Friday, December 16, 2022

बोल री कठपुतली... (दुसरा व शेवटचा भाग)

पहिल्या भागात...

नुकताच साखरपुडा झालेले आयुषी आणि रजत त्यांच्या मित्राच्या लग्नासाठी रतनगढला जात असतात. पहाटेच आयुषीला एक भयानक स्वप्न पडतं ज्याबद्दल ती गाडीत राजतला सांगते. रजत तिचं बोलणं हसण्यावारी नेत विषय बदलतो. पुढे दोघं एका ढाब्यावर थांबले असताना ढाब्याचा मालक रजतला वत्सलेची कहाणी सांगण्यास सुरुवात करतो ज्यात रतनगढ, तिथलं जंगल, तिथलं गांव, गावात राहणारी कावेरी आणि गावाबाहेर राहणारी वत्सला यांचा उल्लेख असतो... 

वत्सला हडळ असल्याचं ढाब्याचा मालक सांगतो. पण राजतला ते पटत नाही. उलट रजत त्यांची मस्करी करतो. ढाब्याचा मालक आयुषीलाही शॉर्टकट नका घेऊ असं सांगायचा प्रयत्न करतो पण तोवर गाडी निघून गेली असते. जंगलाच्या बाजूने न जाता रजत डाव्या बाजूने गाडी वळवतो पण काही अंतर गेल्यावर एक झाड अचानक रस्त्यावर उनमळून पडतं आणि रजतला गाडी उजवीकडे वळवावी लागते. जंगलात शिरताच गाडी गरम होऊन बंद पडते आणि रजत पाणी आणण्यासाठी जंगलात जातो. बराच वेळ रजत परत येत नाही म्हणून काळजीत असलेली आयुषी, रजतला कॉल्स करते पण रजत उत्तर देत नाही. शेवटी न राहवून आयुषी गाडीबाहेर पडते...

जंगलात थोडं चालल्यावर आयुषीला एक जुनाट वाडा दिसतो. पूर्ण जळून काळा झालेला तो वाडा पाहून आयुषीला नवल वाटतं. अनोळखी जागा असल्याने आयुषी वाड्याला बाहेरून फेरी मारते. तेव्हा तिला एक चिठोरा सापडतो. त्यात वत्सलेचा उल्लेख असतो. समोरच एक दार असतं. रजतला शोधत आयुषी आत प्रवेश करते. तिला समोर रजत दिसतो पण तो एका बाहुल्यासारखा झालेला असतो. तेवढ्यात “बोल री काठपुतली डोरी...” हे गाणं ऐकू येतं आणि रजत हातातल्या झांजा वाजवायला लागतो. आयुषीला भीती वाटते आणि त्याचवेळी तिला वत्सला दिसते. वत्सला तिची कहाणी आयुषीला सांगू लागते...

वत्सला तिच्या काळ्या विद्येबद्दल सांगताना असंही सांगते की याच विद्येने तिने कावेरी नावाच्या मुलीच्या आई-वडिलांनाही बाहुल्या बनवलं होतं. वत्सला आयुषीला कावेरी सोबत घडलेली हकिगत दाखवते. वत्सला जंगलात कावेरीला पाहते आणि तिच्या शरीराला काबिज करण्याच्या अभिलाषेने वत्सला कावेरीला फसवून वाड्यावर आणते. तिच्या विद्येबद्दल कावेरीला सांगताना ती मध्येच थांबते. कारण कावेरीचं स्वत:हून खोलीत जाणं गरजेचं असतं. या वाड्यातून बाहेर पडण्याचा मार्ग या वाड्यातच आहे असं कावेरीला सांगून वत्सला अनुष्ठानाला बसते...

शेवटचा भाग...

डोळे बंद असतानाही वत्सलेला कळत होतं कावेरी कुठे कुठे जात आहे. अनुष्ठानात बराच वेळ गेला. मध्यरात्र होऊ लागली होती. डोळे मिटलेल्या अवस्थेत वत्सलेने दाराकडे मान केली. तिच्या चेहेऱ्यावर स्मित होतं. "ही पोरगी त्या खोलीत पोहोचली तर... रिंगणाच्या आजू-बाजूला घुटमळतेस काय... पण तुला आत प्रवेश करावाच लागेल... हा...हा...हा..." असं स्वत:शीच पुटपुटत वत्सलाने डोळे उघडले. बसल्या जागेवरूनच काळ्या धुरासह ती नाहीशी झाली आणि त्याच काळ्या धुरासह ती प्रकटली, ती वरच्या मजल्यावरच्या एका खोलीसमोर. वत्सलेला अचानक आलेली पाहून कावेरी दचकली आणि मागे सरकली. वत्सलेने कावेरीच्या पावलांकडे पाहिलं आणि पुन्हा तिच्या डोळ्यात चमक दिसू लागली. खोलीत येत वत्सला म्हणाली, "तू मुक्तीचा मार्ग शोधलास तर... हे रिंगणच मुक्तीचा मार्ग आहे. आता बस पाहू त्या रिंगणात. मी मंत्र म्हणते आणि मुक्तीचा मार्ग सुकर करते..." कावेरी खूप घाबरली होती. पण मुक्ती हा शब्द ऐकला आणि तिला हायसं वाटलं. ती पटकन त्या रिंगणात बसली. वत्सलाही रिंगणाच्या एका बाजूला आरशाच्यासमोर असलेल्या दुसऱ्या रिंगणात बसली. दोन्ही रिंगणांच्या सभोवताली असलेल्या मेणबत्त्या आपोआप पेटल्या...

वत्सला म्हणाली, "कावेरी, तुझ्या उजव्या हाताला असलेल्या आरशाकडे बघ..." कावेरीने तिथे पाहिलं, तर एक विक्राळ बिभत्स व्यक्ती त्यात दिसत होती. त्या व्यक्तीला पाहून कावेरी अजूनच घाबरली आणि तिने डोळे मिटून घेतले. आरशाकडे बोट करत वत्सला म्हणाली, "ही व्यक्ती आता मुक्तीचा मार्ग दाखवेल. तू डोळे मिटूनच बस. मंत्रोच्चार सुरू होईल. मंत्र संपेपर्यंत डोळे उघडू नकोस..." वत्सलेच्या ताकिदीकडे लक्ष देऊन कावेरी स्वस्थ बसली. यावेळी तिने डोळे नीट मिटले होते. वत्सला उठली आणि कावेरी बसली होती त्या रिंगणाभोवती तिने काळ्या मातीचं अजून एक रिंगण तयार केलं. रिंगण पूर्ण होताच जळत्या निखाऱ्याप्रमाणे ते लाल झालं आणि त्या मातीच्या रिंगणाने पेट घेतला. वत्सला जागेवर येऊन बसली. तिच्या रिंगणाभोवतीही तिने काळ्या मातीचं वर्तुळ काढलं. तेही वर्तुळ जळू लागलं. वत्सला मंत्र म्हणू लागली. मंत्रोच्चार जसा वाढत गेला तशा ज्वाळा भडकत गेल्या आणि काळा धूर खोलीभर पसरला. काही क्षणांसाठी खोलीत फक्त धुराचंच साम्राज्य होतं. अचानक तो धूर नाहीसा झाला. दोन्ही रिंगणांभोवती असलेल्या ज्वाळा शांत झाल्या आणि रिंगणात बसलेल्या कावेरी आणि वत्सलेने एकदमच डोळे उघडले. कावेरीने समोर पाहिलं आणि तिला धक्का बसला. तिने स्वत:ला चाचपडलं आणि ती अजून घाबरली...

कावेरीच्या कोमल कांतीच्या जागी सुरकुतलेलं वृद्ध शरीर दिसत होतं. ती ज्या रिंगणात बसली होती, आता ती तिथे नसून दुसऱ्या रिंगणात होती. कावेरीने समोर पाहिलं तर तिचं शरीर तिला दिसलं. त्या शरीराच्या मुखातून शब्द फुटले, "कावेरी, हा तुझ्या नाही, तर त्या खंगत चाललेल्या शरीरातून बाहेर पाडण्यासाठी माझ्या मुक्तीचा मार्ग होता. मी अनुष्ठानाला बसले ते वेताळाला प्रसन्न करून परकाया प्रवेशाची ही क्रिया सक्रीय करण्यासाठी. तुझं स्वत:हून या वाड्यात येणं आणि रिंगणात प्रवेश करणं आवश्यक होतं. म्हणून जंगलात तो डाव रचून तुला इथवर येण्यास भाग पाडलं मी. आता तुझं हे तरूण शरीर मला मिळालंय आणि त्या नष्ट होत चाललेल्या शरिरात तू बंदिस्त झाली आहेस. या क्रियेचा दुसरा फायदा म्हणजे आता तुला बोलताही येणार नाही. तुझी वाचाही नष्ट केली आहे मी. या नव्या शरिरानिशी मी मुक्त संचार करणार आणि तू इथेच खितपत मरणार... हा...हा...हा..." इतकं बोलून कावेरीच्या तरूण शरीरातली वत्सला काळ्या धुरानिशी नाहीशी झाली...

वाड्याबाहेर काळा धूर प्रकट झाला आणि धूर नाहीसा होताच कावेरीच्या शरीरात असलेली वत्सला तिथे दिसू लागली. ती विचार करू लागली, "नवं शरीर मिळालं. पण ती पोर तशी हुशार वाटते. तो आरसाही अजून तिथेच आहे. त्या आरशाने कावेरीला वाड्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सांगितला तर... मी तिचं शरीर मिळवलं खरं, पण आता मी स्वत: ते नष्ट नाही करू शकणार... हां... हीच युक्ती करावी..." मनाशी विचार पक्का करत वत्सलेने वाड्याकडे नजर टाकली आणि कुत्सित हसत वाड्याच्या उलट्या दिशेने चालू लागली. जंगलात जाऊन वत्सलेने तिचे घातलेले कपडे जागो-जागी फाडले, अंगावर कुठे कुठे जखमा केल्या आणि गावच्या वेशीजवळ येऊन निपचित पडली. येणाऱ्या वाटसरूंनी तिला पाहिलं आणि ती कावेरी आहे असं समजून ते तिला गावात घेऊन गेले...

शुद्धीवर येताच वत्सला रडू लागली आणि रडत रडतच म्हणाली, "मी... मी जंगलात गेले होते ना... तेव्हा ती... ती तिथे आली आणि मला बळजबरीने जंगलातल्या वाड्यावर घेऊन गेली. ती मला बाहुली बनवणार होती. आणि माझ्यानंतर ती गावात येऊन सर्वांना बाहुली बनवणार होती. ती मंत्र म्हणू लागली तशी मी पटकन तिथून निसटले. मी जंगलाबाहेर आले आणि मला चक्कर आली. माझ्या आई-बाबांनाही तिने मारून टाकलं आणि बाहुली बनवलं. मला खूप भिती वाटते. ती इथे आली तर मला परत घेऊन जाईल... नको नको... मला परत नाही जायचं..." कावेरीचं हे बोलणं ऐकून सगळे थोडे घाबरले. पण त्यातला एकजण म्हणाला, "आपण किती काळ त्या वत्सलेपासून असं घाबरून राहणार..." दुसरा म्हणाला, "बरोबर आहे. हिम्मत करून आपण सर्वांनी एकाच वेळी हल्ला चढवला तर ती वत्सला तरी काय करेल..." सर्वांना हे पटलं आणि त्याचक्षणी सर्व गावकरी मशाली घेऊन कावेरीच्या मागे निघाले...

