टी दिसू लागल्या...
माझी खात्री पटली, माझ्या रूपात मंगळदासचा आणि कौशिकच्या रूपात गोपाळदासचा पुनर्जन्म झाला आहे. आम्ही दोघं लहानपणापासून एकत्र, पण कौशिकने मला कधी काही जाणवू दिलं नाही. अर्थात, काय झालं होतं हे त्याला माहितच नव्हतं म्हणा... त्यालाच काय, तुलाही सगळं कुठे माहित आहे... राधाबाईने फुलदाणी मारली आणि गोपाळला पाहून जंगलाकडे पळाली. गोपाळदास मंगळदासजवळ आला. मंगळदासने त्याला सांगितलं, की राधाबाई एक कुलटा आहे आणि पैशासाठी तिने गोपाळशी लग्न केलं आहे. शिवाय राधाबाईची शारिरीक भूक भागवण्यासाठी तिने मंगळदासला फरशी पाडायचा प्रयत्न केला आणि आनंदीला हे समजल्यामुळे तिलाही मारलं... त्या मूर्ख गोपाळचा यावर विश्वास बसला आणि राधाबाईला मारायला तो कोयता घेऊन तिच्या मागे जंगलात गेला...
या संधीचा फायदा घेऊन मंगळदासने आनंदीला तिथे खोलीतच पुरून टाकलं आणि दाराला कुलूप लावलं. इतक्यात त्याला जोरदार ओरडण्याचा आवाज आला. तो आवाज गोपाळचा होता. मंगळदास घराबाहेर आला तर गावकरी जंगलाच्या दिशेने पळत होते. मंगळदासही त्यांच्यासोबत जंगलाच्या दिशेने गेला. एका झाडाजवळ गोपाळ उभा होता. त्या झाडापासून काही अंतरावर काहीतरी हालचाल दिसली. मंगळदास आणि ते गावकरी गोपाळदास जवळ पोहोचले. गोपाळदासचा चेहेरा पांढराफटक पडला होता. डोळे भितीने गोठले होते आणि जबडा पूर्ण उघडा होता. गोपाळदास पाहत असलेल्या दिशेला सर्वांनी पाहिलं तर एक प्राणी काहीतरी ओढत होता. तितक्यात ढगाआड लपलेला चंद्र बाहेर आला आणि त्याचा प्रकाश त्या जनावरावर पडला. तो एक लांडगा होता आणि ते निपचित पडलेलं शरीर राधाबाईचं होतं...
त्या लांडग्याचे लालबुंद डोळे पाहून आधी सगळे घाबरले. पण सर्वांनी जोरजोरात ओरडायला सुरुवात केल्यावर ते जनावर जंगलात पळालं. मंगळदास आणि इतर गावकरी गोपाळदासला घेऊन गावात परतले. गोपाळदासच्या डोक्यावर जबरदस्त परिणाम झाला होता म्हणून मंगळदासने त्याला मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. ही संपत्ती हे वैभव आपण एकटेच उपभोगणार म्हणून मंगळदास खुश होता. पण डॉक्टर म्हणाले गोपाळदास ठिक होऊ शकतो. मग मंगळदासने हॉस्पिटलमधल्या एका माणसाला पैसे चारून त्याच्याकरवी गोपाळदासचा खून करवला आणि मग त्या माणसालाही मारून टाकलं. मंगळदासला वाटलं सगळं संपलं, पण नाही. आनंदीचं प्रेत जिथे पुरलं होतं त्या खोलीने मंगळदासला कधी शांतता लाभू दिली नाही. गावातलं एकमेव श्रीमंत घर असल्याने लोकांची रेलचेल, शिवाय जंगलातले लांडगे, यामुळे मंगळदास आनंदीच्या प्रेताला कधी बाहेर काढू शकला नाही...
