Saturday, November 4, 2023

चेस मास्टर...

'रन मशीन' हा शब्द ऐकला, की एकच व्यक्ती आठवते. भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या मधल्या फळीतला भरवशाचा फलंदाज, विराट कोहली...

खेळपट्टी आणि मैदानावरच्या त्याच्या वावरामुळे विराटला किंग कोहली सुद्धा म्हटलं जातं. विराटच्या बॅटने अनेक मोठमोठ्या खेळी साकारल्या. अनेक विक्रमही विराटच्या नावे आहेत. आशिया चषक २०२३ मध्ये पाकिस्तान समोर खेळताना विराटने सर्वात जलद तेरा हजार धावा करण्याचा नवा विक्रम करून, सचिन तेंडुलकरलाही मागे टाकलं. इतके सगळे विक्रम गाठीशी असल्याने विराट खरंच विराट झाला. पण त्याचे काही डाव असे होते, ज्यांनी विराटला महान खेळाडूंच्या यादीत बसवलं...

आशिया चषक २०१२ - भारत वि. पाकिस्तान...

या सामन्याआधी, पाकिस्तानने दोन्हीही सामने जिंकले होते, तर भारताला बांगलादेशकडून पराभवाचा प्रसाद मिळाला होता. मीरपूरच्या फलंदाजीला पोषक अशा खेळपट्टीवर नाणेफेक जिंकून पाकिस्तानने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मोहम्मद हाफीज़ आणि नासिर जमशेद यांच्या शतकांच्या जोरावर पाकिस्तानने ३२९ धावा उभ्या केल्या. सामना जिंकण्यासाठी भारताला ३३० धावांचा डोंगर पार करायचा होता. भारताचा डाव सुरू झाला आणि दुसऱ्याच चेंडूवर गौतम गंभीर बाद झाला...

भारत हा सामनाही गामावणार असं वाटत होतं. त्यावेळी विराटने मैदानात प्रवेश केला. सचिनसोबत १३३ आणि रोहितसोबत १७२ अशा दोन मोठ्या भागीदाऱ्या रचत विराटने लक्षाला काबीज केलं. सचिन आणि रोहित बाद झाल्यावर, खेळपट्टीवर जम बसलेल्या विराटने मोठे फटके मारायला सुरुवात केली. सत्तेचाळीसाव्या षटकात जेव्हा विराट बाद झाला, तेव्हा सामना पूर्णपणे भारताकडे झुकला होता. धोनीने विजयी चौकार खेचून राहिलेली औपचारिकता पूर्ण केली खरी, पण १४८ चेंडूत १८३ धावांची धडाकेबाज खेळी साकारणारा विराट, या विजयाचा खरा शिल्पकार ठरला...

२०१४ दुसरी कसोटी - भारत वि. न्यूझीलंड...

पहिल्या कसोटीत पराभूत होऊन भारतीय संघ या कसोटीसाठी मैदानात उतरला होता. नाणेफेक जिंकून भारताने न्यूझीलंडला प्रथम फलंदाजी दिली. मोहम्मद शामी आणि इशांत शर्माने भेदक मारा करत न्यूझीलंडला १९२ धावात रोखलं. मग अजिंक्य राहणे आणि शिखर धवन यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर भारताने ४३८ धावा जमवल्या आणि दुसऱ्या डावासाठी भारताला २४६ धावांची  आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात ज़हीर ख़ानने न्यूझीलंडच्या फलंदाजीला खिंडार पाडलं आणि किवींची अवस्था ९४ वर ५ अशी झाली. पण ब्रँडन मॅक्कलम आणि जेम्स वॉटलिंग यांच्या विक्रमी भागीदारीने न्यूझीलंडला जबरदस्त आघाडी मिळवून दिली. भारताला पाचव्या दिवशी ४३४ धावांचा पाठलाग करायचा होता आणि ५२ षटकांचा खेळ शिल्लक होता...