कावेरीच्या शरीरात असलेली वत्सला मनोमन सुखावत होती. थोड्याच वेळात सर्वजण वाड्यावर पोहोचले. मुख्य दरवाजा उघडाच होता पण आत जायला कोणी धजावत नव्हतं. काही क्षणातच थरथरत्या हातात जळके निखारे घेऊन वत्सलेच्या शरीरात अडकलेली कावेरी बाहेर आली. कावेरीने आपल्या जुन्या शरीरावर ते निखारे भिरकावले, पण अंगात त्राण नसल्याने ते निखारे जवळच पडले. कावेरीच्या शरीरातली वत्सला लगेच म्हणाली, "बघा ही पुन्हा मला मारायला सरसावली आहे..." त्यासरशी गावकऱ्यांनी दाराच्या दिशेने दगडफेक करायला सुरुवात केली. त्यांचा समज होता की ते वत्सलेला दगड मारत आहेत. पण ते दगड लागत होते वत्सलेच्या शरीरात कैद असलेल्या कावेरीला. कावेरी वेदनेने विव्हळली. तिला सगळं सांगायचं होतं, पण शब्दच फुटत नव्हते. काही क्षणातच कावेरी कोसळली. तसं गावकऱ्यांनी दगडफेक बंद केली. त्या जखमी, वृद्ध शरीराला फरफटत कावेरी कशीबशी आत गेली...

वत्सला लगेच म्हणाली, "ही हडळ आहे. परत येऊ शकते. जाळून टाका हा वाडा..." गावकऱ्यांना वत्सलेचं म्हणणं पटलं आणि त्यांनी मशाली वाड्यावर भिरकावल्या. ज्वाळा भडकल्या. वाड्यातून आर्त किंकाळ्यांचा आवाज ऐकू येऊ लागला. काही गावकरी म्हणाले, “अखेर गावाला लागलेली ही पीडा संपली. या हडळीचा नायनाट झाला. चला घरी..." या हडळीचा नायनाट झाला..." हे ऐकून कावेरीच्या शरीरातली वत्सला सुखावत होती. तोच आनंद तिच्या चेहेऱ्यावरही दिसून येत होता. तेव्हा तिने तो लपवला. जळणाऱ्या वाड्याकडे तिने एक कटाक्ष टाकला. त्याच क्षणी सर्व गोठून गेलं. पुन्हा तो प्रखर उजेड समोर आला. वेळ आत्ताच्या काळात परत आली होती. आयुषीचे डोळे दिपले तशी तिने पापण्या मिटून डोळ्यांवर हात ठेवला. हळूहळू तो प्रखर उजेड कमी होत वातीच्या कंदिलांचा मंद प्रकाश सर्वत्र पसरला. आयुषीने डोळे उघडले. समोर वत्सला उभी होती...

तिला पाहून आयुषी दोन पावलं मागे सरकत, त्या प्रकाशाच्या दिशेकडे बोट दाखवत म्हणाली, "म्हणजे दगडफेकीत आणि आगीत जी मेली ती तुझ्या शरीरातली कावेरी होती तर... अगं तू माणूस आहेस की सैतान... त्या कावेरीचे असे हाल पाहवले तरी कसे तुला..." हे ऐकून वत्सला कर्कश हसत म्हणाली, "मी माणूस कुठे आहे... मी तर हडळ आहे... या मानवी देहात विसावणारी एक हडळ... या मानवी देहाच्या मर्यादा मी बदलू शकत नाही, पण हा देह तर बदलू शकते... तेच तर केलं मी... आणि आताही करणार आहे. मी असलेल्या देहाला ज्या दिवशी शंभर वर्ष पूर्ण होतात, त्या दिवसाच्या कातरवेळेनंतर जी पहिली स्त्री माझ्या समोर येईल तिचाच देह मी धारण करू शकते... त्या वेळी जंगलात कावेरी भेटली, आणि आज... तू... हा...हा...हा..." इतकं बोलू वत्सला पुन्हा हसू लागली. त्याच्या हसण्याचा आवाज वाड्यात घुमू लागला. त्याच वेळी त्याच सुरातला रडण्याचा हळुवार आवाजही आयुषीला ऐकून आला. सगळीकडे नजर फिरवत आयुषी म्हणाली, "हा रडण्याचा आवाज... म्हणजे इथे अजूनही कोणी आहे..." तो आवाज वत्सलेनेसुद्धा ऐकला...

आपलं हसणं थांबवत वत्सवा म्हणाली, "हुशार आहेस... इथे तुझ्या-माझ्याखेरीज, या बाहुल्यांखेरीज आणि वेताळाच्या साम्राज्याशिवाय अजूनही कोणीतरी आहे... तो आहे एक आरसा, ज्यात माझं प्रतिबिंब मी कैद केलं आहे. ते माझं प्रतिबिंब असल्याने माझ्या पूर्ण विरुद्ध आहे. मी वाईट आहे तर ते चांगलं आहे. पण ते माझंच प्रतिबिंब असूनही इथून जाऊ शकत नाही. कारण माझ्या मंत्रशक्तीच्या जोरावर मी त्याला त्या आरशात बंदिस्त केलंय. मी स्वत:हून त्याला नष्टही करू शकत नाही. कारण ते माझंच प्रतिबिंब आहे. ते नष्ट झालं तर मीसुद्धा नष्ट होईन. आणि हाच या वाड्यातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग आहे... त्या कावेरीला मारण्याचा कट मी याचकरिता रचला. माझ्या प्रतिबिंबाने तिला मुक्तीचा मार्ग सांगितला असता आणि तिने तसं केलं असतं, तर माझं अस्तित्वच संपलं असतं... पण आता मला भय नाही. हा...हा...हा..." वत्सला हसू लागली. आयुषी अजून घाबरली आणि एक पाऊल मागे झाली. लाकडाचं एक फळकूट तिच्या पायाला लागलं. वत्सला दुसरीकडे पाहते आहे हे लक्षात येताच आयुषीने ते फळकूट उचललं आणि पूर्ण ताकदीनिशी तिने वत्सलेवर वार केला...

त्याच क्षणी काळ्या धुरासह वत्सला नाहीशी झाली आणि आयुषीच्या मागे पुन्हा काळ्या धुरासह प्रकटत म्हणाली, "तुला अजून समजलेलं दिसत नाही... मला कोणतीही सजीव व्यक्ती किंवा मानव निर्मित गोष्ट मारू शकत नाही. मला फक्त माझी विद्याच मारू शकते. आता तुझ्याकडे फारच थोडा अवधी आहे. परकाया प्रवेशाची क्रिया सक्रीय करण्यासाठी मी आता अनुष्ठानाला बसणार आहे. माझं अनुष्ठान जोवर सुरू आहे तोपर्यंतच हे शरीर तुझ्याकडे आहे. त्या नंतर... हा...हा...हा..." विचित्र हसत वत्सला काळ्या धुरासह नाहीशी झाली. सर्वत्र सामसूम झालं. आयुषी पुन्हा रजतकडे वळत म्हणाली, "रजत... काय करू रे मी... सांग ना..." आयुषीने रजतचा तो लाकडी पुतळा हलवला आणि त्याच्या खिशातून मोबाईल खाली पडला. मोबाईल उचलून छातीशी धरत आयुषी रडू लागली. तेवढ्यात तिला आठवलं, की वाड्याबाहेर तिला मिळालेला एक चिठोरा तिने खिशात कोंबला होता. आयुषीने लगेच खिसा चाचपडला आणि तो चिठोरा बाहेर काढला.. भरल्या डोळ्यांनी आयुषीने तो चिठोरा पुन्हा वाचला आणि विचार करू लागली, "यात या वत्सलेबद्दल लिहिलेलं दिसतंय. म्हणजे हे कावेरीने तर लिहिलं नसेल... तसं असेल तर तिने अजूनही काही लिहिलं असणार... मला ते शोधायला हवं..."

आयुषीने डोळे पुसले आणि रजतच्या छातीवर दोन वेळा हलकीशी थाप मारून शोध मोहिम सुरू केली. आयुषी एकेक खोलीत जात होती आणि निराशेने परतत होती. तिथे अनुष्ठानात बसलेल्या वत्सलेला हे समजत होतं आणि तिच्या चेहेऱ्यावर स्मित उमटत होतं. बाहेर आयुषी एका भिंतीजवळ पोहोचली. पण तिला कुठेच काहीच सापडलं नव्हतं. रागाने तिने भिंतीला लाथ मारली. जमिनीपासून काही इंच अंतरावर भिंतीला तडा गेला आणि माती खाली पडली. आयुषीने खाली पाहिलं तर आयताकृती आकाराचा एक तडा तिथे दिसत होता. आयुषी विचार करू लागली, "भिंतीला तडाच जाईल तर वेडावाकडा जाईल... असा आकार घेऊन कसा..." आयुषीला काहीतरी आठवल्यासारखं झालं आणि ती स्वत:शीच पुटपुटली, "गावकऱ्यांनी कावेरीवर दगडफेक केली. कावेरी घायाळ झाली आणि फरफटत वाड्याच्या आत आली... या इथे तिने काही लपवलं तर नसेल..." आयुषी तड्याच्या आजूबाजूची जागा साफ करू लागली. थोड्याच वेळात एक हलणारी वीट समोर आली...

आयुषी दोन्हीही हातांनी ती वीट खेचू लागली. तिथे वत्सलेलाही ती वीट दिसली होती. अनुष्ठानातच ती विचार करू लागली, "ही वीट... त्या कावेरीने खरंच काही लिहून इथे लपवलं की काय... वेताळा... मदत कर... त्या पोरीला थांबव..." इकडे आयुषीने ती वीट खेचून काढली. आत एक गुंडाळी केलेला मळका कागद होता. आयुषीने तो कागद बाहेर काढला तसा वारा वाहू लागला. बंद वाड्यात वारा कसा हा प्रश्नच आयुषीला पडला नाही, कारण ती वत्सला जवळपास असताना कधीही काहीही होऊ शकतं हे ती समजून गेली होती. तो वारा इतका सुसाट आणि वेडावाकडा होता की आयुषीला नीट उभंही राहणं शक्य होत नव्हतं. कागद घट्ट हातात धरून आयुषी कशीबशी रजतजवळ पोहोचली. आयुषी पुतळ्याच्या मागच्या बाजूला गेली. तिथे वारा नव्हता. आयुषीने कागदाकडे पाहिलं. कागदाला काही धागे गुंडाळले होते. आयुषीने त्या धाग्यांना हात लावला आणि म्हणाली, "हे तर केस आहेत... म्हणजे कावेरी..." आयुषीने लगबगीने केसांची गुंडाळी सोडवली. काळ्या अक्षरात लिहिलेला मजकूर समोर आला. दुसराच शब्द 'कावेरी' असल्याने तो मजकूर कावेरीनेच लिहिला आहे याची आयुषीला खात्री पटली आणि ती तो कागद वाचू लागली...

"मी कावेरी. ही वत्सला साधी नाही. ती एक हडळ आहे. जंगलात तिने मला तिच्या बोलण्याने फसवून या वाड्यात आणलं. इथे मला माझे आई-बाबा भेटले. पण ते आता माझे आई-बाबा नव्हते. या वत्सलेने त्यांना पुतळा केलं होतं. मला खूप भिती वाटत होती पण इथून बाहेर कसं पडायचं ते समजत नव्हतं. मग वत्सलेने मला एक आरसा शोधायला सांगितलं. हेही सांगितलं की तो आरसाच मला बाहेर जाण्याचा मार्ग दाखवेल. वरच्या मजल्यावरच्या तिसऱ्या खोलीत तो आरसा मला सापडला. तिथे एक विचित्र रिंगण होतं. त्या आरशात मला एक प्रतिबिंब दिसलं. त्याचा चेहेरा खूप भयानक होता. मी काही बोलणार इतक्यात ती वत्सला दारात आली. मी घाबरून मागे सरकले आणि नकळत रिंगणात शिरले. तिथून बाहेरच पडता येत नव्हतं मला. मग वत्सला म्हणाली मला बाहेर पडायचं असेल तर मला त्या रिंगणात बसावं लागेल. मी रिंगणात डोळे मिटून बसले. ती वत्सला काही-बाही मंत्र म्हणू लागली...

