मृत्यूची हाक...
रात्रीची वेळ होती. जोरदार पाऊस, सोसाट्याचा
वारा, विजांचा कडकडाट यांनी थैमान घातलं होतं. निर्जन रस्त्यावरून गाडी भरधाव
वेगाने पळत होती. “आशू, अरे जरा हळू. इतक्यातच वर पोहोचवतो का काय आम्हाला.” विकी
म्हणाला. “नाहीतर काय... रेस लावली आहेस की काय रे...” विकीच्या म्हणण्याला दुजोरा
देत राघवने सूर काढला. “अरे हम है तो क्या डर है...” आशू फुशारक्या मारत होता. “यस
माय बेबी... तुम ही तो हो. ए तुम्ही टेंशन नका रे घेऊ. माझा आशू आहे ना...” बाजूला
बसलेल्या अंजूने आशूची री ओढली. “ए, जरा आजूबाजूला बघा की... घरं नाहीत, वस्ती नाही, जनावरंसुद्धा
दिसत नाहीत. हा वादळ-वारा नसेल तेव्हा भयाण शांतता असणार इथे. तरी मी तुम्हाला
सांगत होते, लवकर निघू. मागच्या गावाजवळच्या लॉजमध्ये राहू पण माझं कोणी ऐकेल तर
ना...” रश्मी बोलती झाली. राघव हसत म्हणाला, “ए भित्री भागुबाई... आम्ही आहोत ना
तुझ्यासोबत... बरं... काही झालंच तर तुलाच पुढे करू. बस... खुश...” सर्व हसले आणि
रश्मी अजून रुसली. असाच हसत-खेळत प्रवास चालला होता आणि...
फट.......सससससससससससससससस...
गाडीचं टायर पंचर झालं. गाडी out of control
होऊ लागली. रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर
गाडी आदळणार होती. “आशू.... ब्रेक मा....र.....” सर्व एका सुरात किंचाळली. आशूने
करकचून ब्रेक मारला. कर्कश आवाज करत गाडी झाडापासून अर्ध्या फुटावर येऊन थांबली.
“आशू, मी सांगत होतो ना स्पीड कमी कर. बघ काय झालं.” विकी म्हणाला. अंजूने आशूला
घट्ट धरलं होतं. म्हणाली, “आता काय करायचं रे... पावसात टायर कसं बदलणार...” “अरे
पाऊस सोडा. स्टेप्नी कुठे आहे गाडीत... आता बसा असेच पाऊस थांबेपर्यंत.” राघव हे
बोलतच होता की खिडकीबाहेर त्याला एक प्रकाशाचा ठिपका दिसला. “ए, ते बघा काय...”
त्याने सर्वाना खुणावले. माळावरून एक माणूस हातात काठी, पावसापासून वाचण्यासाठी
डोक्यावर प्लास्टिक घेऊन हळू हळू रस्त्याकडे येत होता. “काका..... अहो काका.....
इकडे इकडे...” आशू आणि विकी खिडकीबाहेर हात हलवत एका सुरात ओरडले. त्या माणसाने
पाहिलं आणि तो गाडीजवळ आला. म्हणाला, “काय रं पोरांनो, आवऱ्या पावसाचं रातच्या
टायमाला हितं काय करतायसा...” “काका आम्ही ट्रीपला निघालोत. रस्ता चुकलोय. आणि आता
तर गाडीही बंद पडली आहे. अशा वातावरणात काही सुचत नाहीये. आम्हाला मदत करता का...
जवळपास कुठे रहायची सोय होईल का...” रश्मी म्हणाली. तो माणूस काही बोलणार इतक्यात,
“Oh
boy… oasis in desert, ए, तिकडे बघा
रे...” विकीने दाखवलेल्या दिशेला सर्वांनी पाहिलं तर, विजांच्या प्रकाशात झाडीमागे
लपलेला एक बंगला दिसत होता...
सर्वजण त्या बंगल्याकडे पाहत होते. “पोरांनो,
माजं ऐका. थितं जाऊ नगासा... त्यो वाडा झपाटलेला हाय. आम्मी समदी त्याला भूतोबाचा
वाडा म्हनत्यात... थितं आजपातूर कुनीसुदिक गेलं न्हाई... आनी गेलं आसल तर
पुन्यांदा दिसलं न्हाई... ह्यो वाडा असा दिसत न्हाई कदी... आज त्यो दिसतुया...
