Saturday, September 30, 2023

नकोसा विक्रम...

कसोटी क्रिकेटमध्ये अनेक ऐतिहासिक सामने झाले. इंग्लंडविरुद्ध लाराने केलेल्या ४०० धावा असो किंवा पाकिस्तानविरुद्ध कुंबळेने घेतलेले दहा बळी असो. कुठल्या ऐतिहासिक सामन्यात विक्रम होतेच. या सामन्यांमध्ये एक सामना असा होता, जो एका नको असलेल्या विक्रमासाठी लक्षात राहिला. तो सामना होता, १९९६-९७च्या हंगामातला ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडीज...

फ्रँक वॉरेल ट्रोफी. ऍशेस मालिकेसारखीच प्रतिष्ठा असलेल्या फ्रँक वॉरेल ट्रोफीसाठी चुरस असायची ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीज संघांमध्ये. बराच काळ सलग या ट्रोफीवर वेस्ट इंडीजने वर्चस्व गाजवलं. पण १९९६-९७चा ऑस्ट्रेलिया दौरा, वेस्ट इंडीज कधीच विसरणार नाही. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतले पहिले दोन सामने सहज जिंकून कांगारूंनी वेस्ट इंडीजला बॅकफूटवर ढकललं होतं. कर्टली एँब्रोजच्या भेदक माऱ्याच्या जोरावर तिसरी कसोटी जिंकून वेस्ट इंडीजने मालिका रंगतदार अवस्थेत आणली. चौथी कसोटी जिंकून मालिकेत बरोबरी करावी या विचारात संघ असतानाच कर्टली एँब्रोज दुखापतीने जायबंदी झाला...

वेस्ट इंडीज गोलंदाजीचा हुकमी एक्का एँब्रोज मैदानात नाही याचा फायदा कांगारूंनी उचलला आणि चौथा कसोटी सामना डावाने जिंकून मालिकेत विजयी आघाडी घेतली. एँब्रोज मात्र हताशपणे पॅव्हेलियनमधून हे सगळं पाहत होता. एकेकाळी क्रिकेट जगतावर अधिराज्य गाजवणाऱ्या वेस्ट इंडीजवर पत राखण्यासाठी झगडण्याची वेळ आली होती. एँब्रोजने फिटनेस टेस्ट पास केली आणि पाचव्या व शेवटच्या कसोटीसाठी तो मैदानात उतरला. पहिल्या डावात कॉटनी वॉल्शला उष्णतेचा तडाखा बसला आणि त्याने मैदान सोडलं. एँब्रोज आणि बिशपने मात्र अचूक मारा करत कांगारूंना २४३ धावात गारद केलं. त्याला उत्तर देताना लाराच्या शतकाच्या जोरावर वेस्ट इंडीजने १४१ धावांची आघाडी मिळवली...

ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव सुरू झाला. वॉल्श-एँब्रोज जोडीने सुरुवातीपासूनच बळी मिळवत कांगारू फलंदाजीला खिंडार पाडलं. पण काही काळानंतर चौथ्या कसोटी आधी एँब्रोजला झालेल्या दुखापतीने पुन्हा डोकं वर काढलं. त्या दुखण्याने एँब्रोजची एकाग्रता भंग झाली आणि त्याच्या पावलांशी त्याचा ताळमेळ बिघडला. त्यानंतरची एँब्रोजची दोन ओव्हर्स एँब्रोज कधीच विसरणार नाही. सलग नो बॉल आणि वाईड बॉल टाकत एँब्रोजने पहिल्या ओव्हरमध्ये १२ तर नंतरच्या षटकात ६ जास्त बॉल घेतले. १५ चेंडूंची मोठी ओव्हर टाकण्याचा नकोसा विक्रम एँब्रोजच्या खात्यात आला. आपल्या जोडीदाराची अवस्था पाहून कर्णधार वॉल्शने एँब्रोजला पॅव्हेलियनला पाठवलं. मग वॉल्श आणि बिशपने मॅरेथोन ओव्हर्स टाकत राहिलेली कांगारू फलंदाजी गुंडाळून, विजय समोर आणून ठेवला. कॅरेबियन फलंदाजांनी ५४ धावांचं माफक आव्हान सहज पार करत तो सामना दहा गडी राखून जिंकला...

ऑस्ट्रेलियाने ३-२ अशी मालिका जिंकली. पर्थला खेळलेला तो सामना एँब्रोजचा ऑस्ट्रेलियामधला शेवटचा कसोटी सामना ठरला. एँब्रोजने काही काळाने कसोटी क्रिकेटला अलविदा केलं. मॅकग्राथ-गिल्लेस्पी, वसिम-वकारसारखे भेदक असणारी एँब्रोज-वॉल्श ही जोडी फुटली आणि तिथून वेस्ट इंडियन कसोटी क्रिकेटची उतरती कळा समोर आली. २००० पासून आजपर्यंत वेस्ट इंडीज कसोटी सघाला ऑस्ट्रेलियासमोर पराजयाचीच चव चाखावी लागली आणि एक नको असलेला विक्रम उराशी बाळगत एँब्रोजने तो लाल चेंडू हातावेगळा केला...

@ अनिकेत परशुराम आपटे.

Friday, September 15, 2023

युद्ध - दुसरा भाग...

पहिल्या भागात...

दुष्ट राजा दुष्कीर्ती सगळीकडे हाहाकार माजवत असतो. तेव्हा तीन दैवी मानव त्याच्या समोर प्रकट होतात. हजारो वर्ष उलटतात. एका रात्री जंगली लांडग्यांपासून स्वत:ला वाचवत देवयानी पळत असते. त्यावेळी समर आणि सोहम हे दोन भाऊ तिचं रक्षण करतात. देवयानी त्या दोघांना दुष्कीर्ती आणि त्या तीन दैवी मानवांच्या युद्धाची हकीगत सांगते आणि म्हणते की ती स्वत: प्रकाशाच्या मंदिराची देवता आहे. सोहमचा या गोष्टीवर विश्वास बसत नाही. रात्र तंबूत घालवावी आणि सकाळी प्रवास करावा म्हणून सगळे जाऊ लागतात. इतक्यात सोहमला एक काळी वस्तु दिसते. त्या वस्तूला पाहताच देवयानी धोक्याचा इशारा देते...
सोहम त्या वस्तूला स्पर्श करतो आणि त्याच वस्तूमध्ये खेचला जातो. देवयानी समरला सांगते की ही वस्तू म्हणजे त्या दैवी तलवारीचा एक भाग आहे. समरचा विश्वास बसतो. देवयानी आणि समर समुद्र तटावर पोहोचतात. तिथे सागरी तटासारखं काहीच नाही ह पाहून समरला नवल वाटतं. देवयानीला एक गुहा दिसते. दोघं त्या गुहेत प्रवेश करतात. गुहेच्या अंताला एका दगडी शिळेवर एक मूर्ती उभी असते. त्या मूर्तीला देवयानीचा स्पर्श होताच ती भंग पावते आणि ऋषी आदित्यनाथ समोर येतात. आदित्यनाथ सांगतात की त एकेकाळचे राजा होते आणि युद्धात सर्व कूळ गमावल्यावर त्यांना पश्चात्ताप झाला आणि ते इथे तपश्चर्या करायला आले...
श्री विष्णूने त्यांची परीक्षा घेतली ज्यात ते असफल ठरले. श्री विष्णूने त्यांना शाप देत या शिळेत परिवर्तीत केलं. आज देवयानीच्या स्पर्शाने त्यांची शापातून मुक्ती झाली. इतकं बोलून ऋषी आदित्यनाथ भेट म्हणून समरला एक उडणारं जहाज देतात. दुसरा तुकडा मिळवण्यासाठी समर आणि देवयानी त्याच जहाजावर स्वार होतात. एका सागरी दानवाशी लढताना त्यांना सागरी चाचा संग्रामसिंहची मुलगी वीरा भेटते. दानवाला हरवल्यावर तिघं बोलत असताना देवयानीला जाणवतं की दुसरा तुकडा पाण्यात आहे. समर लगेच पाण्यात उडी घेतो. तिथे एक आकाराने मोठा होत असलेला मासा समरची वाट अडवतो...


दुसरा भाग...

तिथे जहाजावर देवयानी आणि वीरा समरच्या कुशलतेची चिंता करत होत्या. दोघी सारख्या पाण्यात डोकावून पाहत होत्या. तिथे पाण्यात, समोर आलेल्या संकटाचा सामना कसा करावा या दुविधेत असलेल्या समरला बाजूलाच पडलेली एक चमकदार वस्तू दिसली. त्याने नीट पाहिलं, तर तो रेतीमध्ये गढलेला एक भला मोठा खंजीर होता. त्या माशाने समरला गळंकृत केलंच असतं, पण समरने चपळाईने तो खंजीर मिळवत, एका बाजूला हटत, तो खंजीर त्या माशाच्या पोटात खुपसला. जखम होताच माशाच्या डोळ्यातली लालसर झाक कमी झाली आणि मासा गतप्राण झाला. माशाच्या अवती-भोवती असलेला काळा धूरही नाहीसा झाला होता. समर माशाजवळ गेला आणि त्याच्या पोटात खुपसलेला खंजीर काढून समरने स्वत:जवळ ठेवला. तिथून जवळच समोरच्या दिशेने लाल प्रकाश येत होता. समर तिथे पोहोचला. तो त्या दैवी तलवारीचा दुसरा तुकडा होता. देवयानीकडून घेतलेल्या रेशमी कापडाने समरने तो तुकडा उचलला आणि क्षणाचाही विलंब न करता तो पाण्याच्या पृष्ठभागाकडे जाऊ लागला...

वर पोहोचून जहाजात चढताना समरने देवयानी आणि वीराच्या नजरांकडे पाहिलं. त्या नजरेत आशा आणि काळजी दोन्ही दिसत होते. अंगरख्यात ठेवलेलं रेशमी कापड बाहेर काढत समर म्हणाला, “हा आहे त्या तलवारीचा दुसरा भाग... वीरा, तुझ्या वडिलांचा काहीच ठाव नाही लागला...” समर बोलतच होता, की त्याच्या कमरेला लटकलेला खंजीर वीराच्या दृष्टीस पडला. त्वरेने तो खंजीर घेत वीरा म्हणाली, “बाबांचा खंजीर... हा माझ्या बाबांचा खंजीर आहे. हे पहा आमचं निशाण. समर, तुला हा खंजीर कुठे सापडला...” समरने एकवार देवयानीकडे पाहिलं. तिने मान हलवली तेव्हा समर म्हणाला, “हा खंजीर पाण्याच्या तळाशी रेतीत रुतला होता. जिथे हा खंजीर होता, तिथून जवळच हा तलवारीचा दुसरा तुकडा होता...” तलवारीच्या तुकड्याकडे पाहत देवयानी म्हणाली, “दोन शक्यता आहेत... कदाचित त्याच दानवाशी लढताना तुझे बाबा...... तेव्हाच तो खंजीर त्यांच्या हातून निसटला. नाहीतर त्यांना तलवारीचा हा दुसरा तुकडा दिसला असणार...