वत्सलेने म्हटलेले मंत्र मला ऐकू येत होतेच पण अजून एक आवाज कानी येत होता. तो आवाज वत्सलेच्या आवाजासारखाच होता पण शब्द वेगळे होते. जणू तो मंत्रच उलटा म्हटला जात होता. बराच वेळ हा मंत्रोच्चार सुरू होता. हळूहळू मला जाणवलं की येणाऱ्या आवाजांच्या दिशा बदलत आहेत. थोड्याच वेळात मंत्र बंद झाले. मी डोळे उघडले आणि समोर पाहिलं तर मला धक्काच बसला. माझंच शरीर मला दिसत होतं. मी स्वत:ला चाचपडलं तर माझ्या हातांवरच्या सुरकुत्या, काळे फाटलेले कपडे मला दिसले. मी गोंधळले. तेव्हा वत्सला म्हणाली की तिने मंत्राच्या मदतीने माझं शरीर घेऊन मला या शरीरात अडकवलं आहे आणि मी आता अशीच मरेन. इतकं बोलून वत्सला काळ्या धुरानिशी नाहीशी झाली. मी कशीबशी स्वत:ला सावरत उभी राहिले. तेव्हा मी माझं नाव ऐकलं. मी आवाजाच्या दिशेने पाहिलं. आरशातलं प्रतिबिंब माझ्याशी बोलत होतं...

"कावेरी... वत्सलेने परकाया प्रवेशाची क्रिया संपन्न केली आहे. तुझी आता या शरीरातून सुटकाही नाही होणार आणि तू बोलूही शकणार नाहीस. कारण तुझ्या शरीरासोबत तुझी वाचाही गेली आहे. आता मी काय सांगते ते नीट ऐक... मी त्या वत्सलेचं प्रतिबिंब आहे. ती जे करते, त्याच्या उलट घडतं माझ्याकडून. ती म्हणत असलेले मंत्र उलटे म्हणून परकाया प्रवेशाची क्रिया अपूर्ण ठेवण्याचा मी प्रयत्न केला. पण त्या वत्सले इतकं सामर्थ्य माझ्यात नाही. तिला संपवण्याचे दोनच उपाय आहेत. एक आहे तिचीच विद्या आणि दुसरा उपाय म्हणजे हा आरसा. वत्सला तिची विद्या तिच्याविरुद्ध नाही वापरणार. आता राहिला हा आरसा. हा आरसा एकाच घावात तुटला तर मीही नष्ट होईन आणि माझ्यासोबत ती वत्सलाही कायमची संपेल. काहीतरी असं शोध ज्याने एकाच घावात हा आरसा निखळून पडेल. पण लक्षात ठेव, हा आरसा तुला दुसरा वार करू देणार नाही. जे करणार असशील ते लवकर कर. तुझ्याजवळ फार थोडा अवधी आहे..." मी प्रतिबिंबाचं बोलणं ऐकलं आणि आजूबाजूला शोध घेऊ लागले...

एका कोनाड्यात मला एक तुटलेली फुलदाणी सापडली. आपल्या थरथरत्या हातांनी मी ती फुलदाणी उचलण्याचा प्रयत्न केला. पण त्या वृद्ध कांतीत ताकद नव्हती. मी खाली कोसळले. वत्सलेचं प्रतिबिंब पुन्हा बोलू लागलं, "कावेरी. हे शरीर ज्यात तू अडकली आहेस, तेच तुला साथ देत नाहीये. मी याहून जास्त तुझी मदत करू शकत नाही. पण तुझी कोणालातरी मदत होऊ शकेल. तुझ्यानंतर अजून कोणी स्त्री या वत्सलेच्या काळ्या विद्येला बळी पडू नये असं तुला वाटत असेल तर तुझ्यासोबत जे घडलं ते लिहून ठेव... कावेरी, मी पुन्हा सांगते, तुझ्याकडे अवधी फार कमी आहे. तुझं शरीर धारण केलेली ती वत्सला गावाला जाऊन मिळाली आहे. तिने गावकऱ्यांना तुझ्याविरुद्ध भडकवलं आहे. सारा गाव इथेच येत आहे. लिही कावेरी लिही..." मला त्या प्रतिबिंबाचं म्हणणं पटलं. मी सगळीकडे शोध घेऊ लागले. मी शोध घेत घेत कशी-बशी खाली आले. मला तिथल्या एका पुतळ्याच्या जवळ काही कागद आणि कोळशाचे काही तुकडे सापडले. मी त्याच कागदांवर हे सगळं लिहीत आहे. ती वत्सला हडळ आहे. तिला संपवायचं असेल तर वरच्या मजल्यावरच्या तिसऱ्या खोलीत ठेवलेला तो आरसा एकाच घावानिशी तोडावा..."

आयुषी जेव्हा कावेरीचे ते कागद वाचत होती तेव्हा दुसरीकडे अनुष्ठानाला बसलेल्या वत्सलेच्या चेहेऱ्यावरचे भाव बदलत होते. वत्सला मनोमन म्हणू लागली, "वेताळा... काय झालं हे... त्या कावेरीने माझं गुपित लिहून ठेवलं आणि ते या पोरीने वाचलं... परकाया प्रवेशाची क्रिया सक्रीय व्हायला आता थोडाच अवधी आहे, तोवर तिला त्या खोलीपर्यंत पोहोचू देऊ नकोस वेताळा... मदत कर वेताळा, मदत कर..." तिथे आयुषीने कागद उलट-सुलट करून पाहिले आणि विचार करू लागली, "यापुढे तर काहीच लिहिलेलं नाही... मग हे कागद भिंतीतल्या त्या खोबणीत कसे गेले... वत्सलेला इतकी वर्ष ते कसे नाही मिळाले..." विचार करताना आयुषीने खाली पाहिलं तर तिला काळे-पांढरे केस पडलेले दिसले. "हे कावेरीचे केस, तिने या कागदांना गुडाळले होते. हे कागद त्या भिंतीत लपवलेले होते. म्हणजे कावेरी त्या वेळी त्या क्षणी इथेच कुठेतरी असणार..." आयुषीने मनोमन काहीतरी विचार केला आणि कावेरीचे केस हातात पकडले. त्या सरशी पुन्हा सोसाट्याचा वारा वाहू लागला. तिथले पुतळे हलू लागले. त्या सगळ्याला न जुमानता केस हातात घट्ट पकडत, डोळे बंद करून आयुषी म्हणाली, "कावेरी... काय झालं होतं सांग मला... कावेरी... सांग मला..."

अचानक तो वाहणारा वारा थांबला आणि गोंगाट ऐकू आला. असं वाटत होतं अनेक माणसं काहीबाही बोलत आहेत. आयुषीने डोळे उघडले, तर समोरचं चित्रच पालटलं होतं. पुतळे वेगळे होते. खिडक्यांची तावदानं थोडी किलकिली होती आणि त्यातून बाहेरचं सगळं दिसत होतं. काळ जवळ जवळ नव्वद वर्षांनी मागे गेला होता...

आयुषीने खिडकीच्या आणि तावदानाच्या फटीतून समोर पाहिलं तर अनेक गावकरी हातात मशाली, लाठ्या, दगडं घेऊन उभे होते. तेवढ्यात आयुषीला बाजूला कसलीतरी चाहूल लागली. तिने बाजूला पाहिलं, तर शंभरीला टेकलेली एक जख्ख म्हातारी तिथे उभी होती. ही तीच म्हातारी होती जिचं प्रतिबिंब आरशात होतं. तिच्या हातात कागदाची गुंडाळी होती. म्हणजे ही म्हातारी, परकाया प्रवेशाच्या क्रियेला बळी पडलेली वत्सलेच्या जुन्या शरीरात अडकलेली कावेरी होती. लोकांना पाहताच तिच्या हातातले कागद गळून पडले. कावेरी हळू हळू चालत खिडकीजवळ पोहोचली. तिने खिडकीतून पाहिलं तर माणसांची झुंबड तिला दिसली. आयुषी तिच्या बाजूलाच उभी राहून सर्व पाहत होती. गावकऱ्यांना पाहून कावेरीच्या वृद्ध चेहेऱ्यावर स्मितरेषा उमटली. तिला बोलायचं होतं, पण शब्दच फुटत नव्हते. कावेरीने हताशपणे आयुषीकडे पाहिलं आणि पुन्हा खिडकीबाहेर पाहू लागली...

गर्दीच्या एका कोपऱ्यात उभी वत्सला तिला दिसली. कावेरीच्या मूळच्या शरीरात असलेली वत्सला वाड्याकडे पाहून स्मित करत होती. वत्सलेला पाहताच कावेरीच्या तळपायाची आग मस्तकात गेली. बाजूलाच वातीचा एक पेटता कंदिल होता. कावेरीने तो हातात घेतला पण शरीरात ताकद उरली नसल्याने कंदिल जमिनीवर पडून फुटला आणि आतून निखाऱ्याप्रमाणे जळणारे लालबुंद कोळशाचे तुकडे बाहेर पडले. दोन्हीही हातात मावतील इतके तुकडे घेऊन कावेरी दारात आली. आयुषी तिच्या सोबतच सर्व पाहत होती. दारात पोहोचल्यावर कावेरीने सर्व जळके कोळसे वत्सलेच्या दिशेने भिरकावले. पण ते सर्व ओसरीवरच पडले. त्याच वेळी समोरून काठ्या आणि दगडांचा मारा सुरू झाला. कावेरीला जखमा होत होत्या पण "अ....", "ब...", "आ...ह..." अशा अक्षरांशिवाय तिच्या मुखातून दुसरं काहीच येत नव्हतं. वेदनेने कावेरी कोसळली आणि तशीच फरफटत वाड्याच्या आत परत गेली...

बाहेरून गावकऱ्यांनी वाड्याला आग लावली होती. जमीनीवर पडलेली कावेरी कशीबशी आत आली होती. तिथे पडलेले कागद तिने उचलले पण तिला उभं राहता येत नव्हतं. तिथेच भिंतीत एक छोटी खोबणी होती. कावेरीने तिच्या थरथरत्या हाताने तिच्या डोक्यावरचे काही केस उपटले आणि त्या कागदांना गुंडाळू लागली. कागदाचा काही भाग फाटून जरा लांब गेला. कावेरी तो कागद घ्यायला गेली पण तो दारातून सरकत वाड्याबाहेर गेला. कावेरीने पुन्हा आयुषीकडे पाहिलं आणि उरलेले कागद आणि त्यांना गुंडाळलेले केस त्या खोबणीत ठेवले. कावेरीने आपले दोन्ही थरथरते हात त्या खोबणीसमोर जोडले आणि जखमांमधून वाहणारं रक्त त्या खोबणीवर लावलं. जेव्हा कावेरीने पुन्हा हात जोडले तेव्हा अचानक ती खोबणी भरली गेली आणि ते कागद भिंतीत दडून गेले. तोवर वाड्यातली आग सर्वत्र पसरली होती आणि कावेरीच्या पावलांपर्यंत ती आग आली. कावेरीने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला पण शारीरिक क्षमतेमुळे तिला हार पत्करावी लागली. आगीने कावेरीच्या पूर्ण शरीरावर ताबा मिळवला आणि आयुषीकडे पाहून उरली-सुरली ताकद एकवटून कावेरी जिवाच्या आकांताने किंचाळली...