म्हंजी... आज... न्हाई न्हाई... तुम्मी काय बी करा... पर थितं जाऊ नगासा... जाऊ
नगासा...” तो माणूस बोलता झाला. सर्वांनी पाहिलं तर त्याच्या डोळ्यात भीती दाटली
होती. तो मागे सरकला. त्याच्या हातातली काठी आणि डोक्यावरचं प्लास्टिक खाली पडले.
आलेल्या दिशेने तो माणूस पळत सुटला. पाचही जण तो माणूस दिसेनासा होईपर्यंत त्याच्याकडे पाहत राहिले. “काय
पण नग असतात एकेक... म्हणे भुताचा वाडा...” विकी म्हणाला. “नाहीतर काय... उगाच
अफवा पसरवायची... चला रे आपण तिथे जाऊ...” विकीला दुजोरा देत राघव म्हणाला. पण
रश्मीच्या मनात वेगळंच काहीतरी आलं, “अरे पण तो माणूस जे म्हणत होता ते खरं असेल
तर... नको नको... आपण इथेच बसू...” रश्मीच्या या बोलण्यावर तिच्या टपलीत मारत राघव
म्हणाला, “अगं राणी, कोणीतरी काहीतरी सांगितलं म्हणून आपण रात्रभर असंच बसून
रहायचं का... त्यापेक्षा त्या वाड्यावर जाऊ. काही मदत मिळते का ते पाहू... काय रे
तुम्ही काय म्हणताय...” सर्वांनी माना डोलावल्या. फुशारकीबहाद्दर आशू तयारच होता.
म्हणाला, “आणि तुम्ही मुली कशाला काळजी करताय... आम्ही तिघं आहोत की तुमचे body guards…
chill मारनेका क्या...” सर्वजण गाडीतून उतरले आणि
वाड्याकडे निघाले...
वाडा खूप जुना होता. कौलं, अंगण सगळं जुन्या
पद्धतीप्रमाणे. कुंपणाला भलं मोठं लोखंडी गेट होतं आणि गेटला त्याच्याच तोडीचं
कुलूप. पण ते कुलूप फक्त शोभेचं वाटत होतं कारण कडी तुटली होती. वाड्याच्या
समोरच्या बाजूला असलेल्या दोन खिडक्या आणि दरवाजा पाहून एखादी कवटी समोर ठेवली आहे
असाच भास होत होता. अंजूने आशूचा हात घट्ट धरला होता. म्हणाली, “किती भयाण आहे रे
इथे... आपण जाऊयात का परत...” आशू अंजूला दिलासा देत होता. आशू, विकी आणि राघवने
जोर लावून ते गेट ढकललं तसं मोठा आवाज करत ते उघडलं. सर्व एकेक करून आत गेले.
अंगणात उगवलेल्या झुडपातून मार्ग काढत दाराजवळ पोहोचले. विकी दार चाचपडून पाहत
होता की ते ‘क........र........’ असा आवाज करत उघडले गेले. जणू काही या सर्वांना
आत बोलावण्याठीच ते उघडलं गेलं होतं. सर्वजण एक पाऊल मागे झाले. हळूच कानोसा घेत,
इकडे-तिकडे पाहत सर्व आत गेले. आतला हॉल, वरच्या मजल्यावर जाणारे दोन जिने,
फर्निचर, सर्वकाही ठेवणीतलं होतं. वाड्यात खूप शांतता होती. एका भिंतीवर काही
तस्बिरी होत्या. बहुतेक वाड्यातील रहिवाशांच्या असाव्यात. सर्वजण त्या फोटोंसमोर
येऊन उभे राहिले. स्वातंत्य्रपूर्व काळातल्या आणि त्याही आधीच्या अशा बऱ्याच
फ्रेम्स होत्या. विकी म्हणाला, “यार, एक गोष्ट कळत नाहीये... फ्रेम्स तर खूपच
जुन्या आहेत पण त्यातले फोटो बघा... असं वाटतंय अलीकडेच बदललेत... आणि या बाकीच्या
फ्रेम्स रिकाम्या का आहेत...” सर्वांनी निरखून पाहिले तेव्हा त्यांनाही पटले. हा
काय प्रकार आहे याचा सर्व विचार करतच होते की... टण... टण... टण... टण... टण...
