पहिल्या भागात...
वर पोहोचून जहाजात चढताना समरने देवयानी आणि वीराच्या नजरांकडे पाहिलं. त्या नजरेत आशा आणि काळजी दोन्ही दिसत होते. अंगरख्यात ठेवलेलं रेशमी कापड बाहेर काढत समर म्हणाला, “हा आहे त्या तलवारीचा दुसरा भाग... वीरा, तुझ्या वडिलांचा काहीच ठाव नाही लागला...” समर बोलतच होता, की त्याच्या कमरेला लटकलेला खंजीर वीराच्या दृष्टीस पडला. त्वरेने तो खंजीर घेत वीरा म्हणाली, “बाबांचा खंजीर... हा माझ्या बाबांचा खंजीर आहे. हे पहा आमचं निशाण. समर, तुला हा खंजीर कुठे सापडला...” समरने एकवार देवयानीकडे पाहिलं. तिने मान हलवली तेव्हा समर म्हणाला, “हा खंजीर पाण्याच्या तळाशी रेतीत रुतला होता. जिथे हा खंजीर होता, तिथून जवळच हा तलवारीचा दुसरा तुकडा होता...” तलवारीच्या तुकड्याकडे पाहत देवयानी म्हणाली, “दोन शक्यता आहेत... कदाचित त्याच दानवाशी लढताना तुझे बाबा...... तेव्हाच तो खंजीर त्यांच्या हातून निसटला. नाहीतर त्यांना तलवारीचा हा दुसरा तुकडा दिसला असणार...
जर त्यांनी या तुडक्याला स्पर्श केला असेल, तर... वीरा, कदाचित तुझे वडील त्या महाकाय दानवाची शिकार झाले, अथवा ते त्याच्या काळ्या साम्राज्यात कैद झाले, जिथे समरचा भाऊ सोहम खेचला गेला...” हे ऐकून वीरा क्षितिजाकडे पाहू लागली. तिच्या डोळ्यात एकाच वेळी क्रोध आणि अश्रू दोन्ही होते. काही क्षणांनी डोळ्यातलं पाणी पुसत वीरा म्हणाली, “मीसुद्धा तुम्हा दोघांसोबत येत आहे. मला माहीत नाही माझे बाबा...... पण जर ते जीवित आहेत आणि त्या काळ्या जगात आहेत, तर त्यांना परत आणल्याशिवाय मला चैन पडणार नाही...” समर आणि देवयानीने एकमेकांकडे पाहिलं. पश्चिम दिशेला पाहत देवयानी म्हणाली, “काळ्या पर्वताची शिखरं याच दिशेला आहेत. तलवारीचा तिसरा भाग तिथेच आहे...” हे ऐकल्यावर जहाजाला नमस्कार करत समर म्हणाला, “कृपया आम्हाला पश्चिम दिशेला घेऊन जावे...” बघता बघता ते जहाज पाण्यावर हवेत उडालं आणि पश्चिमेकडे वळून पुढे जाऊ लागलं...
पश्चिम दिशेला जाताना मृत्यूच्या काळ्या सागराला ओलांडल्यावर अनेक वनं, नद्या आणि पर्वतशिखरं यांना पार करत जहाज हवेतून जात होतं. पश्चिम दिशेला पाहत समरकडे जात वीरा म्हणाली, “आठ दिवस उलटले. आपण अजूनही त्या काळ्या पर्वतापर्यंत पोहोचू शकलो नाही. कोण जाणे कधी आपण तिथे पोहोचू आणि कधी मी बाबांना परत भेटेन...” समर काही बोलायच्या आधीच देवयानी एका दिशेला इशारा करत म्हणाली, “ती पहा काळ्या पर्वताची शिखरं...” वीरा आणि समरने देवयानीने दाखवलेल्या दिशेला पाहिलं, तर अनेक पर्वत शिखरं तिथे दिसत होती. सभोवतालच्या वातावरणाशी विसंगत असलेली ती पर्वतशिखरं काळी ठिक्कर होती. जसं जहाज जवळ गेलं, सर्वांना दिसलं, की त्या परिसरात असलेली वृक्ष, भूमी, सर्वच काळं होतं. असं वाटत होतं, जणू कोणीतरी सर्वत्र काळी चादर पसरली आहे. तिघंही हे सर्व पाहतच होते, की अचानक एका पर्वत शिखरातून निघालेला लाल प्रकाशाचा एक किरण जहाजाला येऊन भिडला...