कानठळ्या बसून आयुषीने कानावर हात ठेवले आणि डोळे घट्ट बंद केले. काही क्षणातच सर्व आवाज बंद झाले. आयुषीने डोळे उघडले आणि कानावरचे हात काढून सर्वत्र पाहू लागली. तिथे आगीचा लवलेश नव्हता. सगळीकडे सामसूम होतं. वेळ आत्ताच्या काळात परत आली होती. हातातल्या केसांकडे पाहून आयुषी म्हणाली, "कावेरी... किती यातना झाल्या असतील गं तुला... कशाचीही तमा न बाळगता तू हे कागद जतन करून ठेवलेस. ही तुझीच पुण्याई आहे, की त्या पापी वत्सलेला आजपर्यंत हे कागद मिळाले नाहीत. तुला त्यावेळी वाचवायला कोणीच नव्हतं. पण आज मी आहे. हे कागद वाचवण्याचा तुझा आटा-पिटा, तुझ्या वेदना, हे काहीच वाया जाऊ देणार नाही मी. शेवटच्या श्वासापर्यंत त्या वत्सलेला संपवण्याचा प्रयत्न करेन मी..." कागद आणि केस रजतच्या पुतळ्याच्या पायाशी ठेऊन आयुषीने रजतच्या छातीवर हात ठेवला आणि डोकंही टेकलं. मग वरच्या मजल्यावरच्या तिसऱ्या खोलीकडे पाहत आयुषी मोठ्याने म्हणाली, "वत्सला, तुझ्या अंताच्या दिशेने जातेय मी. हिम्मत असेल तर अडव मला..."

आयुषी जिन्याच्या दिशेने चालू लागली. त्यासरशी पुन्हा वारा वहायला सुरुवात झाली. आत्ताचा वारा अधिक जोरकस आणि वेडावाकडा होता. मध्ये मध्ये विजाही चमकत होत्या. एक विजेरी आयुषीच्या दिशेने येऊ लागली. आयुषीने ती विजेरी पाहिली आणि तिने मागच्या बाजूला उडी घेतली. विजेरीने जिन्यावर आघात केला आणि तीन पायऱ्या एकदम निखळल्या. तिथे एक भगदाड दिसू लागलं. आयुषी दोन पावलं मागे झाली आणि वेगाने जिन्याकडे धावली. भगदाडीच्या आधीच्या पायरीवरून आयुषीने उडी घेतली पण तिची झेप अपूरी पडली आणि तिचे फक्त हातच भगदाडाच्या पुढच्या पायरीपर्यंत पोहोचू शकले. तिचं बाकीचं शरीर त्या भगदाडीत फेकलं गेलं. आयुषीने खाली पाहिलं तर तळ नसलेली, विजा चमकणारी एक अथांग पोकळी तिला दिसली. एक अज्ञात शक्ती आयुषीचे पाय ओढत होती. आयुषीने सगळी ताकद एकवटून हातांवर जोर देत तिचं शरीर वर उचललं आणि भगदाडीच्या वरच्या बाजूला जाऊन उभी राहिली...

क्षणाचाही विलंब न करता आयुषी पलटली आणि झपझप पावलं टाकत तिसऱ्या खोलीपर्यंत पोहोचली. खोलीचं दार बंद होतं आणि आयुषी ते दार ढकलण्याचा प्रयत्न करू लागली. तिथे अनुष्ठानात बसलेल्या वत्सलेला हे समजलं आणि ती अस्वस्थ झाली. तिने झटक्यासरशी डोळे उघडले आणि वर पाहत म्हणाली, "वेताळा... आता काही क्षणच उरले होते ही क्रिया पूर्ण व्हायला. मी जर उठले तर ही क्रिया अपूर्ण राहील आणि मला दुसरा स्त्री देह शोधावा लागेल... तुझ्या असामान्य शक्तीसोबत देखील तू त्या सामान्य मुलीला थांबवू शकला नाहीस. आता मलाच तिचा बंदोबस्त करायला हवा..." इतकं म्हणून वत्सलेने हातात काळी माती घेतली आणि मंत्र म्हणून ती स्वत:वर शिंपडली. काळ्या धुराचं एक रिंगण वत्सलेभोवती तयार झालं आणि वत्सला त्या धुरासोबत अदृष्य झाली. तिथे आयुषीने अथक प्रयत्नानिशी तो दरवाजा उघडला. जसं ते दार उघडलं तसा तो वारा, ते वावटळ, त्या विजा, सगळं लुप्त झालं...

आयुषी खोलीत पोहोचली. एका कोपऱ्यात तो आरसा भिंतीला लावलेला होता. आरशात वत्सलेची छबी दिसत होती. मोठे मोठे लालभडक डोळे असलेली, काळी फाटकी वस्र परिधान केलेली ती छबी एखाद्या बिभत्स चेटकीणीप्रमाणे वाटत होती. आरशाकडे पाहत आयुषी मनात म्हणाली, "हाच कावेरीने म्हटलेला आरसा असावा. मला हा आरसा तोडायला हवा..." आयुषी आजूबाजूला शोधू लागली. जवळच एक तुटलेली झांज पडली होती. आयुषीने ती झांज उचलली आणि आरशाकडे भिरकावली. ती झांज आरशाला लागणार तोच तिची दिशा बदलली आणि ती आरशाच्या बाजूला भिंतीवर आदळली. खोलीचं दार अचानक बंद झालं. आयुषी ती झांज उचलायला जाणार तोच आरसा आणि तिच्या मध्ये वत्सला येऊन उभी राहिली...

झांजेकडून आयुषीकडे पाहत वत्सला म्हणाली, "माझा आरसा तोडून मला संपण्याचा प्रयत्न करतेस... हा...हा...हा... ते शक्य नाही... मूर्ख मुली, ही विद्या माझ्याशिवाय काहीच करत नाही. माझ्याकडे विद्या नाहीमीच आहे ही काळी विद्या... माझी साधना अपूर्ण ठेवलीस तू... परकाया प्रवेशाची क्रिया अर्धवट राहिली... हरकत नाही. माझा वेताळ पाठीशी आहे माझ्या. तो मला एक दिवस नक्कीच देईल. उद्या पुन्हा नवीन शरीर शोधेन मी. पण तुला सोडणार नाही. या घरात जेवढ्या बाहुल्या आणि कठपुतळ्या आहेत ना, त्या सर्वांवर माझाच प्रभाव आहे. जोवर मी मंत्र म्हणत नाही तोवर या सर्व बाहुल्या अशाच झांजा वाजवत राहतील... तुझ्या त्या जोडीदाराची अवस्था पाहिलीस ना... आता तुझीही हीच दशा करणार आहे मी... हा...हा...हा..." वत्सला विचित्र हसत आरशाच्यासमोर नाचू लागली. तिचा आवाज फारच भयानक होता. नाचता नाचताच वत्सलेने मंत्र म्हटला...

दुसऱ्याच क्षणाला वाड्यात जागोजागी असलेल्या बाहुल्यांच्या हातातल्या झांजा गायब झाल्या. त्यांच्या हातांना बांधलेले दोरखंड नाहीसे झाले. त्या बाहुल्यांमध्ये चेतना आली. सर्वजण आपापलं अंग चाचपडत असतानाच वाड्याचे दरवाजे उघडले गेले. सर्वजण दरवाजांकडे पळत सुटले. रजतनेही त्याचं अंग चाचपडलं. आपण माणसात आलो याचा त्याला आनंद झाला. रजतचं लक्ष त्याच्या पायांकडे गेलं. तिथे काही कागद आणि काही केस पडले होते. बघता बघता त्या दोन्ही गोष्टी हवेत विरून गेल्या. रजत विचार करू लागला, "सगळ्या बाहुल्या आणि कठपुतळ्यांमध्ये चेतना आली. सर्वांची सुटका झाली. मला आयुषीकडे जायला हवं. ती काळजीत असणार...” रजत दाराकडे वळलाच होता की त्याला जमिनीवर पडलेलं आयुषीच्या कानातलं सापडलं. “म्हणजे, मला शोधत आयुषी इथे आली की काय... आणि ते कागद आणि केस... त्या वत्सलेने आयुषीला तर काही..." हा विचार मनात येताच रजत घाबरला, आणि आयुषीला आवाज देत वाड्यात तिला शोधू लागला...

तिकडे वत्सलेच्या खोलीत तिने मंत्र म्हणताच आयुषीने आपले डोळे बंद करून घेतले. पण काहीच झालं नाही हे जाणवून तिने डोळे उघडले. समोर वत्सला पाठमोरी उभी होती. आरशावर नजर फिरवत ती जोरात किंचाळली. खाली रजतने किंकाळी ऐकली आणि भगदाडीवरून उडी घेत धावत वर आला. खोलीत आयुषी स्वत:ला चाचपडत असतानाच खोलीचं दार आपोआप उघडलं आणि रजत तिथे पोहोचला. रजतला पाहून आयुषी लगेच त्याच्या जवळ पोहोचली. त्याला चाचपडत म्हणाली, "रजत, तू ठीक आहेस ना..." तेवढ्यात, "ना....ही... हे शक्य ना...ही... मा...झी विद्या..." असा कर्कश आवाज ऐकू आला. दोघांनी समोर पाहिलं, तर वत्सलेच्या संपूर्ण शरीराभोवती काळं वलय तयार झालं होतं. दोघं लगेच दाराबाहेर पळत सुटली. बाकीचे सगळे आधीच बाहेर पडले होते. रजत आणि आयुषी गेटपर्यंत पोहोचले आणि त्यांनी मागे पाहिलं, तर वाड्याच्या सर्व दारं-खिडक्या आपोआप बंद झाल्या...

वाड्यात आता अंधार झाला होता. सर्वत्र स्मशान शांतता पसरली होती. खिडकीपाशी ठेवलेला ग्रामोफोन हवेत विरून गेला. तिथे खोलीत आरशासमोर उभी वत्सला निस्तेज आणि एखाद्या दगडासारखी दिसत होती. तिच्या दोन्हीही हातात झांजा आल्या आणि एका दोरखंडाने झांजा आणि तिचे हात बांधले गेले. मंत्र म्हणताना वत्सला आरशासमोर उभी होती. झालेल्या अतीव आनंदाच्या भरात वत्सलेने आरशातल्या स्वत:च्या प्रतिबिंबावरच मंत्राचा प्रयोग केला होता. तिची काळी विद्या तिच्यावरच उलटली होती. हातातल्या झांजा वाजवत वत्सला वाडाभर फिरू लागली. आरशातलं वत्सलेचं प्रतिबिंब, आता वत्सलेसाठी गाणं म्हणू लागलं, "बावरी कठपुतली डोरी..."

समाप्त.

@ अनिकेत परशुराम आपटे.

Monday, December 12, 2022

बोल री कठपुतली... (पहिला भाग)

सगळीकडे अंधाराचं साम्राज्य होतं. वादळ-वाऱ्यासह पावसाचं थैमान सुरू होतं. वाड्यात मात्र भयाण शांतता होती. आयुषी कशीबशी अंधारात पुढे जात होती. तिला समोर कोणीतरी उभं असलेलं दिसलं. जवळ जाऊन आयुषीने त्या व्यक्तीला खांद्याला धरून वळवलं. ती व्यक्ती वळली आणि त्याच वेळी अनेक विजा चमकल्या. त्या प्रकाशात, उभ्या असलेल्या व्यक्तीचा चेहेरा पाहून आयुषी अवाक झाली. तो रजत होता. रजतचे डोळे सताड उघडे होते. त्याचं संपूर्ण अंग एखाद्या दगडासारखं झालं होतं. रजतच्या हातात झांजा होत्या. वाड्यात कुठूनतरी, "बोल री कठपुतली डोरी..." हे गाणं ऐकू येऊ लागलं. त्याच बरोबर गूढ स्मित करत हातातल्या झांजा वाजवत रजत आयुषीच्या दिशेने सरकू लागला. आयुषी घाबरली आणि दोन्ही हातांनी डोळे बंद करून जिवाच्या आकांताने किंचाळली...