जर त्यांनी या तुडक्याला स्पर्श केला असेल, तर... वीरा, कदाचित तुझे वडील त्या महाकाय दानवाची शिकार झाले, अथवा ते त्याच्या काळ्या साम्राज्यात कैद झाले, जिथे समरचा भाऊ सोहम खेचला गेला...” हे ऐकून वीरा क्षितिजाकडे पाहू लागली. तिच्या डोळ्यात एकाच वेळी क्रोध आणि अश्रू दोन्ही होते. काही क्षणांनी डोळ्यातलं पाणी पुसत वीरा म्हणाली, “मीसुद्धा तुम्हा दोघांसोबत येत आहे. मला माहीत नाही माझे बाबा...... पण जर ते जीवित आहेत आणि त्या काळ्या जगात आहेत, तर त्यांना परत आणल्याशिवाय मला चैन पडणार नाही...” समर आणि देवयानीने एकमेकांकडे पाहिलं. पश्चिम दिशेला पाहत देवयानी म्हणाली, “काळ्या पर्वताची शिखरं याच दिशेला आहेत. तलवारीचा तिसरा भाग तिथेच आहे...” हे ऐकल्यावर जहाजाला नमस्कार करत समर म्हणाला, “कृपया आम्हाला पश्चिम दिशेला घेऊन जावे...” बघता बघता ते जहाज पाण्यावर हवेत उडालं आणि पश्चिमेकडे वळून पुढे जाऊ लागलं...

पश्चिम दिशेला जाताना मृत्यूच्या काळ्या सागराला ओलांडल्यावर अनेक वनं, नद्या आणि पर्वतशिखरं यांना पार करत जहाज हवेतून जात होतं. पश्चिम दिशेला पाहत समरकडे जात वीरा म्हणाली, “आठ दिवस उलटले. आपण अजूनही त्या काळ्या पर्वतापर्यंत पोहोचू शकलो नाही. कोण जाणे कधी आपण तिथे पोहोचू आणि कधी मी बाबांना परत भेटेन...” समर काही बोलायच्या आधीच देवयानी एका दिशेला इशारा करत म्हणाली, “ती पहा काळ्या पर्वताची शिखरं...” वीरा आणि समरने देवयानीने दाखवलेल्या दिशेला पाहिलं, तर अनेक पर्वत शिखरं तिथे दिसत होती. सभोवतालच्या वातावरणाशी विसंगत असलेली ती पर्वतशिखरं काळी ठिक्कर होती. जसं जहाज जवळ गेलं, सर्वांना दिसलं, की त्या परिसरात असलेली वृक्ष, भूमी, सर्वच काळं होतं. असं वाटत होतं, जणू कोणीतरी सर्वत्र काळी चादर पसरली आहे. तिघंही हे सर्व पाहतच होते, की अचानक एका पर्वत शिखरातून निघालेला लाल प्रकाशाचा एक किरण जहाजाला येऊन भिडला...

किरणाच्या तडाख्याने जहाजाचे तुकडे झाले. आता आपण खाली पडणार हे लक्षात येताच वीराने कमरेला बांधलेला दोरखंड सोडून त्याचा फास बनवला. समरने फास असलेली बाजू एका बाणात अडकवली आणि धनुष्याच्या सहाय्याने तो बाण एका झाडाच्या दिशेने सोडला. तो बाण झाडाच्या एका मजबूत फांदीला लागताना फासाने त्या फांदीला स्वत:त सामावले. दोरखंडाचं दुसरं टोक वीराच्या हातात होतं. तिने दोरखंड खेचला. फास त्या फांदीला आवळला गेला आणि त्या दोरखंडाच्या मदतीने देवयानी, समर आणि वीरा तिघंही अलगद जमिनीवर उतरले. खाली पोहोचताच तिघं सर्वत्र नजर फिरवू लागले. काळी जमीन, काळे वृक्ष पाहून समर आणि वीराला नवल वाटलं. तेव्हा देवयानी म्हणाली, “हे सर्व पूर्वी असं नव्हतं. देवराज इंद्राने पर्वताला शाप देताना वज्रप्रहार केला. त्यामुळे इथली सृष्टी काळी पडली...” देवयानी बोलतच होती, की, “मला मदत करा... कोणी आहे का...” या करूण आवाजाने तिघांचं लक्ष वेधलं...

त्यांनी पाहिलं, तर एक तरुण समोरच्या दिशेने त्यांच्याकडे धावत येत होता. लाल डोळे असलेले काही दगडी दानव आणि राक्षसी वृक्ष त्याचा पाठलाग करत होते. त्या वृक्षांच्या आणि दानवांच्या लाल डोळ्यांच्या वरच्या बाजूने लाल किरणं निघत होती, ज्याने आजूबाजूच्या वृक्षांची आणि जमिनीची राख होत होती. हे पाहून समरने धनुष्य-बाण सरसावला आणि वीराने एका हातात खंजीर तर दुसऱ्या हातात तलवार घेतली. आपल्या कक्षेत आपल्यावर समरने त्या दगडी दानवांवर बाण चालवायला सुरुवात केली. दुसरीकडे वीरा त्या राक्षसी वृक्षांच्या फांद्या तोडू लागली. ते दानव आणि वृक्ष थांबण्याचं नाव घेत नव्हते. थोड्याच वेळात तो तरुणही त्यांच्या जवळ आला. त्या दानवांनी आणि वृक्षांनी एव्हाना समर आणि वीरासह देवयानी आणि त्या तरुणालाही घेराव घातला होता. ते दानव आणि वृक्ष चौघांच्या जवळ येऊ लागले. तेव्हा देवयानीने तिचे हात जोडले...

पांढऱ्या प्रकाशाची एक लकेर देवयानीला घेराव घालू लागली आणि देवयानी हवेत तरंगू लागली. तिने डोळे उघडले. तिचे डोळे पूर्ण पांढरे-शुभ्र होते. देवयानीने तिच्या हातातून पांढरी प्रकाश किरणं सोडली. ती किरणं त्या दानव आणि वृक्षांवर आदळताच क्षणार्धात विस्फोट होऊन त्यांचं भस्म होऊ लागलं. जेव्हा सगळे दानव आणि वृक्ष भस्मसात झाले, तेव्हा देवयानीने पुन्हा डोळे बंद करून हात जोडले. तिच्या कांतीभोवती असलेला पांढऱ्या प्रकाशाचा घेराव कमी होत गेला. काही क्षणातच देवयानी पुन्हा सामान्य रूपात परिवर्तीत होऊन जमिनीवर उतरली. त्यावेळी ती स्वत: सांभाळू शकत नव्हती. देवयानीचा तोल गेला. ती पडणार इतक्यात त्या तरुणाने देवयानीला आधार दिला. तिला व्यवस्थित उभं करताना तो तरुण म्हणाला, “तुम्ही माझी मदत केलीत याबद्दल धन्यवाद. मी....” तो तरुण बोलतच होता, की देवयानीची नजर त्याच्या हातावर पडली...

त्या तरुणाच्या हातात एक काळी वस्तू होती. ती वस्तू पाहून देवयानी अवाक झाली आणि म्हणाली, “हा तर त्या दैवी तलवारीचा शेवटचा तुकडा आहे. या तुकड्याला तुम्ही हातात धरून ठेवलं आहे आणि अजून तुम्हाला काहीच झालं नाही...” त्या तरुणाने स्वत:च्या हाताकडे पाहिलं. मग समोर उभ्या तिघांकडे पाहत म्हणाला, “हो. हा त्याच तलवारीचा तिसरा आणि शेवटचा तुकडा आहे, ज्याला शोधत तुम्ही इथवर आला आहात. याला स्पर्श केल्यावरही मला काहीच कसं नाही झालं, तेही समजेल तुम्हाला. पण त्या आधी...” बोलता बोलता त्या तरुणाने तलवारीचा तुकडा धरलेली मूठ उघडली. तलवारीचा तो तुकडा वर जाऊन काही अंतरावर हवेत तरंगू लागला. मग त्या युवकाने त्यांचे दोन्ही हात त्या तिघांसमोर धरले. वीरा आणि समरजवळ असलेले तलवारीचे राहिलेले तुकडे त्या युवकाकडे आकर्षित होत, त्यांच्यापासून दूर जात, त्या तिसऱ्या तुकड्याच्या बाजूला जाऊन हवेत तरंगू लागले. त्या युवकाच्या चेहेऱ्यावर एक विद्रूप हसू होतं. त्याने जसं त्याच्या दोन्ही हातांना जोडलं, तसे त्या दैवी तलवारीचे तीनही तुकडे एकमेकांशी जोडले गेले...

दुसऱ्याच क्षणाला एक मोठी काळी तलवार हवेत तरंगत होती. काळ्या धुरात गुरफटलेल्या त्या तलवारीतून लाल ठिणग्या निघत होत्या. त्या तरुणाने त्याच्या हातात ती तलवार धरली आणि काळा धूर अजून गढद होऊन त्या युवकाला घेरू लागला. त्या युवकाच्या कायेचा रंग बदलला. तो निळा-जांभळा झाला होता. त्याचे डोळे जळत्या निखाऱ्यासारखे लाल झाले आणि तो तरुण गर्जना करत हसू लागला. हे सगळं इतक्या त्वरेने झालं, की देवयानी, समर आणि वीराला आकलनच करता आलं नाही. त्या युवकाने जसं बोलायला सुरुवात केली, तसे तिघं भानावर आले, “मी दुष्कीर्तीचा पुत्र काली आहे. जेव्हा ते तीन मूर्ख मानव पिताश्रींना काळ्या साम्राज्यात कैद करत होते, तेव्हा पिताश्रीनी या तलवारीतून एक किरण वर अवकाशात सोडला. तो प्रकाश किरण मी होतो. तो किरण इथे या पर्वतावर उभ्या एका वृक्षाच्या फळात शिरला आणि मी त्या फळात अडकून पडलो. ही तलवार तुटली आणि तिचा अग्रभागही इथेच येऊन पडला. काळ्या साम्राज्यात कैद असलेले माझे पिताश्री आणि इथे फळात अडकलेला मी, आम्ही दोघं विवश होतो. तो प्रकाश जर बाहेर पडला असता, तर मी लगेच हा तुकडा हस्तगत केला असता. पण मी स्वत:हून यातून बाहेर पडू शकणार नव्हतो...