किरणाच्या तडाख्याने जहाजाचे तुकडे झाले. आता आपण खाली पडणार हे लक्षात येताच वीराने कमरेला बांधलेला दोरखंड सोडून त्याचा फास बनवला. समरने फास असलेली बाजू एका बाणात अडकवली आणि धनुष्याच्या सहाय्याने तो बाण एका झाडाच्या दिशेने सोडला. तो बाण झाडाच्या एका मजबूत फांदीला लागताना फासाने त्या फांदीला स्वत:त सामावले. दोरखंडाचं दुसरं टोक वीराच्या हातात होतं. तिने दोरखंड खेचला. फास त्या फांदीला आवळला गेला आणि त्या दोरखंडाच्या मदतीने देवयानी, समर आणि वीरा तिघंही अलगद जमिनीवर उतरले. खाली पोहोचताच तिघं सर्वत्र नजर फिरवू लागले. काळी जमीन, काळे वृक्ष पाहून समर आणि वीराला नवल वाटलं. तेव्हा देवयानी म्हणाली, “हे सर्व पूर्वी असं नव्हतं. देवराज इंद्राने पर्वताला शाप देताना वज्रप्रहार केला. त्यामुळे इथली सृष्टी काळी पडली...” देवयानी बोलतच होती, की, “मला मदत करा... कोणी आहे का...” या करूण आवाजाने तिघांचं लक्ष वेधलं...
त्यांनी पाहिलं, तर एक तरुण समोरच्या दिशेने त्यांच्याकडे धावत येत होता. लाल डोळे असलेले काही दगडी दानव आणि राक्षसी वृक्ष त्याचा पाठलाग करत होते. त्या वृक्षांच्या आणि दानवांच्या लाल डोळ्यांच्या वरच्या बाजूने लाल किरणं निघत होती, ज्याने आजूबाजूच्या वृक्षांची आणि जमिनीची राख होत होती. हे पाहून समरने धनुष्य-बाण सरसावला आणि वीराने एका हातात खंजीर तर दुसऱ्या हातात तलवार घेतली. आपल्या कक्षेत आपल्यावर समरने त्या दगडी दानवांवर बाण चालवायला सुरुवात केली. दुसरीकडे वीरा त्या राक्षसी वृक्षांच्या फांद्या तोडू लागली. ते दानव आणि वृक्ष थांबण्याचं नाव घेत नव्हते. थोड्याच वेळात तो तरुणही त्यांच्या जवळ आला. त्या दानवांनी आणि वृक्षांनी एव्हाना समर आणि वीरासह देवयानी आणि त्या तरुणालाही घेराव घातला होता. ते दानव आणि वृक्ष चौघांच्या जवळ येऊ लागले. तेव्हा देवयानीने तिचे हात जोडले...
पांढऱ्या प्रकाशाची एक लकेर देवयानीला घेराव घालू लागली आणि देवयानी हवेत तरंगू लागली. तिने डोळे उघडले. तिचे डोळे पूर्ण पांढरे-शुभ्र होते. देवयानीने तिच्या हातातून पांढरी प्रकाश किरणं सोडली. ती किरणं त्या दानव आणि वृक्षांवर आदळताच क्षणार्धात विस्फोट होऊन त्यांचं भस्म होऊ लागलं. जेव्हा सगळे दानव आणि वृक्ष भस्मसात झाले, तेव्हा देवयानीने पुन्हा डोळे बंद करून हात जोडले. तिच्या कांतीभोवती असलेला पांढऱ्या प्रकाशाचा घेराव कमी होत गेला. काही क्षणातच देवयानी पुन्हा सामान्य रूपात परिवर्तीत होऊन जमिनीवर उतरली. त्यावेळी ती स्वत: सांभाळू शकत नव्हती. देवयानीचा तोल गेला. ती पडणार इतक्यात त्या तरुणाने देवयानीला आधार दिला. तिला व्यवस्थित उभं करताना तो तरुण म्हणाला, “तुम्ही माझी मदत केलीत याबद्दल धन्यवाद. मी....” तो तरुण बोलतच होता, की देवयानीची नजर त्याच्या हातावर पडली...
त्या तरुणाच्या हातात एक काळी वस्तू होती. ती वस्तू पाहून देवयानी अवाक झाली आणि म्हणाली, “हा तर त्या दैवी तलवारीचा शेवटचा तुकडा आहे. या तुकड्याला तुम्ही हातात धरून ठेवलं आहे आणि अजून तुम्हाला काहीच झालं नाही...” त्या तरुणाने स्वत:च्या हाताकडे पाहिलं. मग समोर उभ्या तिघांकडे पाहत म्हणाला, “हो. हा त्याच तलवारीचा तिसरा आणि शेवटचा तुकडा आहे, ज्याला शोधत तुम्ही इथवर आला आहात. याला स्पर्श केल्यावरही मला काहीच कसं नाही झालं, तेही समजेल तुम्हाला. पण त्या आधी...” बोलता बोलता त्या तरुणाने तलवारीचा तुकडा धरलेली मूठ उघडली. तलवारीचा तो तुकडा वर जाऊन काही अंतरावर हवेत तरंगू लागला. मग त्या युवकाने त्यांचे दोन्ही हात त्या तिघांसमोर धरले. वीरा आणि समरजवळ असलेले तलवारीचे राहिलेले तुकडे त्या युवकाकडे आकर्षित होत, त्यांच्यापासून दूर जात, त्या तिसऱ्या तुकड्याच्या बाजूला जाऊन हवेत तरंगू लागले. त्या युवकाच्या चेहेऱ्यावर एक विद्रूप हसू होतं. त्याने जसं त्याच्या दोन्ही हातांना जोडलं, तसे त्या दैवी तलवारीचे तीनही तुकडे एकमेकांशी जोडले गेले...