"आयू... ए आयू... अगं काय झालं... आयू..." आयुषीची आई तिला उठवत होती. आयुषीला जाग आली. तिने पाहिलं तर ती तिच्या बेडरूममध्ये होती. तिची आई बाजूला बसली होती आणि तिचे बाबा दारात उभे होते. आयुषी उठून बसली. तिला कुरवाळत तिची आई म्हणाली, "स्वप्न पाहिलंस का आयू..." आईकडे पाहत आयुषीने होकारार्थी मान हलवली. तिच्या आईने तिला जवळ घेतलं. दारात उभे आयुषीचे बाबा म्हणाले, "स्वप्नच पाहिलंस ना... भूल जाओ | रात गई बात गई..." बाबांना पाहून आयुषी धावतच त्यांच्या जवळ पोहोचत म्हणाली, "बाबा, तुम्ही कधी आलात... आणि ट्रिप कशी झाली तुमची..." आयुषीला जवळ घेत तिचे बाबा म्हणाले, "पहाटेच आलो, आणि ट्रिप एकदम सक्सेसफूल. क्लायंट जाम खुश आहे कंपनीवर. बरं ते जाऊ देत. तू तयार हो पाहू लवकर... होणारे जावई बापू येतीलच इतक्यात...

हे ऐकून आयुषीने आश्चर्याने दोघांकडे पाहिलं. आयुषीचे बाबा म्हणाले, "अगं तुझ्या आईने मला कधीच सांगितलं आहे. तू आणि रजत तुमच्या मित्राच्या लग्नाला जात आहात ना... जा जा. मी नाही अडवणार तुला. साखरपुडा झाला आहे तुझा. अब तो घूमने का लायसंस मिल गया है... पण बेटा..." बाबांच्या हातावर हात ठेऊन आयुषी म्हणाली, "बाबा, तुमच्या या 'पण'चा अर्थ समजला मला. मी असं काहीही होऊ देणार नाही ज्याने तुमची काळजी वाढेल..." बाबा हसले आणि घड्याळ पाहून त्यांनी आयुषीला घाई करण्याचा इशारा केला. आवरा-आवर करून आयुषी हॉलमध्ये आली तर रजत तिथे चहा घेत बसला होता. आयुषीला पाहून आपल्या गुडघ्यावर बसत तो म्हणाला, "ओ माय फेयर लेडी... आय, युअर हम्बल वुड बी हजबंड, अवेटिंग दाय स्माईल..." बाबा पुढे येत म्हणाले, "वाह रजत, एकदम शेक्सपियर..." रजतच्या बोलण्याने छोटासा हशा पिकला...

आयुषी पुढे होत म्हणाली, "चला चला महाशय, ट्रॅफिक लागला तर शेक्सपियरचा हिट्लर होऊन बसेल..." आयुषीच्या उत्तराने तर वातावरण अजून विनोदी झालं. सामान गाडीत ठेवल्यावर आई-बाबांना नमस्कार करून आयुषी गाडीत बसली. रजतही गाडीत बसणार इतक्यात त्याला काहीतरी वाटलं. आयुषीला इशारा करून तो मागे फिरला. आई-बाबांजवळ पोहोचत त्याने दोघांना नमस्कार केला. मग बाबांकडे वळत तो म्हणाला, "बाबा, तुमच्या चेहेऱ्यावरून तुमच्या मनातल्या धास्तीचा मला अंदाज आला आहे. आमचा साखरपुडा जरी झाला असला, तरी मी माझ्या मर्यादा जाणतो. काळजी करू नका..." रजतच्या बोलण्याने आयुषीच्या आई-बाबांना थोडा धीर आला. बाबांनी रजतच्या खांद्यावर हात ठेवत गाडीकडे इशारा केला. दोन्ही जोडप्यांनी एकमेकांना टाटा केलं आणि गाडी रवाना झाली...

गाडी आपल्या गतीने चालत होती. आयुषी खिडकीबाहेर पाहत होती. तिच्यासमोर टिचकी वाजवत रजत म्हणाला, "कहां हो सनम..." रजतकडे पाहत आयुषीने स्मित केलं. रस्त्यावर नजर स्थिर ठेवत रजत पुन्हा म्हणाला, "काय झालं आयू... मी घरापासून पाहतोय, तू गप्प गप्प आहेस... सांग तरी काय झालं..." "रजतला स्वप्नाबद्दल सांगू की नको..." हाच विचार आयुषीच्या मनात होता. शेवटी रजतकडे पाहत ती म्हणाली, "रजत अरे उठण्यापूर्वी मला एक भयानक स्वप्न पडलं. मी कुठल्यातरी अंधाऱ्या बंगल्यात फिरत होते. तेवढ्यात तू समोर आलास. पण तू तू नव्हतास... तुझ्या जागी तुझ्याचसारखा दिसणारा एक बाहुला होता. तुझ्या हातात झांजा होत्या आणि त्या वाजवत तू माझ्या दिशेने येत होतास... मी इतकी घाबरले..." आयुषीचं बोलणं संपल्यावर काही क्षण शांततेत गेले. मग आयुषीकडे पाहत रजत हसू लागला...

रजतला हसताना पाहून आयुषी कपाळावर आठ्या आणत म्हणाली, "तू हसतोस काय असा..." रजत तिला उत्तर देत म्हणाला, "अगं हसू नाहीतर काय करू... तू ज्या भुताखेतांच्या सीरियल आणि पिक्चर बघतेस ना रात्रीची, त्याचाच हा परिणाम आहे. आता या सीरियस गप्पा सोड आणि आपल्या विषयीसुद्धा बोल की काहीतरी... साखरपुडा तर झाला... लग्नाला तीनच महिने उरलेत. पण एका महत्वाच्या गोष्टीवर आपल्यात काही चर्चाच नाही झाली..." रजतचं बोलणं एकून आयुषीला प्रश्न पडला. रजत लगेच म्हणाला, "अगं आपला हनिमून... कुठे जायचं फिरायला... तुझी चॉईस..." हनिमूनचा विषय निघताच आयुषी गोड लाजली. त्यांच्यातला हा विषय वाढत गेला आणि गाडीने शहर सोडलं...

रजत आणि आयुषीमध्ये लग्नाचा विषय रंगत जात होता. गाडीही बराच वेळ चालत होती. एका ढाबावजा हॉटेलकडे रजतने गाडी वळवली. त्या हॉटेलची एकंदर जागा पाहून गाडीतच आयुषी म्हणाली, "रजत, इथे जेवायचं आपण..." गाडी थांबवत रजत म्हणाला, "आयू तू लुकवर नको जाऊस. संज्या म्हणाला होता की जेवण चांगलं असतं इथे. शिवाय बसून खाण्यासारखं चांगलं हॉटेल पुढे नाही ना..." हो नाही करतच रजत आणि आयुषी आत शिरले. जेवताना विषय बदलत बदलत रतनगढवर आला. आयुषीने विचारलं, "कधी पोहोचणार आपण रतनगढला... गाडीत बसून बसून उबग आलाय..." रजतने गल्ल्यावरच्या माणसाकडे पाहत रतनगढचं अंतर विचारलं. त्याने, "अजून चार-पाच तास लागतील..." असं सांगितलं. पण बोलताना त्याच्या चेहेऱ्यावर चिंता दिसत होती...

आयुषी वॉशरूमला गेली तेव्हा रजत त्या गल्ल्यावरच्या माणसाजवळ येत म्हणाला, "काय झालं दादा... रतनगढचं नाव ऐकून तुमच्या चेहेऱ्यावरचे भाव एकदम बदलले ते..." त्या माणसाने वॉशरूमकडे पाहिलं. आयुषी अजून बाहेर नव्हती आली. मग रजतकडे वळत तो माणूस म्हणाला, "साहेब, तुमच्यासोबत मॅडम आहेत म्हणून काही बोलत नव्हतो. पण आता तुम्हाला सांगतो. पुढे गेलात की तुम्हाला दोन रस्ते लागतील. एक रस्ता डावीकडनं जातो ज्याने रतनगढला पोहोचायला चार-पाच तास लागतील. आणि एक रस्ता सरळ जातो. त्याने रतनगढला लवकर पोहोचता येतं. पण तो रस्ता रतनगढच्या जंगलातून जातो. असं म्हणतात की ते जंगल आत आलेल्या व्यक्तीला बाहेर जाऊ देत नाही. खूप वर्षांपूर्वी ते जंगल फक्त रतनगढच्या घाटाच्या पायथ्यापर्यंतच होतं आणि बाकी सगळी वस्ती होती. त्या वस्तीच्या शेवटी आणि जंगलाच्या तोंडावर वत्सला नावाची एक बाई रहायची. तिला कठपुतळ्या म्हणजे दोरीला बांधलेल्या बाहुल्या खूप आवडायच्या...

गावातल्या लहान-मोठ्यांना कठपुतळ्याचे खेळ दाखवून पैसे कमावून ती गुजरण करायची. म्हातारपणामुळे तिचे खेळ कमी झाले, तिला मिळणारे पैसे कमी झाले. तिचे हाल होऊ लागले. "आपण इतके गुणी कलाकार, पण लोकांना आपली किंमतच नाही..." हा विचार करून तिने मनात राग धरला. वत्सलेचे पूर्वज तांत्रिक होते म्हणे. त्यांच्याकडून वत्सलेला अनेक काळ्या विद्या मिळाल्या होत्या. त्यांचा वापर करून म्हणे वत्सला लोकांना भुरळ पाडायची आणि त्यांना बाहुल्या बनवायची. गावातली बरीच माणसं अशीच गायब झाली होती. त्याच गावात कावेरी नावाची एक मुलगी राहत होती. ती आणि तिचे आई-वडील मागे-पुढे गायब झाले. कावेरीचे आई-वडील काही सापडले नाहीत. पण ज्या दिवशी कावेरी गायब झाली, त्याच्या पुढच्याच दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी कावेरी गावच्या वेशीजवळ सापडली. तिने सांगितलं, की वत्सला काळ्या जादूने माणसांचं बहुल्यात रुपांतर करते आणि त्याची शारीरिक ताकद स्वत: मिळवते. कावेरीने सांगितलेल्या गोष्टीवरून वत्सला काळी जादू करणारी एक हडळ आहे याची गावकऱ्यांना खात्री पटली...

सर्वांनी वत्सलेच्या घरावर धडक मारली. दोन्ही हातात जळका कोळसा घेऊन वत्सला दारात उभी होती. जख्ख म्हातारी असलेली वत्सला काहीच न बोलता गर्दीकडे पाहत होती. जमावाकडे पाहत असताना वत्सलेला कावेरी दिसली. रागाने वत्सलेचे डोळे लाल झाले. तिने दोन्ही हातातले जळके कोळसे कावेरीवर भिरकावले. वत्सलेच्या हातात ताकद नसल्याने ते कोळसे जवळच पडले. कावेरीपर्यंत ते पोहोचूच शकले नाहीत. कावेरी वाचली, पण जमावाने वत्सलेवर दगडफेक करायला सुरुवात केली. रक्तबंबाळ झालेली वत्सला जमिनीवर कोसळली तसं गावकऱ्यांनी दगडं मारायचं थांबवलं. वत्सला कशीबशी स्वत:च्या जख्मी शरीराला हाताच्या बळावर ओढत घराच्या आत गेली आणि दार लावून घेतलं. कावेरी म्हणाली, "ही बया हडळ आहे. गावात नकोच ही ब्याद. आपण जाळून टाकू हे घर..." गावकऱ्यांना कावेरीचं म्हणणं पटलं आणि सर्वांनी वत्सलेचं घर पेटवून दिलं. ज्वाळा भडकल्या आणि आतून आर्त किंकाळ्यांचा आवाज येऊ लागला. किंकाळ्यांची तीव्रता कमी होत गेली आणि थोड्या वेळात सर्व शांत झालं. गावकरी निघून गेले... 