मंगळदासने ठरवलं, की गावाकडची सगळी संपत्ती, जमीन-जुमला विकून इथून कायमचं निघून जायचं. पण हा वाडा दुसऱ्याच्या हाती गेला असता तर त्या प्रेताने कधीतरी डोकं वर काढलंच असतं. म्हणून, त्या कुलटा राधाबाईचं पिशाच्च या वाड्यात वावरतंय अशी अफवा मंगळदासने गावात पसरवली. वाड्याच्या समोरच्या घरात राहणाऱ्या मधूकाकाने मंगळदासला शहरात त्याच्या मुलाकडे जायला सांगितलं. मंगळदास शहरात गेला. तिथे त्याचं लग्नही झालं. लग्नानंतरच मंगळदासला धंद्यात खोट बसली. त्याची सगळी संपत्ती निघून गेली आणि त्याच धक्क्याने लग्नाच्या सहा महिन्यातच मंगळदास गेला. त्यावेळी त्याची बायको प्रेग्नंट होती. काही महिन्यांनी तिला एक मुलगा झाला. तो मुलगा म्हणजे मी. माझं नाव अबीर गोखले नाही, तर अबीर जहागीरदार आहे. माझी आई मला जन्म देऊन मरण पावली. शहरात आमच्या शेजारी राहणाऱ्या गोखले नावाच्या दामपत्याने मला दत्तक घेतलं...
गोखले दामपत्याला नंतर अजून एक मुलगा झाला. मी मोठा झालो तसं माझ्या दत्तक बापाने विल केलं. सगळी संपत्ती आम्हा दोघांमध्ये वाटली. पण मला सगळा पैसा हवा होता. ऍक्सिडेंट करवून मी त्या हिस्सेदारासह गोखले दामपत्यालाही संपवलं आणि इथली सगळी संपत्ती विकून सिंगापूरला निघून गेलो. शहरात मंगळदास ज्याच्याकडे आला होता, त्याचा मुलगा म्हणजे कौशिक साने. आमची चांगली मैत्री होती. सिंगापूरला गेल्यावरही आम्ही सोशल मीडियावर कनेक्टेड होतो. मला जे सगळं दिसत होतं ते कदाचित त्यालाही दिसत असावं, पण कौशिकने कधी मला काही जाणवू दिलं नाही. मी त्याला त्याच्या आयुष्यासोबत सोडून द्यायचं ठरवलं. पुढे मलाही सगळ्याचा विसर पडला. लग्नाचं वय झालं होतं. भारतीयच बायको करावी म्हणून वेबसाईटवर नाव रजिस्टर केलं आणि पहिलीच प्रोफाईल तुझी दिसली. तुझा चेहेरा पाहून भूतकाळाने पुन्हा डोकं वर काढलं. तुला आणि कौशिकला संपवून, पुनर्जन्माची ही सिस्टीमच बंद करायची असा विचार करून मी एक प्लॅन बनवला...
तुझ्याशी जवळीक वाढवली. माझ्यावर प्रेम करायला तुला भाग पाडलं. गोष्टी लग्नापर्यंत आल्या. तुमच्यासारखी माणसं फक्त मुलावर समाधानी नसतात. तुम्हाला मुलाचे नातलगही हवे असतात. भारतात आल्यावर एका भाडोत्री जोडप्याला तयार केलं आणि माझे आई-बाबा बनवून त्यांना तुमच्या समोर आणलं. इथे आल्यावर तुझी आणि कौशिकची भेट झाल्याचं मला समजलं. तुझ्यासोबत कौशिकच्या क्लिनिकमध्ये आलो आणि तिथेच ठरवलं, तुम्हा दोघांना अज्ञानात मारण्यापेक्षा सर्व आठवल्यावरच तुम्हाला संपवायचं, आणि तेही तिथेच जिथून या सर्वाला सुरुवात झाली. पार्टीत मी त्या भाडोत्री जोडप्याला कौशिकपासून दूर ठेवलं. ते समोर आले असते तर तिथेच माझं बिंग फुटलं असतं. तू मला आणि कौशिकला बोलताना पाहिलंस. तेव्हा तो मला सांगत होता की त्याला सर्व आठवतंय. आता थांबणं शक्य नव्हतं. त्याच रात्री मी कौशिकच्या घरी गेलो आणि त्याला जांभुळपाड्याला यायला सांगितलं. तूही जांभुळपाड्याला गेली आहेस आणि मला तिथेच तुम्हा दोघांची माफी मागायची आहे असं सांगितल्यावर कौशिक तयार झाला...