दुसऱ्याच क्षणाला एक मोठी काळी तलवार हवेत तरंगत होती. काळ्या धुरात गुरफटलेल्या त्या तलवारीतून लाल ठिणग्या निघत होत्या. त्या तरुणाने त्याच्या हातात ती तलवार धरली आणि काळा धूर अजून गढद होऊन त्या युवकाला घेरू लागला. त्या युवकाच्या कायेचा रंग बदलला. तो निळा-जांभळा झाला होता. त्याचे डोळे जळत्या निखाऱ्यासारखे लाल झाले आणि तो तरुण गर्जना करत हसू लागला. हे सगळं इतक्या त्वरेने झालं, की देवयानी, समर आणि वीराला आकलनच करता आलं नाही. त्या युवकाने जसं बोलायला सुरुवात केली, तसे तिघं भानावर आले, “मी दुष्कीर्तीचा पुत्र काली आहे. जेव्हा ते तीन मूर्ख मानव पिताश्रींना काळ्या साम्राज्यात कैद करत होते, तेव्हा पिताश्रीनी या तलवारीतून एक किरण वर अवकाशात सोडला. तो प्रकाश किरण मी होतो. तो किरण इथे या पर्वतावर उभ्या एका वृक्षाच्या फळात शिरला आणि मी त्या फळात अडकून पडलो. ही तलवार तुटली आणि तिचा अग्रभागही इथेच येऊन पडला. काळ्या साम्राज्यात कैद असलेले माझे पिताश्री आणि इथे फळात अडकलेला मी, आम्ही दोघं विवश होतो. तो प्रकाश जर बाहेर पडला असता, तर मी लगेच हा तुकडा हस्तगत केला असता. पण मी स्वत:हून यातून बाहेर पडू शकणार नव्हतो...
फळाच्या आतून प्रकाश किरणं सोडून मी सुटण्याचा कयास करू लागलो. आज इतक्या वर्षांच्या प्रतीक्षेनंतर समरने चालवलेल्या बाणाने त्या फळाला छेद दिला आणि मी मुक्त झालो...” बोलता बोलता कालीने तलवार देवयानीच्या दिशेला वळवली. तलवारीतून निघालेल्या लाल किरणांनी देवयानीला घेराव घातला. समर आणि वीराने देवयानीकडे धाव घेतली, पण कालीने त्याच्या दुसऱ्या हाताने लाल किरणं त्या दोघांवर सोडून त्यांना दूर फेकलं. तिथे देवयानी एखाद्या चुंबकासारखी कालीकडे खेचली जाऊ लागली. समर आणि वीराकडे पाहत देवयानी म्हणाली, “तुम्हा दोघांना आता हे सगळं थांबवावं लागेल. आजच्या दिवसभरासाठी माझी शक्ती लुप्त झाली आहे. आणि आज दहावा दिवस आहे. आजच त्या दुष्कीर्तीचा अंत व्हायला हवा...” देवयानी कालीसमोर येताच त्याने तलवारीच्या सहाय्याने काळ्या साम्राज्याचे दरवाजे उघडले. मग देवयानीला जखडलेल्या लाल किरणांना पकडून देवयानीसमवेत काली त्या काळ्या साम्राज्यात प्रविष्ट झाला...
सर्व काही इतक्या लवकर झालं, की समर आणि वीरा काहीच करू शकले नाहीत. अचंभित होऊन वीरा म्हणाली, “कालीला तलवार तर मिळाली होती, मग तो देवयानीला का घेऊन गेला..?? काय रहस्य असू शकतं या मागे..?? याला उत्तर म्हणून समर काही बोलेल इतक्यात, “मोठ्या शक्तीसोबत मोठ्या बलिदानाचं मोलही द्यावं लागतं...” हे ऋषी आदित्यनाथ यांनी गुहेत उच्चारलेले शब्द त्याला आठवले. समर म्हणाला, “वीरा, आज दहावा दिवस आहे. आज त्या दुष्कीर्तीला त्याच्या सर्व शक्ती प्राप्त होतील. पण बहुदा त्यासाठी त्याला बलिदान द्यावं लागेल. अर्थात बळी द्यावं लागेल. देवयानीला यासाठी तर नाही... वीरा, आपल्याला देवयानीच्या मदतीसाठी त्या काळ्या साम्राज्यात जायला हवं...” वीराने होकारार्थी मान हलवली आणि दोघंही त्या द्वाराकडे वळले, जे कालीने उघडलं होतं. ते द्वार हळू हळू बंद होत होतं. हे पाहून दोघंही द्वाराच्या दिशेने पळू लागले. इतक्यात त्यांच्या आजू-बाजूला स्फोट होऊ लागले...