फळाच्या आतून प्रकाश किरणं सोडून मी सुटण्याचा कयास करू लागलो. आज इतक्या वर्षांच्या प्रतीक्षेनंतर समरने चालवलेल्या बाणाने त्या फळाला छेद दिला आणि मी मुक्त झालो...” बोलता बोलता कालीने तलवार देवयानीच्या दिशेला वळवली. तलवारीतून निघालेल्या लाल किरणांनी देवयानीला घेराव घातला. समर आणि वीराने देवयानीकडे धाव घेतली, पण कालीने त्याच्या दुसऱ्या हाताने लाल किरणं त्या दोघांवर सोडून त्यांना दूर फेकलं. तिथे देवयानी एखाद्या चुंबकासारखी कालीकडे खेचली जाऊ लागली. समर आणि वीराकडे पाहत देवयानी म्हणाली, “तुम्हा दोघांना आता हे सगळं थांबवावं लागेल. आजच्या दिवसभरासाठी माझी शक्ती लुप्त झाली आहे. आणि आज दहावा दिवस आहे. आजच त्या दुष्कीर्तीचा अंत व्हायला हवा...” देवयानी कालीसमोर येताच त्याने तलवारीच्या सहाय्याने काळ्या साम्राज्याचे दरवाजे उघडले. मग देवयानीला जखडलेल्या लाल किरणांना पकडून देवयानीसमवेत काली त्या काळ्या साम्राज्यात प्रविष्ट झाला...

सर्व काही इतक्या लवकर झालं, की समर आणि वीरा काहीच करू शकले नाहीत. अचंभित होऊन वीरा म्हणाली, “कालीला तलवार तर मिळाली होती, मग तो देवयानीला का घेऊन गेला..?? काय रहस्य असू शकतं या मागे..?? याला उत्तर म्हणून समर काही बोलेल इतक्यात, “मोठ्या शक्तीसोबत मोठ्या बलिदानाचं मोलही द्यावं लागतं...” हे ऋषी आदित्यनाथ यांनी गुहेत उच्चारलेले शब्द त्याला आठवले. समर म्हणाला, “वीरा, आज दहावा दिवस आहे. आज त्या दुष्कीर्तीला त्याच्या सर्व शक्ती प्राप्त होतील. पण बहुदा त्यासाठी त्याला बलिदान द्यावं लागेल. अर्थात बळी द्यावं लागेल. देवयानीला यासाठी तर नाही... वीरा, आपल्याला देवयानीच्या मदतीसाठी त्या काळ्या साम्राज्यात जायला हवं...” वीराने होकारार्थी मान हलवली आणि दोघंही त्या द्वाराकडे वळले, जे कालीने उघडलं होतं. ते द्वार हळू हळू बंद होत होतं. हे पाहून दोघंही द्वाराच्या दिशेने पळू लागले. इतक्यात त्यांच्या आजू-बाजूला स्फोट होऊ लागले...

धावताना दोघांनी पाहिलं, तर दगडी दानव आणि राक्षसी वृक्षांची सेना, चहू बाजूंनी त्यांच्यावर चालून येत होती. वीरा म्हणाली, “हे सैन्य आपल्याला आत जाण्यापासून रोखण्यासाठी येत आहे. यांच्याशी आपण लढत राहिलो तर ते द्वार बंद होईल आणि आपण देवयानीपर्यंत पोहोचू शकणार नाही...” समरने जरा विचार केला. मग त्याने आपल्या भात्यातून काही बाण बाहेर काढले. अंगावरच्या कापडातून काही हिस्सा फाडला आणि त्या बाणांना गुंडाळला. वीरा समजून गेली. तिने पळता पळताच बाजूचे दोन दगड उचलले. ते एकमेकांवर घासून ठिणग्या निर्माण केल्या आणि त्या ठिणग्या बाणांवर बांधलेल्या कापडांवर घातल्या. जळत्या मशालींप्रमाणे दिसणाऱ्या त्या बाणांना समरने वेळ न दवडता द्वाराच्या जवळ पोहोचलेल्या दानवांवर आणि वृक्षांवर सोडलं. विस्फोट झाले आणि द्वाराच्या जवळ पोहोचलेलं सैन्य क्षणार्धात तुकड्यांमध्ये विखुरलं गेलं. हीच संधी साधून समर आणि वीराने बंद होणाऱ्या द्वारातून काळ्या साम्राज्यात उद्या घेतल्या...


चुंबकासारखे
दोघं खाली खेचले जात होते. काही क्षणातच जमीन दिसू लागली. खाली पोहोचताच समर आणि वीरा थोडे अडखळले आणि मग स्थिर उभे राहिले. त्यांच्या चारही बाजूंनी एक वेगळंच जग दिसत होतं. अंधुक प्रकाश होता. काही टेकड्यांमधून ज्वालामुखीचा रस निघत होता. काही टेकड्यांमध्ये विस्फोट होत होते. ते दोघं उभे होते तिथून काही अंतरावर सोनेरी लाव्याचा एक विशाल समुद्र पसरला होता, ज्यात वाफा येत होत्या आणि बुडबुडेही निघत होते. हवा येत-जात होती, पण शीतलतेपेक्षा उष्णतेचा अनुभव जास्त येत होता. आकाशात विजा चमकत होत्या. चंद्र, सूर्य किंवा चांदण्या काहीच दिसत नव्हतं. वीरा म्हणाली, “बाहेरच्या जगापेक्षा ही जागा वेगळीच आहे... कथा-कल्पनांमध्ये ऐकलेला रसातळ हाच का...” वीराला दुजोरा देत समर म्हणाला, “इथे सगळीकडे आगच आग दिसते. वृक्ष नाहीत, प्राणी नाहीत की मनुष्य नाही...” “ते ही येतील. इतकी घाई कशाला...”

समर बोलतच होता, की या आवाजाने समर आणि वीरा दोघंही चपापले. आवाज ज्या दिशेने आला त्या दिशेला दोघांनी पाहिलं, तर समोर काली उभा होता. कालीला पाहताच वीरा आणि समर दोघांनी आपापल्या तलवारी बाहेर काढत आक्रामक पावित्रा घेतला. समरने विचारलं, “काय आहे हे सगळं..?? देवयानी कुठे आहे..??” काली हसत म्हणाला, “रसातळ किंवा ज्याला नरक म्हणतात, त्या पाताळाच्या आणि धरतीच्या मध्ये आहे हे काळं साम्राज्य. या शापित काळ्या साम्राज्याचे पालक आहेत माझे पिताश्री, महान राजा दुष्कीर्ती. माझ्या मागे त्या टेकड्या आहेत ना, त्या टेकड्यांच्या मधोमध पिताश्रींनी परकाया प्रवेशाच्या विद्येचे अनुष्ठान केले आहे. देवयानीसुद्धा मूर्छित अवस्थेत तिथेच आहे. ही विद्या संपन्न होताच पिताश्री देवयानीच्या शरीरात प्रवेश करतील आणि अमर होतील. हा...हा...हा...” काली अजून जोरात हसू लागला. वीरा आणि समरने तलवारी सरसावत कालीवर धाऊन आले...

दोघांना चाल करून येताना पाहून काली हसायचा थांबला. पाहता पाहता त्याचे डोळे लाल झाले आणि त्याच्या दोन्हीही रिकाम्या हातात एकेक शस्त्र आलं. तलवार, भाला, धनुष्य-बाण, खंजीर या सर्वांपेक्षा वेगळी असलेली ही शस्त्र टोकदार आणि मोठ-मोठ्या काटयांनी भरलेली होती. वीरा आणि समर कालीवर वार करत होते आणि काली दोघांचेही वार लीलया परतवत होता. बराच वेळ हे युद्ध चाललं. समर आणि वीरा दोघंही घायाळ झाले होतं. त्यांना झालेल्या जखमांमधून रक्त येऊ लागलं होतं. हसत हसत काली म्हणाला, “हा...हा...हा... स्वीकार करा तुमचा पराजय, तुम्ही क्षूद्र मानव काहीएक करू शकणार नाही. त्या विद्येला आता सुरुवात होणारच आहे. हा...हा...हा...” समर आणि वीराने एकमेकांकडे पाहिलं. दोघांची नेत्रपल्लवी झाली आणि दोघांनी एकत्र कालीवर वार केले. आपली पूर्ण ताकद पणाला लाऊन दोघांनी कालीची शस्त्र त्याच्या हातावेगळी केली. मग तलवारींचे सपासप वार करत दोघांनी कालीला घायाळ केलं. त्याच्या जखमांमधून काळं रक्त वाहू लागलं. कालीला वेदना होऊ लागल्या आणि काही क्षणातच त्याच्या शरीराचा स्फोट झाला. काली संपला हे पाहून समर आणि वीरा दोघं त्या टेकड्यांच्या दिशेने धावले...

टेकडी चढून दोघं माथ्यावर पोहोचले. त्यांनी सर्वत्र नजर फिरवली. टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या पठारावर अनेक ठिकाणी पालवीरहित काळी वृक्ष जळताना दिसत होती. कुठे लाव्याची नदी वाहत होती आणि त्यात स्फोट होत होते. पठाराच्या शेवटी एका दगडी शिळेवर साखळदंडात जखडलेली देवयानी त्यांना दिसली. देवयानी स्वत:ला सोडवण्याचा प्रयत्न करत होती. शिळेच्या मागे काळ्या धुरात गुरफटलेली, लाल डोळे असलेली आणि हातात ती काळी तलवार घेतलेली एक आकृती नाचत होती. तिथून जवळच दगडी दानवांची एक तुकडी सज्ज होती. समर आणि वीराने एकमेकांकडे पाहिलं. समरने भात्यातून बाण काढत धनुष्यावर चढवले. वीराने अग्नी उत्पन्न करत तो अग्नी बाणांवर टाकला. समरने ते अग्नीबाण क्षणार्धात त्या दानवांच्या तुकडीवर चालवले. दोन-तीन विस्फोट झाले आणि ती दानवांची तुकडी ठिकऱ्या ठिकऱ्या होऊन सर्वत्र विखुरली. देवयानी आणि त्या आकृतीने समोर पाहिलं तर समर आणि वीरा टेकडी उतरताना दिसत होते...

त्या दोघांना पाहून देवयानी म्हणाली, “दुष्कीर्ती, थांबव तुझा हा खेळ. तू कधीच विजयी होऊ शकणार नाहीस. कधीच अमरत्व प्राप्त करू शकणार नाहीस...” हे ऐकून ती आकृती हसू लागली आणि तिचा आवाज सर्वत्र घुमू लागलं, “हा...हा...हा... कोण थांबवणार मला... ही विद्या संपन्न होताच तुझं हे देवलोकाचं पवित्र शरीर मला प्राप्त होईल, आणि मी अधिक शक्तीशाली होईन. कीटाकांसारखी भासणारी ही माणसं काय वाकडं करू शकतील माझं. हा...हा...हा...” बोलता बोलता दुष्कीर्तीने तलवारीचं टोक एका दिशेला वळवलं. तलवारीतून निघालेल्या लाल किरणांनी प्रचंड ताकदीची महाकाय जनावरं आणि दानव यांची सेना निर्माण केली. ती सेना, वीरा आणि समरच्या दिशेने जाऊ लागली. त्या सैन्याशी दोन हात करत समर आणि वीरा पुढे सरकत होते. सर्वांचा नायनाट करून वीरा आणि समर पुढे आले आणि, “वीरा, माझी मुलगी...” या आवाजाने दोघं थांबली. वीराने वळून पाहिलं, तर तिचे वडील, म्हणजेच सरदार संग्रामसिंह उभे होते...