मी त्याला मुद्दाम जुन्या रस्त्यावरून नेलं. एका निर्जन ठिकाणी थांबून कौशिकच्या डोक्यात फटका मारून त्याला बेशुद्ध केलं. खोपोली क्रॉस करून गाडी घाटात नेली आणि संधी साधून बेशुद्ध असलेल्या कौशिकला ड्रायव्हर सीटवर बसवून गाडी खाली ढकलून दिली. गाडीला आग लागल्याचं दिसलं आणि मी परत फिरलो. माझ्या त्या भाडोत्री जोडप्याने आधीच जांभुळपाड्याला येऊन त्या हिरूचा काटा काढला होता आणि त्याची जागा घेतली राणाने. कौशिकही संपला होता. आता उरली होतीस तू. सकाळी तुमच्या घरी येऊन लगोलग तुम्हाला इथे जांभुळपाड्याला आणलं. मला खात्री होती, इथे आल्यावर तुला सगळं आठवणार. पुढचं सगळं तुला माहितच आहे. तिथे माझ्या माणसांनी तुझ्या आई-बापाला मारलं असेल. आता तूही नाही वाचणार. तुला एकदाची संपवली की सगळी कटकटच संपेल..." असं म्हणत अबीरने नेत्रासमोर पिस्तुल धरलं...
हे सर्व ऐकून सुन्न झालेली नेत्रा पिस्तुल समोर पाहून भानावर येत म्हणाली, "नीच माणसा... किती खालच्या पातळीला जाशील... इतकी वाईट कृत्य करूनही तुझं पोट भरलं नाही अजून... देव बघतोय. तुला याची फळं इथेच भोगावी लागतील..." हे ऐकून अबीर हसत म्हणाला, "हा...हा...हा... देव त्याही वेळी काही करू शकला नाही आणि आत्ताही काही करणार नाही. या गनसमोर तोही फोल आहे... सो नेत्रा, गेट रेडी टू डाय..." हे बोलत असतानाच अबीरने पिस्तुल अजून पुढे केलं आणि तो चाप ओढणार इतक्यात एक दगड येऊन त्याच्या हाताला लागला. चाप ओढला गेला, पण गोळी नेत्राच्या खांद्याच्या बाजूने निघून गेली आणि पिस्तुल खाली पडलं. दगड आला त्या दिशेला अबीरने पाहिलं तर डोक्यावर पट्टी बांधलेला कौशिक समोर उभा होता. कौशिकला पाहून अबीर अजून चवताळला. त्याच्याकडे पाहत म्हणाला, "तू जिवंत आहेस तर... आता तुला सोडणार नाही..."
अबीर कौशिकवर धाऊन गेला. दोघांमध्ये हाणामारी सुरू झाली. एकमेकांची कॉलर पकडत दोघं घराबाहेर फेकली गेली. हे सर्व पाहत असलेल्या नेत्राला काहीतरी सुचलं. तिने बाजूलाच पडलेला एक दगड उचलला आणि आनंदीचं प्रेत पुरलं होतं त्या दाराच्या कुलुपावर मारू लागली. काही क्षणातच कुलूप तुटलं. नेत्राने कडी काढून दार ढकललं. आतून खूप प्रखर असा प्रकाश नेत्राच्या डोळ्यांवर पडला. तिचे डोळे दिपले. "आय, तू आलीस..." या वाक्याने नेत्राचे डोळे उघडले आणि ती प्रकाशाच्या दिशेने पाहू लागली. प्रकाश अजून वाढत गेला आणि नेत्रा त्यात दिसेनाशी झाली. तिथे अबीर आणि कौशिकचं द्वंद्व सुरूच होतं. कौशिकने अबीरला ढकललं तसा तो मागे जात जमिनीवर पडला. बाजूलाच मघाशी हातून निसटलेलं पिस्तुल पडलं होतं. अबीरने ते उचललं आणि कौशिकवर गोळी झाडली. गोळी कौशिकच्या दंडाला चाटून गेली. दंड पकडून कौशिक विव्हळू लागला. अबीर दुसरी गोळी चालवणार इतक्यात त्याच्या हाताला गोळी लागली...
