Saturday, July 27, 2024

विजयी झेल...

क्रिकेटचे सामने नेहमीच उत्कंठावर्धक असतात. काही सामने रटाळ होतात खरे. पण बहुतांश सामने खुर्चीला खिळवून ठेवणारे असतात. क्रिकेटच्या अनेक स्पर्धा जगभर सुरू असतात. पण सारं जग ज्या स्पर्धेकडे डोळे लाऊन असतं, ती म्हणजे विश्वचषक स्पर्धा. त्यातही विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना म्हणजे उत्कंठेचा उच्चांक गाठणारा असतो...

जग जिंकायला तत्पर असलेले दोन तुल्यबळ संघ एकमेकांसमोर उभे राहतात आणि सर्व ताकदीनिशी 'जगत जेता' या पदासाठी लढतात. अशा या हाय प्रेशर लढतीत काही महत्वाच्या झेलांमुळे सामन्यांना कलाटणी मिळते. भारताने जिंकलेल्या चार विश्वचषकांमध्ये असेच कमालीचे झेल समोर आले...

१९८३ विश्वचषक...

दोन वेळा विश्वविजेता बनलेला वेस्ट इंडीज एका बाजूला तर त्यावेळी नवखा असलेला भारतीय संघ दुसऱ्या बाजूला, असा हा अंतिम सामना होता. प्रथम फलंदाजी करताना गार्नर, होल्डिंग, मार्शल आणि रॉबर्ट्स समोर भारतीय फलंदाजीची दाणादाण उडाली आणि विंडीजला १८३ धावांचं माफक आव्हान मिळालं. तुफान फॉर्ममध्ये असलेले सर विव्ह रिचर्ड्स गोलंदाजांचा समाचार घेत होते. मदनलालला तर त्यांनी सलग चौकार खेचले होते. तरीही कपिलने पुन्हा मदनलालच्या हाती चेंडू दिला. यावेळी मदीपांनी टाकलेल्या आखुड चेंडूवर विव्ह रिचर्ड्सने प्रहार केला. हवेत उडालेला झेल मिड-ऑनला उभ्या असलेल्या कपिलने मागे धावत जाऊन अचूक पकडला. सर विव्ह रिचर्ड्स बाद झाले. विंडीजची पुढची फलंदाजी ढेपाळली आणि ४३ धावांनी सामना जिंकत भारताने पहिल्यांदा विश्वचषकावर नाव कोरलं...

२००७ टी २० विश्वचषक...

टी २० क्रिकेटच्या पहिल्या विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांनी अंतिम फेरी गाठली होती. प्रथम फलंदाजी करताना पाक गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना डोकं जास्त वर काढू दिलं नाही आणि टी २० सामन्यासाठी तुलनेने सोप्पं असलेलं १५८ धावांचं लक्ष्य पाकिस्तानसमोर आलं. विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानची भारतापुढे होणारी गत सर्वांना ज्ञात होती. त्यामुळे हाही सामना भारत जिंकेल असंच वाटत होतं. मिसबाह-उल-हक़ नेटाने किल्ला लढवत होता आणि धावाही जमवत होता. पठाण, रूद्र प्रताप आणि श्रीशांथची षटकं संपली होती. मिसबाह हरभजनची गोलंदाजी चांगला खेळत होता. त्यावेळी एकच पर्याय धोनीसमोर उरला होता. तो म्हणजे जोगिंदर शर्मा. जोगीच्या दुसऱ्याच चेंडूवर षटकार खेचून मिसबाहने समस्त भारतीयांना तोंडात बोटं घालायला लावली. जोगीच्या तिसऱ्या चेंडूवर मिसबाहने स्कूप शॉट खेळला. चेंडू हवेत जाऊन शॉर्ट फाईन लेगला उभ्या असलेल्या श्रीशांथच्या हाती विसावला. मिसबाह बाद झाला आणि पहिला टी २० विश्वचषक भारताच्या झोळीत पडला...

२०११ विश्वचषक...

वानखेडेवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात भारत आणि श्रीलंका समोरासमोर होते. प्रथम फलंदाजी करताना लंकेची सुरुवात थोडी डळमळीत झाली. पण संघक्कारा आणि जयवर्धनेने डाव सावरला. स्थिर होताच दोघांनीही वेगाने धावा जमवायला सुरुवात केली. ही भागिदारी तोडायला हवी असं सर्वांनाच वाटत होतं. पण संघक्कारा आणि जयवर्धने कोणत्याही गोलंदाजाला दाद लागू देत नव्हते. अशा वेळी धोनीने युवराजकडे चेंडू सोपवला. युवराजच्या त्या षटकातल्या पाचव्या आणि थोड्या बाहेर जाणाऱ्या चेंडूला संघक्कारा खेळायला गेला. चेंडूने बॅटची कड घेतली आणि स्टंपला चिकटून उभ्या असलेल्या धोनीने तो पकडला. संघक्कारा बाद झाला. तो जर अजून काही काळ टिकला असता, तर जे लक्ष्य २७५ पर्यंत थांबलं, तेच लक्ष्य कदाचित ३०० पार गेलं असतं. म्हणून धोनीने पकडलेला तो झेल महत्वाचा होता. लंकेच्या धावांना लगाम बसला आणि धावांचा यशस्वी पाठलाग करून भारताने दुसऱ्या विश्वचषकाला गवसणी घातली...

२०२४ टी २० विश्वचषक...

सर्वांच्या अपेक्षांच्या विरुद्ध, हा विश्वचषक भारतीय गोलंदाजांनी गाजवला. सर्व सामने जिंकत भारताने दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला. दक्षिण आफ्रीकेचं कडवं आव्हान भारतासमोर होतं. विराटच्या जिगरबाज खेळीच्या जोरावर प्रथम फलंदाजी करत भारताने प्रोटियाजसमोर १७७ धावांचं आव्हान ठेवलं. भारतीय गोलंदाजांनी जबरदस्त फॉर्मात असलेल्या दक्षिण आफ्रीकन फलंदाजांना वेसण घालत ३० चेंडूत ३० धावा अशा सूस्थितीतून ६ चेंडूत १६ धावा अशा बिकट अवस्थेत आणून ठेवलं. शेवटचं षटक टाकायला आलेल्या हार्दिक पंड्याच्या पहिल्याच चेंडूवर डेविड मिलरने हल्ला चढवला. चेंडू सीमापार जाण्याच्या दिशेने खाली येत असताना लाँग ऑफला उभ्या असलेल्या सूर्यकुमार यादवने प्रसंगावधान दाखवत अप्रतीम झेल पकडला आणि भारतासाठी विजयाची वाट मोकळी झाली...

अत्यंत हाय प्रेशरमध्ये, कपिल, श्रीशांथ, धोनी आणि सूर्याने डोकं शांत ठेवत मोक्याच्या क्षणी पकडलेले हे चारही झेल, फसलेल्या सामन्यांना कलाटणी देत भारताच्या बाजूने सामना झुकवणारे ठरले. त्यामुळे, 'कॅचेस विन मॅचेस...' ही म्हण पूर्णपणे सार्थकी लागली...

@ अनिकेत परशुराम आपटे.

No comments:

Post a Comment