धावताना दोघांनी पाहिलं, तर दगडी दानव आणि राक्षसी वृक्षांची सेना, चहू बाजूंनी त्यांच्यावर चालून येत होती. वीरा म्हणाली, “हे सैन्य आपल्याला आत जाण्यापासून रोखण्यासाठी येत आहे. यांच्याशी आपण लढत राहिलो तर ते द्वार बंद होईल आणि आपण देवयानीपर्यंत पोहोचू शकणार नाही...” समरने जरा विचार केला. मग त्याने आपल्या भात्यातून काही बाण बाहेर काढले. अंगावरच्या कापडातून काही हिस्सा फाडला आणि त्या बाणांना गुंडाळला. वीरा समजून गेली. तिने पळता पळताच बाजूचे दोन दगड उचलले. ते एकमेकांवर घासून ठिणग्या निर्माण केल्या आणि त्या ठिणग्या बाणांवर बांधलेल्या कापडांवर घातल्या. जळत्या मशालींप्रमाणे दिसणाऱ्या त्या बाणांना समरने वेळ न दवडता द्वाराच्या जवळ पोहोचलेल्या दानवांवर आणि वृक्षांवर सोडलं. विस्फोट झाले आणि द्वाराच्या जवळ पोहोचलेलं सैन्य क्षणार्धात तुकड्यांमध्ये विखुरलं गेलं. हीच संधी साधून समर आणि वीराने बंद होणाऱ्या द्वारातून काळ्या साम्राज्यात उद्या घेतल्या...
समर बोलतच होता, की या आवाजाने समर आणि वीरा दोघंही चपापले. आवाज ज्या दिशेने आला त्या दिशेला दोघांनी पाहिलं, तर समोर काली उभा होता. कालीला पाहताच वीरा आणि समर दोघांनी आपापल्या तलवारी बाहेर काढत आक्रामक पावित्रा घेतला. समरने विचारलं, “काय आहे हे सगळं..?? देवयानी कुठे आहे..??” काली हसत म्हणाला, “रसातळ किंवा ज्याला नरक म्हणतात, त्या पाताळाच्या आणि धरतीच्या मध्ये आहे हे काळं साम्राज्य. या शापित काळ्या साम्राज्याचे पालक आहेत माझे पिताश्री, महान राजा दुष्कीर्ती. माझ्या मागे त्या टेकड्या आहेत ना, त्या टेकड्यांच्या मधोमध पिताश्रींनी परकाया प्रवेशाच्या विद्येचे अनुष्ठान केले आहे. देवयानीसुद्धा मूर्छित अवस्थेत तिथेच आहे. ही विद्या संपन्न होताच पिताश्री देवयानीच्या शरीरात प्रवेश करतील आणि अमर होतील. हा...हा...हा...” काली अजून जोरात हसू लागला. वीरा आणि समरने तलवारी सरसावत कालीवर धाऊन आले...
दोघांना चाल करून येताना पाहून काली हसायचा थांबला. पाहता पाहता त्याचे डोळे लाल झाले आणि त्याच्या दोन्हीही रिकाम्या हातात एकेक शस्त्र आलं. तलवार, भाला, धनुष्य-बाण, खंजीर या सर्वांपेक्षा वेगळी असलेली ही शस्त्र टोकदार आणि मोठ-मोठ्या काटयांनी भरलेली होती. वीरा आणि समर कालीवर वार करत होते आणि काली दोघांचेही वार लीलया परतवत होता. बराच वेळ हे युद्ध चाललं. समर आणि वीरा दोघंही घायाळ झाले होतं. त्यांना झालेल्या जखमांमधून रक्त येऊ लागलं होतं. हसत हसत काली म्हणाला, “हा...हा...हा... स्वीकार करा तुमचा पराजय, तुम्ही क्षूद्र मानव काहीएक करू शकणार नाही. त्या विद्येला आता सुरुवात होणारच आहे. हा...हा...हा...” समर आणि वीराने एकमेकांकडे पाहिलं. दोघांची नेत्रपल्लवी झाली आणि दोघांनी एकत्र कालीवर वार केले. आपली पूर्ण ताकद पणाला लाऊन दोघांनी कालीची शस्त्र त्याच्या हातावेगळी केली. मग तलवारींचे सपासप वार करत दोघांनी कालीला घायाळ केलं. त्याच्या जखमांमधून काळं रक्त वाहू लागलं. कालीला वेदना होऊ लागल्या आणि काही क्षणातच त्याच्या शरीराचा स्फोट झाला. काली संपला हे पाहून समर आणि वीरा दोघं त्या टेकड्यांच्या दिशेने धावले...