घड्याळाच्या
टोल्यांचा आवाज वाड्यात घुमत होता. सर्वजण एकमेकांकडे पाहू लागले. त्यांनी आपापली
घड्याळं पाहिली. साडे अकरा वाजले होते. “आत्ता तर साडे अकरा वाजलेत, मग पाच टोले
कसे...” सर्वांच्या मनात एकच विचार आला. “काय भानगड आहे पाहिलं पाहिजे...” विकी म्हणाला.
“अरे हो, पण समोर दिसत नाहीये घड्याळ... शोधायचं कुठे...” आशूने शंका काढली. राघव
पुढे झाला. म्हणाला, “असं करू... विकी, तू आणि रश्मी वर बघा... आम्ही तिघं खाली
बघतो...” सर्वांना राघवचं म्हणणं पटलं. आशू, अंजू आणि राघव खाली शोधू लागले आणि
विकी व रश्मी वर गेले. काही दारं बंद होती आणि काही उघडी होती. सर्वांना एकच अनुभव
येत होता. अंधारात पावलं टाकत, अंदाज घेत सर्व शोध घेत होते की, “विकी....
विकी.... काय झालं.... अरे दार उघड... विकी...” रश्मीच्या आवाजाने सर्वजण वर
धावले. रश्मी एका दाराला थाप मारत होती. अंजू म्हणाली, “काय झालं रश्मी... विकी
कुठे आहे...” रश्मी रडत होती. म्हणाली, “आम्ही शोधत होतो. सगळी दारं बंद होती.
विकीला हे दार उघडं दिसलं. मला बाहेर थांबवून तो आत गेला. आत जाताच दार आपोआप बंद
झालं. मला ‘धाप......’ असा आवाज आला आणि आता दार उघडत नाहीये.” राघवने दाराला हात
लावून पाहिलं. म्हणाला, “दार आतून बंद आहे... आशू चल, दार तोडावं लागेल...” आशू
आणि राघवने लाथा हाणून दार उघडलं. खोलीत एक मोठा आरसा, एक लाकडी कपाट आणि एक बेड
याखेरीज काहीच नव्हतं. बेडच्या बाजूला विकी पडला होता. त्याचे डोळे खूप मोठे झाले
होते. तोंड पूर्ण उघडलं होतं. राघवने विकीचा हात धरला. म्हणाला, “Guys….
He is dead….”
सर्वजण स्तब्ध होते. कोणाला काय बोलावं काळत
नव्हतं. “Guys…
आपण सर्व एकत्र इथे आलो. घड्याळाचा शोध घेत
होतो तेव्हा विकी रश्मीच्या डोळ्यांदेखत गायब झाला आणि हा असा सापडला. याचाच अर्थ
कोणीतरी सहावी व्यक्ती इथे आहे. कदाचित गुन्हेगार असतील. आपण आलो म्हणून घाबरून
त्यांनी हे कृत्य केलं असेल...” आशू सांगत होता. थरथरणाऱ्या रश्मीला शांत करत अंजू
म्हणाली, “अरे पण जर तो कोणी मनुष्य नसेल तर... रश्मी म्हणाली ना दार आपोआप बंद
झालं. आणि खोलीतही कोणी नाही...” राघव म्हणाला, “काही असो... विकी आपला मित्र
होता. आपल्यासोबत तो इथे आला. त्याच्या मृत्युचं कारण आपल्याला समजलंच पाहिजे.