अबीरच्या हातून पिस्तुल पुन्हा दूर फेकलं गेलं. कौशिक व अबीरने गोळी आलेल्या दिशेला पाहिलं तर हातात पिस्तुल घेऊन इंस्पेक्टर व काही हवालदार उभे होते. नेत्राचे आई-वडील व बेड्या घातलेली अबीरची माणसंही बाजूलाच होती. कौशिक म्हणाला, "अबीर, तू मला मारायचा प्रयत्न केलास, पण माझं दैव बलवत्तर म्हणून मी वाचलो. मोक्याच्या क्षणी मला शुद्ध आली आणि मी गाडीतून उडी घेतली. कसाबसा रस्त्यावर येऊन पुन्हा बेशुद्ध झालो. प्रवाशांपैकी कोणीतरी मला हॉस्पिटलला नेलं. तिथे आलेल्या पोलीसांना मी सर्व सांगितलं आणि आम्ही सगळे लगोलग निघालो. इंस्पेक्टर साहेब नेत्राच्या आई-बाबांना वाचवायला गेले आणि मी इथे आलो. मला वाटलं मंगळदासच्या कृत्यांचा तुला पश्चात्ताप झाला म्हणून तू मला इथे आणणार होतास, पण तू..." कौशिकचं बोलणं पूर्ण होत होतं तोच इंस्पेक्टर पुढे होत म्हणाला, "मि. अबीर, डॉ. कौशिकसोबत हे सर्व तुमच्या विरुद्ध साक्ष द्यायला तयार आहेत. तुमचा खेळ संपला आहे. चला..."
अबीर खाली मान घालून पोलीसांसोबत जाऊ लागला. काही पावलं चालल्यावर त्याने इंस्पेक्टरला धक्का दिला आणि त्याच्या हातातलं रिव्हॉल्व्हर खेचून घेतलं. सर्वांकडे ते रिव्हॉल्व्हर रोखत अबीर म्हणाला, "हा...हा...हा... अबीरचा खेळ संपला असेल, पण मंगळदासचा डाव अजून बाकी आहे. या गनमध्ये अजून आठ गोळ्या शिल्लक आहेत, आणि तुम्ही सगळे पण आठच आहात. मला कोणीच हरवू शकत नाही. मंगळदास आहे मी मंगळदास. हा...हा...हा..." अबीर मोठ-मोठ्याने हसत होता. त्याच्या डोळ्यात वेडाची झाक दिसत होती. हवालदार आणि इंस्पेक्टर त्याच्याजवळ सरकत होते तोच, "व्हय. मंगलदास हायस तू मंगलदास... नीच आन् पापी राक्षस..." या आवाजाने सर्व चपापले. सर्वांनी आवाजाच्या दिशेने पाहिलं तर समोर नेत्रा होती. ती हवेत तरंगत होती. तिचे मोकळे सुटलेले केस, राखाडी छटा असलेलं शरीर पाहून सर्वजण स्तब्ध झाले. अबीरही चांगलाच घाबरला. त्याच्या हातून पिस्तुल गळून पडलं. नेत्राने अबीरच्या दिशेने पाहत आपला हात वर उचलला, तसा अबीरही वर उचलला गेला...