टेकडी चढून दोघं माथ्यावर पोहोचले. त्यांनी सर्वत्र नजर फिरवली. टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या पठारावर अनेक ठिकाणी पालवीरहित काळी वृक्ष जळताना दिसत होती. कुठे लाव्याची नदी वाहत होती आणि त्यात स्फोट होत होते. पठाराच्या शेवटी एका दगडी शिळेवर साखळदंडात जखडलेली देवयानी त्यांना दिसली. देवयानी स्वत:ला सोडवण्याचा प्रयत्न करत होती. शिळेच्या मागे काळ्या धुरात गुरफटलेली, लाल डोळे असलेली आणि हातात ती काळी तलवार घेतलेली एक आकृती नाचत होती. तिथून जवळच दगडी दानवांची एक तुकडी सज्ज होती. समर आणि वीराने एकमेकांकडे पाहिलं. समरने भात्यातून बाण काढत धनुष्यावर चढवले. वीराने अग्नी उत्पन्न करत तो अग्नी बाणांवर टाकला. समरने ते अग्नीबाण क्षणार्धात त्या दानवांच्या तुकडीवर चालवले. दोन-तीन विस्फोट झाले आणि ती दानवांची तुकडी ठिकऱ्या ठिकऱ्या होऊन सर्वत्र विखुरली. देवयानी आणि त्या आकृतीने समोर पाहिलं तर समर आणि वीरा टेकडी उतरताना दिसत होते...
त्या दोघांना पाहून देवयानी म्हणाली, “दुष्कीर्ती, थांबव तुझा हा खेळ. तू कधीच विजयी होऊ शकणार नाहीस. कधीच अमरत्व प्राप्त करू शकणार नाहीस...” हे ऐकून ती आकृती हसू लागली आणि तिचा आवाज सर्वत्र घुमू लागलं, “हा...हा...हा... कोण थांबवणार मला... ही विद्या संपन्न होताच तुझं हे देवलोकाचं पवित्र शरीर मला प्राप्त होईल, आणि मी अधिक शक्तीशाली होईन. कीटाकांसारखी भासणारी ही माणसं काय वाकडं करू शकतील माझं. हा...हा...हा...” बोलता बोलता दुष्कीर्तीने तलवारीचं टोक एका दिशेला वळवलं. तलवारीतून निघालेल्या लाल किरणांनी प्रचंड ताकदीची महाकाय जनावरं आणि दानव यांची सेना निर्माण केली. ती सेना, वीरा आणि समरच्या दिशेने जाऊ लागली. त्या सैन्याशी दोन हात करत समर आणि वीरा पुढे सरकत होते. सर्वांचा नायनाट करून वीरा आणि समर पुढे आले आणि, “वीरा, माझी मुलगी...” या आवाजाने दोघं थांबली. वीराने वळून पाहिलं, तर तिचे वडील, म्हणजेच सरदार संग्रामसिंह उभे होते...
आपल्या वडिलांना समोर पाहून वीराने धावत जाऊन त्यांना आलिंगन दिलं. समर त्यांच्याकडे वळलाच होता, की त्याच्या खांद्यावरही एक हात आला. समर वळला तर मागे सोहम उभा होता. सोहम म्हणाला, “दादा, माझ्यासाठी आलास ना इथवर... मी तर इथे आहे. मग तू त्या दिशेला का जात होतास... आता आपली भेट झाली आहे. चल, इथून बाहेर जाऊ...” तिथे आपल्या वडिलांच्या मिठीत सामावलेली वीरा त्वरेने मागे झाली आणि म्हणाली, “बाबा, तुम्ही इतके थंडं का जाणवत आहात...” सरदार संग्रामसिंहांच्या चेहेऱ्यावर स्मित आलं. वीराचा हात पकडत ते म्हणाले, “वीरा इथून बाहेर जाऊ आपण. आता इथे थांबण्याची काहीच आवश्यकता नाही...” वीराला त्यांचा स्पर्शही खूपच थंडं वाटला. ती स्वत:ला सोडवू लागली. वीरा तिचा हात सोडवण्याचा जितका प्रयत्न करत होती, तितकीच सरदार संग्रामसिंहांची पकड अधिक बळकट होत होती. त्याच वेळी फक्त पकडलेल्या हाताने सरदार संग्रामसिंहांनी वीराला भिरकावलं आणि वीरा दूर जाऊन जमीनीवर पडली...