आपल्या वडिलांना समोर पाहून वीराने धावत जाऊन त्यांना आलिंगन दिलं. समर त्यांच्याकडे वळलाच होता, की त्याच्या खांद्यावरही एक हात आला. समर वळला तर मागे सोहम उभा होता. सोहम म्हणाला, “दादा, माझ्यासाठी आलास ना इथवर... मी तर इथे आहे. मग तू त्या दिशेला का जात होतास... आता आपली भेट झाली आहे. चल, इथून बाहेर जाऊ...” तिथे आपल्या वडिलांच्या मिठीत सामावलेली वीरा त्वरेने मागे झाली आणि म्हणाली, “बाबा, तुम्ही इतके थंडं का जाणवत आहात...” सरदार संग्रामसिंहांच्या चेहेऱ्यावर स्मित आलं. वीराचा हात पकडत ते म्हणाले, “वीरा इथून बाहेर जाऊ आपण. आता इथे थांबण्याची काहीच आवश्यकता नाही...” वीराला त्यांचा स्पर्शही खूपच थंडं वाटला. ती स्वत:ला सोडवू लागली. वीरा तिचा हात सोडवण्याचा जितका प्रयत्न करत होती, तितकीच सरदार संग्रामसिंहांची पकड अधिक बळकट होत होती. त्याच वेळी फक्त पकडलेल्या हाताने सरदार संग्रामसिंहांनी वीराला भिरकावलं आणि वीरा दूर जाऊन जमीनीवर पडली...

दुसरीकडे समरने जेव्हा सोहमचा हात आपल्या हातात घेतला, तेव्हा तो समरला थंडं जाणवला. समरने त्वरित आपला हात सोडवला आणि स्वत:च्या हाताकडे पाहून मग सोहमकडे पाहत समर म्हणाला, “सोहम, तू बोलतोस हे... इतरांच्या सहाय्यासाठी तू नेहमीच तत्पर असतोस. आणि इथे...” यावर सोहम पुन्हा रागाने म्हणाला, “समर, आधी चल इथून. तुला माझ्यासोबत यावंच लागेल...” सोहमच्या या व्यक्तव्याने समर अवाक झाला आणि मागे जाऊ लागला. त्याचवेळी सोहमने समरच्या छातीवर लाथ मारली. तो तडाखा इतका जबरदस्त होता, की समर हवेत उडून लांब फेकला गेला. वीरा आणि समर एकमेकांपासून जवळच पडले होते. एकमेकांना आधार देत दोघं उभे राहिले. समर म्हणाला, “वीरा आपले आप्त आता आपले नाही राहिले. हे दोघं कदाचित या दुष्कीर्तीच्या काळ्या विश्वाचाच भाग झाले आहेत...” समरच्या म्हणण्याला दुजोरा देत वीरा म्हणाली, “तुझं म्हणणं योग्य असेलही समर, पण तरीही मी माझ्या बाबांवर शस्त्र कसं चालवू...” समरला वीराची मन:स्थिती समजली. कारण या घडीला समरच्या मनातही सोहमबाबत हाच प्रश्न उभा ठाकला होता. समर म्हणाला, “तू म्हणतेस ते अगदी योग्य आहे वीरा. यावर एकच उपाय, मी तुझ्या वडिलांचा सामना करतो, आणि तू सोहमला सांभाळ...” दोघंही तलवारी सरसावत एकमेकांच्या पाठीला पाठ लाऊन लढायला सज्ज झाले...

पाहता पाहता सोहम आणि सरदार संग्रामसिंह, दोघांचे डोळे लाल झाले आणि शरीरं निळी-जांभळी पडली. दोघांनी समर आणि वीरावर हल्ला चढवला. समर आणि वीराने त्यांच्या पूर्ण ताकदीनिशी सरदार संग्रामसिंह आणि सोहमचा सामना केला. अखेर वीराने तिच्या तलवारीने सोहमचा शिरच्छेद केला आणि समरने त्याची तलवार सरदार संग्रामसिंहांच्या छातीच्या आर-पार केली. सोहम आणि सरदार संग्रामसिंह हा हा म्हणता भस्मसाद झाले. तिथे राजा दुष्कीर्तीने हे पाहिलं आणि त्याला राग अनावर झाला. त्याने पुन्हा तलवार चालवली. तलवारीतून निघालेल्या लाल किरणांमधून भयंकर जनावरं आणि दानवांचं प्रचंड मोठं सैन्य तयार झालं. ते सैन्य अत्यंत वेगाने समर आणि वीराच्या रोखाने सरकू लागलं. हे पाहून समरने तलवार म्यान केली आणि भात्यातून बाण काढून ते जमीनीवर पसरलेल्या लाव्यात बुडवले. बाणांनी पेट घेताच समरने धनुष्याच्या सहाय्याने ते बाण त्या सैन्यावर चालवले. जागोजागी स्फोट होऊ लागले. ती जनावरं जळू लागली. दानवांच्या ठिकऱ्या उडू लागल्या. थोड्याच वेळात समरच्या भात्यातले सगळे बाण संपले. पण ते सैन्य अजून शिल्लक होतं. तेव्हा समर आणि वीराने पुन्हा तलवारी उपसल्या आणि त्या राक्षसी सेनेवर हल्ला चढवला...

कुठे जनावरांच्या पंजांवर वार होत होते तर कुठे त्या दानवांच्या माना छाटल्या जात होत्या. वीरा आणि समर लढत होते पण ते सैन्य कमी होण्याचं नाव घेत नव्हतं. त्याच वेळी मोठ्या आवाजानिशी ती दगडी शिळा भंग पावली आणि साखळदंडात जखडलेली देवयानी मुक्त होऊन हवेत तरंगू लागली. देवयानी हवेत तरंगत होती, पण तिचं शरीर निष्तेज होतं आणि जमीनीला समांतर होतं. समर, वीरा आणि त्या सैन्याने आवाजाच्या दिशेने पाहिलं. दुष्कीर्तीने ती दैवी तलवार देवयानीच्या हाती सोपवली आणि गर्जना करून हसत तो देवयानीच्या शरीरात प्रविष्ट झाला. चहू बाजूंना कंपनं झाली आणि देवयानीचं शरीर निळं-जांभळं पडलं. काही क्षणातच देवयानीच्या निष्तेज शरीरात चेतना आली आणि डोळे उघडून ती हवेतच उभी राहिली...

तिचे निळे डोळे बदलून ती जागा लाल भडक आग ओकणाऱ्या डोळ्यांनी घेतली होती. तिने हातातली तलवार साखळदंडांवर ठेवतातच सर्व साखळदंड वितळून गेले. देवयानीच्या मुखातून दुष्कीर्तीचा आवाज येऊ लागला, “हा...हा...हा... मी आता अनंत काळासाठी अमर झालो आहे. क्षूद्र मनुष्य प्राण्यांनो, या देवयानीची दैवी शक्ती प्राप्त करून आता मी समस्त ब्रह्मांडाला काबीज करेन... हा...हा...हा...” देवयानीच्या आत प्रवेश केलेल्या दुष्कीर्तीने देवयानीचा हात पुढे केला. त्यासरशी थांबलेलं ते राक्षसी सैन्य पुन्हा चाल करून आलं आणि दुष्कीर्ती मंत्र म्हणू लागला. त्याच वेळी एक प्रखर पांढरा प्रकाश देवयानीच्या माथ्यातून निघाला. त्या प्रकाशाने त्या राक्षसी सैन्याला एकाच जागी गोठवलं. गोठलेलं ते सैन्य पाहून वीरा आणि समर, काय झालं याचा विचारच करत होते, की देवयानीच्या छातीवर त्यांना अजून एक प्रखर प्रकाश दिसला. दोघांनी तिथे पाहिलं, तर तिथे देवयानीचा चेहेरा दिसत होता. देवयानी म्हणाली, “समर, माझ्या शक्ती पूर्ण ग्रहण करण्यासाठी हा दुराचारी मंत्रोच्चारण करत आहे. माझ्या शक्तींनी माझ्या पूर्ण शरीराचा पूर्ण ताबा त्याला दिलेला नाही. या शरीरात माझा काही अंश अजूनही शिल्लक आहे. हे युद्ध रोखण्यासाठी एकमेव उपाय आहे दुष्कीर्तीचा अंत, जो त्याच्याच त्या दैवी तलवारीने होऊ शकतो. त्वरा कर समर. या तलवारीला माझ्या हातून हिसकावून घे...”


देवयानीने
इतकं बोलायचा अवकाश, की समरने तिथेच पडलेल्या एका दानवाचा तुटलेला हात उचलून धनुष्यावर चढवला. निशाणा साधत त्याने प्रत्यंचा खेचली. धनुष्यातून निघालेल्या त्या हाताने आपला निशाणा चोख साधला आणि देवयानीच्या हाताला झटका दिला. ती दैवी तलवार जशी हवेत उडाली, तसे दुष्कीर्तीचे मंत्रोच्चार बंद झाले. दुष्कीर्ती काही करेल, त्याआधीच समरने हवेत कोलांटी उडी घेत ती तलवार पकडली. समरच्या हातात तलवार येताच देवयानीच्या शरीरातला दुष्कीर्ती गर्जना करू लागला, “नाहीऽऽऽऽऽ..." आणि काळ जसा स्तब्ध झाला. तलवारीला गुरफटलेला काळा धूर कमी होत गेला. तलवारीतून निघत असलेल्या लाल ठिणग्या बंद झाल्या आणि निळी प्रकाशकिरणं तलवारीतून निघू लागली. त्या निळ्या प्रकाशकिरणांनी जसा तलवारीला घेराव घातला, तसा तलवारीचा काळा रंग निघून गेला आणि तलवार पांढऱ्याशुभ्र प्रकाशात न्हाऊन निघाली...