जवळ जवळ दोन-तीन पुरुषभर हवेत गेल्यामुळे अबीर अजूनच घाबरला. तो सगळीकडे पाहत असतानाच नेत्रा पुन्हा भसाड्या आवाजात म्हणाली, "मंगलदास... तू माज्या आयला तरास दिलास, माला बंद करून ठिवलंस, तुला मरायाच हवं..." असं म्हणत नेत्राने तिच्या हाताची बोटं जवळ आणायला सुरुवात केली. त्याबरोबर अबीरचा गळा आवळू लागला. काही क्षणातच अबीरचे प्राण जाणार हे लक्षात येताच कौशिक ओरडला, "थांब आनंदी. असं करू नकोस. तू या मंगळदासला मारशील, पण शिक्षा तुझ्या आईला मिळेल. नेत्राच्या रूपाने परत आलेल्या तुझ्या आईला पुन्हा त्रास व्हावा असं वाटतंय का तुला..." हे ऐकून कौशिककडे पाहत नेत्राने आपली बोटं मोकळी केली आणि आपला हात खाली आणला. त्यासरशी अबीर जमिनीवर कोसळला. उभा राहत स्वत:ला चाचपडत अबीर हसू लागला आणि म्हणाला, "हा...हा...हा... मंगळदासला कोणीच हरवू शकत नाही... हा...हा...हा..." विकृत हसत अबीर जंगलाच्या दिशेने पळाला...
नेत्रा हळू हळू जमिनीवर उतरली. तिच्या शरीराला एक झटका लागला आणि ती कोसळली. बाजूला एक पांढरी आकृती उभी होती. तो आनंदीचा आत्मा होता. त्या आकृतीने जंगलाच्या दिशेने पाहिलं आणि तिने क्षणार्धात एका हिंस्त्र लांडग्याचं रूप घेतलं. जराही न थांबता तो लांडगा जंगलाच्या दिशेने धावत सुटला. लांडगा लांब गेल्यावर कौशिक आणि नेत्राचे आई-वडील नेत्राजवळ आले. नेत्राचं डोकं मांडीवर घेत सरिता म्हणाली, "नेत्रा, ऊठ बाळा... अहो, ही उठत नाही हो..." काही क्षणात नेत्रा शुद्धीवर आली. स्वत:ला चाचपडलं, उठून उभी राहत ती म्हणाली, "मी इथे कशी... मी तर आत त्या खोलीसमोर होते. कुलूप तोडलं आणि... आनंदी कुठे आहे... आणि अबीर..." नेत्राच्या डोक्यावरून हात फिरवत रत्नाकर म्हणाले, "नेत्रा, शांत हो बेटा..." आणि आत्ता घडलेली सर्व हकीगत रत्नाकरने नेत्राला सांगितली. "आनंदे... अगं आनंदे..." अशी हाक मारत नेत्रा जंगलाच्या दिशेने पळत सुटली. कौशिक, रत्नाकर, सरिता आणि पोलीसदेखील नेत्राच्या मागून गेले...
अबीरच्या माणसांना घेऊन पोलीस निघून गेले. कौशिककडे वळत नेत्रा म्हणाली, "मंगळदासचा न्याय तर झाला, पण आनंदी... ती अजूनही त्याच फेऱ्यात अडकलेली आहे. तिलाही मुक्ती मिळायला हवी..." कौशिकला नेत्राचं म्हणणं पटलं. सर्वजण वाड्यात गेले. ज्या खोलीचं दार नेत्राने उघडलं होतं, त्या खोलीत सर्वजण पोहोचले. कौशिक व रत्नाकरने तिथली माती बाजूला करायला सुरुवात केली. कौशिक त्याच्या घरातून कुदळ घेऊन आला आणि जमीन खणू लागला. बरंच खणल्यावर त्यांना सांगाड्याचे तुकडे दिसू लागले. रत्नाकर व कौशिकने ते तुकडे अलगद बाहेर आणले. चिता रचून कौशिकने अग्नी दिला. जळणाऱ्या चितेतून एक मंद अशी ज्योत आकाशात जात नाहीशी झाली...
निळ्याशार आकाशात तेजस्वी आवरणात आनंदीचा चेहेरा दिसत होता. ती गोड हसत म्हणाली, "आय... माजं पॉट भरलं. आता तुला सपनांचा कंदी बी तरास होनार न्हाय..." इतकं बोलून तो चेहेरा लुप्त झाला. त्या रात्री बिछान्यावर झोपलेल्या नेत्राला आज हे सुखद स्वप्न पडलं. झोपलेल्या नेत्राच्या चेहेऱ्यावर स्मितहास्य दिसत होतं...
समाप्त.

No comments:
Post a Comment