दुसरीकडे समरने जेव्हा सोहमचा हात आपल्या हातात घेतला, तेव्हा तो समरला थंडं जाणवला. समरने त्वरित आपला हात सोडवला आणि स्वत:च्या हाताकडे पाहून मग सोहमकडे पाहत समर म्हणाला, “सोहम, तू बोलतोस हे... इतरांच्या सहाय्यासाठी तू नेहमीच तत्पर असतोस. आणि इथे...” यावर सोहम पुन्हा रागाने म्हणाला, “समर, आधी चल इथून. तुला माझ्यासोबत यावंच लागेल...” सोहमच्या या व्यक्तव्याने समर अवाक झाला आणि मागे जाऊ लागला. त्याचवेळी सोहमने समरच्या छातीवर लाथ मारली. तो तडाखा इतका जबरदस्त होता, की समर हवेत उडून लांब फेकला गेला. वीरा आणि समर एकमेकांपासून जवळच पडले होते. एकमेकांना आधार देत दोघं उभे राहिले. समर म्हणाला, “वीरा आपले आप्त आता आपले नाही राहिले. हे दोघं कदाचित या दुष्कीर्तीच्या काळ्या विश्वाचाच भाग झाले आहेत...” समरच्या म्हणण्याला दुजोरा देत वीरा म्हणाली, “तुझं म्हणणं योग्य असेलही समर, पण तरीही मी माझ्या बाबांवर शस्त्र कसं चालवू...” समरला वीराची मन:स्थिती समजली. कारण या घडीला समरच्या मनातही सोहमबाबत हाच प्रश्न उभा ठाकला होता. समर म्हणाला, “तू म्हणतेस ते अगदी योग्य आहे वीरा. यावर एकच उपाय, मी तुझ्या वडिलांचा सामना करतो, आणि तू सोहमला सांभाळ...” दोघंही तलवारी सरसावत एकमेकांच्या पाठीला पाठ लाऊन लढायला सज्ज झाले...
पाहता पाहता सोहम आणि सरदार संग्रामसिंह, दोघांचे डोळे लाल झाले आणि शरीरं निळी-जांभळी पडली. दोघांनी समर आणि वीरावर हल्ला चढवला. समर आणि वीराने त्यांच्या पूर्ण ताकदीनिशी सरदार संग्रामसिंह आणि सोहमचा सामना केला. अखेर वीराने तिच्या तलवारीने सोहमचा शिरच्छेद केला आणि समरने त्याची तलवार सरदार संग्रामसिंहांच्या छातीच्या आर-पार केली. सोहम आणि सरदार संग्रामसिंह हा हा म्हणता भस्मसाद झाले. तिथे राजा दुष्कीर्तीने हे पाहिलं आणि त्याला राग अनावर झाला. त्याने पुन्हा तलवार चालवली. तलवारीतून निघालेल्या लाल किरणांमधून भयंकर जनावरं आणि दानवांचं प्रचंड मोठं सैन्य तयार झालं. ते सैन्य अत्यंत वेगाने समर आणि वीराच्या रोखाने सरकू लागलं. हे पाहून समरने तलवार म्यान केली आणि भात्यातून बाण काढून ते जमीनीवर पसरलेल्या लाव्यात बुडवले. बाणांनी पेट घेताच समरने धनुष्याच्या सहाय्याने ते बाण त्या सैन्यावर चालवले. जागोजागी स्फोट होऊ लागले. ती जनावरं जळू लागली. दानवांच्या ठिकऱ्या उडू लागल्या. थोड्याच वेळात समरच्या भात्यातले सगळे बाण संपले. पण ते सैन्य अजून शिल्लक होतं. तेव्हा समर आणि वीराने पुन्हा तलवारी उपसल्या आणि त्या राक्षसी सेनेवर हल्ला चढवला...
कुठे जनावरांच्या पंजांवर वार होत होते तर कुठे त्या दानवांच्या माना छाटल्या जात होत्या. वीरा आणि समर लढत होते पण ते सैन्य कमी होण्याचं नाव घेत नव्हतं. त्याच वेळी मोठ्या आवाजानिशी ती दगडी शिळा भंग पावली आणि साखळदंडात जखडलेली देवयानी मुक्त होऊन हवेत तरंगू लागली. देवयानी हवेत तरंगत होती, पण तिचं शरीर निष्तेज होतं आणि जमीनीला समांतर होतं. समर, वीरा आणि त्या सैन्याने आवाजाच्या दिशेने पाहिलं. दुष्कीर्तीने ती दैवी तलवार देवयानीच्या हाती सोपवली आणि गर्जना करून हसत तो देवयानीच्या शरीरात प्रविष्ट झाला. चहू बाजूंना कंपनं झाली आणि देवयानीचं शरीर निळं-जांभळं पडलं. काही क्षणातच देवयानीच्या निष्तेज शरीरात चेतना आली आणि डोळे उघडून ती हवेतच उभी राहिली...