भारताचा दुसरा डाव सुरू झाला पण ट्रेन्ट बोल्ट आणि टिम साउदीने टिच्चून मारा करत भारताच्या आघाडीच्या फलंदाजांना लवकर परतीचा रस्ता दाखवला. ३ गडी बाद ५४ अशा केविलवाण्या अवस्थेत भारतीय संघ अडकला होता. हा सामनाही भारत गमावणार असंच सर्वांना वाटत असताना मैदानात होते विराट कोहली आणि रोहित शर्मा. विराटने एकेरी-दुहेरी धावा जमवत खेळपट्टीवर जम बसवला. टप्प्यातल्या चेंडूंवर जोरदार प्रहार करत चौकार-षटकारही मिळवले. ती कसोटी अनिर्णित अवस्थेत संपली. मॅक्कलमच्या त्रिशतकाने आणि मॅक्कलम-वॉटलिंग जोडीच्या विक्रमाने ही कसोटी चर्चेत राहिली हे खरं आहे. पण कसोटी वाचवणारी १३५ चेंडूत नाबाद १०५ धावांची विराट कोहलीची चिवट खेळी जास्त लक्षात राहिली...

टी २० विश्वचषक २०२२ - भारत वि. पाकिस्तान...

कोव्हिडमुळे पुढे सरकलेल्या टी २० विश्वचषक २०२१ मध्ये विश्वचषक इतिहासात पहिल्यांदाच पाकिस्तानने भारताला पराभूत केलं. तोच विजय गाठीशी धरून याही वेळी पाकिस्तानी संघ मैदानात उतरला होता. त्या विश्वचषकात, भारत व पाकिस्तान दोघांचाही हा पहिलाच सामना होता. नाणेफेक जिंकून भारताने पाकिस्तानला फलंदाजी दिली. अर्शदीप सिंह आणि हार्दिक पंड्या यांच्या गोलंदाजीच्या जोरावर भारताने पाकिस्तानला १५९ धावांवर रोखलं. आता सामना होता भारतीय तगडी फलंदाजी आणि पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजीचा. राहुल, रोहित, कार्तिक, सूर्या ही दमदार नावं पाहता भारत हे आव्हान लीलया पेलेल असं वाटत होतं...

नईम शाह आणि हॅरीस रौफ यांनी भेदक मारा करत भारतीय फलंदाजीला खिंडार पाडलं. ३६ धावा आणि चार बळी अशा नाजूक अवस्थेत भारतीय संघ असताना, विराटने सामन्याची सूत्र स्वत:च्या हाती घेतली. हार्दिकसोबत एकेरी-दुहेरी धावा जमवत विराटने धावफलक हलता ठेवला. वेळोवेळी चौकार-षटकारांची बरसात करत विराटने धावगतीही वाढवली. अश्विनच्या चतुरपणामुळे असो किंवा नवाज़च्या ढिसाळपणामुळे असो, सामना भारताच्या झोळीत गेला. पण प्रतिकूल परिस्थितीत, ५३ चेंडूत नाबाद ८२ धावांच्या विराटच्या जिगरबाज खेळीचा, भारताच्या या अशक्यप्राय विजयात सिंहाचा वाटा होता हे नक्की...

या सर्व सामन्यात जेव्हा विराट फलंदाजीसाठी आला, तेव्हा भारताची नाजूक स्थिती होती. त्यातून विराटने भारताला नुसतं बाहेरच नाही काढलं, तर सामन्याला कलाटणी देत विजश्रीही खेचून आणली. एकेरीच्या दुहेरी करणं, दुहेरीच्या तिहेरी धावा करणं यात विराटचा कमालीचा फिटनेस दिसून येतो. धावफलक हलता ठेवत एकीकडे फील्डर्सना व्यस्त ठेवायचं आणि दुसरीकडे धावा जमवत जायचं यात विराटचा हातखंडा आहे. विराटचं हेच कौशल्य त्याला इतर फलंदाजांत वेगळं ठरवतं...

आज ५ नोव्हेंबर. आज विराट कोहलीचा वाढदिवस. भारतीय क्रिकेट संघाच्या या भरवशाच्या चेस मास्टरला वाढदिवसाच्या शतकमय शुभेच्छा...

@ अनिकेत परशुराम आपटे.

No comments:

Post a Comment