राघव उठला आणि बाकी खोल्यांमध्ये पाहू लागला. आशू, अंजू आणि रश्मीही त्याच्यासोबत
निघाले. आशू म्हणाला, “विकीकडे एक टॉर्च मी पाहिला होता. तो घेऊन येतो. सर्व पुढे
झाले आणि आशू मागे फिरला. काही क्षणातच... टण... टण... टण... टण... घड्याळाचे चार
टोले पडले. सर्व थबकले. रश्मी अजून घाबरली. म्हणाली, “आ....पण पाच जण इथे आलो
तेव्हा घड्याळात पाच टोले पडले. विकी गेला. आ... पण चार जण उरलो. आता चार टोले
पडले....” राघवने विचार केला. म्हणाला, “आपण तिघं एकत्र आहोत पण आशू... Come on… he is
in danger…” तिघंही मागे फिरले. Passageमध्ये एका कपाटाजवळच्या खुर्चीत आशू बसला होता.
त्याचा चेहरा विकीसारखाच भेदरलेला दिसत होता. हातात उघडलेली टॉर्च होती. राघवने नाडी तपासली आणि नकारार्थी मान
हलवली...
“आशू...... नाही आशू.... मला सोडून जाऊ नकोस
रे.... ऊठ ना....” अंजूच्या आसवांचा बांध फुटला होता. आशूला उठवण्याचा ती कसोशीने
प्रयत्न करत होती. “अंजू, अगं सावर स्वत:ला...” अंजूच्या खांद्यावर हात ठेवत राघव
म्हणाला. त्याला रश्मीने बाजूला खेचलं. म्हणाली, “राघव, आतातरी ऐक माझं. चल आपण
इथून निघूया.” राघवला रश्मीचं म्हणणं पटलं. दोघं अंजूला उठवू लागले पण ती ऐकतच
नव्हती. शेवटी राघव म्हणाला, “रश्मी आपण आपलं सर्व सामान गोळा करू मग अंजूला
घ्यायला येऊ. तोवर अंजू तू इथेच थांब. कुठेही जाऊ नकोस.” राघव आणि रश्मी खाली आले.
सामान गोळा करू लागले. रश्मीची नजर सहज म्हणून फोटो लावलेल्या भिंतीकडे वळली. ती
भीतीने गोठली. राघवला इशारा करत थरथरत्या हाताने भिंतीकडे बोट दाखवलं. भिंतीवरच्या
दोन रिकाम्या फ्रेम्समध्ये विकी आणि आशूचे चेहरे दिसत होते. राघवचे डोळे
विस्फारले. तो म्हणाला, “रश्मी, आधी इथे पाच फोटो होते. आशू आणि विकी गेले आणि
त्यांचे फोटो इथे लागले. आणि ते कमी होणारे घड्याळाचे टोले... Oh my God… रश्मी... तू बरोबर होतीस... इथे आपल्याखेरीज जे
काही आहे ते मानवी नाही... चल आपल्याला लगेच निघायला हवं...” रश्मी आणि राघव
अंजूसाठी वळणार इतक्यात... टण... टण... टण... राघव आणि रश्मीने एकमेकांकडे पाहिलं
आणि “अंजू..............” दोघंही एकाच वेळी ओरडली. “खळळळळळळळळळळळळळळळ.......”
आवाजाकडे दोघांनी पाहिलं तर हॉलच्या मधोमध ठेवलेल्या काचेच्या टेबलाचा चक्काचूर
झाला होता आणि अंजू त्यावर गतप्राण होऊन पडली होती. अंजू गेली होती तरीही तिच्या
उघड्या डोळ्यातली भीती लपत नव्हती...
राघव आणि रश्मी जवळ गेले. “आ.....अंजू.....
उ..... ऊठ ना...” कापऱ्या स्वरात रश्मी म्हणाली. अंजू उठत नाही याची खात्री पटली
आणि रश्मीचं अवसान गळलं. “आ.... आपण मारणार आहोत.... विकी, आशू, अंजू.... आ....पण
न....नाही वाचणार.... ना....ही....” रश्मी कशीबशी पुटपुटली. राघव तिला शांत करू
लागला. दोघांनी फोटो असलेल्या भिंतीकडे पाहिलं तर एका रिकाम्या फ्रेममध्ये अंजूचा
चेहरा दिसू लागला. आतामात्र दोघंही प्रचंड घाबरली. दार उघडायला धावली. पण दर बंद
होतं. काही केल्या उघडेना. राघव म्हणाला, “रश्मी आपल्याला इथून बाहेर पडायचं आहे. हे
दार बंद आहे आणि माझ्या एकट्याने ते नाही उघडणार. पण या खिडक्या बघ... त्या तोडता
येतील. तू तिथे बघ मी या बाजूला बघतो. अशी एखादी वस्तू शोध जिने खिडकी तोडता येईल.