स्तब्ध झालेला काळ पुन्हा पूर्ववत झाला. राक्षसी सैन्याची एक तुकडी जशी जवळ आली, समरने त्याच क्षणी तलवार चालवली. तलवारीच्या तडाख्याने ती तुकडी क्षणार्धात भस्मसाद झाली. हे पाहताच समरने तलवारीचे वार करायला सुरुवात केली. काही वेळातच संपूर्ण सैन्याचं भस्म झालं. हे पाहून दुष्कीर्ती अधिकच क्रोधीत झाला आणि म्हणाला, “क्षूद्र मानवा, माझी तलवार हस्तगत करून हे सैन्य संपवलंस म्हणजे तू विजयी झालास असं वाटतंय का तुला... मी आत्ताही अमर आहे, अजिंक्य आहे... हा...हा...हा...” इतकं बोलून दुष्कीर्ती पुन्हा मंत्रोच्चार करू लागला. त्याचवेळी देवयानीच्या छातीवर पांढरा प्रकाश दिसू लागला. त्यातून देवयानी म्हणाली, “समर, हीच ती वेळ, हाच तो क्षण. अवकाशातले ग्रह आणि नक्षत्र आपापल्या परमोच्च स्थानी पोहोचले आहेत. दुष्कीर्तीची तलवारी तुझ्या हाती आहे. कर वार... जाऊ देत ते पातं माझ्या छातीच्या आर-पार...” समर नकारार्थी मान हलवू लागला आणि मागे सरकू लागला. देवयानी पुन्हा म्हणाली, “समर, आठव ऋषी आदित्यनाथांचं ते वाक्य...”

दुविधेत सापडलेल्या समरने डोळे बंद केले आणि ऋषी आदित्यनाथांचं वाक्य त्याच्या कानात घुमू लागलं, “मोठ्या शक्तीसोबत मोठ्या बलिदानाचं मोलही द्यावं लागतं...” समरने डोळे उघडले. त्याने चारही बाजूंना नजर फिरवली आणि, “दुष्कीर्तीऽऽऽऽ...” असं ओरडत तलवारीसोबतच समरने हवेत उडी घेतली. दुष्कीर्तीचा मंत्रोच्चार सुरूच होता, की समरने ती तलवार देवयानीच्या छातीत खुपसली. मग पूर्ण ताकदीसह तलवार देवयानीच्या शरीराच्या आर-पार केली. विजेचा प्रचंड कडकडाट झाला आणि धरती कापू लागली. तलवारीसह देवयानीचं शरीर हवेत तरंगू लागलं आणि काळा धूर तिच्या शरीरातून निघून तलवारीत सामावला. तलवारीतून प्रखर निळा प्रकाश निघाला ज्यामुळे समर आणि वीरा दोघांचेही डोळे दिपले. दोघांनी हळूहळू डोळे उघडले. अंधार नष्ट झाला होता. चोहीकडे कोरीव काम केलेल्या सांगमरवरी भिंती होत्या आणि पणत्या ज्योतीर्मय झाल्या होत्या...

एका पलंगावर असलेल्या मखमली गादीवर देवयानी पाहुडली होती आणि बाजूलाच निळ्या प्रकाश किरणात गुरफटलेली ती दैवी तलवार हवेत तरंगत होती. समर आणि वीराने आधी एकमेकांकडे पाहून मग चारही बाजूंना नजर फिरवली. देवयानीला निपचित पडलेली पाहून साश्रू नायनांनी दोघं तिच्याजवळ पोहोचले. वीरा देवयानीला स्पर्श करणारच होती इतक्यात एक आवाज तिथे घुमू लागला, “धीर धरा पुत्रांनो. तुम्ही आता प्रकाशाच्या मंदिरात आहात. सर्वकाही क्षेम होईल...” वीरा आणि समरने आवाजाच्या दिशेने पाहिलं, तर तलवारीच्या बाजूलाच तीन तेजस्वी पुरुष उभे होते. तिघं एकत्र म्हणाले, “तुम्हा दोघांनी दाखवलेल्या अतुलनीय साहसामुळे आज दुष्कीर्तीचा अंत होऊ शकला. या युद्धात तुम्ही तुमच्या आप्तजनांना हरवून बसलात हे खरं आहे, पण सर्वात मोठं बलिदान दिलं या देवयानीने. दुर्जनांच्या विनाशासाठी तिने स्वत:च्या प्राणांची आहुती दिली. आणि म्हणूनच...” बोलता बोलता तिघांनी आपापला हात देवयानीच्या दिशेने केला. काही क्षणातच देवयानीने डोळे उघडले आणि ती उठून हात जोडून उभी राहिली...

देवयानी जिवंत आहे हे पाहून समर आणि वीरा दोघांनाही आनंद झाला. देवयानीकडे वळत ते तीनही महापुरुष म्हणाले, “देवयानी, मृत्यूलोकातलं तुझं कार्य पूर्ण झालं. आता तू देवलोकाकडे प्रस्थान कर. वीरा, तू एक सागरी लुटारू आहेस, पण दुष्कीर्तीसोबतच्या युद्धात तू तुझी सर्व पापं धुतली आहेस. तू आता एका राज्याची महाराणी होशील. तुझे इतर लुटारू साथीदार तुझी प्रजा आणि तुझे मंत्रीगण बनून तुझ्या आधीन असतील. समर, तू जो असामान्य पराक्रम दाखवला आहेस, त्यावर आम्ही प्रसन्न आहोत. मनाच्या शक्तीनुसार चालणारी ही तलवार दुष्कीर्तीच्या स्पर्शाने अपवित्र झाली होती. पण तुझा स्पर्श होताच तिला तिचं मूळ स्वरूप प्राप्त झालं. कारण तुझं मन शुद्ध आहे, निर्मळ आहे. म्हणूनच ही दिव्य तलवार तुला आम्ही भेट देत आहोत. ही तलवार जोवर तुझ्याजवळ असेल, तोवर तू अपराजित राहशील. कल्याणमस्तु...”

इतकं बोलून ते तीनही महापुरुष लुप्त झाले. समर आणि वीराकडे पाहत देवयांनी म्हणाली, “तुम्ही दोघांनी मला मोलाचं सहाय्य केलंत. त्याबद्दल मी तुमची आभारी आहे. वीरा, उत्तरेला स्थित श्वेतांबर नावाचं राज्य आपल्या महाराणीची प्रतीक्षा करत आहे. योग्य रीतीने राज्यकारभार कर. समर, ज्या वनात आपली भेट झाली, तू त्या वनाचा अधिपती होशील. सर्व पशूपक्ष्यांची आणि वृक्ष-वल्लरींची भाषा तुला अवगत होईल...” देवयानी बोलत असतानाच पांढराशुभ्र प्रकाश देवयानीला गुरफटू लागला. हे पाहताच देवयानी म्हणाली, “माझं इथलं कार्य संपन्न झालं. आता मला प्रभूचरणी लीन व्हायला हवं. पण मी मूर्तीरूपाने याच मंदिरात विराजमान असेन...” प्रकाश वाढत गेला आणि पाहता पाहता देवयानी अंतर्धान पावली. जिथे देवयानी उभी होती, तिथे आता एक संगमरावरी सुंदर मूर्ती प्रकट झाली आणि पूर्ण देऊळ प्रकाशात न्हाऊन निघालं...”

समाप्त.

@ अनिकेत परशुराम आपटे.

Tuesday, September 12, 2023

युद्ध - पहिला भाग...

प्रकाश हळू-हळू कमी होत होता. अंधार आपले हात पसरवत होता. आगीच्या ठिणग्या आणि गोळ्यांचा जणू पाऊस पडत होता. लोक घायाळ होत होते, मृत्यूमुखी पडत होते. दूर क्षितिजावर काळ्या धुरात गुरफटलेली तलवार नाचवत सैतान राजा दुष्कीर्ती हसत होता, “हा... हा... हा... मी अजेय आहे. आता माझा कोणीही पराभव नाही करू शकणार... माझा कोणीही अंत नाही करू शकणार... हा... हा... हा...” हसता हसताच दुष्कीर्तीने तलवारीचं टोक एका दिशेकडे वळवलं. तळवारीतून लाल किरणं निघाली आणि समोर विस्फोट होऊ लागले. मनुष्य क्षणार्धात भस्मसात होऊ लागले. त्याच वेळ तीन तेजस्वी मानव दुष्कीर्तीसमोर प्रकट झाले...

दैवी शक्ती असलेल्या त्या तीन मानवांनी आपापल्या हातात शस्त्र घेतली होती. एक मानव म्हणाला, “दुष्ट, दुराचारी... बंद कर तुझी ही विनाशलीला अन्यथा...” हे ऐकून दुष्कीर्ती अजून जोरात हसत म्हणाला, “हा... हा... हा... अन्यथा... अन्यथा काय... कोण थांबवेल मला... तुम्ही क्षूद्र मानव... हा... हा... हा... करा प्रयत्न...” बोलता बोलता दुष्कीर्तीने तलवार स्वत:च्या माथ्याला लावली आणि त्याचा आकार वाढू लागला. बघता बघता सैतान राजा दुष्कीर्ती, काळ्या धुरात गुरफटलेल्या, डोळ्यांनी आग ओकणाऱ्या एका अक्राळ-विक्राळ राक्षसात परिवर्तीत झाला आणि समोर उभ्या त्या तीन मानवांसमोर उभा राहून तो जोर-जोरात हसू लागला...

हजारो वर्ष उलटली...

अंधार वाढत चालला होता. किड्यांची गुणगूण आणि जनावरांच्या आवाजांसोबत, वाऱ्यामुळे सळसळणाऱ्या पानांच्या आवाजामुळे जंगल अधिकच भयावह झालं होतं. दगडी वाटेवरून अडखळत, झाडांच्या, फांद्यांना चुकवत एक मुलगी वाट फुटेल तिथे पळत होती आणि काही जंगली लांडगे तिचा पाठलाग करत होते. अचानक ती मुलगी ठेच लागून खाली पडली. तिला पडताना पाहून ते लांडगेही पळायचे थांबले. त्या मुलीने वळून पाहिलं तर दोन लांडगे हळू-हळू तिच्याकडे येत होते. त्या लांडग्यांनी त्या मुलीवर झडप घातली आणि अचानक त्याच वेळी कुठूनतरी दोन बाण बाहेर आले...

एका बाणाने एका लांडग्याच्या मानेवर आघात केला तर दुसरा बाण दुसऱ्या लांडग्याच्या कपाळाला लागला. दोन्ही लांडगे एकसाथ त्या मुली समोर येऊन पडले आणि गतप्राण झाले. आपल्या साथीदारांची अवस्था पाहून बाकी लांडगे कान दुमडून इकडे-तिकडे पाहू लागले आणि थोड्याच वेळात मागे वळत अंधारात पळून गेले. भेदरलेली ती मुलगी चोहीकडे नजर फिरवू लागली. काही क्षणातच चार पावलं तिच्या जवळ आली. दगडावर दगड घासून ठिणग्या तयार झाल्या आणि जवळ पडलेल्या काही पानांवर त्या पडून अग्नी प्रज्वलित झाला. त्या प्रकाशात त्या मुलीने पाहिलं, तर पाठीवर बाण भरलेले भाते, कमरेला बांधलेली तलवार आणि खांद्यावर धनुष्य घेतलेले दोन तरूण समोर उभे होते. त्यातल्या एकाने जमीनीवर पाडलेलं जाड लाकूड उचलून आगीवर धरून त्याची मशाल तयार केली. दुसरा तरूण त्या मुलीजवळ येत म्हणाला, “शांत व्हा. ते लांडगे पळून गेले. माझं नाव समर. आणि हा माझा भाऊ सोहम. आम्ही दोघं वनात शिकारीसाठी आलो होतो. रात्र झाली म्हणून इथे जवळच तंबू उभारला...” सोहम पुढे येत म्हणाला, “आपण कोण आहात..? आणि अशा यावेळी या वनात कशा..?