गावकऱ्यांना वाटलं संपलं सगळं. पण तसं नव्हतं. तिथूनच वत्सलेच्या काळ्या जादूला खरी सुरुवात झाली. सर्वात आधी गावातून कावेरी गायब झाली. त्याच सुमारास "कठपुतली" नावाचा सिनेमा आला होता. रतनगढच्या एका मंत्र्यांच्या मुलाला त्यातलं “बोल री कठपुतली..” हे गाणं खूप आवडायचं. त्याच्याकडे असलेल्या ग्रामोफोनमध्ये तो हे गाणं सारखं लावायचा. असं ऐकलं होतं, की कावेरी पुन्हा गायब झाल्यावर काही दिवसांनी तो मंत्र्यांचा पोरगासुद्धा गायब झाला. त्यानंतर त्या जळक्या वाड्यातून हे गाणं ऐकू येऊ लागलं. ज्या ज्या वेळी वत्सलेच्या वाड्यातून हा आवाज यायचा, त्या त्या वेळी गावातली एखादी व्यक्ती गायब असायची. यामागे ती काळी जादू करणारी हडळ वत्सलाच आहे हे लोकांना कळलं. तिच्यापुढे आपला काहीच टिकाव लागणार नाही हे लक्षात येताच वस्ती कमी होऊ लागली. गाव ओसाड पडू लागलं आणि जंगल वाढत गेलं. वत्सलेच्या काळ्या जादूने जंगलावर पकड बसवली. म्हणून म्हणतो साहेब, जंगलाच्या वाटेने जाऊ नका. तिथे गेलेलं कोणीच परत आलं नाही आजवर..."

त्या माणसाचं बोलणं संपलं तसा रजत म्हणाला, "काय राव उगा बाता मारताय... असं कधी असतं का... नाही पण छान गोष्ट आहे. तुम्ही पुस्तक लिहा या गोष्टीवर..." तेवढ्यात आयुषी तिथे आली. दोघांना काऊंटरवर बोलताना पाहून ती संभ्रमात पडली. तिला पाहून विषय बदलत रजत म्हणाला, "किती वेळ आयू... मला वाटलं आज इथेच रहावं लागतंय की काय... बरं चल, आवर आता. मी गाडी काढतो. मॅनेजरदादांनी छान शॉर्टकट सांगितला मला..." इतकं म्हणून रजत बाहेर पडला. बॅग सरसावून आयुषी बाहेर पडू लागली तसा तो मॅनेजर म्हणाला, "मॅडम, मी साहेबांना शॉर्टकट सांगितला खरा, पण तिथून नका जाऊ. काय आहे, तुमच्यासाठी अनोळखी जागा आहे, जंगलातला रस्ता आहे आणि आता दोनेक तासात अंधार पडेल म्हणून म्हणतोय..." हे बोलणं ऐकून आयुषी म्हणाली, "मी सांगत होते रजतला, फ्लाईटने जाउया... पण माझं ऐकेल तर ना... मला पडलेलं कठपुतळीचं स्वप्न त्याला सांगूनही..." तेवढ्यात रजतने हॉर्न वाजवला. बोलणं अर्धवट सोडून आयुषी बाहेर पळाली. तो मॅनेजर स्वत:शीच पुटपुटला, "स्वप्न, कठपुतळी... म्हणजे वत्सला..." पाठमोऱ्या आयुषीकडे पाहत तो मॅनेजर ओरडला, पण तोवर गाडी निघून गेली होती...

गाडी बराच वेळ धावत होती. रजत आणि आयुषी दोघं शांत बसले होते. मॅनेजरने सांगितलेल्या गोष्टीचा विचार करत रजत रस्त्यावर नजर ठेऊन होता तर जंगलाचा विचार करत आयुषी खिडकीबाहेर पाहत होती. गाडी एका तिठ्ठ्यावर आली. गाडीच्या समोर दोन रस्ते दिसत होते. एक रस्ता उजवीकडे वळला होता आणि कच्चा व थोडा खडकाळ होता, तर दुसरा चांगला डांबरी होता आणि डावीकडे गेला होता. रजत व आयुषीने एकमेकांकडे पाहिलं आणि रजतने गाडी डाव्या रस्त्यावर घातली. गाडी थोडंच पुढे गेली होती, की सोसाट्याचा वारा सुरू झाला. अचानक वारा कसा काय, हा प्रश्न दोघांना पडतच होता, की काही अंतरावरचं एक झाड उनमळून गाडीच्या बरोब्बर समोर आणि रस्त्याच्या मधोमध पडलं. झाड पडताना पाहून रजतने कचकन ब्रेक मारला. कर्कश आवाज करत गाडी झाडापासून इंचभर आधी थांबली. दोघंही उतरून ते दृष्य पाहू लागले. झाड चांगलंच मोठं होतं, त्यामुळे ते हलवणं शक्य नव्हतं. झाडाच्या पुढचा रस्ता पूर्ण मोकळा होता. रस्त्याच्या डाव्या बाजूला नाला होता तर उजवीकडे शेतं होती...

रजतकडे पाहत आयुषी म्हणाली, "तरी मी तुला सांगत होते, फ्लाईटने जाउया... पण तुला रोमँटिक ड्राईव्ह हवी होती ना... आता काय करायचं... ना पुढे जाऊ शकत ना मागे... आणि अंधारही पडत चाललाय..." रजत विचार करत असतानाच शेताच्या बाजूला आणि रस्त्यापासून थोड्या अंतरावर त्याला एक कच्चा रस्ता दिसला. रजत आयुषीला म्हणाला, "आयू, आता झालं ते झालं. हा कच्चा रस्ता बघ या मुख्य रस्त्याला पॅरलल जातोय. बहुतेक मुख्य रस्त्याला मिळेल पुढे. जायचं का त्याने..." रस्त्याकडे पाहत आयुषी, "डू वी हॅव एनी अदर ऑप्शन..." असं म्हणत परत गाडीत जाऊन बसली. रजतही मागोमाग गाडीत आला. गाडी थोडी मागे घेत त्याने उजवीकडे वळवली आणि मुख्य रस्त्याच्या थोडं खाली असलेल्या कच्चा रस्त्यावर घातली. रस्ता कच्चा आणि शेतातला असल्याने गाडीचा वेग मंदावला होता. आयुषीने आजूबाजूचं वातावरण पाहिलं आणि रजतला म्हणाली, "रजत, आपण मेन रोडवर होतो तेव्हा तर झाड पडेल इतका वारा होता, आणि आता तर वाऱ्याचा काही जोरच नाही..." रजतलाही ही गोष्ट खटकली. त्याने बाहेर पाहिलं तर मुख्य रस्ता दृष्टीआड झाला होता आणि झाडी वाढत चालली होती...

स्टियरिंग घट्ट धरत नजर समोर ठेऊन रजत म्हणाला, "आयू, आपण तर जंगलाच्या दिशेने चाललोय. पण मी तर गाडी डाव्या बाजूला..." रजत पुढे बोलणार इतक्यात गाडीच्या समोरून काहीतरी गेलं आणि रजतने पुन्हा ब्रेक मारला. समोर बोट दाखवत आयुषी म्हणाली, "रजत, काय होतं ते..." आयुषीकडे वळत रजत म्हणाला, "आयू अगं जंगल आहे हे. एखादं जनावर गेलं असेल. मी आहे ना... वैसे, समा है सुहाना सुहाना..." रजत गाणं म्हणायला लागला तर त्याच्या खांद्यावर चापट मारत आयुषी म्हणाली, "काय रे रजत... अशा वेळीही तुला रोमँस सुचतोय... आधी बाहेर पडू इथून. रोमँससाठी पूर्ण आयुष्य पडलंय..." रजत हसला आणि त्याने किल्ली फिरवली. घरघर झाली पण गाडी सुरू झाली नाही. रजतने एक-दोन वेळा गाडी सुरू करण्याचा प्रयत्न केला. पण काही उपयोग झाला नाही. शेवटी तो गाडीच्या बाहेर आला. बॉनेटला हात लावताच त्याला चटका बसल्यासारखं झालं. त्याने बॉनेट उघडून आत डोकावलं. मग गाडीत येऊन बसत तो म्हणाला, "गरम झाली आहे गाडी. पाण्याची व्यवस्था करायला हवी..."

रजतने सभोवताली पाहिलं. अंधार वाढत चालला होता. आयुषी काही बोलणार तोच डॅशबोर्डमधून टॉर्च घेऊन, गाडीचं दार उघडून रजत बाहेर पडला आणि डिकीकडे वळला. डिकी उघडून कॅन घेऊन त्याने डिकी बंद केली आणि पुन्हा आयुषीजवळ आला. एकवार सगळीकडे नजर फिरवत रजत म्हणाला, "आयू, अंधार पडतोय. तू गाडीतच बस. आतून गाडी लॉक करून घे. मी कुठे पाणी मिळतंय का बघतो..." आयुषीसुद्धा येण्याचा हट्ट करू लागली. तेव्हा तिला समजावत रजत म्हणाला, "आयू अगं जंगल आहे. वाट हरवताना वेळ नाही लागत जंगलात. तसंच काही झालं, तर तू इथे असशीलच की मला गाईड करायला... शिवाय अंधार आहे. कुठे दगड-धोंड्यात अडकून तुला काही झालं तर..." रजतने अनेक मिनतवाऱ्या केल्यावर आयुषी गाडीत बसायला तयार झाली. रजत कॅन घेऊन चालू लागला. एका झुडुपाजवळ येऊन त्याने मागे पाहिलं. दोघांची नजरानजर झाली. दोघांनी एकमेकांना हात दाखवला आणि रजत झुडुपाआड निघून गेला...

रजत गेल्यावर आयुषीने काचा वरपर्यंत चढवून सर्व दरवाजे आतून लॉक केले. तिने बाहेर नजर फिरवली. सर्वत्त अंधार पसरला होता. गाडीत काय तो दिवा होता. एका क्षणासाठी आयुषीचा थरकाप उडाला. तिने गाडीतले लाईट बंद केले आणि मोबाईलवर गाणी सुरू केली. किशोर कुमारची जुनी गाणी वाजत होती आणि आयुषीने सीटवर डोकं टेकलं. गाणी ऐकताना तिला कधी झोप लागली हे तिचं तिलाही कळलं नाही. काही वेळाने झोपेतच आयुषीला एक बिभत्स चेहेरा दिसला. वेडेवाकडे बाहेर आलेले दात, मोठमोठे लाल डोळे, कापूस पिंजल्यासारखे पांढरेशुभ्र केस, असा तो सुरकुतलेला भयानक चेहेरा आयुषीला दिसला आणि ती दचकून जागी झाली. तिने गाडीतला लाईट लावला आणि सर्वत्र पाहिलं. तो चेहेरा कुठेच नव्हता पण अंधार अजून गडद झाला होता. तिने घड्याळ पाहिलं आणि विचार करू लागली, "रजतला जाऊन बराच वेळ झालाय. अजून कसा परत आला नाही हा... कॉल करू का त्याला..." आयुषीने लगेच रजतला कॉल लावला. बेल वाजत राहिली पण रजतने कॉल नाही घेतला. आयुषीने बरेच कॉल्स केले पण काही उपयोग झाला नाही. आता आयुषीला काळजी वाटू लागली. तिने मनाशी निर्धार केला आणि गाडीतून बाहेर पडली...