तिचे निळे डोळे बदलून ती जागा लाल भडक आग ओकणाऱ्या डोळ्यांनी घेतली होती. तिने हातातली तलवार साखळदंडांवर ठेवतातच सर्व साखळदंड वितळून गेले. देवयानीच्या मुखातून दुष्कीर्तीचा आवाज येऊ लागला, “हा...हा...हा... मी आता अनंत काळासाठी अमर झालो आहे. क्षूद्र मनुष्य प्राण्यांनो, या देवयानीची दैवी शक्ती प्राप्त करून आता मी समस्त ब्रह्मांडाला काबीज करेन... हा...हा...हा...” देवयानीच्या आत प्रवेश केलेल्या दुष्कीर्तीने देवयानीचा हात पुढे केला. त्यासरशी थांबलेलं ते राक्षसी सैन्य पुन्हा चाल करून आलं आणि दुष्कीर्ती मंत्र म्हणू लागला. त्याच वेळी एक प्रखर पांढरा प्रकाश देवयानीच्या माथ्यातून निघाला. त्या प्रकाशाने त्या राक्षसी सैन्याला एकाच जागी गोठवलं. गोठलेलं ते सैन्य पाहून वीरा आणि समर, काय झालं याचा विचारच करत होते, की देवयानीच्या छातीवर त्यांना अजून एक प्रखर प्रकाश दिसला. दोघांनी तिथे पाहिलं, तर तिथे देवयानीचा चेहेरा दिसत होता. देवयानी म्हणाली, “समर, माझ्या शक्ती पूर्ण ग्रहण करण्यासाठी हा दुराचारी मंत्रोच्चारण करत आहे. माझ्या शक्तींनी माझ्या पूर्ण शरीराचा पूर्ण ताबा त्याला दिलेला नाही. या शरीरात माझा काही अंश अजूनही शिल्लक आहे. हे युद्ध रोखण्यासाठी एकमेव उपाय आहे दुष्कीर्तीचा अंत, जो त्याच्याच त्या दैवी तलवारीने होऊ शकतो. त्वरा कर समर. या तलवारीला माझ्या हातून हिसकावून घे...”
स्तब्ध झालेला काळ पुन्हा पूर्ववत झाला. राक्षसी सैन्याची एक तुकडी जशी जवळ आली, समरने त्याच क्षणी तलवार चालवली. तलवारीच्या तडाख्याने ती तुकडी क्षणार्धात भस्मसाद झाली. हे पाहताच समरने तलवारीचे वार करायला सुरुवात केली. काही वेळातच संपूर्ण सैन्याचं भस्म झालं. हे पाहून दुष्कीर्ती अधिकच क्रोधीत झाला आणि म्हणाला, “क्षूद्र मानवा, माझी तलवार हस्तगत करून हे सैन्य संपवलंस म्हणजे तू विजयी झालास असं वाटतंय का तुला... मी आत्ताही अमर आहे, अजिंक्य आहे... हा...हा...हा...” इतकं बोलून दुष्कीर्ती पुन्हा मंत्रोच्चार करू लागला. त्याचवेळी देवयानीच्या छातीवर पांढरा प्रकाश दिसू लागला. त्यातून देवयानी म्हणाली, “समर, हीच ती वेळ, हाच तो क्षण. अवकाशातले ग्रह आणि नक्षत्र आपापल्या परमोच्च स्थानी पोहोचले आहेत. दुष्कीर्तीची तलवारी तुझ्या हाती आहे. कर वार... जाऊ देत ते पातं माझ्या छातीच्या आर-पार...” समर नकारार्थी मान हलवू लागला आणि मागे सरकू लागला. देवयानी पुन्हा म्हणाली, “समर, आठव ऋषी आदित्यनाथांचं ते वाक्य...”
दुविधेत सापडलेल्या समरने डोळे बंद केले आणि ऋषी आदित्यनाथांचं वाक्य त्याच्या कानात घुमू लागलं, “मोठ्या शक्तीसोबत मोठ्या बलिदानाचं मोलही द्यावं लागतं...” समरने डोळे उघडले. त्याने चारही बाजूंना नजर फिरवली आणि, “दुष्कीर्तीऽऽऽऽ...” असं ओरडत तलवारीसोबतच समरने हवेत उडी घेतली. दुष्कीर्तीचा मंत्रोच्चार सुरूच होता, की समरने ती तलवार देवयानीच्या छातीत खुपसली. मग पूर्ण ताकदीसह तलवार देवयानीच्या शरीराच्या आर-पार केली. विजेचा प्रचंड कडकडाट झाला आणि धरती कापू लागली. तलवारीसह देवयानीचं शरीर हवेत तरंगू लागलं आणि काळा धूर तिच्या शरीरातून निघून तलवारीत सामावला. तलवारीतून प्रखर निळा प्रकाश निघाला ज्यामुळे समर आणि वीरा दोघांचेही डोळे दिपले. दोघांनी हळूहळू डोळे उघडले. अंधार नष्ट झाला होता. चोहीकडे कोरीव काम केलेल्या सांगमरवरी भिंती होत्या आणि पणत्या ज्योतीर्मय झाल्या होत्या...