स्वत:ला सांभाळत ती मुलगी उभी राहिली. मग समर आणि सोहमकडे पाहत बोलू लागली, “मी कोण आहे हे जाणून घेण्याआधी मी इथे का आहे ते जाणून घ्या. हजारो वर्षांपूर्वी दुष्कीर्ती नावाचा एक महापराक्रमी राजा होऊन गेला. तो जितका बलवान होता तितकाच दुष्ट होता. समस्त पृथ्वीवर त्याला राज्य करायचं होतं. त्याने घोर तपश्चर्या करून भोळेनाथ शंकरकडून वर प्राप्त करून घेतला. भगवान शंकरने दुष्कीर्तीला पांढराशुभ्र प्रकाश असलेली एक खड्ग भेट करत वरदान दिलं, की मनाच्या शक्तीने तेज मिळवणारी ही खड्ग दुष्कीर्तीला प्रत्येक युद्धात अपराजित ठेवेल. शिवाय याच तलवारीच्या वारानेच दुष्कीर्तीचा अंत होईल. या तलवारीशिवाय दुसरं कोणतंही शस्त्र दुष्कीर्तीला अपाय करू शकणार नाही. इतकं बोलून महादेव अंतर्धान पावले. पवित्र अशा पांढऱ्या प्रकाशाने वेढलेली ती तलवार जशी दुष्कीर्तीच्या हाती आली, त्याच क्षणी त्याच्या अंगात विजेचा संचार झाला. पाहता पाहता तो पांढरा प्रकाश लुप्त झाला आणि तलवारीभोवती काळ्या धुराने वेटोळं करायला सुरुवात केली...

काळ्या मनाच्या दुष्ट राजा दुष्कीर्तीने त्याचे काळे विचार त्या तलवारीत प्रविष्ट केले. तो आता अमर झाला होता. चहू दिशांना त्याने आपली विनाशलीला आरंभली. पृथ्वीची ही दशा पाहून स्वर्गातील देव-देवता भयभीत झाले. महादेवाच्या वरदानाने उन्मत्त झालेला दुष्कीर्ती कदाचित स्वर्गावरही आक्रमण करू शकला असता. हे विचारात घेऊन देवतागण महादेवांकडे गेले. दुष्कीर्तीची विनाशलीला पाहून महादेव आधीच क्रोधीत झाले होते. पण स्वत:च दिलेल्या वरदानामुळे ते हतबल होते. महादेवांनी मग ब्रह्मदेव आणि नारायण यांना पाचारण केले. या त्रिमूर्तीने तीन चमत्कारी मानवांची निर्मिती केली आणि त्यांना दुष्कीर्तीला थांबवण्यासाठी पृथ्वीवर जाण्याचा आदेश दिला. राजा दुष्कीर्ती आणि या तीन मानवांचं घनघोर युद्ध झालं. महादेवांच्या वरदानामुळे दुष्कीर्तीचा पराभव करणं किंवा त्याचा अंत करणं शक्य नव्हतं. समस्त चराचराला गिळंकृत करण्यासाठी दुष्कीर्तीने काळ्या साम्राज्याचं द्वार उघडलं होतं. त्या तीन महामानवांनी योजना आखली आणि दुष्कीर्तीलाच त्या काळ्या साम्राज्यात फेकून दिलं. पडताना दुष्कीर्तीच्या हातून वेगळ्या झालेल्या तलवारीला पकडण्यासाठी ते तीन मानव पुढ सरसावले. हे पाहून दुष्कीर्तीने आपल्या दोन्ही हातांनी लाल किरणं सोडली. एक किरण उत्तरेच्या दिशेला निघून गेला आणि एक किरण तलवारीवर आदळला. तलवार हवेत उडाली आणि तिचे तीन तुकडे होऊन ते तुकडे दूरवर फेकले गेले. काळ्या साम्राज्याचं द्वार बंद झालं...

हजारो वर्ष उलटली. दुष्कीर्तीचं शरीर तर पंचतत्वात विलीन झालं, पण त्याचा आत्मा तिथेच काळ्या साम्राज्यात विहार करत राहिला. काळ्या शक्तींमुळे दुष्कीर्तीचा आत्मा अधिकच बलवान आणि मायावी झाला. परंतु बाहेर येण्याचे त्याचे सगळे प्रयास विफल झाले. बाहेरच्या जगात त्या तीन तेजस्वी मानवांनी एका मंदिराची स्थापना करून आपल्या दैवी शक्ती तिथे जतन करून ठेवल्या. मी देवयानी. त्याच मंदिराची देवी. आज इतक्या वर्षांनी देवळातला तेजस्वी पांढरा प्रकाश कमी होऊन देऊळ काळं पडू लागलं. मूर्तीरूपात तिथे विराजमान असलेल्या मला मूर्तस्वरूप प्राप्त झालं. कलशाच्या आतल्या भागात तीन निशाण दिसू लागले. ही तीच स्थानं होती, जिथे दुष्कीर्तीच्या तलवारीचे तुकडे फेकले गेले होते. मृत्यूचा सागर, काळा पर्वत आणि हे वन. माझ्या मानवी देहाचा उद्देश मला उमगला. ते तीनही तुकडे एकत्र करून ती तलवार पुन्हा निर्माण करायची आणि काळ्या साम्राज्यात दडलेल्या दुष्कीर्तीचा अंत करायचा. या जंगलात असलेला तुकडा शोधण्यासाठी मी इथे आले. तो तुकडा मला मिळालाही, पण तेवढ्यात ते लांडगे माझ्या मागे लागले. पळता पळता मी येथे पडले आणि तो तुकडा माझ्या हातून निसटला. पुढे काय झालं, हे तुम्हा दोघांना ज्ञात आहेच...” हे ऐकून समर आणि सोहम दोघंही आश्चर्यचकित झाले...

देवयानी पुढे म्हणाली, “अपवित्र झालेल्या त्या तलवारीला मंदिरात नेऊन पुन्हा पावन करायला हवं. म्हणजे त्या काळ्या शक्तींचा समूळ नाश होईल...” शेकोटीजवळ उभा असलेला सोहम म्हणाला, “देवी, आपण जे म्हणता आहात ते जर सत्य असेल, तर इतकी वर्ष सगळं शांत कसं होतं..? आणि अचानक सर्व सुरू कसं झालं..? आमचा पूर्ण परिचय नसतानाही आपण हे सर्व आम्हाला का सांगितलंत..? दादा, दंतकथा रचून या आपला वेळ वाया घालवू पाहत आहेत. मी तंबूत परत जात आहे. तू ही चल माझ्या सोबत. पण तुला जर यांच्यासोबत इथे थांबायचं असेल तर तुझी मर्जी...” इतकं बोलून देवयानी अजून काही बोलण्याआधीच सोहम एका दिशेने चालू लागला. देवयानी उभी राहत असताना तिला मदत करत समर म्हणाला, “देवयानी, सोहम पूर्णपणे चुकीचा नाही. तुमच्या कथनावर विश्वास ठेवणं थोडं कठीण आहे. या वेळी तुम्ही आमच्यासोबत चला. तुमचं इथे अशा वेळी थांबणं कदाचित घातक ठरू शकतं...” देवयानीला समरचं म्हणणं पटलं आणि ती समर व सोहमसोबत चालू लागली. तेवढ्यात एका झाडाच्या बुंध्याजवळ काळ्या धुराचा एक छोटा ढग सर्वांना दिसला. सोहमने ढग बाजूला केला, तर तिथे एक काळी टोकदार वस्तू पडलेली होती. त्या काळ्या वस्तूला उचलण्यासाठी सोहम झुकलाच होता, की देवयानी ओरडून म्हणाली, “त्या वस्तूला स्पर्श करू नका...”

देवयानीच्या बोलण्याआधीच त्या वस्तूला सोहमच्या हाताचा स्पर्श झाला होता. एक प्रखर लाल प्रकाशाची लकेर त्या वस्तूमधून निघाली आणि सोहमच्या संपूर्ण अंगाभोवती एक घिरटी घालून पुन्हा त्या काळ्या वस्तूत प्रविष्ट झाली. पुढच्याच क्षणी काळ्या धुराचा तो छोटा ढग मोठा होऊ लागला आणि सोहमला घेरू लागला. काही क्षणातच त्या ढगाने सोहमचं पूर्ण शरीर झाकलं आणि तो ढग त्या काळ्या वस्तूत जाऊ लागला. “दादा, वाचव मला...” ही सोहमची हाक ऐकून स्तब्ध झालेला समर भानावर आला आणि सोहमकडे धावला. त्याचवेळी समरचा हात पकडत देवयानी त्याला रोखत म्हणाली, “नाही समर. तुम्ही हे नाही थांबवू शकत...” काळ्या धुराचा तो ढग सोहमसहित त्या काळ्या वस्तूत समाविष्ट झाला आणि ती वस्तू निष्तेज झाली. त्या वस्तूकडे पाहत देवयानी म्हणाली, “ही काळी वस्तू म्हणजे त्याच तलवारीचा एक तुकडा आहे. यात अजूनही शक्ती आहे. आता तरी विशास ठेवा माझ्यावर. मी जे काही सांगितलं ती केवळ दंतकथा नाही. तर ते एक सत्य आहे. याच तुकड्याला सोहमचा स्पर्श झाला आणि सोहम त्याच काळ्या साम्राज्यात खेचला गेला जिथे दुष्कीर्तीचा आत्मा आहे...”

समरने एकवार तुकड्याकडे बघितलं आणि मग पुन्हा देवयानीकडे पाहू लागला. देवयानी म्हणाली, “अंधारात तुम्ही त्या लांडग्यांना नीट पाहिलं नाहीत. आकाराने मोठी असलेली ती जनावरं त्याच काळ्या शक्तीने प्रेरित होऊन या तुकड्याचं रक्षण करत होती. मी प्रयास करून हा तुकडा मिळवला पण त्यांना समजलं आणि ते माझ्या मागे लागले...” बोलता बोलता देवयानीने बाजूलाच पडलेल्या एका रेशमी कपड्याचा तुकडा उचलला आणि त्याच कपड्यात ती वस्तू उचलून गुंडाळून धरली. मग समरला तो हात दाखवत, दुसऱ्या हाताने अजून दोन रेशमी कपड्यांचे तुकडे अंगरख्यातून बाहेर काढत देवयानी म्हणाली, “हे तीन रेशमी कपडे त्या तीन महावीरांच्या अंगरख्यांचे आहेत ज्यांनी दुष्कीर्तीला काळ्या साम्राज्यात धाडलं आणि ते पवित्र देऊळ स्थापन केलं...