अंधार मी म्हणत होता. आयुषीने मोबाईलचा टॉर्च सुरू केला आणि वाटेतल्या दगडांना, खडकांना चुकवत ती पुढे जात होती. तिने वळून पाहिलं, पण अंधाराशिवाय दुसरं काहीच दिसत नव्हतं. आयुषी वळली आणि पुन्हा चालू लागली. वाटेत एका ठिकाणी तिला लाल ठिपका दिसला. तिने जवळ जाऊन पाहिलं, तर ते सिग्रेटचं अर्धवट जळलेलं थोटूक होतं. "म्हणजे मला गाडीत बसवून हा शहाणा इथे सिग्रेट ओढत होता तर... भेटू तर देत, चांगला इंगा दाखवते..." आयुषी स्वत:शीच पुटपुटत होती. थोडं पुढे गेल्यावर वातावरणातला बदल तिला जाणवला. आत्तापर्यंत वाहणारा मंद वारा अचानक स्तब्ध झाला होता. पानांची होत असलेली सळसळ बंद झाली होती. खाली लक्ष देत पुढे जात असतानाच एक कावळा "काव काव" करत आयुषीच्या डोक्याच्या इंचभर वरून निघून गेला. डोक्यावरून हात फिरवत आयुषी खाली बसली आणि जाणाऱ्या कावळ्याकडे पाहू लागली. कावळा ज्या दिशेने गेला तिथे एका इमारतीसारखं काहीतरी दिसत होतं. आयुषी उठली आणि तिने मोबाईल समोर धरला. त्या प्रकाशात ती इमारत बऱ्यापैकी दिसू लागली. तो एक जुनाट, काळकभिन्न वाडा होता...

"या जंगलात हा बंगला... हा तर जळून काळा पडलाय... कोणी राहत असेल का इथे... रजत इथे तर आला नसेल... जाऊन बघावं का..." आयुषीचं विचारचक्र सुरू झालं. ती हळूहळू बंगल्याच्या दिशेने जाऊ लागली. काटेरी कुंपण, लोखंडी गेट, गेटला लावलेलं कुलूप, सगळं जुन्या पद्धतीचं होतं. गेट उघडंच होतं. आयुषी आत गेली. तिथल्या हवेत एक विचित्र वास होता. मुख्य दरवाजा काही पावलांवरच होता. आयुषी पुढे जाणार तोच तिला तिच्या वडिलांचे शब्द आठवले, "कुठल्याही अनोळखी ठिकाणी जायच्या आधी त्या ठिकाणाची जमेल तितकी माहिती करून घ्यावी..." हे शब्द आठवले आणि आयुषी पुढे जायची थांबली. "बंगल्याला सगळ्या बाजूने निरखून मगच आत जावं..." हा विचार मनाशी पक्का करत आयुषी डावीकडे वळली. बंगल्याच्या भिंतीचा आधार घेत, जमिनीवरच्या दगडांपासून वाचत, मोबाईलच्या मंद प्रकाशात आयुषी पुढे जात होती. सगळं काही शांत होतं. एका आवाजाने शांततेचा भंग केला. ते एक हळुवार वाजणारं गाणं होतं, "बोल री कठपुतली डोरी कौन संग बाँधे..." 

अचानक आलेल्या या आवाजाने आयुषी दचकली. आधी तिला वाटलं रजतच मस्करी करत असेल. पण ऐकू येणारा आवाज जुनाट होता. जणू ग्रामोफोनमधून येत असावा. आयुषीला लक्षात आलं, की गाणं वाजवणारा रजत नाही. ती आवाजाच्या दिशेने वळलीच होती, की जमिनीवरच्या दगडांवरून घसरून तिचा तोल गेला आणि आयुषी खाली पडली. ती कशीबशी उठत असताना तिच्या हाताला कागदाचा एक तुकडा लागला. आयुषीने तो कागद उचलला आणि मोबाईलच्या प्रकाशात धरला. धूळ भरलेला तो कागदाचा तुकडा खूपच जुना होता. त्यावर अस्पष्ट अशी अक्षरं दिसत होती. आयुषीने धूळ हटवली तशी ती अक्षरं दिसू लागली, "मला भुरळ घालून वत्सला मला इथे घेऊन आली. मी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, पण तिच्या मायाजालामधून सुटू शकले नाही. मी एक एक खोली पाहू लागले. एका खोलीत एक विचित्र रिंगण होतं. रिंगणाच्या बाहेर विजलेल्या मेणबत्त्या उभ्या करून ठेवल्या होत्या. कुतुहल म्हणून मी रिंगणात प्रवेश केला, तेवढ्यात......"

तिथे तो कागद फाटलेला होता. आयुषी विचार करू लागली, "कोण वत्सला... कोण अडकलं तिच्या जाळ्यात... कसलं रिंगण..." विचार करत असतानाच आयुषीला एक दार दिसलं. तिने तो कागद पँटच्या खिशात घातला आणि दार चाचपडलं. ते दार उघडंच होतं. आतल्या बाजूला ढकललं गेलं. आत अंधार होता. दारातच खोळंबलेली आयुषी विचार करू लागली, "पुढचं मोठं दार उघडायला गेले तर कदाचित आवाज होईल. हे दार कसलाही आवाज न करता उघडलं. कदाचित रजत असेल आत..." विचार पक्का करत आयुषीने दारातून आत पाऊल ठेवलं. त्यासरशी वाऱ्याची एक थंडगार झुळूक तिच्या दंडाला चाटून दाराबाहेर निघून गेली. आयुषीच्या अंगावर काटा आला. तिने मोबाईल समोर धरला. त्या अंधूक प्रकाशात तिला काहीच स्पष्ट दिसत नव्हतं. एक प्रकारचा दुर्गंध पसरला होता. हा तोच वास होता जो आयुषीला बंगल्याच्या बाहेरही आला होता. आयुषीने नाकावर हात ठेवला आणि पुढे गेली. तिने एक पाऊल पुढे टाकलंच होतं, की तिच्या पायाला काहीतरी लागलं. तिने खाली पाहिलं तर तो रजतचा टॉर्च होता. "म्हणजे रजत इथे आलाय तर... मग गेला कुठे... आणि हा टॉर्च..." विचार करतच आयुषीने मोबाईल खिशात ठेऊन टॉर्च उचलून चालू केला. टॉर्च समोर धरताच आयुषी अवाक झाली...

रजत समोर उभा आयुषीकडे एक टक पाहत होता. पापण्याही न लवता उभ्या असलेल्या रजतकडे पाहून आयुषी त्याच्याकडे धावली. "रजत... रजत अरे कुठे होतास तू... किती नाही नाही ते विचार आले मनात... रजत... अरे बोल ना..." आयुषीच्या या बोलण्याचा रजतवर काहीच परिणाम दिसत नव्हता. निर्विकार चेहेऱ्याने तो आयुषीकडे पाहत होता. तेवढ्यात पुन्हा गाणं ऐकू येऊ लागलं, "बोल री कठपुतली डोरी कौन संग बाँधे..." रजतच्या चेहेऱ्यावर एक गूढ हास्यरेषा उमटली. त्याने हात पुढे केले. आयुषीला वाटलं तो तिला जवळ बोलवत आहे. आयुषी रजतजवळ जाणार इतक्यात तिचं लक्षं त्याच्या हातांकडे गेलं. रजतच्या दोन्ही हातात दोन मोठाल्या झांजा होत्या आणि साखळदंडांनी त्या हातांना बांधल्या होत्या. हे पाहून आयुषी अजून घाबरली. ती पुढे काही बोलणार इतक्यात रजतने त्याचे दोन्ही हात जवळ आणले. झांजा वाजल्या आणि मोठा आवाज आला. आयुषीने पटकन कानांवर हात ठेवले.  झांजा वाजत होत्या आणि ध्वनी वाढत होता. कानांवर हात ठेऊनच आयुषी खाली बसली. "तो आता तुझ्या जगातून बाहेर पडला आहे..."

या आवाजाने आयुषी भानावर आली. तिने डोळे उघडले. सभोवताली वातीच्या कंदिलांचा बऱ्यापैकी उजेड पसरला होता. गाणं बंद झालं होतं. रजतने झांजा वाजवणंही बंद केलं होतं. आयुषी उठून उभी राहिली. तिने सगळीकडे पाहिलं तर रजतप्रमाणे इतर अनेक माणसं हातात झांजा घेऊन तिथे विखुरलेली होती. "काय पाहतेस... या सगळ्या माझ्या कठपुतळ्या आहे..." सभोवतालच्या माणसांकडे पाहताना आलेल्या या आवाजाने आयुषी दचकली. तिने आवाजाच्या दिशेने पाहिलं, तर जिन्यावर एक आकृती होती. ती आकृती खाली येऊ लागली. प्रकाशात येताच त्या आकृतीला पाहून आयुषी अजून घाबरली. फाटके-मळके कपडे घातलेली ही तीच होती, जी आयुषीला झोपेत असताना गाडीत दिसली होती. थोडी मागे सरकत आयुषी कशी-बशी म्हणाली, "क...कोण आ...हेस तू... य....या बा...हुल्या..." बिभत्स हसत ती बाई कर्कश आवाजात बोलती झाली, "मी वत्सला... हा वाडा माझा आहे. आणि ही सगळी माझी खेळणी आहेत. मला लहानपणापासूनच बाहुल्यांचा छंद होता. लाकडाच्या नि कापडाच्या बाहुल्यांना दोऱ्या बांधून त्यांना माझ्या तालावर मी नाचवायचे. आई-वडिलांना माझा हा छंद आवडत नव्हता म्हणून त्यांचा त्याग करून मी इथे आले...

इथे हे वन नव्हतं, तर एक समृद्ध गाव होतं. गावाच्या एका कोनाड्यात मी एक झोपडी बांधली. तिथेच हा कठपुतळ्याचा खेळ दाखवून मी गुजरण चालवायचे. मला धन मिळत गेलं आणि त्या झोपडीच्या जागी हा वाडा उभा राहिला. लग्नाचा विचारही मी कधी केला नाही. या बाहुल्याच माझं जग होतं. पण माझ्या या ऐश्वर्याला दृष्ट लागली. जग बदलत होतं, मानवांच्या आवडी बदलत होत्या. माझ्या कठपुतळ्यांचे खेळ त्यांना आवडेनासे झाले. माझं महत्व कमी झालं, माझे हाल होऊ लागले. पण या मानवांना काहीच वाटलं नाही त्याचं. मग मी ठरवलं, मला दूर लोटणाऱ्या या मानवजातीलाच कठपुतळ्या बनवायचं, आणि मी माझ्या विद्येचा प्रयोग सुरू केला. हो. मला काळी विद्या अवगत आहे. मी कुठल्याही सजीव किंवा निर्जीव गोष्टीवर मंत्रप्रयोग करून त्या गोष्टीला माझ्या आधीन करू शकते. वाड्याच्या आस-पासच्या लोकांना वश करून वाड्यात आणून मी मंत्र म्हणायचे. त्या लोकांचा मानवी देह मग लाकडात परिवर्तीत व्हायचा आणि त्यांच्या हातात झांजा यायच्या...