हो, पण आपण एकमेकांच्या नजरेसमोरच राहू.” दोघंही शोध घेऊ लागली. रश्मीच्या हाताला
एक फुलांची रिकामी कुंडी लागली. उचलायला जड असली तरी दोघांनी ती उचलली तर खिडकी
तोडून बाहेर जाता येणार होतं. कुंडीकडून राघवकडे वळत असताना... टण... टण...
टोल्यांच्या आवाजाने रश्मी गोठली. “कोणाची वेळ आली असेल... माझी की राघवची...” हा
विचार करत ती वळली तर राघव कुठेच नव्हता. “राघव.... राघव.... रा....” ओरडत असताना
तिला टेबलजवळ पडलेला राघव दिसला. तिने जवळ जाऊन पाहिलं तर राघवचं तोंड उघडं होतं
आणि डोळे विस्फारले होते...
रश्मी कापू लागली. जागेवर उभी राहिली. तिने
सगळीकडे नजर फिरवली. अंधारात तिला काहीच दिसत नव्हतं. फक्त जाणवत होता क्षणोक्षणी
जवळ येणारा मृत्यू. जीवाच्या आकांताने रश्मी पळत सुटली. “वाचवा.... वाचवा.... कोणी
आहे का.... मला बाहेर काढा...” असं ओरडत खिडक्या, दारं वाजवू लागली. आणि.... “कुठे
पळतेस रश्मी.... आता तुझाच नंबर आहे...” आवाजाने रश्मीचं काळीज धडधडू लागलं. तिने
हळू हळू मागे पाहिलं... तिचे डोळे विस्फारले... तिला ओरडायचं होतं पण तिच्या
उघड्या तोंडातून आवाजच फुटत नव्हता... आणि... टण..... टोल्याचा नाद सगळीकडे घुमत
होता...
“सर्व बॉड्या ताब्यात घ्या आणि Post Mortemसाठी पाठवा... अजून काही मिळतंय का ते बघा...”
इंस्पेक्टर साहेब आपल्या लोकांशी बोलत होते. चला शिंदे... आपण बाहेर जाऊ... ज्याने
complaint
केली त्यांच्याशी बोलू...” दोघं बाहेर आली.
“पोलिसात वर्दी कोणी दिली होती...” इंस्पेक्टर साहेबांचा धारदार आवाज ऐकून एक
माणूस पुढे आला. म्हणाला, “सायेब, ही समदी मुलं काल रातच्याला हितं भेटली व्हती.
त्यांची गाडी बंद पडली व्हती. म्या त्यासनी सांगितलं की आत जाऊ नगासा पर त्यांनी
ऐकलं न्हाय. सकालच्या पारी म्या हितं आलू तवा गाडी बी हितंच व्हती आनी हे फटकसुदिक
उघडं व्हतं. म्हनून म्या तुम्मासनी खबर दिली.” इंस्पेक्टर साहेब सर्व ऐकून घेत,
“ठीक आहे...” असं म्हणून मार्गस्थ झाले...
Post Mortem
report आला. सर्वांच्या मृत्युचं कारण... Cardiac
Arrest… हृदयक्रिया बंद पडल्याने अकस्मात झालेला
मृत्यू... पण... ही सर्व मुलं तर तरुण होती... याचा अर्थ... तिथे त्यांना जिवाचा
थरकाप उडवणारं, असं काहीतरी भयानक दिसलं, की भीतीने त्यांची हृदयं बंद
पडली... काय घडलं असावं काल... असं काय
दिसलं असावं त्यांना... हे एक गूढ आहे... आजही हा वाडा, आपले बाहू पसरून एखाद्या
अक्राळ विक्राळ राक्षसासारखा आपल्या भक्षाची वाट पाहत आहे... आणि त्या घड्याळाच्या
टोल्यांमधून, जणू मृत्यूच हाक मारत आहे...
टण... टण... टण... टण...
समाप्त.
No comments:
Post a Comment