हे रेशमी कपडे त्या दुष्ट शक्तींना काबूत ठेऊ शकतात, पण थोड्याच अवधीसाठी. दुष्कीर्ती आणि त्या तीन महामानवांचं जेव्हा युद्ध सुरू झालं, तेव्हा अवकाशात ग्रह आणि नक्षत्रांची एक विशिष्ट स्थिती होती. दहा दिवस ते युद्ध सुरू राहिलं. प्रत्येक दिवशी दुष्कीर्तीची शक्ती वाढत होती. दहाव्या दिवशी जेव्हा सगळे ग्रह आणि नक्षत्र त्यांच्या परमोच्च स्थानावर होते, तेव्हा काही क्षणांसाठी दुष्कीर्तीची शक्ती कमी झाली. ही संधी साधून त्या महावीरांनी दुष्कीर्तीला काळ्या साम्राज्यात ढकललं. इतक्या वर्षानंतर काल रात्री ग्रह व नक्षत्रांची तीच स्थिती उत्पन्न झाली जी युद्ध सुरू होताना दिसली होती. आता दुष्कीर्तीची आसूरी काळी शक्ती वाढत जाणार. याचं प्रमाण आहे हा अंध:कार. काल पौर्णिमेची रात्र होती, पण अवकाशात चंद्र नव्हता. बलवान होत चाललेल्या काळ्या शक्तींनी चंद्रालाही झाकोळून टाकलं होतं. दहाव्या दिवशी जेव्हा सर्व ग्रह आणि नक्षत्र त्यांच्या परमोच्च स्थानावर असतील, त्या समयी त्या तलवारीचे तुकडे देवळात नेऊन ती तलवार नष्ट केली, तरच दुष्कीर्तीच्या आत्म्याला मुक्ती मिळेल. आजचा दिवसही गेला. आता माझ्याकडे केवळ आठ दिवस आहेत...” “माझ्याकडे नाही. आपल्याकडे...”

हे ऐकून देवयानीने समरकडे पाहिलं. समर पुढे म्हणाला, “हो देवयानी. मीसुद्धा तुझ्यासोबत येत आहे. त्या काळ्या शक्ती कितीही मोठ्या का असेनात, पण सोहम त्यांच्या कैदेत आहे. तो जिवंत आहे की नाही ते ठाऊक नाही. पण मी त्याला एकटं नाही सोडू शकत. आणि तुलाही माझ्या मदतीची गरज भासू शकते...” समारच्या म्हणण्याने देवयानीच्या मुखावर हलकीशी स्मितरेषा उमटली. दोघंही खूप थकले होते. तंबूजवळ पोहोचल्यावर दोघांनी विचार केला, थोडी विश्रांती घेऊन सकाळी पुढच्या प्रवासाला जावं. दोन प्रहर उलटले. सकाळ व्हायला काही क्षणच राहिले होते. एका किंकाळीने समरचे डोळे उघडले. तंबूतून बाहेर येत समरने पाहिलं, तर एक अस्वल आणि लांडगा यांच्यामध्ये, हातात एक लाकडाचा तुकडा घेऊन देवयानी उभी होती. ती जनावरं आकाराने मोठी आणि रूपाने अघोरी वाटत होती...


समरने त्याचं धनुष्य उचललं. आपला निशाणा साधत समरने चालवलेला बाण अस्वलाच्या माथ्यावर जाऊन लागला. अस्वल चित्कारलं आणि तात्काळ मरून पडलं. समरला वाटलं, अस्वलाची दशा पाहून लांडगा मागे हटेल. पण रागाने अधिकच लालबुंद होऊन लांडगा समरवर झेपावला. समरने लगेच दुसरा बाण चालवला आणि त्याच्या प्रहाराने लांडगा वाटेतच पडला. हे पाहून लाकडाचा तुकडा बाजूला टाकत देवयानी समरजवळ येत म्हणाली, “समर, तू माझी रक्षा केली. नाहीतर या जनावरांनी...” देवयानी बोलत होती आणि समरचं लक्ष तिच्या जखमांकडे गेलं. तो म्हणाला, “देवयानी, तू जखमी आहेस. मी लेप लाऊन देतो. मग पुढे जाऊ. दोघंही तंबूकडे परतायला लागले. तेवढ्यात अनेक चित्कारांनी वन दणाणून गेलं. दोघांनी वळून पाहिलं, तर अनेक अस्वलं आणि लांडगे वेगाने त्यांच्या दिशेने येत होते…

म्यानातून तलवार बाहेर काढत समर म्हणाला, “देवयानी, तू निघून जा इथून. तुझं पुढे जाणं आवश्यक आहे. मी यांना थोपवतो...” ती जनावरं जवळ आलीच होती, की उगवणाऱ्या भास्कराची किरणं समर आणि देवयानीवर पडली. त्याच क्षणी तीव्र प्रकाशाने समरचे डोळे दिपले. दुसऱ्याच क्षणाला समोरून येणाऱ्या जनावरांवर विजेच्या लकेरी पडल्या. क्षणार्धात ती सगळी जनावरं जागीच गतप्राण झाली. तो प्रखर प्रकाश आणि विजेच्या त्या लकेरी, देवयानी ऊभी होती तिथून येत होत्या. समरने देवयानीकडे पाहिलं, तर तिच्या सगळ्या जखमा गायब झाल्या होत्या. तिची काया, पांढऱ्याशुभ्र प्रकाशात घेरलेली होती आणि नुसत्या हातांनी देवयानी विजेच्या लकेरी उत्पन्न करत होती. सर्व जनवरांचा अंत केल्यावर देवयानी म्हणाली, “समर, माझ्याकडे त्या तीन महावीरांची शक्ती आहे. पण मानवी रूपात असल्याकारणाने पूर्ण दिवसात केवळ एकदाच मी या शक्तीचा प्रयोग शकते. मग माझी शक्ती लुप्त होते आणि सूर्योदयासोबत ती शक्ती मला परत प्राप्त होते...”

देवयानी बोलत असताना तिचा आवाज एखाद्या प्रतिध्वनीसारखा सर्वत्र घुमत होता. क्षणार्धात तिच्या भोवती असलेला पांढरा प्रकाश कमी झाला आणि देवयानी पुन्हा मानवी रूपात अलगद पृथ्वीवर येऊन उभी राहिली. हे सगळं पाहून समर आश्चर्यचकित झाला. देवयानी म्हणाली, “समर, तलवारीचा दुसरा तुकडा दक्षिण दिशेला पसरलेल्या मृत्यूच्या सागरात कुठेतरी आहे. संकटं अजून गढद होत जातील. तू अजूनही माझ्यासोबत आहेस...” या वेळी देवयानीचा आवाज सामान्य होता. आशेने भरलेल्या नजरेने देवयानी समरकडे पाहत होती. दोघांची नेत्रपल्लवी झाली. समरने स्मित केलं आणि होकारार्थी मान हलवली. देवयानीला हायसं वाटलं. ती म्हणाली, “मग अजून कुठलंही संकट येण्यापूर्वी आपल्याला तलवारीच्या दुसऱ्या तुकड्याला शोधायच्या मोहिमेवर निघायला हवं...”

दोघंही लवकरच जंगल पार करून किनाऱ्यापर्यंत पोहोचले. लांबवर पसरलेल्या काळ्या रेतीशिवाय काहीच दिसत नव्हतं तिथे. सर्वत्र पाहत समर म्हणाला, “आपण सागर किनारी आहोत. पण इथे किनाऱ्यासारखं काहीच दिसत नाही. वृक्ष नाहीत, पक्षी नाहीत, केवळ काळी वाळू दिसत आहे. अजब आहे...” बोलता बोलता त्याने देवयानीकडे पाहिलं. देवयानी टक लाऊन एका दिशेला पाहत होती. त्याच दिशेकडे बोट दाखवत ती म्हणाली, “समर, तिथे एक गुहा आहे. आपण तिथे जाऊ. कदाचित आपल्याला सहाय्य मिळेल...” समरने मान हलवून अनुमोदन दिलं आणि दोघंही गुहेकडे निघाले. काही क्षणातच दोघं गुहेच्या तोंडावर पोहोचली. दोघांनी आत डोकावलं, पण हवा आणि अंधाराशिवाय तिथे काहीच नव्हतं. समरने जवळच पडलेल्या खडकांचे तुकडे घासून ठिणग्या निर्माण केल्या. तिथेच पडलेल्या एका लाकडाच्या तुकड्यांवर त्या ठिणग्या टाकत अग्नी प्रज्वलित केला. अग्नीच्या त्या प्रकाशात दोघं गुहेत शिरली...

गुहेच्या अंती एका शिळेवर एक दगडी मूर्ती उभी होती. कोणी तपस्वी आहेत असंच वाटत होतं. मूर्तीच्या डोळ्यात भीती दिसत होती, आणि तिचा हात समोरच्या दिशेने होता. जणू ते कोणालातरी थांबण्याचा इशारा करत आहेत. देवयानी आणि समरने एकमेकांकडे पाहिलं आणि मूर्तीच्या जवळ पोहोचले. “कोण आहेत हे..? आणि इथे...” समर त्याचं बोलणं पूर्ण करेल त्याआधीच देवयानीचा त्या मूर्तीला स्पर्श झाला. मूर्तीला तडे गेले आणि अचानक तिचा विस्फोट झाला. त्या प्रकाशाने देवयानी आणि समर, दोघांचे डोळे दिपले. हळूहळू प्रकाश कमी झाला तसे दोघांनी डोळे उघडले. समोर पांढऱ्या प्रकाशात घेरलेले एक ऋषी उभे होते. देवयानीकडे पाहत त्यांनी हात जोडले आणि म्हणाले, “धन्यवाद देवी. आपल्या स्पर्शाने आज मी धन्य झालो. मी एकेकाळचा राजा आदित्यनाथ आहे. एका युद्धात माझ्या कुटुंबाचा समूळ नाश झाला. हे पाहून मी अत्यंत दु:खी झालो. सगळ्या सुख-सोयी मला नीरस वाटू लागल्या. या गुहेत येऊन माझ्या हातून घडलेल्या पापांसाठी आणि मोक्षप्राप्तीसाठी मी तपश्चर्या करू लागलो...