एका पलंगावर असलेल्या मखमली गादीवर देवयानी पाहुडली होती आणि बाजूलाच निळ्या प्रकाश किरणात गुरफटलेली ती दैवी तलवार हवेत तरंगत होती. समर आणि वीराने आधी एकमेकांकडे पाहून मग चारही बाजूंना नजर फिरवली. देवयानीला निपचित पडलेली पाहून साश्रू नायनांनी दोघं तिच्याजवळ पोहोचले. वीरा देवयानीला स्पर्श करणारच होती इतक्यात एक आवाज तिथे घुमू लागला, “धीर धरा पुत्रांनो. तुम्ही आता प्रकाशाच्या मंदिरात आहात. सर्वकाही क्षेम होईल...” वीरा आणि समरने आवाजाच्या दिशेने पाहिलं, तर तलवारीच्या बाजूलाच तीन तेजस्वी पुरुष उभे होते. तिघं एकत्र म्हणाले, “तुम्हा दोघांनी दाखवलेल्या अतुलनीय साहसामुळे आज दुष्कीर्तीचा अंत होऊ शकला. या युद्धात तुम्ही तुमच्या आप्तजनांना हरवून बसलात हे खरं आहे, पण सर्वात मोठं बलिदान दिलं या देवयानीने. दुर्जनांच्या विनाशासाठी तिने स्वत:च्या प्राणांची आहुती दिली. आणि म्हणूनच...” बोलता बोलता तिघांनी आपापला हात देवयानीच्या दिशेने केला. काही क्षणातच देवयानीने डोळे उघडले आणि ती उठून हात जोडून उभी राहिली...
देवयानी जिवंत आहे हे पाहून समर आणि वीरा दोघांनाही आनंद झाला. देवयानीकडे वळत ते तीनही महापुरुष म्हणाले, “देवयानी, मृत्यूलोकातलं तुझं कार्य पूर्ण झालं. आता तू देवलोकाकडे प्रस्थान कर. वीरा, तू एक सागरी लुटारू आहेस, पण दुष्कीर्तीसोबतच्या युद्धात तू तुझी सर्व पापं धुतली आहेस. तू आता एका राज्याची महाराणी होशील. तुझे इतर लुटारू साथीदार तुझी प्रजा आणि तुझे मंत्रीगण बनून तुझ्या आधीन असतील. समर, तू जो असामान्य पराक्रम दाखवला आहेस, त्यावर आम्ही प्रसन्न आहोत. मनाच्या शक्तीनुसार चालणारी ही तलवार दुष्कीर्तीच्या स्पर्शाने अपवित्र झाली होती. पण तुझा स्पर्श होताच तिला तिचं मूळ स्वरूप प्राप्त झालं. कारण तुझं मन शुद्ध आहे, निर्मळ आहे. म्हणूनच ही दिव्य तलवार तुला आम्ही भेट देत आहोत. ही तलवार जोवर तुझ्याजवळ असेल, तोवर तू अपराजित राहशील. कल्याणमस्तु...”
इतकं बोलून ते तीनही महापुरुष लुप्त झाले. समर आणि वीराकडे पाहत देवयांनी म्हणाली, “तुम्ही दोघांनी मला मोलाचं सहाय्य केलंत. त्याबद्दल मी तुमची आभारी आहे. वीरा, उत्तरेला स्थित श्वेतांबर नावाचं राज्य आपल्या महाराणीची प्रतीक्षा करत आहे. योग्य रीतीने राज्यकारभार कर. समर, ज्या वनात आपली भेट झाली, तू त्या वनाचा अधिपती होशील. सर्व पशूपक्ष्यांची आणि वृक्ष-वल्लरींची भाषा तुला अवगत होईल...” देवयानी बोलत असतानाच पांढराशुभ्र प्रकाश देवयानीला गुरफटू लागला. हे पाहताच देवयानी म्हणाली, “माझं इथलं कार्य संपन्न झालं. आता मला प्रभूचरणी लीन व्हायला हवं. पण मी मूर्तीरूपाने याच मंदिरात विराजमान असेन...” प्रकाश वाढत गेला आणि पाहता पाहता देवयानी अंतर्धान पावली. जिथे देवयानी उभी होती, तिथे आता एक संगमरावरी सुंदर मूर्ती प्रकट झाली आणि पूर्ण देऊळ प्रकाशात न्हाऊन निघालं...”
समाप्त.
@ अनिकेत परशुराम आपटे.


No comments:
Post a Comment