मला याच गोष्टीत आनंद मिळू लागला. हळू हळू गाव ओसाड पडू लागलं. मला मिळणारी माणसं कमी होऊ लागली. जंगल वाढू लागलं. नवं खेळणं मिळवण्यासाठी मी दुसऱ्या गावी जाणार होते, पण मला या जंगलाची सीमा ओलांडता आली नाही. मी माझ्या विद्येने याचं कारण जाणलं तेव्हा समजलं, की या विद्येचा पहिला प्रयोग मी ज्या ठिकाणी केला असेल, तेच ठिकाण माझ्या विद्येची सीमा असेल. गावाबाहेरच्या वनात मी या विद्येने पहिलं सावज हेरलं होतं. म्हणून मी या जंगलातच अडकले. त्या वेळी एक माणूस एक यंत्र घेऊन याच जंगलात गाणी ऐकत होता. मला नवं खेळणं मिळालं. मी त्या माणसाला माझ्या विद्येने भुरळ घालून वाड्यावर बोलवलं. या यंत्रात वाजणारं, "बोल री कठपुतली..." हे गाणं मला फार आवडलं. त्या माणसाची कठपुतळी केल्यावर मी या यंत्रावरही प्रयोग केला. आता हे यंत्रच माझ्यासाठी सावज शोधून आणतं. ते गाणं ऐकताच मनुष्य चुंबकासारखा वाड्याकडे खेचत येतो आणि माझं खेळणं बनतो. तुझा हा मित्र वाड्यावर आला तेव्हा मी मंत्र म्हणण्यात दंग होते. तो आत आल्याचं मला कळलंही नाही. त्याच्या जवळ असलेलं एक यंत्र आवाज करू लागलं तेव्हा मला समजलं...

आयुषीने विचार केला, "म्हणजे मी जेव्हा रजतला कॉल केलं तेव्हा तो इथे होता तर... आणि माझ्या कॉलमुळेच हिचं लक्ष... सॉरी रजत..." आयुषीचे विचार भंगले ते वत्सलेच्या बोलण्याने, "तो आवाज ऐकला आणि मी इथे आले. हा तुझा साथिदार आयताच माझ्या तावडीत सापडला. आता हा तुझा साथिदार नाही. आता हे माझं खेळणं आहे. या सगळ्या खेळण्यांप्रमाणे. ते गाणं वाजलं ना, की हा तुझा मित्र हसतो आणि झांजा वाजवू लागतो. पण तू घाबरू नकोस. तुला मी खेळणं बनवणार नाही. तू तर माझा तिसरा पुनर्जन्म आहेस..." आयुषीला हे वाक्य समजलं नाही. ती कशीबशी म्हणाली, "तिस...रा पुनर्जन्म... म्ह....णजे..." आयुषीचं हे वाक्य ऐकून वत्सला किळसवाणी हसत म्हणाली, "हा...हा...हा... मी आत्ता दिसते ते तर हे शरीर आहे. माझं वय त्याहून अधिक आहे. मी जेव्हा ही काळी विद्या ग्रहण केली तेव्हा परकाया प्रवेश करण्याचीही विद्या मला प्राप्त झाली. पण तो मंत्र मी आयुष्यात एकदाच वापरू शकणार होते. काळी विद्या, कठपुतळ्यांचे खेळ यांसोबत मी मोठी झाले. अनेक वर्षांपूर्वी मी शंभरी गाठली. माझ्या शरीराची मर्यादा तेवढीच असल्याने मला तो देह सोडावा लागणार होता. दुसऱ्या शरीराच्या शोधात असतानाच जंगलात बागडणारी कावेरी माझ्या दृष्टीस पडली..."

वत्सला बोलत असतानाच तिने एका ठिकाणी पाहिलं. आयुषीने वत्सला पाहत असलेल्या दिशेला पाहिलं. अचानक प्रखर प्रकाशाने तिचे डोळे दिपले. आयुषीने लगेच डोळ्यांवर हात ठेवला. हळूहळू प्रकाश कमी झाला तसे आयुषीने डोळे उघडले. वाड्याच्या भिंती गायब होऊन समोर घनदाट जंगल दिसू लागलं. भूतकाळातली ती घटना आयुषीसमोर प्रत्यक्ष उभी राहिली...

घनदाट जंगलात कावेरी बागडत होती. फुलांचा सुगंध घेत, फळांचा आस्वाद घेत, झाडांच्या फांद्यांना लोंकळत कावेरी स्वत:चा जीव रमवत होती. कावेरीचे हे खेळ सुरू असताना एका वृक्षामागून वत्सला तिला पाहत होती. वत्सलेच्या पाश्वी डोळ्यात एक क्रूर आनंद दिसत होता. वत्सला विचार करू लागली, "चुणचुणीत दिसते ही मुलगी. हा देह बदलायची वेळ जवळ येते काय आणि ही मुलगी मला दिसते काय... वाह वेताळा, तूच आहेस रे सोबतीला... या मुलीला कसंही वाड्यात न्यायला हवं..." विचार करता करता वत्सलेला एक युक्ती सुचली. कावेरीची पाठ दिसताच वत्सला झाडामागून बाहेर आली आणि कावेरीच्या दिशेने चालू लागली. कावेरीने वळून पाहताच वत्सला जमिनीवर कोसळली आणि त्याच अवस्थेत रडू लागली, "आई आई गं... माझं मेलीचं नशीबच फुटकं... या वयात आता हा पाय पण मुरगळला... आता कशी जाऊ मी परत..." पडलेल्या बाईचं विव्हळणं पाहून कावेरी धावत तिच्याजवळ गेली. जमिनीवर बसत ती म्हणाली, "आजी, तुला लागलं का... मी मदत करू का..." वत्सलेच्या डोळ्यात एक चमक आली. तिने विचारलं, "काय नाव तुझं मुली... आणि इथे या वनात काय करतेस..." वत्सलेला आधार देऊन उठवताना कावेरी म्हणाली, "मी कावेरी. माझे आई आणि बाबा जंगलात लाकडं तोडून त्याच्या मोळ्या विकत. रोज ते दोघंच यायचे पण महिन्याभरापूर्वी ते दोघं अचानक गायब झाले. म्हणून आज मी आले... पण तुम्ही कोण..."

कावेरीच्या खांद्याचा आधार घेत वत्सला म्हणाली, "माझं नाव वत्सला. इथून जवळच असलेल्या वाड्यात राहते. काढा करावा म्हणून वनस्पती गोळा करायला आले तर पाय घसरून पडले..." कावेरीने वत्सलेला आधार दिला आणि दोघी वाड्याच्या दिशेने चालू लागल्या. थोड्याच वेळात दोघी वाड्यावर पोहोचल्या. आत आल्या-आल्याच वत्सलेने कावेरीच्या खांद्यावरचा हात काढला आणि, "बाळ कावेरी, मी जरा आलेच बरं का..." असं म्हणून वत्सला आतल्या खोलीत निघून गेली. खोलीच्या दाराआडून वत्सलेने कावेरीला पाहिलं. कावेरी तिथेच घुटमळत होती. वत्सलेच्या चेहेऱ्यावर एक गूढ हसू आलं. दाराआडूनच कावेरीला पाहताना वत्सला विचार करू लागली, "हिला वरच्या खोलीत नेण्याचा काहीतरी उपाय करायला हवा. ही स्वइच्छेने त्या रिंगणात गेली तरच माझी विद्या फळाला येईल..." विचार करत असताना वत्सलेने पाहिलं, तर कावेरी दोन कठपुतळ्यांना आई-बाबा म्हणत होती. दाराआडून बाहेर येत वत्सला म्हणाली, "ते तुझे आई-बाबा नाहीत हो... आता ती माझी खेळणी आहेत... बघायचं आहे तुला..." बोलता बोलता वत्सलेने तिच्या कमरेला लटकवलेल्या बटव्यातून काळी माती काढली. मंत्र म्हणून तिने ती माती तिथल्या पुतळ्यांवर टाकली. पुतळ्यांचे डोळे अधिक विस्फारले. त्यांच्या चेहेऱ्यावरचं हसू अधिक मोठं झालं. त्या पुतळ्यांनी हात पुढे केले. त्यांच्या हातात मोठमोठ्या झांजा होत्या आणि हात साखळदंडांनी जखडलेले होते...

वत्सलेने पुन्हा मंत्र म्हटला आणि तिथल्या सर्व बाहुल्या त्यांच्या हातातल्या झांजा वाजवू लागल्या. कानठळ्या बसणारा तो आवाज ऐकून कावेरीने कानावर हात ठेवले आणि डोळे घट्ट बंद करून घेतले. वत्सलेच्या डोळ्यात एक विकृत चमक होती. तिने चेहेऱ्यावर हसू आणत पुन्हा मंत्र म्हटला. त्याबरोब्बर सर्व बाहुल्या स्तब्ध झाल्या. त्यांच्या चेहेऱ्यावरचं हसू कमी होऊन ते पुन्हा निर्विकार दिसू लागले. आवाज बंद होताच कावेरीने डोळे उघडून कानांवरचे हात काढले. तिने पाहिलं तर सर्व बाहुल्या त्यांच्या त्यांच्या जागी हात खाली करून उभ्या होत्या. कावेरी घाबरली आणि त्याच नजरेने वत्सलेकडे पाहू लागली. वत्सला म्हणाली, "ही सर्व माझी खेळणी. मला हवं त्यावेळी मी यांच्याशी खेळते. आणि बरं का, यांचा हा आवाज या वाड्याबाहेर नाही जात. म्हणून बाहेर कोणालाच काही कळत नाही. फक्त मी एकमेवच आहे जी या वाड्याच्या आत-बाहेर करू शकते. या बाहुल्यांमध्ये चेतना नसली तरी मानवी शरीराचे सर्व गुणधर्म आहेत. म्हणून या बाहुल्या आपोआप वृद्ध होऊन भस्मसात होतात. मग मी नवी खेळणी आणते. तुझे आई-वडिल पण असेच आले इथे. आणि आता तू..."

हे ऐकून कावेरी अजून घाबरली आणि दोन पावलं मागे सरकली. तिला पाहून वत्सला अजून खुश झाली. थोडी पुढे सरकत ती म्हणाली, "कावेरी, तू घाबरू नकोस... मी तुला काहीच करणार नाही. तू तर माझा दुसरा पुनर्जन्म......." बोलता बोलता वत्सला थबकली आणि म्हणाली, "तू तर मला सोबत केलीस. त्या वनातून इथे यायला मदत केलीस... त्याबद्दल मी तुला काही करणार नाही. या वाड्यातून बाहेर पडण्याचा मार्ग याच वाड्यात आहे. मी आता मंत्र म्हणायला बसणार आहे. त्या आधी तू तो मार्ग शोधलास तरच तू मुक्त होशील. नाही तर... हा...हा...हा..." बिभत्स हसणारी वत्सला काळ्या धुरासह गायब झाली. वत्सला तिच्या खोलीत त्याच धुरासह प्रकट झाली. तिने एकवार दाराआडून बाहेर पाहिलं, तर कावेरी वाडाभर नजर फिरवत हळू-हळू पुढे जात होती. तिला पाहून वत्सला कुत्सित हसली आणि अनुष्ठानाच्या जागी जाऊन बसली. "काय सांगत होते मी त्या पोरीला... तिला इथे आणण्याचं खरं कारण तिला समजलं असतं तर... माझ्या वेळीच लक्षात आलं म्हणून बरं... आता या पोरीचा त्या खोलीत जाण्याचा अवकाश... ती स्वत:हून त्या रिंगणात गेली की..." असं स्वत:शीच पुटपुटून वत्सला गूढ हसली आणि हातात काळी माती घेऊन डोळे मिटून तिने मंत्र म्हणायला सुरुवात केली...

दुसरा व अंतिम भाग लवकरच...