श्री विष्णूला माझी परीक्षा घ्यावीशी वाटली. त्या परीक्षेत मी विफल ठरलो आणि क्रोधीत होऊन त्यांनी मला अनंत काळासाठी या दगडी शिळेत राहण्याचा शाप दिला. मी त्यांची याचना केली, तेव्हा त्यांनी उ:शाप दिला. ते म्हणाले, मानवी शरीरात असलेल्या एखाद्या दैवी शक्तीचा स्पर्श जेव्हा या शिळेला होईल तेव्हाच मी शापमुक्त होईन आणि तोच क्षण माझ्या मोक्षप्राप्तीचा असेल. आज तुमच्या स्पर्शाने या दगडी शिळेतून माझी मुक्तता झाली. त्या कारणास्तव माझा आपल्याला धन्यवाद...” आशीर्वाद देत देवयानीने तिचा उजवा हात वर उचलला. मग समरकडे पाहत आदित्यनाथ म्हणाले, “मुला, तू ज्या यात्रेवर निघाला आहेस, तिथे तुला अजून मोठ्या संकटांना सामोरं जावं लागणार आहे. त्या संकटांचा सामना करण्यासाठी माझ्या आशीर्वादाचा स्वीकार कर...”

बोलता बोलता आदित्यनाथ ऋषींनी आपला हात आशीर्वादस्वरूप वर केला. हातातून एक प्रखर किरण निघाली आणि गुहेच्या बाहेर जात अदृश्य झाली. “किनाऱ्यावर माझा आशीर्वाद तुझी प्रतीक्षा करत आहे समर. मोठ्या शक्तीसोबत मोठ्या बलिदानाचं मोलही द्यावं लागतं. ईश्वर तुझं कल्याण करो. माझा तो आशीर्वाद ग्रहण कर...” आदित्यनाथ यांचं बोलणं संपलं आणि ते त्या पांढऱ्या प्रकाशात विलीन झाले. त्या जागेला नमस्कार करून समर आणि देवयानी गुहेच्या बाहेर आले. तटावर शस्त्रास्त्राने युक्त एक जहाज उभं होतं. समर आणि देवयानी त्या जहाजावर चढले. त्याच वेळी आकाशवाणी झाली आणि आदित्यनाथ म्हणाले, “समर, हे जहाज पाणी आणि हवा असं दोन्हीवर चालू शकतं. कल्याणमस्तू...” आकाशवाणी बंद झाली आणि जहाज सुरू झालं. दूरवर पसरलेल्या सागराकडे पाहत समर म्हणाला, “हा समुद्र इतकं शांत कसा..? लाटा नाहीत, पाण्याची गाज नाही..! पाण्याचा रंगसुद्धा काळा आहे..! असं का..?”

सागराकडे पाहत देवयानी म्हणाली, “ही खूप वर्षांपूर्वीची घटना आहे. हा समुद्र आधी असा नव्हता. त्या काळी तो तटही असा ओसाड नव्हता. मोठ-मोठाले वृक्ष, पक्षी यांनी तो सुशोभित असायचा. एक दिवस यमराज या सागरावरुन प्रवास करत होते. तेव्हा उसळणाऱ्या लाटांमुळे ते भिजले. यमराज क्रोधीत झाले आणि त्यांनी त्यांचा पाश लाटांवर आणि पाण्यावर मारला. तेव्हापासून हा सागर काळा पडला आणि सारे वृक्ष सुकून नष्ट झाले. सर्व पक्षी भयभीत झाले आणि त्यांनी स्थलांतर केलं. पाण्यातली जनावरं...” देवयानी बोलतच होती, की जहाज जोरजोरात हलू लागलं. आणि चारही बाजूंनी काळ्या धुरात गुरफटलेले पर्वताइतके लांब हात पाण्याबाहेर येऊ लागले. देवयानी आणि समर दोघंही स्तब्ध झाले. एका मोठ्या गर्जनेसह, लाल डोळ्याचा एक विशालकाय जीव बाहेर आला. समरने लगेच तलवार सरसावली आणि त्या हातांना कापू लागला. समरला पाहून देवयानीनेही एक भाला उचलला आणि त्या दानवाचा सामना करू लागली. त्या दानवाचा हात जिथे कापला जाई, तिथूनच नवीन हात पुन्हा बाहेर येइ. बराच वेळ हा सामना करताना समर म्हणाला, “हा दानव तर महाशक्तीशाली आहे. आपण किती काळ याचा सामना करू शकू...” दानवाच्या हाताला लांब सारत देवयानी म्हणाली, “समर, या दानवाचा डोळा बघ... त्याच्यावर निशाणा साध...” दानवाच्या डोळ्याकडे पाहताना समरची एकाग्रता भंग झाली आणि दानवाच्या हाताच्या तडाख्याने समर दूर फेकला गेला...


दुसरीकडे त्या दानवाच्या हाताच्या तडाख्याने देवयानीने पकडलेला भाला तिच्या हातून खाली पडला. तो हात देवयानीला पकडणारच होता त्याच वेळी काहीतरी वस्तू समर आणि देवयानीसमोर असलेल्या दानवाच्या दोन्ही हातांना जाऊन भिडली. एकाच वेळी दोन विस्फोट झाले आणि दानवाचे दोन्ही हात कापले गेले. दानवासोबतच देवयानी आणि समरने, ज्या दिशेने ती वस्तू आली त्या दिशेला पाहिलं. एक जहाज हवेत उडत होतं. त्यावर, एका हातात मशाल आणि दुसऱ्या हातात तलवार पकडून एक मुलगी उभी होती. तिच्या समोर एक भलीमोठी तोफ होती. त्या मुलीने तोफेला पुन्हा बत्ती दिली. पुन्हा विस्फोट झाले आणि त्या दानवाचे अजून दोन हात कापले गेले. दानवाने रागाने लाल होऊन त्या जहाजाकडे मोर्चा वळवला. दानवाचं लक्ष विचलित झालेलं पाहून देवयानी म्हणाली, “समर हाच मोक्याचा क्षण आहे...”

दानवाने एव्हाना राहिलेल्या हातांनी त्या मुलीच्या जहाजाला जखडायला सुरुवात केली होती. त्याच वेळी देवयानीचा इशारा समजून समरने धनुष्य उचलून निशाणा साधला आणि एकसाथ दोन बाण चालवले. दोन्ही बाणांनी योग्य ठिकाणी प्रहार केला. एक बाण त्या दानवाच्या डोळ्यात लागला आणि दुसरा त्याच्या मानेत घुसला. दानव जोरजोरात किंचाळू लागला. त्याच्या डोळ्यातून काळं रक्त वाहू लागलं. जहाजाला जखडूनच तो दानव पाण्याखाली जाऊ लागला. समर त्या मुलीकडे पाहून ओरडला, “दानवापासून वाच...” जहाज जखडलं जात असताना त्या मुलीने तलवार म्यान करून पाण्यात उडी घेतली. काही क्षणातच दानव जहाजासह पाण्यात नाहीसा झाला. समरने दोर फेकून त्या मुलीला आपल्या जहाजावर खेचून घेतलं. कृतज्ञतेच्या भावनेने त्या मुलीने समर आणि देवयानीकडे पाहिलं आणि मस्तक झुकवलं. देवयानी म्हणाली, “काही क्षणांपूर्वी इथे फक्त आमचंच जहाज होतं. आपण अचानक कशा आलात..? कोण आहात आपण..?”

ती मुलगी हसली आणि म्हणाली, “मी वीरा. सागरी चाचांचे सरदार संग्रामसिंह माझे वडील आहेत. बाबा कितीतरी काळापासून बाहेर होते. एक दिवस कबुतरामार्फत एक संदेश आला. त्यात लिहिलं होतं, एका जहाजाला लुटून परत येत असताना समुद्री तुफानात ते अडकले. त्यांचं जहाजही नष्ट झालं आणि बाबा या काळ्या समुद्रात फसले. मग त्यांच्या पाळीव कबुतरामार्फत त्यांनी हा संदेश पाठवला. आत्ता जे जहाज त्या दानवाने खेचून नेलं, ते माझ्या मनाच्या इशाऱ्याने चालायचं. तेच जहाज घेऊन मी इथे बाबांना शोधत होते. तुम्हाला संकटात पाहिलं म्हणून इथे आले. पण तुम्ही कोण आहात..? आणि इथे कसे..?” हे ऐकून समर बोलू लागला, “मी समर, आणि ही देवयानी. प्रकाशाच्या मंदिराची देवी...” आत्तापर्यंत घडलेल्या सर्व घटना समरने वीराला सांगितल्या आणि म्हणाला, “त्या तलवारीच्या दुसऱ्या भागाचा शोध घेण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत...”

समरचं बोलणं ऐकून वीरा म्हणाली, “खरंच अदभूत. पण या अथांग सागरात त्या तुकड्याला कुठे...” वीरा बोलतच होती, पाण्यावर तरंगणारं एक लाकडी फळकूट तिच्या नजरेस पडलं. वीराने ते फळकूट नीट पाहिलं आणि ओरडलीच, “ते... ते... बाबांच्या जहाजाचं फळकूट आहे ते. त्यावर आमचं निशाणसुद्धा आहे. म्हणजे बाबा पण इथेच कुठेतरी... बाबा... बाबा... मी वीरा... कुठे आहात तुम्ही...” वीराला दिलासा देत समर मागे वळला तेव्हा देवयानी एका दिशेला टक लाऊन पाहत होती. समर देवयानीजवळ गेला तेव्हा एका दिशेला बोट दाखवत देवयानी म्हणाली, “समर, तो बघ. तो लाल प्रकाश. याचा अर्थ, तलवारीचा दुसरा भाग तिथेच असेल. आणि वीरा, कदाचित तुझे बाबाही तिथे असू शकतील. तो प्रकाश पाण्याच्या आतून येत आहे. आपल्याला पाण्याखाली जायला हवं...” वीरा आणि समरने माना हलवल्या. समरने देवयानीकडून रेशमी कापड घेतलं आणि पाण्यात उडी मारली...

लाल प्रकाशाकडे जात समर पाण्यात अजून खोल जाऊ लागला. बराच वेळ पोहोल्यानंतर समर तळापर्यंत पोहोचला. पाणी आणि अंधार याशिवाय समरला काहीच जाणवत नव्हतं. त्याला एका दिशेने लाल प्रकाशाचा भास होत होता. त्या प्रकाशाच्या दिशेने समर पुढ जातच होता, की एका छोट्या माशाने त्याची वाट अडवली. त्या माशाला हटवायला समर जवळ गेला तेव्हा त्याला दिसलं, की माशाचे डोळे काळे होते आणि मासा काळ्या धुरात गुरफटलेला होता. हा मासासुद्धा त्या काळ्या विद्येच्या जाळ्यात अडकलेला आहे, हे समर समजून गेला. एकाएकी माशाचे डोळे लाल झाले आणि त्याचा आकार झपाट्याने वाढू लागला. समरने स्वत:ला चाचपडलं, पण त्याच्याकडे कोणतंही शस्त्र नव्हतं. आकाराने मोठा होणारा तो मासा हळू-हळू समरच्या दिशेने येऊ लागला...


कथेचा उर्वरित भाग लवकरच...

@ अनिकेत परशुराम आपटे.